डॅमच्या कडेला कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मारेगाव : काम आटोपलं आणि सहजच डॅमचा आनंद लुटायला गेलेल्या कारने अनाचक पेट घेतल्याची घटना मार्डा डॅम वर घडली. यामध्ये कार जळून खाक झाली असून, कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. सदर घटना आज शनिवारी घडली.

राजुरा येथील बालाजी संभाजी लिपटे हे रेनो कंपनी कार क्र. एम एच 14 EU1963 या वाहनाने राजुरा येथून वरोरा मार्गे मुकटा (ता. मारेगाव) या परिसरातील शेत बघण्यासाठी आले असता वर्धा नदीवरील मार्डा डॅम वर असलेल्या पुलावर अचानक कारने पेट घेतला. दरम्यान कारमध्ये तिघे जण बसले होते. शनिवार दुपारची वेळ, कडक उन्हाचा पारा, कारमध्ये शॉर्टसर्किट होऊन किंवा इंजिन गरम झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. प्रसंगवधान साधून कार मधील बाहेर पडले त्यामुळे जीवीतहानी टळली.

बाहेरगाववरुन येणाऱ्या कारने अचानक पेट घेतल्याचे दृष्य कॅमेरात कैद होऊन वाऱ्यासारखे सोशल माध्यमावर परसले, याबाबत स्थानिकांशी चर्चा केली असता नानाप्रकारची चर्चा ऐकावयास मिळतेय... या लागलेल्या अचानक आगीत कार जळून खाक

झाली. 

रेल्वे प्रशासनाने नागरिकांना बेघर करु नये – पालकमंत्री श्री. मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

चंद्रपूर : जलनगर येथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरसकट कारवाई करून नागरिकांना बेघर करु नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. नियोजन सभागृह येथे जलनगर रेल्वे प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासन, रेल्वेचे अधिकारी व नागरीकांसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, ब्रिजभूषण पाझारे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘सर्वांना घरे’ ही प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, एकीकडे नागरिकांना घरे देण्याची योजना असताना रेल्वे प्रशासन नागरिकांना बेघर करीत आहे. अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे बोर्डाचा कोणताही आदेश आला तर सर्वात प्रथम जिल्हा प्रशासन व पालकमंत्री कार्यालयाशी रेल्वे प्रशासनाने संपर्क करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाला जमिनीची आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मागावे. नागरिकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्यात यावे. सरसकट कारवाई करून नागरिकांना बेघर करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
३५-४० वर्षांपूर्वी जेव्हा अतिक्रमण झाले तेव्हा रेल्वेने काहीही म्हटले नाही. रेल्वेला आता अतिक्रमणाची आठवण आली. या शहरावर पहिला हक्क स्थानिकांचा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रथम नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करावी, नंतरच अतिक्रमणाला हात लावावा. तसेच रेल्वेने आता कोणतेही नवीन अतिक्रमण होऊ देऊ नये, मात्र जुन्या घरांना हात लावू नका. राज्य शासनाच्या घरकुल योजनेत रेल्वेनही आर्थिक सहकार्य करावे. याबाबत आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

भाषागौरव दिनी वणीत मनोज मोहिते यांचे व्याख्यान

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या विदर्भ आवृत्तीचे वृत्तसंपादक मनोज मोहिते यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता मराठीचे मराठीपण या विषयावर होणाऱ्या या व्याख्यानप्रसंगी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक व इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मानसकुमार गुप्ता हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लोकमान्य टिळक सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानास अभ्यासक नागरिक पालक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे, आवाहन मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख डॉ. अजय देशपांडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजेन्द्र कोठारी, प्रा.उमेश व्यास, प्रा.मनोज जंत्रे, प्रा.किशन घोगरे, डॉ.विकास जुनगरी, प्रा.बाळा मालेकर, प्रा.प्रिया नगराळे, प्रा.राहुल खोंडे, प्रा.दिपाली ठावरी, पंकज सोनटक्के हे परिश्रम करीत आहे.

भावना म्यान केल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही : सागर मुने


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी :   "माता पितांबद्दल परम श्रद्धा आणि त्यांच्या स्वप्नानुसार वागणे,शत्रूंना देखील विश्वास वाटावा असे अद्वितीय चरित्र आणि सर्वसामान्य प्रजाजनांमध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवत अठरा पगड जातीचे मर्द मावळे तयार केले. स्वराज्य आणि स्वदेश याबाबतीत प्राण समर्पित करणे इतकी निष्ठा जागृत करणे. या सर्वच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू काही भगवान राजा रामचंद्र यांच्या चरित्राचे अनुकरण करीत प्राप्त केल्या, त्यामुळेच शिवछत्रपतींचे राज्य रामराज्य प्रमाणे आदर्श राज्य ठरले. माता पिता आणि संस्कृती बद्दलचा आदर, चारित्र्य आणि राष्ट्रनिष्ठा हाच शिवप्रभूंची शिकवण आहे. महाराजांचे विचार, लिहण्याचे, ऐकण्याचे, पाहण्याचे नसून जगण्यासाठी आहे. प्रसंगी भावना म्यान केल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही." असे विचार युवा पत्रकार आणि व्याख्याते सागर मुने यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असलेल्या माझं गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेच्या अठराव्या सत्रात "थोरलं राजं सांगून गेलं !" या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार तथा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे उपस्थित होते. प्रास्ताविकात माधव सरपटवार यांनी आज प्रथमच व्याख्याता म्हणून उपस्थित होत असलेल्या युवा पत्रकाराचे स्वागत करीत हाच या उपक्रमाचा उद्देश आहे हे अधोरेखित केले.
      
आपल्या शांत,संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषणात सागर मुने यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग मांडत त्यातून महाराजांनी आजच्या काळात आपल्याला दिलेला बोध उलगडून दाखविला. रामचरित्रासोबत शिवचरित्राचा असलेला सहसंबंध हा त्यांच्या विवेचनाचा विशेष आकर्षण बिंदू ठरला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये छत्रपती शिवराय हा डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात साठवण्याचा विषय आहे असे प्रतिपादन डॉ. दिलीप अलोणे यांनी केले.
        
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी तर आभारप्रदर्शन सचिव डॉ अभिजित अणे यांनी केले. जुमडे मॅडम यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेंगावार, प्रमोद लोणारे, देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

चंद्रपूर : कृषीपासून ते उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर भारत करण्याचा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे. कृषी क्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून ख-या अर्थाने शेतकरी हाच खरा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चांदा क्लब येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक नंदकुमार घोडमारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुळकर उपस्थित होते.

कृषी क्षेत्राच्या भरभराटीसाठी जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ राबविण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे सिंचनाच्या व्यवस्था करण्यात येईल. राज्यातील सर्व माजी मालगुजारी तलावाच्या नुतणीकरणासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती आपण उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. येत्या अर्थसंकल्पात ही घोषणा होणार असून पहिल्या टप्प्यात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी हे अमृत आहे. आपली गावे कसे वॉटर न्यूट्रल करता येतील, त्याबाबत नियोजन करावे. यासाठी खनीज विकास निधी, नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ.

पाच दिवस चालणा-या या कृषी महोत्सवात एकूण 211 स्टॉल लागले असून यातून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक माहिती मिळेल. जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रेसर राहावा, यासाठी आपण कटिबध्द आहोत. अर्थमंत्री असतांना आपण सहकारी शेतीची संकल्पना मांडली. राज्यात 1 कोटी 37 लक्ष शेतकरी भोगवटादार असून 1 कोटी 7 लक्ष शेतकरी अल्पभुधारक आहेत. ‘चांदा ते बांदा’ योजनेत कृषी आर्मी करण्याचा आपण संकल्प केला होता. दुस-याचे पोट भरणारा शेतकरी उपाशी राहणे योग्य नाही. त्यासाठी सामुहिक शेती हा चांगला पर्याय आहे. शेतकरी प्रक्रिया उद्योगांचे जाळे विणण्यासाठी शेतकरी समोर येत आहे.

पुढे पालकमंत्री म्हणाले, रक्त आणि पोट भरणारे धान्य कृत्रिमरित्या निर्माण करता येत नाही. अलिकडच्या काळात शेती करण्याकडे कल कमी झाला आहे. शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय होणे आवश्यक आहे. शेत तिथे मत्स्यतळे अशी योजना राबविण्यात येणार आहे. किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अल्पदरात शेतक-यांना कर्ज मिळू शकते. जिल्ह्यात भाजीपाला क्लस्टर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कृषी स्टार्ट अपमध्ये पहिला शेतकरी आपल्या जिल्ह्यातून व्हायला पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. शेतक-यांनो केवळ कृषी प्रदर्शनी बघू नका तर नवीन तंत्रज्ञान घेऊन शेती जगविण्याचा विचार करा.

पुढील वर्षी कृषी महोत्सव हा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावा. या कृषी महोत्सवाकरीता शेतकरी, नागरीक यांच्या सुचना मागण्यासाठी आजपासूनच येथे एक बॉक्स ठेवा. उत्कृष्ट सुचना देण्या-यांना आपल्या स्वत:कडून 11 हजार, 5 हजार व 3 हजार असे बक्षीस देण्यात येईल. तसेच पुढील महोत्सवात एक दिवस कृषी साहित्य अधिवेशन, एक दिवस सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन असे सत्र आयोजित करावे. अत्याधुनिक नर्सरीच्या बाबतीत शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी नाविन्यपूर्ण किंवा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला आहे. त्यामुळे पशुधनासाठी चांगले कुटार उपलब्ध होईल. कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा शेतक-यांनी अवलंब करावा. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शेतक-यांपर्यंत शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान पोहचविणे, हा यामागचा उद्देश आहे. शेतक-यांनी खाजगी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे दुबार – तिबार पिके घेतली तर शेतक-यांचे उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार उपसंचालक रविंद्र मनोहरे यांनी मानले. कार्यक्रमाला शेतकरी प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधी, विविध स्टॉलचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

पशु प्रदर्शनीला भेट :
जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चांदा क्लब समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडवर पशु प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व पशुपालकांशी संवाद साधला.