सुरमाज फाउंडेशनच्या वतीने आत्मनिर्भर महिलांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : फेब्रुवारी 2022 मध्ये सूरमाज फाउंडेशन च्या वतीने स्किल इंडिया डेवलपमेंट फॉर वूमेन ही योजना सुरू करण्यात आली होती. ज्याअंतर्गत अनेक महिलांना टेलरिंग क्लासेससाठी फी देण्यात आली होती आणि आज 25 ऑक्टोबर 2022 यापैकी काही महिलांनी त्यांचा कोर्स उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे आणि आता ते लोक आपले कुटुंबाची गरजा पूर्ण करू शकतात. म्हणूनच तिच्या कामाचा कौतुक करताना, सूरमाज फाऊंडेशनने महिलांचा सन्मान केला आणि इतर महिलांना उत्साहित केला की लवकरच त्यांनी आपला कोर्स पूर्ण करून आत्मनिर्भर व्हायला पाहिजे
कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुराण पाकने करण्यात आली तसेच संचालन डॉ.एम.डी.रगीब साहिब यांनी केले तर शिवलेले कपड्यांचा उघडण्यासाठी प्रशिक्षक शमीम तेली साहिबा यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अतिथी शेख मुजाहिद-ए-इस्लाम यांनी सांगितले की, आपणही महिलांना स्वयंभू बनवायला हवे. जे हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमज फाऊंडेशन) यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला, त्याच बरोबर कार्यक्रमात उपस्थित सर्व लोकांनी शिवलेल्या कपड्यांचे व कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांचे कौतुक केले आणि ठेकेदार आरिफ कॉन्ट्रॅक्टर साहेब, सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई अबुलैस शेख चे डॉक्टर मोहम्मद जुबेर शेख यांनी सूरमाज फाउंडेशनचे वतिने सर्वाचं आभार मानले.

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री चौफेर | न्यूज 

गडचिरोली : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जनजागरण मेळाव्याप्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

धोडराज येथील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत असून रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.

गत दोन वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस हा महत्त्वाचा घटक असून पोलिसांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात आमुलाग्र बदल झालेला दिसत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी येथे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला ही बाब संपूर्ण पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाची आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत असून राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत होत आहे.

प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तत्पूर्वी धोडराज येथील पोलीस मदत केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लो, माळी गुमा मासा, शांती कुतु मज्जू, चैते चैतू पल्लो यांना साडीवाटप, राजे चैतु पुंगाटी, जैनी वड्डे, इंदरसाय गावडे यांना ब्लॅंकेट वाटप, रेश्मा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीन, परी दिनेश पुंगाटी, मोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग तर बबलू देवाजी सिडाम, सोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विनीत पद्मावार यांनी तर आभार पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी मानले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस जवान तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.

पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे - गीत घोष



सह्याद्री चौफेर | नितीन वनकर 

राळेगाव : जगातील लोकांच्या हक्कासाठी आवाज उचलने हेच वृतपत्राचे काम असून पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे असे उदगार साप्ताहिक राळेगाव समाचारच्या दीपोत्सव दिवाळी अंकाचे उद्घाटक म्हणून उदघाटन करित असतांना प्रगतशील साहित्य व विचारवंत मा. गीत घोष यांनी काढले. ते साप्ताहिक राळेगांव समाचार दिपअंक प्रकाशन सोहळ्याचे उदघाटक म्हणून यावेळी बोलत होते.

साप्ताहिक राळेगांव समाचार कार्यालय, इंदिरा नगर तहसील समोर, राळेगांव पारपडलेल्या यार सोहळ्याचे अध्यक्ष मा.ना. माजी शिक्षणमंत्री म.राज्य वसंतरावजी पुरके साहेब होते ,उदघाटक मा.गीत घोष हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा.आशिष कांबळे अमरावती हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.रविंद्र शेराम, नगराध्यक्ष न.पंचायत, राळेगांव, श्रीमत उषाताई भोयर जि.प.सदस्या, यवतमाळ, मा.चित्तरंजन कोल्हे ता.अध्यक्ष पा.ज.पा.तथा जि.प. सदस्य, मा.प्रशांत तायडे, सभापती पंचायत समिती, राळेगांव, मा.अरविंद वाढोणकर,जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल जिल्हा कांग्रेस कमिटी, यवतमाळ, मा.जानराव गीरी, उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगांव, मा.अड.प्रफुल चौहान, जिल्हा महामंत्री भाजपा, यवतमाळ, मा.अड. फिडेल बायदाणी, जेष्ठ विधिज्ञ, राळेगांव, मा. अरविंद फुटाणे, ता.अध्यक्ष भाराका,राळेगांव, मा.शंकर वरघट, जिल्हा उपाध्यक्ष मनसे, यवतमाळ, मा.विनोद काकडे, तालुका प्रमुख शिवसेना, राळेगांव, मा. राजेश काळे,तालुका अध्यक्ष पत्रकार संघटना, राळेगांव, मा.नंदकुमार गांधी, सभापती, वसंत जिनिंग, राळेगांव, मा.मिलींद इंगोले, अध्यक्ष खरेदी विक्री संघ, राळेगांव, मा.सचिन हुरकुंडे, अध्यक्ष ग्रामविकास सोसायटी, राळेगांव, मा. कुदनभाऊ कांबळे, नगरसेवक, नगर पंचायत, राळेगांव, सौ.कमरूनिस्सा हमिदभाई पठाण, नगरसेविका नगर पंचायत,राळेगांव, सौ.पुष्पाताई विजय कन्नाके, नगरसेविका, नगर पंचायत, राळेगांव ह्या उपस्थित होत्या.
(साप्ताहिक राळेगाव समाचारच्या दीपोत्सव दिवाळी अंकाचे उद्घाटक प्रसंगी उपस्थित मान्यवर)

पुढे बोलताना घोष म्हणाले की, हा आहे रे आणि नाही रे या दोन विचालधारेतील संघर्ष असून तो संघर्ष कमी होण्याऐवजी अधिक तिव्र होतांना दिसते आहे. लोकांचे संविधानिक हक्क सोडवण्याऐवजी कुंठित केले जात आहे, लोकांचा आवाज दाबल्या जात आहे. लोकांच्या बाजूने आवज उठवणाऱ्या पत्रकार विचारवंतांना जेल मध्ये डांबले जात असूश देशातील सत्ता तानाशाहीचे रुप धारण करुन देशातील कष्टकरी, शेतकरी व नागरिकांना देशोधडीला लावत आहे आणि वृतपत्राने राजकीय स्वरुप धारण करुन लोकांच्या बाजूने बोलने, लिहणे बंद केले आहे त्यामुळे आपल्या देशाची आज ही अवस्था आहे.या अवस्थेतून बाहेर पडाये असेल तर वृतपत्र आणि पत्रकारांनी निर्भिडपणे लोकांच्या बाजूने लिहायला लागले पाहिजे आणि लोकांनी देखील आम्ही भारताते नागरिक म्हणून सत्तेला प्रश्न विचारायला रस्त्यावर उतरले पाहिजे कारण ज्या देशातील जनता मुखी तो देश भांडवलशाहीच्या पारतंत्र्यात जगावे लागते,असेही ते म्हणाले. प्रमुख वक्ते प्रा.आशिष कांबळे यांनी देखील आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून ह्या व्यवस्थेचा खरपून समाचार घेत पत्रकारांनी लोकांच्या हक्कासाठी लढले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.

या प्रसंगी मा.वनीश घोसले, सरपंच ग्रामपंचायत पळसकुंड,मा. विजय धानोरकर, उपसरपंच, गट ग्रामपंचायत वाटखेड यांचा सत्कार घेण्यात आला.
या सोहळ्याचे प्रास्ताविक मा.फिरोज लाखाणी संपादक साप्ताहिक राळेगांव समाचार यांनी केले तर संचालन- मझीनी बायदाणी यांनी केले. हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी समीर लाखाणी, शकील लाखाणी आणि साप्ताहिक राळेगांव समाचार परिवारातील, वितरक,वार्ताहर यांनी अथक परिश्रम घेतले.

वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री चौफेर | न्यूज 

नागपूर : राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केली.

येथील अजनी परिसरात सेंटर रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
केंद्र शासनामार्फत पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. दीपोत्सवाच्या पर्वावर हा रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नागपूर येथे आज २१३ युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास ३८ विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. आज एकाच दिवशी देशभरात ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर देशातील विविध भागात मान्यवरांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात 10 लक्ष नोकरी भरतीचे लक्ष ठेवले आहे. राज्य शासनालाही अशावेळी मैदानात उतरावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपल्या नेतृत्वातील राज्य सरकारची तरुणांना नोकरी देणे ही प्राथमिकता असणार आहे. त्यामुळे वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. त्याची सुरुवात लवकरच १८ हजार युवकांची पोलीस दलामध्ये तसेच १० हजार युवकांची ग्रामविकास विभागातील भरतीद्वारे केली जाईल, असे घोषित केले.
राज्यातील खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आहे. खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांना ज्या पद्धतीचे कौशल्य हवे आहे, त्या पद्धतीच्या कौशल्य निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्या मोठ्या संख्येने मिळाव्यात. यासाठी नोकरी देणारे व नोकरी हवे असणारे यांचे प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघ निहाय रोजगार मेळावे आयोजित करणार असल्याचे सांगितले.

यावेळी केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाच्या विशेष निमंत्रणावरून कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही संबोधित केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठविण्याची घोषणा केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने हे धाडसी पाऊल उचलल्यामूळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती ही प्रक्रिया यापुढे गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक ऋचा खरे यांनी केले.

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत उणे प्राधिकार पत्रे काढण्‍याची सुविधा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसानग्रस्‍त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्याने अनुदान उपलब्ध होण्याची वाट न पाहता आता अशा प्रकरणात तात्काळ दावा मंजूर करता येणार आहे. संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास नुकसान भरपाई प्रदान होईल याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्ती आणि त्‍याबाबत लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी देण्‍यात आलेल्‍या निवेदनांच्‍या अनुषंगाने तसेच येणारा दिवाळी सणाचा कालावधी लक्षात घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणांमध्‍ये तात्‍काळ नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व्‍यक्‍तीशः लक्ष घालावे. क्षेत्रीय स्‍तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्‍यावा व संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई प्रदान होईल याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासन स्‍तरावरून मंजूर व प्राप्‍त रूपये ४० कोटी अनुदान सर्व वनवृत्‍तांना त्‍यांनी वेळोवेळी केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने वितरीत करण्‍यात आले होते. सदर वितरीत अनुदान पूर्णतः खर्च झाले असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍ती तसेच इतर ग्रामस्‍थांमध्‍ये वन्‍यजीव व शासनाप्रती असंतोष निर्माण होऊ नये तसेच वनविभागामार्फत वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत राबविण्‍यात येणाऱ्या योजनेद्वारे संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास नुकसानभरपाई प्रदान केली जाते. या प्रकरणी स्वत: वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष घालून शासनस्‍तरावरून या योजनेत उणे (-) प्राधिकार पत्रे काढण्‍याची सुविधा अर्थसंकल्‍पीय वितरण प्रणालीवर उपलब्‍ध करून दिल्‍यामुळे वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान झालेल्‍या व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास अनुदान उपलब्‍ध होण्‍याची वाट न पाहता तात्‍काळ दावा मंजूर करून नुकसान भरपाई देण्‍यात येत आहे.