एक दिवस बळीराजासाठी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

आपल्या देशात सुमारे 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील लोकांची उपजिवीका शेती व्यवसायावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यातून येणारे नैराश्य व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतची कारणमिमांसा योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे.
             
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत, त्यावर कोणत्या उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घेता येतील यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन अडचणी समजून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याविषयीच्या माहितीवर आधारित लेख.
 
प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामात येणाऱ्या अडचणी त्यांच्यासोबत विविध कामात सहभाग घेऊन सोडवण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सहभागी होणारे अधिकारी

या उपक्रमामध्ये राज्यस्तरावरील कृषिचे प्रधान सचिव, आयुक्त, कृषि संचालक तर विद्यापीठस्तरावरील शास्त्रज्ञ यामध्ये कृषि विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठांचे विभाग प्रमुख, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता सहभाग घेतील.

विभागस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये विभागीय आयुक्त, विभागीय कृषि सहसंचालक तर जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) व इतर जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी असतील. उपविभागीय स्तरावर महसूलचे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व इतर उपविभागीय स्तरीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व इतर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

या उपक्रमामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी द्यायच्या आहेत.

गावांची व शेतकऱ्यांची निवड

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’
या उपक्रमात भेट देणाऱ्या गावाची निवड करताना दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू, आदिवासी, सामाजिक व दुर्बल असणारे क्षेत्राची निवड करण्यात येईल. गावाची निवड करताना संबंधित अधिकारी/पदाधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयापासून दूरची गावे निवडण्यात यावीत. गावाची निवड लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांना करुन द्यावी तसेच भेट देण्यात येणाऱ्या शेतकऱ्याची निवड करताना शक्यतो कोरडवाहू शेतकऱ्याची निवड करावी.

उपक्रम कालावधीत घ्यावयाची माहिती

अधिकारी, पदाधिकारी यांनी गावाची निवड केल्यानंतर गावातील शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था, गावातील बँका, सोसायटी, दूध संस्था शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत देतात याबाबत चर्चा करावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे येणारे उत्पादन, खर्च व बचत याबाबत त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करुन माहिती घ्यावी. आत्महत्याग्रस्त विभागामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या नैराश्याची कारणे शोधावी. त्याअनुषंगाने त्यांच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घेता येतील याचा सविस्तर अहवाल तयार करावा.

भेट देणाऱ्या गावामध्ये ग्राम कृषी विकास समितीची बैठक घेऊन त्यामध्ये गावाच्या पीक पद्धती, बदल करावयाच्या पीक पद्धतीबाबत तसेच शेतकरी वापरत असलेल्या तंत्रज्ञानाबाबत सविस्तर चर्चा होईल. तसेच ग्राम कृषी विकास आराखड्यावरही चर्चा घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेबाबतच्या विविध योजनांची माहिती देण्यात येईल. विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे शेती करतानाचे अर्थकारण समजावून घ्यावे. नवनवीन तंत्रज्ञानाची पिकनिहाय वाणांची माहिती, गावामध्ये बैठका घेऊन देण्यात येईल.

गावातील शेतकरी, उत्पादक कंपन्या, बचत गट, महिला बचत गट, गटशेती उपक्रम इत्यादी माध्यमातून यशस्वी झालेल्या उपक्रमांना भेटी दिल्या जाणार आहेत. एकूणच ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल.

विभागीय माहिती कार्यालय,पुणे

सावली तालुक्यात स्वाईनपल्यू (H1N1) चा रुग्ण आढळला; आरोग्य यंत्रणेत खळबळ....


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यातील एका रुग्णाला स्वाईन पल्यू (H1N1) ची लागण झाल्याने मोठी खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा त्वरित कामाला लागलेली असल्याचे दिसत आहे.

सावली तालुक्यातील पालेबारसा येथे एका व्यक्तीला ताप येत होता. त्याची लक्षणे योग्य वाटत नसल्याने त्याला गडचिरोली जिल्ह्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्याच्या तपासणी अंती अहवाला नंतर त्याला स्वाईन पल्यू लागण झाल्याची माहिती सावली तालका आरोग्य विभागाला माहिती होताच एकच खळबळ माजली आहे.

सावली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री औघड यांनी या बाबत वरिष्ठांना माहिती देवून घटनास्थळ गाठले.
पालेबारसा या गावात प्रत्येक घरी तपासणी चे काम हाती घेतले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे व आरोग्याची काळजी घ्यावी असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील प्लेसमेंट सेल व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. गजानन सोडणर तर मार्गदर्शक म्हणून BYJU'S या ऑनलाईन प्लॅटफॉर्म लर्निंग सेंटर मधील प्रा. राऊत सर तसेच प्लेसमेंट सेल चे समन्वयक डॉ. संतोष गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमूख, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. विजय भगत आणि गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विभा घोडखांदे मॅडम उपस्थित होत्या.
(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी )

सदर स्पर्धा परीक्षेबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले प्रा. राऊत सर यांनी वर्तमानकाळात स्पर्धा परीक्षेची वाढत चाललेली आव्हाने आणि यशप्राप्ती याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गजानन सोडणर सर यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निर्माण होणारी विविध शासकीय व खासगी क्षेत्रातील पदे व अभ्यासक्रम याविषयी संबोधन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गायकवाड सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन B. Com. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. वेदश्री राऊत आणि आभार प्रदर्शन प्रा. भगत सर यांनी केले.

कार्यशाळेच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता समस्त प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

लम्पी आजाराला वेळीच घाला आळा; पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी स्कीन’ हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी काळजी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचविता येईल.

आजाराची प्रमुख लक्षणे

आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीना सूज येते. सुरवातीस ताप येतो. दुधाचे प्रमाण कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, मायांग, कास इ. भागाच्या त्वचेवर १०-५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात. तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

सन २०२०-२१ मध्ये राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये, तसेच २०२१-२२ मध्ये १० जिल्ह्यांत लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव आढळून आलेला होता. सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.

राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी स्कीन डिसिज सदृष्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर राज्यामध्ये अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.

एकूण ७१ गावांमध्ये लम्पी स्कीन रोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील ३०१ गावातील एकूण १ लाख ३४२ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावांतील एकूण ७६२ बाधित पशुधनापैकी एकूण ५६० पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ९ व पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील १ असे एकूण १० बाधित जनावरांमध्ये मरतुक झाली आहे.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. जनावरामध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.

बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २-३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करता येईल.

या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. या रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड आदी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी.

रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४ (१) नुसार पशुंमध्ये या रोगाची लक्षणेआढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था,संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी याबाबतची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

लम्पी स्कीन रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने, पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास माहीती तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

संकलन:

जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

ठाणे : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित 5 व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत ठाण्यातील काजूवाडी येथील महानगरपालिका शाळेत झाला. यावेळी श्रीमती सुमित्रा गुप्ता, उपायुक्त गोकुळ देवरे, एकात्मिक सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर यांच्यासह लाभार्थी महिला, बालके व नागरिक उपस्थित होते.



राष्ट्रीय पोषण महिना शुभारंभानिमित्त सकस पाककृती प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा व श्रीमती सुमित्रा गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. लोढा यांनी अंगणवाडीतील बालकांशी व अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून पोषण आहाराविषयी माहिती घेतली. गरोदर महिला व सुदृढ बालकांना सकस फ्रूट बास्केट, स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप मंत्री श्री. लोढा व श्री. म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. लोढा म्हणाले की, राज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्याच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मूल सक्षम तर देश सक्षम असा संदेश दिला होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन काम करत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

श्री. मस्के म्हणाले की, महिलांचे व बालकांचे पोषण महत्त्वाचे आहे. गरोदर महिलांना योग्य व सकस आहार दिल्यास बालकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. यासाठी महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. अनेक महत्त्वाचे उपक्रमही या विभागाच्या वतीने घेण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा.

श्रीमती अग्रवाल यांनी प्रास्ताविकात पोषण महिना कार्यक्रमाची माहिती दिली. राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या काळात 1 लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण महिना उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. बालकांचे वजन तपासणे, सकस आहारासंबंधी जनजागृती करणे, महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्वस्थ बालक-बालिका स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी यावेळी दिली. श्री. क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पोषण शपथ घेण्यात आली. तसेच अंगणवाडी सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.