सेवावर्ती समाजसेवक शेषराव इंगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्य सत्कार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : म.राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले श्री शेषराव इंगळे यांचा सपत्नीक सत्कार ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकरराव उईके यांचे हस्ते जिजाऊ भवन पुसद रोड, उमरखेड येथे करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय अध्यक्ष प्रा. उईके म्हणाले की, आपण कर्मचारी म्हणून सेवा देत असताना त्या सोबतच समाज सेवा देखील केले पाहिजे. आपण शिकलो सुशिक्षित झालो नोकरीला लागलो. परंतु आपला समाज बांधव आज देखील गाव खेड्यात मार्गदर्शना अभावी आपल्या हक्का पासून वंचित राहतो आहे. त्यांचे साठी देखील आपण वेळ काढून त्यांना मार्गदर्शन करावे. म्हणजे आपण आपल्या समाजासाठी काही अंशी कामी आलो व समाज ऋण फेडल्यासारखे होईल. त्या अनुषंगाने आपल्या समाजाची प्रगती होईल आणि हेच सेवाभावी वृतीने शेषराव इंगळे समाज सेवेचे कार्य करीत आहेत.

शेषराव इंगळे हे सेवेत असताना आपली जाबदारी सांभाळून आदिवासी ग्रामीण भागात सामूहिक विवाह मेळावे, रक्तदान शिबीर, महिलां मेळावा, सांस्कृतिक व समाज प्रबोधन मेळावे आणी सर्व आदिवासी कर्मचाऱ्यांचं संघटन करण्याचे कामे करीत आले आहेत. आजच्या प्रसंगी जमलेली असंख्य स्नेही मंडळी त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांनी समाजकार्य, सत्कार्य केले म्हूणन आपण त्यांचा सत्कार करित आहोत.
या प्रसंगी बिरसाक्रांती दलाचे राज्यध्यक्ष रंगराव काळे, ऑ. ई. आदी. एम्प. फेड. केंद्रीय कार्यअध्यक्ष सुरेश कनाके, राज्य उपाध्यक्ष गुलाबराव कुळमेथे, केंद्रीय सदस्य पवनकुमार आतराम,यांनी आपले विचार व्यक्त केले.

या वेळी प्रल्हाद सिडाम, शंकर कोटनाके,नारायण कराळे, दतराव ब्राह्मटेके, शंकरराव नाटकर, किशोर उईके,विजय गेडाम, अभिमन्यू धुर्वे, प्रा.गजानन कोवे, डी. बी. अंबोरे दत्ता उगले, के. पी. पांडे,आर. डी. तोडकर, व ऑ. ई. आदी. एम्प. फेडरेशन व बिरसाक्रांती दल, एस. टी. महामंडळाचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. 


कडाक्याच्या उन्हात ९ वर्षांच्या चिमुकल्या मिसबाहने ठेवला रमजानचा रोजा


रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : रमजानचा महिना सुरू होताच, ९ वर्षांच्या चिमुकल्या मिसबाह शरीफने रमजान चा पहिला रोजा ठेवला. जिथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे, अशा परिस्थितीत स्पोर्ट्स आईस्क्रीमचा आग्रह धरण्याचे वय असताना मिसबाह ने सारे खेळ बाजूला सारून रोजा करीत आहे.

इस्लाम धर्मातील सर्वोच्च आणि उपासनेचा महिना मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात मिसबाह शरीफ यांनी पालकांचा आग्रह धरून पहिला उपवास ठेवला आहे. मुस्लीम धर्मातील लहान मुले समाज, तरूण वडिलधारी मंडळीही उपवास आणि नमाज पठण केल्या नंतर अल्लाह च्या पूजनात मग्न आहेत. सूर्य आग ओकत आहे अशा कडक सूर्यप्रकाशात रोजा करणे म्हणजे अल्लाह च्या दयेच्या सावलीत असणारे लोक.
मुस्लिम समाजाच्या १२ महिन्यांपैकी अफजल आणि उपासनेचा महिना रमजान चा महिना मानला जातो, या महिन्यात रमजानचे ३० दिवस उपवास ठेवले जातात, उपवास पाळणे म्हणजे पूर्णपणे उपाशी असणे, अगदी पाणी पिण्यासही सक्त मनाई आहे. कडक उन्हात रोज चा उपवास पूर्णतः अल्लाह च्या उपासनेत गुंतलेला असतो, कडक उन्हात, रोजंदारी करणार्‍यांवर सूर्याचा कोणताही परिणाम होत नाही. तीस दिवस तारवीहीची नमाजही अदा केली जाते, ही नमाज पूर्ण १ तासाची असते, जे मशिदीचे इमाम कुराण शरीफचे एक ते दोन पारे पाठ करतात आणि तारवाहीच्या नमाजमध्ये वाचतात.

सम्यक बौद्ध मंडळाने आमदार बोदकुरवार यांना निवेदनातून केली मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
    
वणी :  कोरोनामुळे गेल्या दोन वर्षपासून सण उत्सव साजरे होत नव्हते, परंतु नुकतेच राज्य शासनाने सर्व निर्बंध हटवले आणि सण उत्सव साजरे होऊ लागले आहे. राज्य शासनाकडून बाबासाहेबांची जयंती मोठया उत्सहात साजरी होणार असे जाहीर केल्यानंतर जसजशी १४ एप्रिल आता जवळ येऊ लागली तसे तसे आंबेडकरी अनुयायी जयंती च्या तयारीला लागली. मात्र,सावर्ला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी  करण्यासाठी अडथळा निर्माण होणार असल्याचे  येथील सम्यक बौद्ध मंडळाने दिलेल्या निवेदनातून म्हटलं आहे.   

गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम चालू आहे. खोदकामातून निघालेली माती ही इतर ठिकाणी न टाकता चक्क पंचशील झेंडा लगत टाकून सावर्ला ग्रामपंचायतने सामाजिक वादाला तोंड फोडल्याचे बोलल्या जात आहे. किंबहुना येथील पंचशील झेंड्याला अभिवादन करण्यास आंबेडकरी अनुयायांना मोठा अडथळा निर्माण झाला असून याबाबत मंडळाच्या वतीने वारंवार सूचना केली असता त्यांचेकडून टोलवाटोलवी व उद्धटपणाचे उत्तर दिल्या जात असल्याचे बाब येथील नागरिकांनी मौखिकरित्या आमच्या प्रतिनिधीला बोलून दाखविली असून, असा प्रकार घडल्यास निश्चितच भविष्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत, प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचे असून येथील पंचशील झेंडा लगत टाकलेला मातीचा ढिगारा तात्काळ उचलून संबंधित जागा मोकळी करून द्यावी अशा मागणीची निवेदन प्रत सम्यक बौद्ध मंडळ यांचे वतीने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आले आहे.
 

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

पुणे :
ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल , अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून २० वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.

ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या माताभगिनींच्या आरोग्याचेही अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठीदेखील विशेष लक्ष देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शासनाने गेल्या दोन दिवसात महत्वाच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कृतीतून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे सांगून स्व. मुंडे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांचाही श्री.ठाकरे यांनी उल्लेख केला. ऊसतोड कामगारांशी स्वतः संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

स्वप्न..... नंदासूत



स्वप्न... 
 आज आपण जरा बोलूयात स्वप्नांवरती. सर्वांना ती पडतात. काहींना भुतांची, काहींना श्रीमंतीची, काहींना पैशाची तर काहींना स्वतः काही तरी करून दाखविण्याची. काहीतरी म्हणजे अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनीअर इत्यादी. बहुतांश मुलांची स्वप्नं असतात. आपण अधिकारी झाले पाहिजे. तर त्यासाठी आली स्पर्धा व परीक्षा. आपण स्वतः निरीक्षण केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. त्यात अजून पुण्या, मुंबई सारख्या ठिकाणी जायच. घरची परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे काहींच ते फक्त स्वप्न राहत. अब्दुल कलाम सर म्हणतात "जी स्वप्ने झोपेत पडतात ती स्वप्ने नसतात, तर ज्या स्वप्नांमुळे झोप लागत नाही ती खरी स्वप्ने असतात". स्पर्धा परीक्षा खरतर युवा पिढीचं सर्वात मोठ स्वप्न. भारतात क्रिकेट सोडलं तर दुसऱ्या खेळाला खेळ म्हणतात यावर अधिकतर तरुण विश्वास ठेवत नाहीत. तसचं काहीसं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी होणं म्हणजेच करिअर, नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवलं तरी त्याला “करिअर’ म्हणणे याबाबत युवा पिढी साशंकच आहे, असे दिसून येते.

संघर्षाची उर्मी हवी, माघार घेणे अयोग्य
काही दिवसापूर्वी पुण्यात एक दु:खद घटना घडली. स्वप्नील लोणकर या अवघ्या 24 वर्षाच्या तरूणानं आत्महत्या केली. कारण मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत लवकर न झाल्याने ताणतणाव निर्माण झाला. एका तरूणाची आत्महत्या ही अतिशय दुर्देवी व मनाला वेदना लावणारी घटना आहे. त्याच्या कुटुंबावर काय बेतलं असेल याची कल्पना करणेही अशक्य. पण या आत्महत्येचे समर्थनही करता येणार नाही. किंबहूना ज्या वयात संघर्ष करावयाची उर्मी हवी त्याचवेळीस माघार घेणे कितीस योग्य आहे ? येणाऱ्या पिढीने यातून काय बोध घ्यायचा हा प्रश्नच निर्माण होतो. त्याच्या जाण्याने जेवढे दु:ख त्याच्या कुटुंबीयाना झाले त्यापेक्षा जास्त दु:ख त्यांना इथून पुढे सहन करावे लागेल. कारण तोच तर त्याच्या कुटुंबाचा आधार होता.

…तोच खरा जीवनाचा शिल्पकार
तेव्हा मित्रांनो मनाशी एक ठाम गाठ बांधून ठेवा की रस्त्यावर, उन्हातान्हात, शेतात कुठेही काम करीन पण आत्महत्येचा मार्ग कधीही स्वीकारणार नाही. या जगात अडचणी कुणाला येत नाहीत फक्त अडचणी वेगवेगळ्या स्वरुपाच्या असतात. मग तो शेतात राबणारा शेतकरी असो अथवा उच्चपदस्थ अधिकारी किंवा राजकारणी, रस्त्यावर उभा राहून चणे – फुटाणे विकणारा फेरीवाला असो अथवा मोठा उद्योगपती असो. पण या चक्रीवादळात ठामपणे जो उभा राहातो, तोच खरा त्याच्या जीवनाचा शिल्पकार ठरतो.अपेक्षांचे ओझे !
स्पर्धा परीक्षेतील यश – अपयश यात दोष कुणाला द्यायचा, अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारे युवक – युवती, शासन, परीक्षा घेणारा आयोग, अवाजवी अपेक्षा ठेवणारे आई – वडील की समाज. हा प्रश्न महत्वाचा आहे. माझ्या मते सध्याच्या काळात याची सुरूवात बालवयापासूनच होते. छोटं व विभक्त कुटुंब यापासूनच याची सुरूवात होते. आजी – आजोबा बरोबर राहणे म्हणजे एकत्र कुटुंब अशी कल्पना असणारी नवीन पिढी अनुभवानं खूपच मागे पडत आहे असे दिसून येते. घरात तीन किंवा चारच जण, पती-पत्नी, एक किंवा दोन मुलं. संपुर्ण लक्ष त्याच्या किंवा तिच्यावरच केंद्रीत झालेलं असते. आवश्यकतेपेक्षा जास्तच लाड व गरजेपेक्षा जास्त सुखसोयी यातून नकार हा या पिढीला माहीतच नाही. अपयश पचवणे तर दूरच. त्यामुळे मुलं पदवीधर झाली की त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवायचे व लहानपणापासून तुला काहीही कमी पडू दिले नाही, कोणतीही गोष्ट नाही म्हटलो नाही, मग तु आता आमच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत. अशा अपेक्षांचे ओझे त्याच्या डोक्यावर लादले जाते त्यातूनच त्याच्या मनावर ताण तणाव निर्माण होण्यास सुरुवात होते व त्याचे परिणाम शेवटी व्हायचे तेच होतात.आठवीपर्यंत पास निर्णयाच्या फेरविचाराची गरज आहे. 
 एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की, इयत्ता पहिली पासून इयत्ता 8 वी पर्यन्त परीक्षा रद्द झाल्या आहेत. मुलानां वयाप्रमाणे वर्गात प्रवेश मिळतो. खरंतर मोठ-मोठया शिक्षण तज्ज्ञांनी व शासनाने यावर पूर्ण विचार केला असेल म्हणूनच हा निर्णय झाला असेल, पण मला वाटते की याचा थोडा फेरविचार व्हायला हवा. अगदी लहान वयात ज्या सवयी लागतात, जे संस्कार होतात तेच मोठेपणी त्यांच्या कामी येतात. मग लहाणपणीच परीक्षांची सवय नाही, नापास होण्याची भिती नाही. अगदी 15 ते 16 वर्षाचे होईपर्यंत अभ्यास करावा असे काहीच नाही. मग अचानक ज्या वयात अनेक गोष्टी कळायला लागतात, ज्याचे आकर्षण वाटते. ज्या कराव्याशा वाटतात. त्या वयात अभ्यासासारखी नावडती गोष्ट करणं विद्यार्थी कितीसं लक्ष देऊन करणार हा प्रश्नच आहे. त्यात भर म्हणून शाळेत शिक्षकांनी रागावयाचे नाही, मारायचे नाही. अपमान करायचा नाही हे शासनाचे कायदे आहेत. अगोदरच्या काळात म्हणजे 25 ते 30 वर्षापूर्वी घरात आगाऊपणा केला तर शिक्षकाची भिती घालायचे. याउलट आता मुलेच शिक्षकांना आई-वडीलांची भिती घालतात. तेच आई-वडील आज आपल्या मुलाला का रागावला, का अपमान केला म्हणून शाळेत जाऊन कायदेशीर कारवाईची भाषा करू लागलेत. याचे परिणाम फारसे चांगले होताना दिसत नाहीत.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज
15 ते 16 वर्षाच्या मुलानां जर शिक्षकाने रागावणे किवा प्रसंगी एखादा धपाटा देणे हा जर त्यांना अपमान वाटत असेल तर पुढील जीवनात, नोकरीत, व्यवसायात पावलोपावली अपमान सहन करावा लागतो त्याचे काय ? हे ही आत्महत्येचे विचार येण्याचे एक कारण असू शकते. पूर्वी 10 वी 12 वीला बोर्डात नंबर आला तर त्या विद्यार्थ्यांची यादी वृत्तपत्रात प्रसिध्द होत असे. आता तेही बंद झाले. कारण असे असावे की जे विद्यार्थी यादीमध्ये येत नाहीत ते नाराज होतात. खरंतरं ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट करुन महाराष्ट्रात नंबर काढला त्याचे कौतूक नको का व्हायला ? त्याचा उत्साह वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. तोच उद्या भारत घडविणारा आहे. त्याला प्रोत्साहीत करायला हवं, पण इतर विद्यार्थ्याचा विचार करून अप्रत्यक्षपणे हुशार विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होतंय असच दिसतंय.स्पर्धेत टिकायचं असतं…
प्रत्येक विद्यार्थ्याला वाटू देत की, माझाही बोर्डात नंबर आला पाहिजे, माझेही कौतूक झाले पाहिजे. जे विद्यार्थी कमी पडतायत त्यांची जास्त काळजी घेत आहोत व पुढे जाणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहोत असच काहीस वाटतयं. आमच्या वेळी हा एक उत्सवच असायचा. बोर्डात आलेले विद्यार्थी व त्यांच्या घरच्यांचा अभिमान वाटायचा. त्याच्या घरी मोठमोठी माणसं भेट द्यायची व त्या विद्यार्थ्यांची मुलाखत वृत्तपत्रात छापून यायची याचं सर्वांना कौतूक असायचं व ते विद्यार्थी पुन्हा जोमानं पुढ शिक्षण घेऊन आपल्या बरोबर देशाचेही भविष्य उज्ज्वल करायचे. स्पर्धेत टिकायचं असतं याची जाणीव व्हायची. दुबळ्या मनाच्या मुलांचा विचार करून कणखर मनं आपण दुबळी करत नाही ना याचा विचार व्हायला हवा.
मनाची कणखरता टिकवायला हवी
इयत्ता चौथीची स्कॉलरशिप सातवीची स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षा, वर्गात पहिला येणे हे सर्व हवंच तरच पुढच्या स्पर्धा परीक्षा यामधले यश अपयश पचवता येऊ शकेल. परीक्षा म्हटलं की ताणतणाव आलाच, जो यायलाच हवा. आपलं शरीर पीळदार, निरोगी, सदृढ हवं असेल, तर व्यायाम आवश्यकच आहे. व्यायामाने शरीरावर ताण येतो व शरीर सदृढ बनते त्याच प्रमाणे मेदुंचा सुध्दा व्यायाम होणे आवश्यक आहे आणि जोपर्यंंत लहान वयातच थोडा मेंदूला ताण देण्याची व यश-अपयश पचविण्याची सवय लागत नाही तोपर्यंंत आयुष्यात मोठे-मोठे ताण-तणाव सहन करण्याची क्षमता निर्माण होणार नाही नाहीतर जीवनाच्या प्रवासात एखादे वादळ निर्माण झाले तर हताश होण्यापलिकडे काहीच उरणार नाही.सर्व गोष्टींचा सारासार विचार करण्याची गरज आहे. 
स्पर्धा परीक्षेसंदर्भात बोलायचंच झालं तर विद्यार्थी हा मुख्य घटक आहे. आपण उच्चपदस्थ अधिकारी होणार याच विश्वात फक्त राहून चालणार नाही. ब­ऱ्याचदा आपल्या जवळचं कोणीतरी या परीक्षेत यशस्वी होतं मग स्वत:बरोबर, घरातील व नातेवाईकानाही वाटतं म्हणून स्पर्धा परीक्षेच्या मागे धावण्यास सुरवात होते. तरुण पिढीने अगोदरच स्वत:चे आत्मपरिक्षण करावयास हवे. माझी बौध्दीक क्षमता काय आहे.? कष्ट घेण्याची किती तयारी आहे.? किती वर्षापर्यंत कमवायला सुरू करणे आवश्यक आहे.? आणि अपयश आले तर पुढे काय ? थोडक्यात, दुसरा पर्याय काय ? या सर्व गोष्टीचा पूर्ण विचार करुन अपयश आलेच तर न डगमगता दुसरा पर्याय आनंदाने स्वीकारणे जमले पाहिजे. स्पर्धा परीक्षमुळे एक नोकरी मिळणार होती त्याऐवजी दुसरी मिळेल किंवा व्यवसाय पण पर्याय आहे, हे मनोमनी पूर्ण रुजवणे गरजेचे आहे. कित्येक युवक अगदी डॉक्टर, इंजिनिअर ते व्यवसाय, राजकारण यामध्ये यशस्वी झाले आहेत. किंबहुना स्पर्धा परीक्षेच्या नोकरीपेक्षा जास्त यशस्वी वाटण्याइतपत यश मिळविले आहे. एक सुरक्षित नोकरीपेक्षा जास्त महत्व न देता या परीक्षेचा अभ्यास करावा व योग्यवेळी बाहेर पडण्याचाही निर्णय घेता यावा हेच योग्य ठरेल. या परीक्षेचा एक फायदा नक्कीच करुन घ्यायचा की चौफेर मिळविलेले ज्ञान व मोठे होण्याचे पाहिलेले स्वप्न दोन्ही सदैव जिवंत ठेऊ न दुसरा पर्याय निवडलेल्या क्षेत्रात उत्तम यश मिळवणे होय. किंबहूना दुसऱ्या पर्यायाने यशस्वी झाल्यावर अस वाटलं पाहिजे की, स्पर्धा परीक्षेत अपयश आलं ते बरच झालं. नाहीतर सरकारी गाडीतून फिरण्याऐवजी स्वत:च्या आधुनिक मोटारीतून फिरायला मिळाले नसते. याचे समाधान व्हावयास हवे.स्पर्धा परीक्षेच्या गोंधळावर पर्याय
स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांचा गोंंधळ होण्यास अनेक कारणे आहेत. एका गोष्टीची खासकरुन आवश्यकता वाटते ती की, यामध्ये शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व ज्या शासकीय विभागतील जागा भरावयाच्या आहेत, तो विभाग याचा योग्य तो समन्वय असणे अतिशय आवश्यक आहे. याचा क्रम असा असावा असं मला वाटतय की, ज्या विभागाच्या जागा निघतील त्या विभागाने लोकसेवा आयोगाकडे जागांची आवश्यकता असलेली माहिती देण्यापुर्वी संपूर्ण शासकीय कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. (उदा. वित्त विभागाची परवानगी, बिंदूनामवली तपासून घेणे) तसेच आयोगाने एक दरवर्षीचे कायमस्वरुपी वेळापत्रक बनवणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ जूनचा पहिला रविवारी – पूर्व परीक्षा, दोन महिन्यानी पहिला आठवडा मुख्य परीक्षा, दोन महिन्यांनी दुसरा आठवडा मुलाखती व दोन महिन्यानी पहिला आठवडा निकाल इत्यादी अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विभागाची मागणी होती. त्या विभागाला अंतिम यादी देणे व त्या विभागाने तीन महिन्याच्या आत उमदेवाराची सर्व चौकशी पूर्ण करुन कामावर रुजू करुन घेणे. या सर्व घटकांनी जर एकत्रीतपणे संघटीतपणे व समन्वयाने काम केले तर विद्यार्थ्यांना मानसिक त्रास कमी होईल. दोन-दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार नाही व ज्या विद्यार्थ्यांना या मायाजालातून बाहेर पडायचे आहे तेही आपल्या दुस­ऱ्या पर्यायाकडे वेळेतच आकर्षित होतील व दुसरे स्वप्नील लोणकर होण्यापासून वाचतील. इतकं या निमित्ताने सांगावेसे वाटते.मी स्व अनुभव आणि जवळच्या सहकाऱ्यांचे अनुभव यातून काही महत्त्वपूर्ण सुचवू इच्छितो.
हेच ते अल्लड वय.. या वयात कुणाचे ऐकू वाटत नाही. असे वाटते मला सगळे कळते. असे वाटणे साहजिक आहे. पण योग्य वेळी काही गोष्टी समजून नाही घेतल्या तर वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करावा लागतो.
१. वाईट व्यसन
कारण हेच मुख्य वय असते व्यसन लागण्याचे, या वयात आपण व्यसन केले तर आपले भविष्य उध्वस्त होईल. व्यसनामुळे सहकारी तसेच मिळतील, अनेक चुकीचे कृत्य होतील. आयुष्याची राख रांगोळी होईल. आजकालची शाळेतील पोर सुद्धा मावा, गुटखा, बिडी, सिगारेट च्या आहारी जाताना दिसत आहेत. त्यावरून खरच वाटते की आपल्या देशाची प्रगती होत आहे की अधोगती हे कोड मला अजून सुटलेले नाही. 
२. वासना
तरुण पणात वासना पासून दूर राहाल तर नक्कीच येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत आनंदी असेल. या वयात आपण उतावळे होतो. अनेक गोष्टी डोक्यात येतात. जसे की एकमेकांना वाटणारे आकर्षण, प्रेम हे सर्व करण्यासाठी आपल्याकडे आयुष्य पडलेले आहे. सर्व क्षनिक आहे. त्यासाठी आपण आपल सारे आयुष्य वाया घालवतो. 
३. चुकीची संगत
आपण ज्यांच्या सोबत असू हळूहळू आपण देखील तसेच बनत असतो. आणि माणूस चुकीच्या आणि वाईट गोष्टीकडे लवकर आकर्षित होतो. चांगले वागायला आणि आत्मसात करायला वेळ लागतो पण आपल्यासाठी तेच योग्य असते. आपली संगत नेहमी चांगली ठेवा कारण चुकीचे सहकारी आपल्याला नेहमी विनाशा कडे नेहतील. चुकीच्या लोकांना नाही म्हणायला शिका. आणि अश्यांची संगत दूर करा.
४. आदर्श
आपले आदर्श निवडायला चुकू नका, कोणता भाई, दादा कोणता फिल्मी हिरो आपला आदर्श असता काम नये. आपले आदर्श आपले महापुरुष छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे, सरदार भगतसिंह, चंद्रशेखर आझाद असेच असले पाहिजेत. तरच आपल्या तरुणाईला योग्य दिशा मिळेल.
लक्षात ठेवा मित्रांनो हे वय खूप महत्त्वाचे आहे. हेच ते वय आपल्याला स्वतः साठी, घरच्यांसाठी चांगले काही करून दाखवायचे. हेच ते वय उमेदीचे.. ध्येयावर लक्ष केंद्रित करा, खूप व्यायाम करा, चांगले मित्र जोडा, चांगले सकस अन्न खा, आनंदी रहा, तरुण पण अगदी मस्त जगा. सर्व गोष्टींचे भान राखून तरुण पणाचा आनंद घ्या.
बल हेच जीवन, दुर्बलता हाच मृत्यू. 
असे स्वामी विवेकानंद यांनी म्हंटल आहे. व त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. व रडत बसण्यापेक्षा लढत संकटाना सामोरे गेले पाहिजे. 
आयुष्य खूप सुंदर आहे...त्याचा आनंद घ्या.

- लेखक, कवी, स्थापत्य अभियंता - सुशिलकुमार चंद्रकांत पवार (नंदासुत)