लोकमान्य टिळक महाविद्यालयात छायाचित्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचलित,लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे
समाजशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हितगुज( commune ) अंतर्गत
 "छायाचित्र व चलचित्र कार्यशाळा" घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी करियर ओरिएंटेड शिक्षण घेणे आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्य संबंधी जागरूक असायला पाहिजे. व नवीन कौशल्य प्राप्त करायला हवेत असे मत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नीलिमा दवणे यांनी केले, विद्यार्थ्याना कौशल्य पुर्ण शिक्षण मिळावं या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. सागर मुने यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना छायाचित्र क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मेहनत, जिद्द, प्रामाणिकता, नियोजन व सगळ्यात महत्वाचे कौशल्य पाहिजे, तरच या व्यवसायात आर्थिक उन्नती आहे तसेच व्हिडीओ एडिटिंग, फोटो अल्बम डिझाइन या क्षेत्रात खूप मागणी व उत्पन्न आहे. असे पहिल्या मार्गदर्शन सत्रात सांगितले. 
(विद्यार्थ्यांना छायाचित्र प्रात्यक्षिक करून दाखवताना मुने)

दुसऱ्या सत्रात प्रात्यक्षिक करून फोटो कसे काढायचे याबाबत वणी नगरातील नामवंत फोटोग्राफर प्रशिक्षक रवींद्र काळे ,प्रमोद नवले, सागर मुने व सहकारी जीवन पंधरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. फोटोग्राफि कशा पद्धतीने करायची आणि व्हिडिओ कसे रेकॉर्ड करावेत आणि एडिट कसे करावेत. याबद्दलचे कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रशिक्षण घेणाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत, सर्व बारकावे माहिती करून घेतली व एक महिना प्रशिक्षण देण्यात यावे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशन घोगरे यांनी केले तर वैष्णवी निखाडे हिने आभार मानले.

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र मंडळाचे उदघाटन!


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी बुधवारला कला वाणिज्य व विज्ञान महा. मारेगाव येथे वनस्पतीशास्त्र विभागामार्फत वनस्पतीशास्त्र मंडळाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा डॉ गजानन सोडनर, विभाग प्रमुख इतिहास विभाग हे होते, तर प्रा डॉ किशोर सूरडकर, इंदिरा महाविद्यालय कळंब हे प्रमुख मार्गदर्शक होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ विनोद नु. चव्हाण, विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र विभाग यांनी तर सूत्रसंचालन प्रा स्नेहल भांदकर यांनी केले.
वनस्पती शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री फरहान शेख यांची निवड झाली तर कु पूजा मुळे (उपाध्यक्ष), कु जोती ठावरी (सचिव), कु मयुरी नन्ने (सहसचिव), व कु साक्षी देऊळकर (कोषाध्यक्ष) यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रा तानूरकर, प्रा घोडखांदे, प्रा कुलकर्णी, प्रा देशमुख, प्रा आत्राम, प्रा जेणेकर, प्रा चिरडे, प्रा राऊत, प्रा वांढरे, प्रा कांबळे मॅडम,श्री पंढरपूरे, श्री कुमरे, इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश घरडे यांनी नवीन वनस्पती शास्त्र मंडळाला शुभेच्छा वं प्रोत्साहन दिले तर प्रा अडसरे,प्रा माकडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अतिशय मोलाचे सरकार्य केले तर मंडळाचे प्रमुख प्रा स्नेहल भांदकर व प्रा डॉ विनोद चव्हाण विभाग प्रमुख यांनी सगळ्यांचे आभार मानले.

वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यास होणाऱ्या असुविध्येबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली दखल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ उपस्थित रहात नसल्याने स्वास्थ प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) मिळविण्याकरिता विद्यार्थी व निराधारांना नुसत्या चकरा माराव्या लागत असल्याने त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊन त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थी व निराधारांना ग्रामीण रुग्णालयात हेलपाटे मारतांना पाहून काही सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र निळण्याकरिता होणारी असुविधा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसमोर निवेदनातून मांडली. वणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी त्यांच्या या निवेदनाची त्वरित दखल घेत ऑन ड्युटी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना विद्यार्थी व निराधारांच्या आरोग्य तपासण्या करून त्यांना वेळेतच स्वास्थ प्रमाणपत्र देण्याच्या लिखित सूचना दिल्याने सर्वांचेच समाधान झाले.  

वस्तीगृहात प्रवेश मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना स्वास्थ प्रमाणपत्राची आवश्यक्ता असते. ते मिळण्याकरिता विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात येतात. पण वैद्यकीय अधिकारीच पूर्ण वेळ रुग्णालयात उपस्थित रहात नसल्याने विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अनेक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात चकरा मारतांना दिसतात. बाहेरगावचे विद्यार्थीही वैद्यकीय प्रमाणपत्रकारिता रुग्णालयाच्या येरझारा करीत असतात. वैद्यकीय अधिकारी उपस्थित रहात नसल्याने त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊन त्यांची अन्य शैक्षणिक कामे थांबतात. तसेच निराधार नागरिकांनाही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागत असल्याने तेही वैद्यकीय प्रमाणपत्रकारिता ग्रामीण रुग्णालयाच्या चकरा मारत असतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती अभावी विद्यार्थी व निराधारांना स्वास्थ प्रमाणपत्र मिळण्याकरिता निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांनी या समस्येचे निराकरण करण्याकरिता पुढाकार घेऊन वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डि. एन. सुलभेवार यांना निवेदन देत वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याकरिता रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याची मागणी केली. 

नागरिकांच्या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षकांनी त्वरित दखल घेत सर्व ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विद्यार्थी व निराधारांच्या वैद्यकीय तपासण्या करून वेळेतच त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या लेखी सूचना दिल्या. विद्यार्थी व निराधारांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागतात. ते त्यांना परवडण्यासारखे नाही. तेंव्हा वैद्यकीय प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याची ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशा लेखी सूचना वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलभेवार यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी विद्यार्थी व निराधारांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यास होणाऱ्या असुविधेबाबत दिलेल्या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षकांनी तत्काळ दखल घेतल्याने सर्वांचेच समाधान झाले आहे. 

निवेदनावर प्रकाश दुर्गे, मोरेश्वर देवतळे, देवानंद झाडे, अजय खोब्रागडे, प्रशांत गाडगे, रविंद्र कांबळे, रविंद्र तावाडे, अर्जुन शिरसाट, माणिक तावाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शासकीय वसतिगृहाच्या सन २०२१-२२ साठीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने सन 2021-22 साठी वसतीगृह प्रवेश मिळविण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे :- शालेय विद्यार्थी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021, पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.

पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

बी. ए./बी. कॉम / बी. एस. सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम. ए./ एम. कॉम. / एम. एस. सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि .4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.

पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि.4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021.

पहिली निवड यादी अंतिम करणे दि.6 जानेवारी 2022 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 20 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 25 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.1 फेब्रुवारी 2022.

पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दिलेल्या रकान्यामधील दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश द्यावा (स्पॉट अॅडमिशन) असे पुण्याचे समाजकल्याण आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बेघर व गरजूंसाठी महाआवास अभियान

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून देशात 20 नोव्हेंबर 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही योजना राबविण्यास सुरूवात झाली. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून महाराष्ट्रात ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यास सुरूवात झाली.

हे महा आवास अभियान दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविण्यात आले आणि या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आलेली गतिमानता व गुणवत्तावाढ विचारात घेऊन 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च, 2022 पर्यंत पुन्हा ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ हे सन 2021-22 या वर्षामध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे, शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे, घरांची गुणवत्ता वाढविणे, लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम घडवून आणणे, जनजागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे ही या महा आवास अभियानाची उद्दिष्टे आहे. या अभियानाच्या कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे तसेच बहुमजली इमारती व गृहसंकुले उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया किमान कालावधीत पूर्ण करून मंजुरी देऊन घरकुल मंजुरीचे पत्र त्वरीत वितरित करण्यात येतील.

राज्यात महिला स्वयंसहायता गट / ग्राम संघ / प्रभाग संघ / विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी समुदाय आधारित संस्थाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक घरकुल मार्ट सुरू करून त्याद्वारे घरकुलाचे बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले जातील. त्याचप्रमाणे सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाच्या भौतिक प्रगतीनुसार टप्पानिहाय सर्व हप्ते किमान कालावधीत वितरीत करण्यात येतील.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यानंतर 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र अद्यापपर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील. यात घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणाचे विश्लेषण व त्यावर उपाययोजना करणे. पूर्ण होऊ न शकणारी प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिफंड करून रिमांड करणे.

घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट देणाऱ्या संस्थांशी समन्वय ठेवून कुशल गवंडी तयार करण्यात येणार आहे. प्रशिक्षित ग्रामीण गवंडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील इतर उपलब्ध गवंडी याची ग्रामपंचायतनिहाय यादी तयार करून त्याचे पॅनेल बनवून या पॅनेलमधील गवंड्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील बांधकामात सहभाग घेण्यात येईल.

घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत डेमो हाऊस निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड त्यांचे आधार सिडींग करण्यात येईल. राज्यपुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मधील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड काढून त्याचे आधार सिडींग व जॉब कार्ड मॅपिंग पूर्ण करण्यात येणार आहे.

ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन, पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मिशन, गॅस जोडणीसाठी उज्ज्वला योजना, विद्युत जोडणीसाठी सौभाग्य योजना, उपजिविकेसाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन अशा विविध शासकीय योजनांशी कृतीसंगमातून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृतिसंगम साधण्यात येणार आहे.

या गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता सुधारणासाठी बहुमजली गृहसंकुले उभारणे व त्याच्या सहकारी संस्था स्थापन करणे, भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याकरिता विविध मार्गांनी उपलब्ध होणाऱ्या जागांची लॅण्ड बँक तयार करणे, वाळू करिता सॅण्ड बँक आणि वाळूला पर्याय म्हणून क्रश सॅण्ड, प्लाय ॲश ब्रिक्स, इंटर लॉकींग ब्रिक्स, हॉलो ब्रिक्स इत्यादीसोबतच अन्य बांधकाम तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे.

महा आवास अभियान ग्रामीण 2021-22 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेबरोबरच विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून सोबतच ग्राम कृती गटाचे गठन, लाभार्थी मेळावे, बँक मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सनियंत्रण व मूल्यमापन समितीची रचना करण्यात आली आहे.

महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ‘महा आवास अभियान पुरस्कार 2021-22’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, इत्यादी ग्रामस्तरीय पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजना यांचा समावेश असणार आहे. या उत्कृष्ट कामासाठीच्या पुरस्कारांची नामांकने निवडण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

बेघर आणि गरजू लोकांना हक्काचे आणि पक्के घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या महाआवास अभियानाच्या टप्पा-2 द्वारे राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, याची काळजी शासन आणि त्यासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी घेत आहेत.

 

संजय डी.ओरके

सहाय्यक संचालक (मा.)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

मंत्रालय, मुंबई-32