शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वक्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : येथील स्थानिक शासकीय विश्राम गृहात नुकतेच चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांना स्टेज डेरिंग यावे व त्यांना व्यवस्थित भाषण करता यावे ह्या करिता वक्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यांत आले होते. या वक्ता प्रशिक्षण शिबिराला उद्घाटक म्हणून आमदार चंद्रिकापुरे लाभले होते तर, प्रमुख उपस्थितीत विदर्भ निरीक्षक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वर्षाताई निकम उपस्थित होत्या. शिबिराचे मार्गदर्शक म्हणून राजेश पेचे यांची उपस्थिती होती.

सदरहु वक्ता प्रशिक्षण शिबीरात शहरातील २० पदाधिकारी प्रशिक्षण घेणार होते तदवतचं २० पदाधिकारी ऑब्झरवर म्हणून प्रशिक्षण घेणार होते. वक्ता प्रशिक्षण शिबीर या वेळी 3 टप्यात घेण्यांत आले. त्या नंतर प्रशिक्षण घेणांऱ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक पेचे ह्यांनी भाषण देताना कसे उभे राहायचे, देह रचना कशी असली पाहिजे ह्या बाबत सविस्तर माहिती दिली. वक्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजक शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी प्रास्ताविक केले.
या वेळेस विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर्, धनंजय दानव, शालिनी महकुलकर, चारुशीला बरसागडे, रामगुंडे आरिकर, विभागीय अध्यक्ष मेघा रामगुंडे,विनोद लाभाणे, वैष्णवी देवतळे, दीपक गोरडवार,तसेच विद्यार्थी म्हणून शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितीतांचे आभार मेघा रामगुंडे यांनी मानले. शिबिरात अनेकांची उपस्थिती लाभली हाेती.

मंत्रालयात जाऊन त्यांनी काय दिवे लावले? • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई : मी मंत्रालयात जात नाही घरातून काम करतो, अशी सातत्याने ओरड करणाऱ्यांना माझा सवाल आहे. त्यांनी मंत्रालयात जाऊन काय दिवे लावलेत? हे सर्वांना माहिती आहे.त्यामुळे घरून काम होत असेल तर मंत्रालयात पाट्या टाकण्याची गरज काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य न करता फोडा काय बॉम्ब फोडायचे ते. पण पाकिस्तानला कधी फोडणार ते सांगा असा सवाल केंद्र सरकार ला विचारला आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारांसोबत आयोजित स्नेहभोजनदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनौपचारिक गप्पामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या दीड वर्षाच्या काळात जनतेच्या हिताची कामे करतांना अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत.
मात्र, तरीही विरोधक मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत. कामे होत नाहीत. अशी ओरड करतात. मात्र जे लोकं मंत्रालयात येत होते, त्यांनी काय दिवे लावले आहेत. हे मी बघतच आहे. त्यामुळे मंत्रालयात येऊन पाट्या टाकण्यापेक्षा जनतेच्या हिताची कामे जर घरातून होत असतील तर त्यात काय चूक आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी बोलताना उपस्थित केला. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालाच आहे. मात्र जे मुस्लिम आरक्षण मागत आहे. त्याबाबत केंद्र सरकारने विचार करणार की नाही हे स्पष्ट करावं असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. पाश्चात देशांमध्ये कोरोनाची तिसरीला आली आहे. लस न घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे अजूनही जास्त आहे. त्यामुळे त्यांना यावेळी भीती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
कोरोनावर रामबाण औषधं सापडलेलं नाही. त्यामुळे अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. सर्वांनी कोरोना प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रहारच्या प्रयत्नाला आले यश: दिव्यांग,अनाथ, निराधार योजनेचे अनुदान दिवाळी पूर्वीच अदा

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : समाजातील गरीब ,अनाथ, निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्तीं यांना उपजिविका करण्याच्या उदेशाने शासनाकडून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यांत येते. परंतु मागिल काही महिन्यांपासून अनुदानचे (मासिक) वितरण करण्यात आले नव्हते. त्या साठी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी तहसिलदार चिमूर यांना एक लेखी निवेदन दिले हाेते.
त्यांचे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना उपजिविकेसाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. तर अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालय व बॅंकेचे उंबरठे झिजवित होते. मात्र, त्यांचे खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे आल्या पाऊलीच त्यांना घरी जावे लागत होते. त्यामुळे दिव्यांग,अनाथ, निराधार योजनेचे अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे. यासाठी चिमूर प्रहारच्या वतीने ही मागणी रेटून धरण्यांत आली.
दरम्यान तहसीलदार यांच्या कॅबीनमध्ये स्वतःला कोंडून आंदोलन करण्याचा इशारा प्रहारने प्रशासनाला या पुर्विच दिला होता. सदरहु निवेदनाची दखल घेत अवघ्या ६ दिवसांत अनुदान वितरित करण्यात आले. या मागणीचे निवेदन सादर करतांना प्रहार सेवक विनाेद उमरे, मुरलीधर रामटेके, नारायण निखाडे, सत्यपाल गजभे, स्वप्नील खोब्रागडे, रमेश वाकडे आदीं उपस्थित होते.

बचट गटातील महिलांचे गृहउद्योग स्वयंरोजगार निर्मिती कडील एक यशस्वी पाऊल - आ. किशोर जोरगेवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : महिला बचट गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. अनेक बचट गट गृहउद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीत मोठे योगदान देत आहे. दिवाळी फराळ तयार करुन ते विक्री करण्याचा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून त्यांच्यातील पाककला कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळण्याचीही गरज आहे. बचत गटातील महिलांचा हा स्वयंचलीत गृहउद्योग म्हणजे रोजगार निर्मितीकडील यशस्वी पाऊल आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
   
उमेदच्या वतीने तहसील कार्यालयातील परिसरात आयोजित दिवाळी फराळ साहित्य प्रदर्शन व विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते काल करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, ता. या. व्य. शितल देरकर, यंग चांदा ब्रिगेड चे संघटक पंकज गुप्ता, करण बैस, राशीद हुसेन, कल्पना शिंदे आदींची उपस्थिती होती.
  यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, बचतगट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसहाय्य करणारी आहे. घरातील जबादा-यांसह महिला आता आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी सुध्दा महिला बचतगटांच्या माध्यमातून सिध्द करत आहेत. नोकरी न करताही कुटुंबाला आर्थिक धैर्य देण्यात आज महिला बचत गटातील सदस्यांचा वाटा महत्वाचा आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक नवे लघूउद्योग पुनर्जीवित झाले आहे. या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत आहे. चंद्रपूर जिल्हातही बचतगट झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात बचत गटांचे कार्य उत्तम सुरु आहे. याचा ग्रामिण अर्थव्यवस्था आणि समाज यावर चांगला परिणाम होत आहे. बचतगटाच्या मदतीने बऱ्याच महिला उपलब्ध स्थानिक स्त्रोतांसह त्यांचे कौशल्य आणि ज्ञानाने स्वयंरोजगार निर्माण करून स्‍वावलंबी झालेल्‍या आहेत. त्यामूळे महिला बचत गटांना सक्षम करण्याची भुमिका महाविकास आघाडी सरकारची असून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सरकारच्या वतीने केल्या जात आहे. दिवाळी निमित्य महिला बचत गटांनी या प्रदर्शनीसाठी तयार केलेले साहित्य व फराळ त्यांच्यातील कौशल्याची साक्ष देणारा असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आ. जोरगेवार यांनी विक्री प्रदर्शनीची पाहणी करत महिलांनी तयार केलेल्या साहित्यांची माहिती जाणून घेतली. तसेच सदरहु साहित्य खरेदी केले. यावेळी महिला बचट गटांच्या महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक्षा खोब्रागडे, जयश्री नागदेवते, सिद्धर्थ ढोणे, आशिष चवरे, प्रवीण फुके, रमेश खोब्रागडे, मयूर भोपे, सलमा शेख, सोनम जांभुलकर आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमा अंतर्गत या वेळी महिलांनी विविध वस्तूंची सदरहु प्रदर्शनात व विक्री केन्द्रात माेठ्या प्रमाणात विक्री केली.

आपली संस्कृती आयुर्वेदानुकुल - प्रणीता भाकरे


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी : "भारतीय संस्कृती ही भारतीय पर्यावरणाचा विचार करीत जीवन जगण्याचा मार्ग असून दिनचर्या, रात्रिचर्या, ऋतुचर्या इ. विविध पद्धतीने आहार आणि विहाराच्या द्वारे रोग झाल्यावर उपाय नाही तर होऊ नये यासाठी मार्ग सांगणे, केवळ याच जीवनाचा नाही परलोकाचे देखील हित साधण्याची क्षमता आयुर्वेदाने आपल्याला प्रदान केली आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणात आपण आपल्या या दिव्य ठेव्याला नावे ठेवत आहोत, त्याच्या अद्वितीय लाभापासून स्वतःला वंचित करीत आहोत. हे खरे दुर्दैव आहे. आयुर्वेदाने मांडलेल्या सिद्धांताचा उपयोग करीत स्वतःच्या जीवनाला सुंदर समृद्ध आणि आनंददायी करायला हवे." असे विचार संस्कृत भारतीच्या विदर्भ प्रांत शिक्षण प्रमुख तथा विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख प्रा. प्रणीता प्रशांत भाकरे यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझं गाव माझा वक्ता या अभिनव व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना आयुर्वेदोक्त दिनचर्या या विषयावर त्या व्यक्त होत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप अलोणे विराजमान होते.
आपल्या गावातील आपल्या वक्त्यांना आपल्या गावातच हक्काचे व्यासपीठ असावे या भूमिकेतून सुरू झालेल्या या व्याख्यान मालिकेचे प्रास्ताविक करताना विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी वणी नगरात आजवर संपन्न झालेल्या विविध व्याख्यानमालांच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
राजेश महाकुलकार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिल्यानंतर, प्रणीता भाकरे आणि प्रशांत भाकरे या दाम्पत्याच्या मेघा अलोणे आणि डॉ.दिलीप अलोणे या उभयतांनी सत्कार केला.
आपल्या अत्यंत अभ्यास पूर्ण आणि ओघवत्या शैलीतील व्याख्यानामध्ये प्रणीता भाकरे यांनी आयुर्वेदातील नस्य, गंडूश, दंतधावन, कवल, अंजन, धूम्रपान, उद्वर्तन,अभ्यंग, स्नान, भोजन अशा विविध क्रियांच्या माध्यमातून आयुर्वेदोक्त दिनचर्या कशी असावी? याविषयी सविस्तर विवेचन केले.

या प्रत्येक कृतीचे महत्व, त्यावेळी घेण्याची काळजी यांचे विवेचन करताना विविध आवेग, विरुद्ध अन्न, कोणत्या ऋतूत कोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत इत्यादी आणि विषय सुद्धा अनुषंगिक रीत्या स्पष्ट केले.
विविध सुभाषितांचा मुक्त वापर तथा स्नानाचा विषय निघाल्यावर आठ प्रकार के स्नान इ. विषयातील विविध उपप्रकारांचे वर्णन यामुळे हे व्याख्यान श्रोत्यांच्या पसंतीचा आणि उपयोगाचा विषय ठरले.
अध्यक्षीय मनोगतात कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राचे आणि आयुर्वेदाचे महत्त्व जनतेला कसे जावे यावर डॉक्टर दिलीप अलोणी यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी नागपूर येथील हिंगणा येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात वणीचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजित अणे यांचा सुभाषजी देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले प्रमोद लोणारे आणि राम मेंगावार यांचे विशेष साहाय्य लाभले.