सुमेध ऍग्रो ट्रेडर्स तर्फे बोंडअळी नियंत्रण व फवारणी आयोजित

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० ऑगस्ट) : दिनांक २९/०८/२०२१ रोज रविवार ला सायंकाळी 6:00 वाजता बोंडअळी नियंत्रण व फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन सभा ठेवण्यात आली होती. सभेला श्री. जाधव साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा, श्री. श्रीकांत जी बोबडे साहेब, गट विकास अधिकारी पं.स.वरोरा, श्री. डोंगरकार साहेब, मंडळ कृषी अधिकारी, श्री. धात्रक साहेब कृषी विकास अधिकारी पं.स. वरोरा, श्री. खिरट्कर साहेब, विस्तार अधिकारी, श्री. लोखंडे साहेब कृषी पर्यवेक्षक, तसेच सरपंच सौ. इंदूताई खिरटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कंपनी प्रतिनिधी तर्फे हरीहरा ऍग्रो बायोटेक चे जिल्हा प्रतिनिधी श्री. धावेकर व प्रसाद जोशी, ट्रपिकल ऍग्रो सिस्टिम चे श्री. अमोल गहूकर, श्री. संगीत काळे, अंकुर सिड्स आणि धरती ऍग्रो केमिकल तर्फे श्री. अभिजीत घोरपडे, रामटेके साहेब, सुमिटोमो केमिकल चे जिल्हा प्रतिनिधी श्री. जावेद शेख, श्री. देठे साहेब, श्री. चामाटे साहेब, यांनी उत्कृष्ट मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे श्री. बादल असुटकर, चेतन माथनकर, श्री. सुभाष आपटे, निखिल सोमलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजित कार्यक्रमासाठी डोंगरगाव रेल्वे येथील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले. त्या बद्दल समस्त डोंगरगाव वासियांचे सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, वरोरा तर्फे उपस्थितांचे आभार मानले.

चंदनखेडा येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० ऑगस्ट) : इनरव्हील क्लब ऑफ वरोरा व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनखेडा येथे मोफत नेत्रोपचाराचे तपासणी चे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची खासियत,या शिबिरात योग्य दराचे चस्मे वाटप करण्यात आले. तसेच ज्यांना ऑपरेशन ची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची योग्य किंमतीत ऑपरेशन केले. तसेच शिबिरातील इनरव्हील क्लब च्या वतीने दोन रुग्णांचा ऑपरेशनचा खर्चही भरला गेला.

या कार्य प्रसंगी वरोरा येथील डॉ. लांबट नेत्र तज्ञ् यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी चंदनखेडा येथील डॉ.संतोष झाडे वैद्यकीय अधिकारी, डॉ.जयश्री भोंगळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुळेवार, सरपंच नानाजी जांभुळे, उपसरपंच भारती उरकांडे, डॉ.जगदीश बोढे, रुग्णवाहिका चालक पवन भोस्कर तसेच आशा वर्कर बुरावार आणि तालेवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला आहे.  

सुमारे 500 लोकांनी या शिबिरामध्ये लाभ घेतला. या कार्यक्रमात इनरव्हील अध्यक्षा मधू जाजू, सचिव सौ.À वंदना बोढे, सदस्य दिपाली टिपले, माजी अध्यक्षा तथा अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्षा सौ. माया बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजित कार्यक्रमाचे संचालन सौ. माया बजाज यांनी केले तर मधू जाजू यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी क्लब व संमेलनाच्या सर्व पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.

नकाेड्याच्या शेकडाें कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : देशाच्या राजकारणात काँग्रेस—भाजपाला पर्याय म्हणून, अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वातील आम आदमी पार्टी फार वेगाने या जिल्ह्यात वाढत आहे. दरम्यान,काल रविवारी चंद्रपूर विधानसभेतील नकोड्याच्या शेकडो युवकांनी गणपती गेडाम यांचे नेतृत्वात आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला.
   
दिल्लीतील सुशासन, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, नेत्यांना मिळत असलेल्या मोफत वीज, पाणी, उत्तम आरोग्य आणि शिक्षण हे सामान्य माणसाला देवूनही देशातील नफ्यातील दिल्ली हे एकमेव राज्य असल्यांचे केंद्र सरकारच्या कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे मत सुनील मुसळे यांनी व्यक्त केले. दिल्लीतील सामान्य माणसाचे सरकार, चंद्रपूर जिल्ह्यात विवीध निवडणुकीच्या माध्यमांतून आणण्याचा संकल्प आम आदमी पार्टी जिल्हा कमीटीने केला असून, या दृष्टीने आपचे कार्यकर्ते दिवस रात्र परिश्रम घेत आहे. मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीने सामान्य नागरिकांसाठी केलेले काम, कोरोणा काळात सामान्य रुग्णांना दिलेला दिलासा यामुळे आम आदमी पार्टीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जनता विश्वास ठेवतील असा आशावाद मुसळे यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.
     
ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती, त्यावेळचा भ्रष्टाचार, भाजपावाले बाहेर काढून 'ईडी, सिबीआय' लावतील अशी त्यांना भिती आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे भविष्य भाजपा—काँग्रेस च्या हातात सुरक्षित नसून, हे दोनही पक्ष एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. 
या परिस्थितीत जनतेला स्वच्छ आणि चांगला राजकीय पर्याय आम आदमी पार्टीच असल्याची खात्री पटत असल्याने, मोठया प्रमाणावर नागरिक आम आदमी पार्टीत प्रवेश करीत आहे. काल प्रवेश करणाऱ्या मध्ये अविनाश भारशंकर, गणेश बावणे, अरुण उमरे, महेश हंसकार, राजू आसपवार, बळेश्वर साहू, शुभम सुबे, प्रेमदास सोयाम, महादेव गेडाम, मनोज दुबे, गणेश देशकर, गंगाधर मांदाडे कवडु नवले यांचेसह शेकडो युवकांचा समावेश आहे.
 
आगामी मनपा, नगर परिषद व इत्तर होणाऱ्या सर्व निवडणूका आम आदमी पार्टी लढविणार असून राजकीय कार्यकर्त्यानी व नागरीकांनी आम आदमी पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन आप कडुन यावेळी करण्यात आले.

नकाेडा येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाला आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, मयूर राईकवार ,संतोष दोरखंडे, अशोक आनंदे ,अमित बोरकर, सोनू शेत्तियार, धनराज भोंगले, सागर बि-हाडे, विकास खाडे, आशीष पाझारे आदीं उपस्थित होते.

मच्छिन्द्रा येथे खावटी अनुदान योजनेचे जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० ऑगस्ट) : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील ४० लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेचे उर्वरित किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

आदिवासी विभागातील लाभार्थ्याकरिता महाराष्ट्र शासनाची खावटी योजना आदिवासिंना दिनांक २८ ऑगस्ट रोजी गावातील जेष्ठ नागरिक माजी सरपंच श्रीधर पेंदोर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली. मागील चार महिन्यापूर्वी रुपये २०००/- इतके लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा झाले व उर्वरित अंदाजे २०००/- चे अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावशक्य वस्तूंची किट येथील ४० पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. 
या अनुदान खावटी मध्ये मटकी (१किलो), चवळी (२किलो), हरभरा (३किलो), पांढरा वटाणा (१किलो), तूरडाळ (२किलो), उडीद डाळ (१किलो), मीठ (३किलो), शेंगदाणा तेल (१ लिटर), गरम मसाला (५००ग्रॅम), साखर (३किलो), चाय पावडर (५००ग्रॅम), मिरची पावडर (१किलो), असे ऐकून १८ कि. ग्रॅ. प्लस १ लिटर चा समावेश आहे.

अशा कठीण कोरोना काळात आदिवासिंना खावटी योजनेचा लाभ मिळाल्याचे समाधान पात्र लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. अनुदान योजना वाटप करते वेळी गावातील तरुणांनी मदत म्हणून साहित्य उतरवण्यापासून ते वाटप करण्यापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यावेळी हरिदास पेंदोर, बादल कुमरे, सचिन आत्राम, पुरुषोत्तम सोयाम यांनी हातभार लावला. 

देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातून चालना


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (२९ ऑगस्ट) : देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात कॅन्सर स्क्रीनिंग, प्लॅस्टिकपासून दीर्घकालीन टिकणारे रस्ते बनविणे, फिशपॉन्डचे आधुनिकरण, एयर फिल्टरमार्फत इंधन बचत, पोल्ट्री व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित समारंभात गौरविण्यात आले. तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले. तर, स्टार्टअप्स आणि राज्य शासनामध्ये भागीदारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
विजेत्या उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. सप्ताहासाठी देशभरातून १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली होती, त्यातील निवडक १०० स्टार्टअप्सनी सोमवारपासून ऑनलाईन आयोजित सप्ताहात मंत्री, गुंतवणूकदार, तज्ज्ञ, उद्योजक, शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज गौरविण्यात आले. प्रशासनात नाविन्यता आणणारे व अभिनव बदल घडवू शकणारे कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यसुविधा, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), प्रशासन आणि इतर क्षेत्रातील स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.
मंत्री नवाब मलिक यावेळी म्हणाले की, राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या या सप्ताहास देशभरातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. एकविसावे शतक हे डिजिटल क्रांतीचे शतक आहे, यामध्ये जगात भारत देश अग्रस्थानी राहील. महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात आपले विशेष योगदान देत आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याबरोबरच यासंदर्भातील धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. विविध खरेदी, शासनास हव्या असलेल्या विविध सेवा यामध्येही तरुणांच्या नवसंकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना संधी देण्यात येईल. राज्यात महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. यापुढील काळातही युवक-युवती आणि महिलांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी शासनामार्फत विविध निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, देशाच्या ग्रामीण भागासह शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या अनुषंगाने सप्ताहामध्ये सहभागी तरुणांनी विविध संकल्पना मांडल्या. याशिवाय कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या बनलेल्या आरोग्य क्षेत्रासाठीही नवनवीन संकल्पना सादर करण्यात आल्या. मत्सविकाससारख्या क्षेत्रासाठीही तरुण नवनविन संकल्पना शोधत आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून या सर्व नवसंकल्पनांना गुंतवणूकदार तसेच शासनापर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. अशा प्रयत्नातून स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. उद्योग विभागामार्फतही यासाठी व्यापक पातळीवर उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या सप्ताहामुळे शहरी भागासह ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळाले आहे. कृषी, आरोग्य, पाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा अशा विविध क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळाले आहे. शिवाय त्यांना आपले प्रॉडक्ट उद्योजक आणि शासनासमोर सादर करण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमातून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याने इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कौशल्य विकास विद्यापीठ, आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांमधून तरुणांमधील व्यावसायिकता, उद्योजकतेला चालना देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सप्ताहाच्या आयोजनामगील भूमिका सांगितली. तरुणांच्या बदलत्या आशा-आकांशांना चालना देणे तसेच त्यांच्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शासन यंत्रणेत वापर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे. तरुणांचाही शासनासमवेत भागीदारी करण्यामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून उद्योजक, गुंतवणुकदारांनाही नवनवीन संकल्पना मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण क्षेत्रातील इलिमिनो किड्स एलएलपी, हेसा टेक्नॉलॉजीज, रिझरव्हॉयर न्युरोडायव्हर्सिंटी कन्सलटंट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले. तसेच प्रशासन क्षेत्रातील सीव्हीस, डेफिनिटीक्स सॉफ्टवेअर सोल्युशन्स, प्रानटेक मीडीया, कृषी क्षेत्रातील आर्यधन फायनान्शियल सोल्युशन्स, ग्रामहीत, क्रुशक मित्र ॲग्रो सर्व्हीसेस, शापोज सर्व्हीसेस, आरोग्य क्षेत्रातील ब्लॅकफ्रॉग टेक्नॉलॉजीज, हेल्थ व्हील्स, पेरीविंकल टेक्नॉलॉजीज, विंडमिल हेल्थ टेक्नॉलॉजीज, शाश्वत पायाभूत सुविधा आणि मोबीलिटी क्षेत्रातील ग्राउंड रिॲलिटी एन्टरप्राईजेस, क्यूईडी ॲनॅलिटीक्स, स्मॉल स्पार्क कन्सेप्ट्स, योटाका सोल्युशन्स, शाश्वतता क्षेत्रातील आय कॅपोटेक, मॅकलेक टेक्निकल प्रोजेक्ट लॅबोरेटरी, पक्षीमित्र पोल्ट्री टेक्नॉलॉजीज, सोलीनास इंटिग्रीटी तर इतर क्षेत्रातील जेएचकेपी टेक्नॉलॉजीज, नेचर डॉट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, फार्मइजीचे सहसंस्थापक डॉ. धवल शाह, हंड्रेड एक्स डॉट व्हीसीचे संस्थापक संजय मेहता, एसीटी ग्रँटस्चे प्रवक्ते संदीप सिंघल, आयएमसीचे माजी अध्यक्ष राज नायर यांच्यासह सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.