वाठोडा जंगलात मारेगाव तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग

                          (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | दीपक डोहणे 
मारेगाव, (ता.१ जुलै) : महिला बचत गटावर लाखो रुपयाचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथील विवाहित महिलेचा भुलथापा देवून करंजी- वाठोडा या जंगल रस्त्यालगत विनयभंग केल्याने इंदिराग्राम येथील ४५ वर्षीय इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परिणामी सदर जंगलातून पिडीत महिलेने समयसूचकता दाखवित सुटका केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
      मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील २८ वर्षीय महिला मोलमजुरीसह महिला बचत गटाचे कार्य करते.अशातच तिच्या पतीचे दुरवरचे नातेवाईक असलेले इंदिराग्राम येथील संशायित आरोपी विलास नारायण टेकाम (४५) याने घटनेच्या काही दिवसापूर्वी प्रत्यक्ष भेट देवून शबरी आदिवासी महामंडळ तर्फे महिला बचत गटाला पाच लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचा भुलथापा दिल्या.त्यासाठी यवतमाळ मिटींगला जाने अनिवार्य असल्याचे सूतोवाच केले.
     महिला गटाला लाखो रुपये कर्ज मिळत असल्याने 'ती ' महिला यवतमाळ जाण्यासाठी दि.२८ जुलै रोजी विलास सोबत दुचाकीने करंजी वाठोडा मार्गे निघालेत.मात्र विलासच्या मनात नियतिची घालमेल सुरु असतांना करंजी वाठोडा मधोमध असलेल्या जंगलाच्या कडेला दुचाकी थांबविली आणि अश्लील लैंगिक भाषेत बोलून 
नको ती मागणी केली.मात्र पिडितेने सपशेल नकार देत घटना स्थळावरुन कशीबशी सुटका करुन काही अंतरावर पायदळ येत पतीला मोबाईल वरुण संपर्क करित आपबिती कथन केली.काही वेळातच पती करंजी येथे दाखल झाले.
     ओढावलेल्या प्रसंगाची पिडितेने माहिती देत पांढरकवडा पोलिस स्टेशन गाठले.तक्रारी अंती संशायित आरोपी विलास नारायण टेकाम रा.इंदिराग्राम ता.मारेगाव यांचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान प्रसंगावधान साधून पिडीत महिलेने घटनास्थळावरुन सुटका करवून घेतल्याने समोरील अनर्थ टळल्याची चर्चा ग्रामस्थात सुरु आहे.

लोन काढून देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेचा वाटेत केला विनयभंग


सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (ता.१ जुलै) : मारेगाव तालुक्यातील कुंभा (इंदिरा ग्राम) येथील सेतू केंद्र संचालक विलास नारायण टेकाम यांनी श्रीरामपुर येथील विवाहित महिलेचा लोनचा बहानाकरून वाटेत विनयभंग केला.

याबाबत असे की, आदिवासी शबरी महामंडळाची पाच लाखांची लोन केस करून देतो असे म्हणून विवाहित महिलेला यवतमाळ येत चालण्यासाठी पिडीत महिलेला सेतू केंद्र संचालक विलासने आग्रह धरला. विलास याचा मान ठेवत दि.२९ रोज मंगळवार १०:३० वाजता पिडीत महिला घरुन दुचाकीवर बसुन करजी वरून वाठोडा मार्गे जात असताना पिडीत महिलेला रनींग असलेल्या दुचाकीवर 'तु मला खूप आवडते' असे म्हणून दुचाकी वाठोडा रोड लगत असलेल्या जंगल परिसरात ११:३० वाजतच्या सुमारास पिडीत महिलेचा हात पकडून संशयित आरोपी विलास याने खाली पाळण्याचा प्रयत्न केला असता घाबरलेल्या अवस्थेत पिडीत महिलेने घटनास्थळावरून पळ काढला.

ती रस्त्यावर येवून 'यवतमाळ येथे मला यायचे नाही' असे म्हणून पिडीत महिलेने संशयित आरोपी विलास याला सांगितले. महिलेने पतीला सांयकाळी घरी गेल्यावर सर्व आपबीती सांगीतली. दि २९ जुन रोजी पतीला सोबत घेऊन मारेगाव पोलीस स्टेशन गाठले असता, वाठोडा जंगल परिसर मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये पिडीत महिला पतीला सोबत घेवून विलास नारायण टेकाम वय (४५) रा. इंदिरा ग्राम (कुंभा) यांच्या विरुद्ध तक्रार दाखल दिली असता कलम ३५४ ३५४(अ) ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पांढरकवडा पोलीस करित आहे.

वणी जवळ खोद्कामात आढळले लावा बेसाल्ट दगडी खांब

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (ता.१ जुलै) : मागील आठवड्यात वणीजवळ शिबला-पार्डी ह्या गावाजवळ खोदकामात दिसलेली दगडी खांब ही कोणत्याही ऐतिहासिक काळातील मानव निर्मित वस्तू नसून ६ कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखी उद्रेक झाला त्यातील लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट (Columnar Basalt) नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक आहेत. लावारास अचानक पाण्याच्या संपर्कात येवून थंड झाल्यास आकुंचित पावून षटकोनी आकाराचे खांब तयार होतात. अशी माहिती येथील भुशास्त्र आणि खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली.
           
यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसर हा जसा ऐतिहासिक दृष्ट्‍या प्राचीन आहे तसा तो भौगोलिक दृष्ट्‍या अतिप्राचीन आहे. ह्याच परिसरात २०० कोटी वर्षाची स्ट्रोमेटोलाईटची आणि पूर्वी पांढरकवडा जवळ आणि मारेगाव तालुक्यात ६ कोटी वर्षाची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे मी शोधली होती. झरी तालुक्यातील आता प्रकाशात आलेल्या ह्या अश्म खांबाची माहिती ५ वर्षापासून मला होती. ७ कोटी वर्षापूर्वी पर्यंत विदर्भात समुद्र होता परंतु ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस ( late cretaceous) काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लावारस यवतमाळ जिल्हा आणि मध्य विदर्भा पर्यत वाहात आला. ह्या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना दक्खनचे पठार (Deccan Trap) नावाने ओळखले जाते. हा ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात आणि पश्चीमेकडे ६६०० फुट जाडीचा आहे.

महाराष्ट्रात ८०% हा बेसाल्ट अग्निज खडक आहे.   
भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अश्याच कॉलमनार बेसाल्ट साठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, नांदेड येथे हे खडक आढळले असून आता त्यात यवतमाळ जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे.
विदर्भ प्रदेशात ह्या खडकाची जाडी कमी आहे त्यामुळे गेल्या हजारो वर्षापासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत असून अनेक नव्या जीवाश्माचे संशोधन होऊ शकेल. वणी परिसरात तेव्हा तप्त लाव्हारस वाहात (Flood Basalt) आला तेव्हा येथील नद्यात तो पडून अचानक थंड झाला त्यामुळे त्याचे आकुंचन पावून षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले,त्यांना कॉलमनार बेसाल्ट असे म्हणतात. इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे ते होऊ शकले नाही. अनेक ठिकाणी षटकोनी खांबां ऐवजी पंच किंवा सप्तकोणी खांब सुधा आढळतात. हे खांब अगदी मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी तयार केले होते तसेच दिसतात त्यामुळे त्याची गल्लत होते त्यामुळेच वृत्तपत्रात ते ऐतिहासिक असावेत असे लिहिले गेले. असे प्रा. चोपणे ह्यांनी सांगितले.
     
यवतमाळ जिल्ह्यात ६ कोटी वर्षापूर्वी डायनोसोर सारखे विशाल जीव आणि प्राणी वास करीत होते. घनदाट जंगले होती, परंतु महाराष्ट्रातील ह्या मोठ्या ज्वालामुखी उद्रेकामुळे सर्व जंगले, जीव जंतू जळून राख झाले.जवळ जवळ ३०,००० वर्षे अधून मधून लाव्हारस वाहत येत असे.पुढे हा प्रलय थांबला आणि नव्याने सजीव सृष्टी निर्माण झाली. त्या काळात मानव नावाचा कुठलाही प्राणी विकसित झाला नव्हता. मानवाचा विकास केवळ ५० लाख वर्षानंतर विकसित झाला असे प्रा.सुरेश चोपने यांनी सांगितले.   
  
हे खडक भोगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असून प्रशासनाने तेथे आढळलेली दगडी खांब आणि परिसर संरक्षित आणि सुशोभित करावा, नागरिकांनी सुद्धा ह्या स्थळाची खडक तिथेच जपून ठेवण्याचे आवाहन प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

केंद्राच्या परवानगीशिवायच राज्यात लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण, ठाकरे सरकार चा निर्णय

                        (संग्रहीत फोटो)

मुंबई, (ता.३०) : घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही. राज्यात लवकरच घरोघरी जाऊन आता लसीकरण करण्यात येईल. प्रायोगिक तत्वावर घरोघरी लसीकरणाची सुरूवात पुण्यापासून करण्यत येईल, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्यासमोर खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय कळवण्यात आला.

घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी केंद्राच्या परवानगीची वाट बघणार नाही. केंद्राच्या परवानगीशिवायच राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येईल. प्रयोगिक तत्वावर या लसीकरणाची सुरूवात पुणे जिल्ह्यातून केली जाईल, अशी माहिती राज्याचे महाअधिवक्ता अनिल कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयास दिली. आम्ही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली होती. त्याच अनुभवाचा फायदा घेऊन ही लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या आकारामुळे प्रायोगिक तत्वावर लसीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा आकाराने फार मोठा नाही आणि फार छोटाही नाही. पुणे जिल्ह्यातच परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली होती. हा जुना अनुभव आणि पुणे जिल्ह्याचा आकार यामुळे पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचेही राज्य सरकारने न्यायालयात सांगितले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.३०) : राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख रु. याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.

ही योजना MH-CET, NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000/-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी आहे व मुख्यत: लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटित क्षेत्रात, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.

सन -2021 इयत्ता 10 वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील तसेच संबंधित निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना बार्टीमार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास SSC, CBSE, ICSE बोर्डांमध्ये मध्ये 90% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील शासकीय नोकरीत आहेत ते विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र राहणार नाही.

योजना ही सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व यापुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देय असेल, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, पुणे यांच्यामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.