पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वणी तालुक्यातील गणेशपुर साझाचे तलाठी सुमेध भिमराव अघम यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला. जामवाडी घाटात डिझल टॅंकरला अपघात होऊन लागलेली आग विझविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी विनोद खरात यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

आपल्या 29 वर्षाच्या पोलिस सेवेत चोखपणे कर्तव्य बजावल्याबद्दल पोलिस हवालदार संतोष पांडे तसेच 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ, नवी दिल्ली येथील कार्यक्रमात तुतारी वाजविण्याची संधी मिळाल्याबद्दल महिला पोलिस कर्मचारी सुषमा मारोती मेश्राम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी पाळला 'ब्लॅक डे'

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
    
वणी : महाराष्ट्र वाद्यातर्फे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे 1 मे रोजी विदर्भातील संपूर्ण 11 ही जिल्ह्यात आणि तालुक्यात 'काळा दिवस' (Black Day) पाळला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून वणी मारेगाव झरी तालुक्याचे वतीने वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजता दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 

विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनाचा निषेध करित स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रा.पुरुषोत्तम पाटील यवतमाळ जिल्हा प्रमुख, देवराव धांडे पाटील शेतकरी नेते व नारायण गोडे समाजसेवक यांची भाषणे झालीत. यावेळी बोलताना प्रा. पाटील आपल्या भाषणात म्हणालेत 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार करून विदर्भाच्या जनतेला बळजबरीने महाराष्ट्रात सामील करण्यात आले. परंतु नागपूर कराराच्या कलमापैकी एकही कलम पाळले गेले नाही. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कुपोषण, सिंचनाचा अनुशेष, आमदार खासदारांची संख्या कमी झाली, रोजगारासाठी तरुणांना मुंबई पुणे नाशिक कडे जावे लागत आहे, विदर्भात विद्युत प्रकल्प आहेत परंतु विदर्भ तासोगणती अंधारात असतो, त्यालाच प्रदुषणाचा त्रासही सहन करावा लागतो, राज्यावर प्रचंड कर्जांचा डोंगर वाढत आहे.अशा अवस्थेत विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच या समस्ये वर रामबाण उपाय असल्याचे प्रा.पाटील आपल्या भाषणात म्हणाले. 

या कार्यक्रमाला प्रा.पुरुषोत्तम पाटील, राहुल खारकर,प्रा बाळासाहेब राजुरकर, नामदेव जेनेकर, धीरज भोयर देवराव पाटील धांडे, होमदेव कनाके, दशरथ पाटील,संजय चिंचोलकर, धिऱज भोयर, बालाजी काकडे, पुंडलिक पथाडे, नारायण गोडे, प्रभाकर उईके, सिध्दार्थ ताकसांडे, प्रा.विजय बोबडे, अंबादास वागदरकर, अशोक चौधरी, प्रा.नितीन मोहितकर, गजेंद्र भोयर, भाऊसाहेब आसुटकर, सुरेश राजुरकर, बबनराव ठाकरे, विठ्ठल येरगुडे, गजानन ठाकरे, प्रमोद जवादे, रोहित येंगड, संबा बोरकर यांच्या सह असंख्य विदर्भवादी उपस्थित होते.

वन विभाग ऍक्शन मोडवर...अवैद्यरित्या जंगल क्षेत्रातुन वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : उन्हाच्या कडाक्याला न जुमानता तस्कर नदी नाले पिंजून काढत वाळू ची जमेल त्या वेळी अवैधपणे उपसा करित आहे. अशातच आज बुधवारी सकाळी वन परिक्षेत्रांतर्गत केगाव बिट मधील कक्ष क्र. (सि. 55 बी) मधील निर्गुळा नदीपात्रातून अवैधरित्या ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून वाहतूक करताना वन विभागाच्या टीमने एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली आहे. 

मारेगाव तालुक्यातील रेती घाट तस्कराकडून फस्त करणे हे काही नवीन नाही. मालामाल होण्याच्या नादात वाटेल तेथून सकाळी दुपारी सायंकाळी व मध्यरात्री वाळूचा उपसा केल्या जात आहे. महसूल विभाग सतत ह्यांचे कंबरडे मोडत असताना आता वन विभागही ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. 

मारेगांव वनपरिक्षेत्रातील मारेगाव वर्तळातील नियतक्षेत्र केगांव अंतर्गत कक्ष क्र. C55B मध्ये सामुहिकरित्या गस्त करित असतांना जंगल क्षेत्रातुन वाहणाऱ्या निर्गुळा नदीपात्रातून अवैद्यरित्या जंगल मार्गाने रेती वाहतुक होत असल्याच्या संशय आल्यामुळे नदी काठाने गस्ती दरम्यान एक टॅक्टर निर्गुळा नदी पात्रातील वाळु जंगल मार्गाने वाहतुक करित असल्याचे दिसुन आले. सदर टॅक्टर वाहकाने वनविभागाचे पथक त्याच्याकडे येत असल्याचे पाहुन तिथुन पळ काढला, त्यामुळे सदर टॅक्टरचा पाठलाग करून त्याला केगांव गांवामध्ये पकडुन त्यावर भारतीय वन अधिनियम 1927 अंर्तगत कार्यवाही केली व पुढील चौकशीकरीता टॅक्टर मारेगांव वनविभाग कार्यालयामध्ये जमा केले.  

विशेष म्हणजे उपसा करित असलेल्या ठिकाणाहून ट्रॅक्टरसह पळ काढत असताना एखाद्या चित्रपटाला शोभेल असा त्यांचा पाठलाग करून केगाव येथे अखेर सकाळी 9 वाजता वाळू भरलेले किमान एक ते सव्वा ब्रास असलेल्या ट्रॅक्टर क्र. (एम एच 34 ए पी 2588) ह्या वाहनाचा पंचनामा करून मारेगाव येथे वन विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले अशी माहिती आहे. 

सदरची कार्यवाही शंकर हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) मारेगांव यांचे समक्ष दिनेश पोयाम क्षेत्रसहाय्यक मारेगांव, मोहन टोंगे क्षेत्रसहाय्यक वडकी व मोनाली मडावी वनरक्षक केगांव बिट यांनी केली.

वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांचे आवाहन :
मारेगांव वनरिक्षेत्रातील लोकांना आवाहन करण्यात येते कि, जंगल क्षेत्रामध्ये विना परवाना कोणीही प्रवेश करु नये, जंगल क्षेत्रातील झांडांची तोड करु नये, जंगल क्षेत्रामध्ये आग लावु नये तसेच तेंदु पाने, मोहफुले वेचण्याकरिता एकटे जंगल क्षेत्रामध्ये जावु नये तसेच मानव वन्यजीव संघर्ष घडेल असे कुठलेही कृत्य करु नये.

खैरी-वडकी रोडवर टिप्पर ,कार व मोटरसायकलचा तिहेरी अपघात

 सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : दिनांक २९-४-२४ रोजीचे रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान खैरी-वडकी रोडवर डबलशिट मोटरसायकल स्वार हे वडकीकडे जात असतांना पेंट्रोल संपल्यावर ते मोटरसायकल थांबवुन उभे असतांना खैरी कडुन येणाऱ्या चारचाकी वाहन क्र.एम.एच.०४ ई.टी.०७६५ या कारने मोटरसायकल स्वारांना जोरदार धडक देऊन समोरुन येत असलेल्या टीप्पर क्र.एम.एच.४० वाय १९५१ या टिंप्परला जोरदार धडक दिल्याने ती कार विरुद्ध दिशेने रोडच्या बाजुच्या नालीच्या कडेला जाऊन पडली. मात्र त्यामध्ये असलेले वाहनचालक व सोबत असलेल्या व्यक्तीनी मात्र त्या कार मधुन निघुन पसार झाले. यावरुन नेमकी ही कार कुठली आणि कोणाची आणि कारचालक व सोबतीला असलेले पळून जाण्याचे कारण काय यावर मात्र संशय व्यक्त केल्या जात आहे. सदर अपघाची माहीत वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांना देण्यात आली ते अपघातस्थळी पोहचुन पंचनामा केला. मात्र, पंचनामा केल्यानंतर अपघातग्रस्त वाहने ही पोलिस स्टेशनला जमा करण्याची जिम्मेदारी ही पोलिसांची असतांना मात्र चक्क वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार महाले यांनी मात्र रेती तस्करी करणाऱ्याचकडे ते अपघातग्रस्त दोन्ही वाहणे वडकी पोलिस स्टेशनच्या आवारात आणण्याची जिम्मेदारी दिली. अपघातग्रस्त वाहणे ही पोलिस स्टेशनला जमा करण्याची जिम्मेदारी ही पोलिसांची असतांना मात्र चक्क रेती तस्काराकडेच अपघातातील दोन्ही वाहणे पोलिस स्टेशनला आणण्याची जिम्मेदारी देण्याचे कारण काय? हे मात्र वडकी ठाणेदार यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. 

या गंभीर विषयाकडे जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी लक्ष देऊन पोलिसांच्या कर्तव्यावर असतांना कसुर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येइल का? असे नागरिकांतून चर्चील्या जात आहे.

समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या ! – राज्यपाल रमेश बैस

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

आपल्या शुभेच्छा संदेशात राज्यपाल म्हणाले, सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींचा महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे. राज्यात उच्च दर्जाची विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आहेत. विलोभनीय विस्तीर्ण समुद्रकिनारे, पर्वत रांगा, वने, गड-किल्ले, नदी खोरे आणि पठारे अशा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेला, जैवविविधतेने नटलेला महाराष्ट्र पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्वाधिक आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे.

राज्यपाल म्हणाले, शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्याच्या विकासात मुंबईसह पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरांचे मोठे योगदान आहे.
मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

संसदीय लोकशाहीमध्ये नियमितपणे होणाऱ्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तसेच बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी केले.

राज्यपालांच्या संदेशाच्या मराठी अनुवादाचे वाचन अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी केले.

याप्रसंगी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव नितिन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध देशांचे उच्चायुक्त, महावाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी निवेदन केले.