कसा असेल तुमचा महिन्याच्या शेवटचा दिवस? जाणून घ्या...!!


                  राशीभविष्य : ३० एप्रिल रविवार..!

मेष:-
मेष राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि महत्वाकांक्षी लोकांसाठी दिवस शुभ राहील आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. प्रवासात लाभ आणि यश मिळेल. दुपारनंतर वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. संध्याकाळी योजना पूर्ण करणे फायदेशीर ठरेल आणि संध्याकाळी अतिथीच्या आगमनामुळे खर्च वाढू शकतो.

वृषभ:-
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल नाही. मालमत्तेशी संबंधित वादात तुमचे नुकसान होऊ शकते. भौतिक सुखाची साधने खरेदी करण्यात खर्च होऊ शकतो. तुम्ही तुमचा मुद्दा लोकांसमोर ठामपणे मांडू शकाल. रात्री कुटुंबियांसोबत सहली आणि मौजमजा करण्यात वेळ जाईल. तुम्ही जवळपास फिरायलाही जाऊ शकता.

मिथुन:-
मिथुन राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि काहीजण व्यवसायाशी संबंधित नवीन योजना बनवतील. कर्जाची परतफेड करू शकाल. मुलाकडून पूर्ण आनंद आणि सहकार्य मिळेल. भौतिक साधनांवर खर्च होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला आनंद होईल. नवीन शैली शिकण्याची संधी मिळेल. फालतू खर्च टाळा.

कर्क:-
कर्क राशीच्या लोकांची ग्रहस्थिती शुभ आहे. भौतिक सुख आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही शुभ कार्यातही वेळ घालवू शकता, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल आणि सुविधा वाढतील.

सिंह:- 
सिंह राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि जुन्या मित्रांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी अनुकूलता येईल. तुमचे थांबलेले काम पूर्ण होईल आणि तुमच्यासाठी नवीन संधी येऊ शकतात. हुशारीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तुम्ही जे काही काम कठोर परिश्रम आणि समर्पणाने कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी व्हाल आणि तुमचा प्रभाव वाढेल.

कन्या:-
कन्या राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि विनाकारण शत्रूंची वाढ कमी होईल आणि तुमच्या समस्या दूर होतील. तुमचा खर्च कमी झाल्याने अर्थव्यवस्था सुधारेल. वाहनाचा आनंद मिळेल. आर्थिक बाबतीत कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. आज तुमचे सर्व काम पूर्ण झाल्यामुळे लोक तुमचा हेवा करतील.

तूळ:-
तूळ राशीच्या लोकांना भाग्य साथ देईल. आर्थिक बाबतीत फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. पैसे मिळून निधी वाढेल. नोकरदार लोकांच्या अधिकारात वाढ होईल. स्पर्धा परीक्षा किंवा राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ काही शुभ समारंभात जाईल.

वृश्चिक:-
वृश्चिक राशीच्या लोकांचे भाग्य साथ देत आहे आणि अचानक एखाद्या मोठ्या अधिकारी किंवा नेत्याशी भेट होईल. तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीशी संबंधित चांगली बातमी कुठूनही येऊ शकते. तुम्हाला उत्तम प्रकारचे पदार्थ खायला मिळतील. एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर तुमचा खर्च वाढेल. जवळ किंवा दूरचा प्रवास करावा लागू शकतो.

धनु:-
धनु राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि तुमचे अडथळे दूर होतील. पूजापाठ आणि सत्संगात रुची वाढेल आणि कमाईचा काही भाग दानही होईल. नवीन व्यवसायासाठी नवीन योजना आखल्या जातील, ज्यामुळे भविष्यात धनलाभ होईल. तुम्हाला प्रत्येक बाबतीत भाऊ-बहिणींचे आनंद आणि सहकार्य मिळेल. आत्मविश्‍वासात वाढ होईल. राजकारणाच्या बाबतीत तुम्हाला धावपळ करावी लागेल.

मकर:-
मकर राशीच्या लोकांचा दिवस आर्थिक बाबतीत खूप संमिश्र जाणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. तुम्ही पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही काम करू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे.

कुंभ :- 
कुंभ राशीच्या लोकांचे नशीब साथ देत असून काही जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. जुनी रखडलेली कामे काही अडचणींनंतर पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान वाढेल. तुम्ही तुमचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध कराल. शत्रू पक्ष तुम्हाला घाबरेल.

मीन :-
एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. तुमच्या तिजोरीत वाढ होईल आणि नशीब तुम्हाला अनुकूल राहील. तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिवस अनुकूल राहील. तुमच्या महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील आणि नशीब तुमची साथ देईल.


जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांनी व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. विखे - पाटील म्हणाले की, राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर केले आहे. हे धोरण राबवित असताना जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना अडचणी येऊ शकतात. यासाठी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पाठिशी जिल्हाधिकारी यांनी ठामपणे उभे रहावे.

वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्ती नष्ट करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. विखे- पाटील म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेती/वाळू धोरणानुसार रेतीचे/ वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू/ रेतीचे सर्वंकष धोरण असावे याबाबतची मागणी होती. या नवीन धोरणामुळे सर्वसामान्यांना वाळू/रेती सोप्या पद्धतीने खरेदी करता येणार आहे. शिवाय अनधिकृत पद्धतीने होणारे रेती/वाळूचे उत्खनन यावर आळा बसणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती/ वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी यावर राज्य शासनाने भर दिला आहे.

पूर परिस्थिती धोका कमी करणे, नदीपात्रातील दिशा सरळ करणे कामी आवश्यक असलेली रेती /वाळू नदीपात्रातून काढणे यासाठी जलसंपदा विभागाची मदत घेऊन अशी कामे प्राधान्याने करणेबाबत निर्देश दिले. वैयक्तिक घर बांधकामासाठी ठराविक प्रमाणात वाळू उपलब्ध करून देणे, नवीन वाळू धोरण करताना सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी, नागरिकांना कमीत कमी दरात वाळू उपलब्ध देण्याचा शासनाचा मानस आहे. मुबलक वाळू पुरवठा उपलब्ध केल्यास त्याचा सर्वसामान्यांना लाभ मिळणे, हा शासनाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल. विकास कामांसाठी वाळू उपलब्ध करण्याबरोबरच आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये, म्हणून वाळूचे उत्खनन केले जाते. राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा बसणार आहे, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

रविकांत मडावी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोल डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांना नुकताच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक विभागासह सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

रविकांत शामराव मडावी असे जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकाचे नाव आहे. सदर शिक्षक इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापक आहे. त्याचबरोबर त्यांनी तालुका स्तरावरील शैक्षणिक शिबिरामध्ये शिक्षकांना इंग्रजी विषयाचे प्रशिक्षणासह विविध नाविन्य उपक्रम राबविले आहेत.

त्यामुळे त्यांना नुकताच झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

एस.पी.एम विद्यालयात बालसंस्कार शिबिराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील एस. पी.एम विद्यालयात दिनांक 26 एप्रिल ते 3 मे 2023 पर्यंत बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना व कलागुणांना वाव देण्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सकाळी सात ते दहा या दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शालेय प्रार्थना, प्राणायाम कराटे प्रशिक्षण व इतर विषयाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे शिक्षक करतात. यात गीत गायन वाचन प्रेरणा अभियान लेखन कौशल्य सामान्य ज्ञान व विद्यार्थ्यांमधील कलाविष्कार सादर करण्यात येतो, या शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री क्षीरसागर सर व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी करण्यात आले शालेय प्रार्थना व योगासना श्री बुजुरे सर यांनी सादर केली सिंग मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण दिले तर बिडकर मॅडम आणि बिडकर सर यांच्या चमुचे सहकार्य लाभले.

मेश्राम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. गारघाटे,सर, चिडे मॅडम, कनाके मॅडम,कचवे मॅडम,नवघरे मॅडम, आस्कर सर,धकाते सर, राजगडकर मॅडम, पडलवार सर, निमकर सर, मडावी सर, गादेवार मॅडम, आसुटकर सर, बुजुरे सर यांनी मुलांना वेगवेगळ्या विषयाचे धडे दिले. दरम्यान मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातं असे, या शिबिरासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

भाजपा पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलने दणदणीत विजय मिळवित बाजार समितीत आपली सत्ता कायम केली. 18 पैकी 14 जागांवर शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर महाविकास आघाडी समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनलला 4 जागांवर समाधान मानावे लागले.

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज शुक्रवारी झालेल्या निवडणुकांचे निकाल रात्री उशिरा जाहीर झाले. त्यात शेतकरी एकता पॅनलने 18 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळावीत बाजार समितीत सत्ता काबीज केली. या बाजार समितीच्या निवडणुकीत 94 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 36 अधिकृत तर दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी सहकारी संस्था गटातील 10 व ग्रामपंचात गटातील 4 जागांवर भाजप समर्थित शेतकरी एकता पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. तर व्यापारी अडते व हमाल गटातील तिन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. सहकार संस्था गटातील आरक्षित जागेवर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आला.

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. अ‍ॅड. विनायक एकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकता पॅनल तर, माजी आमदार वामनराव कासावार व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यात शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार सरस ठरले. त्यांनी एकहाती विजय मिळविला. या विजयाचे पडसाद अन्य निवडणूकीवर पडतील अशा ही चर्चा रंगू लागल्या आहेत. 


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सहकारी संस्था गटातील शेतकरी एकता पॅनलचे अ‍ॅड. विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर, अशोक पिदूरकर, वेनूदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर व शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमोद वासेकर, यांचा तर ग्रामपंचायत गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी एकता पॅनलचे विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार यांचा तसेच व्यापारी अडते व हमाल गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलचे सतिश बडघरे, रवींद्र कोंगरे, प्रमोद सोनटक्के यांचा समावेश आहे.



महाविकास आघाडतील अंतर्गत धुसपूस पराभवास
कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत होती. महाविकास आघाडी पासून राष्ट्रवादी दूर राहिली. घटक पक्षही महाविकास घडतीत दिसून आले नाही. शेतकरी संघटनांनाही सोबत घेण्यात आले नाही. अनुभवी नेत्यांना दूर ठेवण्यात आले. काँग्रेस व सेना (ठाकरे) गटानेच महाविकास आघाडीच्या सीट वाटप करून निवडणूक लढविली. त्यामुळे महाविकास आघाडीशी संबंधित असलेले त्यांचे खंदे समर्थक नाराज दिसून येत होते. ही नाराजीच विजयला भोवल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमधून ऐकायला मिळत होती. रणनीतीकार, राजकीय धुरंधर व अनुभवी राजकारणी समजल्या जाणाऱ्या दोन माजी आमदारांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा पुढील वाटचालीकरता मोठा धक्का मानला जात आहे. दोन्ही राजकीय नेत्यांच्या संगठनाचा अभाव या निवडणुकीत दिसून आला. आपापसातील समन्वयाच्या अभावामुळे महाविकास आघाडीला पराभवाची चव चाखावी लागल्याच्या चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत.