निलेशच्या समय सुचकतेने वाचले जखमी वानराचे प्राण; जखमी वानराला प्राणी मित्र हरीश कापसेंनी दिले जिवनदान!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील रेल्वे क्रॉसिंग समोर असलेल्या विद्या नगरी वसाहती मध्ये , मागील एक महिन्यापासून रस्ता भटकून आलेल्या वानराच्या जखमी पिल्लाला प्राणिमित्र हरीश कापसे यांनी जिवनदान दिले.
प्राप्त माहितीनुसार विद्या नगरी परिसरात मागील एक महिन्यापासून वानराचे एक पिल्लू कळप सोडून या भागात भटकले. हे प्रत्येकांच्या गच्चीवर जाऊन, आपला खेळ खेळत असल्यामुळे बाल गोपालांमध्ये, त्या वानराच्या पिल्लाने चांगलाच लळा निर्माण केला होता. त्यामुळे तो वानराचं पिल्लू विद्या नगरी परिसरातील एखादा सदस्य असल्याचा भास येथील नागरिकांना होत होता. परंतु मंगळावर (दि.४ एप्रिल) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास, परिसरातील मोकाट कुत्र्यांनी त्या वानराच्या पिल्लावर हल्ला चढविला.आणि त्याला गंभीर जखमी केले. ही बाब सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांना आज बुधवारला पहाटे ५ वाजताच्या सुमारास लक्षात येताच निलेश चौधरी यांनी कुठलाही वेळ घालवता वनविभागाला माहिती दिली.
तसेच शहरातील प्राणी मित्र हरीश कापसे यांना पाचारण करुन,चार तासाच्या अथक परिश्रमातून जखमी असलेल्या वानराच्या पिल्लाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी विद्यानगरी येथील अध्यक्ष अशोक चौधरी, मनोज नवघरे, विनोद आवरी, विलास समर्थ, अशोक चव्हाण, धनराज डवरे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

तूर्तास वानराचे पिल्लू हे गंभीर जखमी असल्याने,वनविभाग व प्राणीमित्र हरीश कापसे यांनी त्यास रुग्णालयात हलविले.

सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर...

दोन ते अडीच महिन्याअगोदर असेच कार्य सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांनी केले होते, गणेशपूर रोडवर एक अज्ञात युवक जखमी होता. त्याला कोणीही विचारपूस करित नव्हते, मात्र निलेश चौधरी हे त्या मार्गाने भटकंती करित असतांना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या जखमी युवकाला स्वतः च्या वाहनाने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे श्री चौधरी, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.

खाजगी बसेसच्या विरोधात युवकाचे उपोषण


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : नियम डावलून धावणाऱ्या ट्रॅव्हल्स बंद करण्याच्या मागणीसाठी येथील युवक नवाझ शरीफ कादीर शरीफ यांनी मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते नवाझ शरीफ म्हणाले की, मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 78 मध्ये खासगी प्रवासी वाहन कसे? कोणत्या गाड्या धावणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वणी -यवतमाळ रस्त्यावरील धावणाऱ्या गाड्या नियमांना बगल देत या ट्रॅव्हल्स धावत आहेत. त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. या विरोधात प्रवाशांनी आवाज उठवला असता ट्रॅव्हल्सचे कर्मचारी त्यांना शिवीगाळ करून गैरवर्तन करतात. मात्र पोलीस, आरटीओ, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. याबाबत एसपींनी, उपप्रादेशिक, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, खासदार बाळू धानोरकर आदींसह परिवहन अधिकारी यवतमाळ, रापनिचे विभागीय नियंत्रक आदींकडे तक्रारी केल्या, मात्र आज उपोषणाचा दुसरा दिवस उजाळला असूनही कोणीही या कार्यवाहीसाठी धजावले नाही.

आमदार बोदकुरवार यांनी दिल्या कारवाईच्या सूचना 

नवाझ शरीफ कादिर शरीफ हे मंगळवारी दुपारी तीन वाजता पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि पवार, परिवहन विभागाचे एसएचओ राजेश पुरी यांच्याशी बोलून सूचना केल्या. याप्रकरणी योग्य ती कारवाई करा मात्र, या आश्वासनानंतरही उपोषणकर्त्यांचे उपोषण सुरूच आहे. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह दिनकर पावडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही - मुख्यमंत्री

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्य सरकारी व निमसरकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांनी दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी सरकारी कर्मचारी शिक्षक बेमुदत संप वेतन कपात करू नका असे, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे आदेश मथळ्याखाली प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
तीन एप्रिल 2023 रोजी समन्वय समिती व सहकारी यांनी शासनाच्या सह्याद्री अतिगृहात माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संपकऱ्यांची वेतन कपात होऊ नये याविषयी प्रस्तावात्मक निवेदन सादर केले मुख्य सचिवांसह संबंधित सर्व सचिवांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी शिक्षकांची वेतन कपात करू नका असे स्पष्ट आदेश यावेळी दिले आहेत.
दिनांक 14 मार्च ते दिनांक 20 मार्च कसा एकूण सात दिवसांचा संप कालावधी होता सदर कालावधी असाधारण रजा म्हणून गृहीत धरावा असा आदेश दिनांक 28 मार्च रोजी शासनाने पारित केला होता. याविषयी दिनांक 20 मार्च रोजी निर्णायक चर्चा झाली होती या चर्चेत सदर संप कालावधी ध्येय रजा देऊन नियमित करावा असे निसंधिग्ध आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी त्यावेळी दिलेले असतानाही 28 मार्च चा विसंगत आदेश पारित झाला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक प्रक्षुद्द झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ्या मनाने वेतन कपातील मज्जाव केला आहे.
जुनी पेन्शन सर्वांना लागू करा या मागणीबाबत शासन कर्मचारी शिक्षकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यास असेच सकारात्मक धोरण ठेवी अशी अपेक्षा आम्ही यावेळी व्यक्त करतो असे राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती ने सदर परिपत्रकात म्हटले आहे.

कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासल्याने प्रगतीचा मार्ग प्रशस्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मेहनतीला प्रयोगशीलतेची जोड देत मेळघाटातील एका अल्पभूधारक शेतकरी बांधवाने प्रगती साधली आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील बिजूधावडी नजिकच्या बारू या दुर्गम गावाचे रहिवासी किसन भुऱ्या कासदेकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. डोंगराळ भागातील शेती, दळणवळणाची अल्प साधने, साधारण परिस्थिती या परिस्थितीतून मार्ग काढत श्री. कासदेकर यांनी मुख्य पीकांबरोबरच परसबाग, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय करून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षापासून कासदेकर हे शेती करत आहेत. आपल्याकडे केवळ 1.53 हेक्टर शेती आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी कमी जागेत अधिक उत्पन्न देणा-या पिकांचा, तसेच पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती घेतली. कृषी विभागाच्या कार्यशाळा, प्रशिक्षणे, चर्चासत्रे, अभ्यास दौरे यातही ते आवर्जून सहभागी होऊ लागले. त्यांचा जिज्ञासा पाहून त्यांना अधिका-यांकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळू लागले.

शेतात सुरूवातीला पाण्याची सुविधा नसल्यामुळे केवळ खरीप पिके घेतली जायची. त्यानंतर कासदेकर यांनी शेतात विहिर निर्माण केली. त्यामुळे पाण्याची सोय झाली. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पीके घेता येणे शक्य झाले. कासदेकर यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मिरची, टमाटे, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच उन्हाळ्यात भुईमुगाचे पीक घेण्यास सुरूवात केली.

या पिकांबरोबरच त्यांनी सर्व प्रकारचा भाजीपाला, मिरची, वांगी, मेथी, कोथिंबीर, चवळी, वाल, पुदिना, कढीपत्ता, लसूण, मुळा आदींचीही लागवड सुरू केली. त्याचबरोबर, त्यांनी शेताच्या बांधावर आंबा, सीताफळ, बांबू, शेवगा, पेरू, बोर, सुबाभूळ अशा फळझाडे व इतर झाडांची लागवड केली. शेताच्या बांधावर 127 विविध झाडे त्यांनी लावली. सफरचंद, सुपारी, फणस, द्राक्ष, नारळ अशा झाडांची लागवडही त्यांनी प्रायोगिक तत्वावर केली.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी परसदारातील कुक्कुटपालन सुरू केले. ‘ग्रामप्रिया’ कोंबडीचे पालन करून कमी गुंतवणूकीतही उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत कसा आकाराला येतो व कुपोषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी ते कसे लाभदायी ठरू शकते, त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दर्शवले. त्याचप्रमाणे, त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून बायोगॅस युनिट उभारले. गॅसनिर्मितीनंतर उर्वरित स्लरीचा त्यांनी गांडूळ खतनिर्मितासाठी वापर केला. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य व्यवस्थापन व वापर करून शाश्वत शेतीचे आदर्श उदाहरण कासदेकर यांनी निर्माण केले.

इतर शेतकरी बांधवांनाही ते पूरक व्यवसाय, तसेच विविध प्रयोगांबाबत सातत्याने मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना कृषी विभागातर्फे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, तसेच आदिवासी शेतकरी कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- हर्षवर्धन पवार
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती


प्रा. प्रमोद नारायणे यांच्या 'मी पॉझिटिव्ह आलो' या पुस्तकाला रा. ग. जाधव राष्ट्रीय पुरस्कार


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : सुप्रसिद्ध साहित्यिक व शेगांव (बुद्रुक ) येथील कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मी पॉझिटिव्ह आलो या कोरोनाकाळातील मनोवस्थेचे चित्रण करणाऱ्या स्वानुभाव कथनपर साहित्यकृतीला ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते 'रा. ग. जाधव राष्ट्रीय पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

नागपूर येथे 'विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात' जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ द्वारा आयोजित साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या पर्वावर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. के. पी. वासनिक, (दिल्ली ), प्रसिद्ध साहित्यिक अनिल सूर्या ( दिल्ली ) उपस्थितीत होते. १५ जानेवारी २०२३ रोजी ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांच्याकडून प्रकाशित झालेल्या प्रमोद नारायणे यांच्या मी पॉझिटिव्ह आलो या उत्कृष्ट साहित्यकृतीला कमी कालावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुस्तकाची मागणी सुद्धा वाढली आहे. या पुस्तकात त्यांनी कोरोनाकाळात माणसाच्या बदललेल्या मानसिकतेचे वर्णन केले आहे. प्रा. प्रमोद नारायणे यांचा यापूर्वी ' म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे हा बालकवितासंग्रह प्रकाशित होऊन बहुचर्चित ठरला आहे.

सत्याची जात व शरच्चंद्र मुक्तिबोध यांची कविता हे समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले आहेत. एक संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख असून ते उत्कृष्ठ वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर, प्रसिद्धीप्रमुख सूर्यकांत पाटील, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. संदीप भेले यांनी अभिनंदन केले.