गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ५०३ प्रकरणात १० कोटींचे वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतक-यास व त्याच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. या अंतर्गत जिल्ह्यात सन 2018 – 19 पासून आजपर्यंत एकूण 503 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून संबंधितांना 10 कोटी 6 लक्ष रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

शेती व्यवसाय करतांना होणा-या विविध अपघातांमुळे शेतक-याचा मृत्यु झाल्यास तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लक्ष रुपये तर एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 782 अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी 503 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून संबंधित लाभार्थी कुटुंबाला 10 कोटी 6 लक्ष रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 132 प्रकरणे प्रक्रियेमध्ये असून 147 प्रकरणे रद्द झाली आहेत. मंजूर 503 प्रकरणांपैकी 198 प्रकरणे खंडीत कालावधीतील आहे.

खंडीत कालावधी : अपघाती मृत्यु प्रकरणी शेतक-याच्या कुटुंबाला शासकीय अनुदान देण्याकरीता शासनाकडून एका वर्षाच्या कालावधीकरीता विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. सदर विमा कालावधी संपुष्ठात आल्यावर दुस-या कंपनीची नियुक्ती होईस्तोवर सदर कालावधी हा खंडीत म्हणून गृहीत पकडला जातो. अशा कालावधीत विमा दावे आयुक्तालय स्तरावर सादर करण्यात येतात.

अनुदानाचे स्वरुप : शेती व्यवसाय करतांना विविध अपघातामुळे शेतक-याचा मृत्यु झाल्यास दोन लक्ष रुपये अनुदान देण्यात येते. तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लक्ष तर एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपये अनुदान देण्यात येते.

समाविष्ट असलेले अपघात : रस्ता / रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यु, पाण्यात बुडून मृत्यु, नक्षलवाद्यांकडून होणा-या हत्या, सर्पदंश, विंचू दंश, वीज पडून मृत्यु, इलेक्ट्रिक शॉक, अपघाती विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु इत्यादी. अपघातामुळे शेतक-याचा मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास वारसदारांना लाभ देण्यात येतो.

आवश्यक कागदपत्रे : क्लेम फॉर्म भाग – 1 व सहपत्र, क्लेम फॉर्म भाग – 2 (अ) व (ब), क्लेम फॉर्म भाग – 3, सातबारा उतारा, 6 – क (वारस नोंद उतारा), 6 – ड (फेरफार उतारा), वयाचा पुरावा (स्वयंसाक्षांकित प्रत), शिधापत्रिका (स्वयंसाक्षांकित प्रत), मृत्यु दाखला / अपंगत्वाचा दाखला (स्वयंसाक्षांकित प्रत), प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) (स्वयं साक्षांकित प्रत), घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत), पोलिस पाटील माहिती अहवाल (एफआयआर नसल्यास), इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा अहवाल (आवश्यक असल्यास), वाहन परवाना (आवश्यक असल्यास), बँक पासबुक (झेरॉक्स प्रत), अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र व फोटो, नावात / आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र.

या योजनेंतर्गत केवळ सातबारावर नाव असलेल्या संबंधित व्यक्तिलाच नव्हे सातबारावर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्याचा अपघात किंवा अपंगत्व आल्यास वरीलप्रमाणे लाभ देण्यात येतो. त्यामुळे 2018 – 19 पासून या योजनेत अपघातप्रकरणी फक्त सातबाराधारक सदस्य गृहीत न धरता संपूर्ण कुटुंबाला संरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंबाला संरक्षित करण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले.

शेतजमीनीचा परस्परांकडील ताब्याची अदलबदल करणारी ‘सलोखा योजना’

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तासाठी शासनाने सलोखा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात '१३ एप्रिल' हा 'सलोखा योजना दिवस' म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह‌्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्याना सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

शेतजमीनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी शासनाने ही योजना लागु केली आहे. ही योजना दोन वर्षासाठी लागू राहील.

एकमेकांच्या नावावर शेत जमीनीचा ताबा असणा-या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नाममात्र मुद्रांक शुल्क एक हजार रु आकारण्याबाबत सवलत सलोखा योजनेत देण्यात आली आहे.

शासन निर्णयामध्ये राज्यातील प्रत्येक गांवामध्ये अंदाजे ३ प्रकरणे असण्याबाबत नमुद करण्यात आलेले आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्हयामध्ये २१५९ महसुली गावांमध्ये अंदाजे ६४७७ एवढी प्रकरणे असण्याची शक्यता आहे. सदर शासन निर्णयाचा कालावधी हा २ वर्षासाठीच लागु असल्याने लाभार्थ्याच्या हितासाठी मोहिम स्वरुपात काम होणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी पात्रता अशी आहे.

१.सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसुचना शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन दोन वर्षाचा राहील.

२. सदर योजनेत पहिल्या शेतक-याच्या शेतजमीनीचा ताबा दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे किमान १२ वर्षापासुन असला पाहिजे.

३.एकाच गावात जमीन धारण करणा-या शेतक-यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे व सदर पंचनामा नोंदवहीवरुन तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतक-यांना दिले पाहिजे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे.

४. सलोखा योजनेंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटदार वर्ग ,सत्ताप्रकार,पुनर्वसन, आदिवासी , कुळ इ. सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकरांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदविणे आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.

५.पहिल्या शेतक-याच्या शेतजमीनीचा ताबा दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तीक जमीनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही.

६.सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुस-याकडे व दुस-याचा ताबा पहिल्याकडे असणा-या जमीनीच्या दोन्ही बाजुकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.

७. अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमीनीस सदर योजना लागु असणार नाही.

८.सलोखा योजना अंमलात येण्यापुर्वी काही पक्षकारांनी जमीनीची अदला-बदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.

९.सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांनी जमीन ही यापुर्वीच तुकडा घोषित केली असेल तर त्याबाबत प्रमाणित बुक दस्तास जोडुन अदलाबदल दस्त नोंदवनु त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील.


जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वेळापत्रक तयार केले असुन जिल्हाभर त्यानुसार कार्हवाही करण्याचे निर्देश त्यांनी महसुल यंत्रणेला दिले आहेत. ते असे आहेत.

२९ मार्च ते ३१ मार्च २०२३ उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या स्तरावर अधिनस्त सर्व गावांमध्ये सलोखा योजना राबवण्याबाबत नियोजन करावे. १ एप्रिल ते १२ एप्रिल २०२३ तलाठी यांच्याकडुन गाव स्तरावर सलोखा योजनेची प्रचार व प्रसिध्दी करावी. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडुन गावामध्ये सलोखा योजनेअंतर्गत पात्र असणा-या खातेदारांची यादी तयार करावी. सदर यादी तयार करत असतानाच व प्रकरणे प्राप्त होताच शासन निर्णय परिशिष्ट ब नुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचनामा तयार करुन नोंदणीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. १२ एप्रिलला तालुक्यामध्ये गाव निहाय पात्र अर्जदारांची संख्यासह यादी बाबत उपविभागीय अधिकारी यांनी आढावा घ्यावा. सदर माहिती जिल्हास्तरावर पाठवून सर्व लाभार्थ्यासाठी मोहिम स्वरुपात परिशिष्ट ब नुसार पंचनामा करून व नोंदणी करावी. याबाबत तालुकानिहाय वेळापत्रक बनवून जिल्हास्तरावर पाठवावे.

१३ एप्रिल हा दिवस पूर्ण जिल्हयात "सलोखा योजना दिवस " म्हणुन राबवून पात्र लाभार्थ्यासाठी परिशिष्ट ब नुसार पंचनामा तयार करण्याची कार्यवाही करावी. १७ एप्रिल पासुन प्रत्येक उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यानुसार अधिकार अभिलेखामध्ये नोंद घेण्याबाबत, सर्व तालुक्यांचे, गावांचे काम पूर्ण होईपर्यत नियमित आढावा घेऊन प्रगती अहवाल जिल्हास्तरावर पाठवावा असे निर्देश श्री येडगे यांनी दिलेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीचा बिगुल वाजला!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची समजली जाणारी तसेच वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बऱ्याच तपानंतर अखेर बिगुल वाजला. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा 18 जागेसाठी अखेरच्या दिवशी 91 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.  
27 मार्च पासून सुरु झालेल्या नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी 3 एप्रिलला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटात 41, महिला राखीव 07, इतर मागासवर्ग मतदार संघ 07, अनुसूचित जमाती राखीव मतदार संघ 04, तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण 14, अनु. जाती /जमाती मतदार संघ 07, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ 05, व्यापारी अडते मतदार संघ 04, हमाल, मापारी व तोलारी मतदार संघ 02 असे एकुण 91 असे एकूण 91 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 5 एप्रिलला छाननी केली जाणार आहे तर नामनिर्देशन पत्र 6 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत मागे घेता येईल. निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी 21 एप्रिल ला चिन्हासह करण्यात येणार आहे. 30 एप्रिल ला 4 वाजेपर्यंत मतदान केले जाणार आहे.   
या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे(गट) शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्पना अरुण हरणे यांचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : येथील प्रसिद्ध हरणे कॅटरर्सचे संचालक अरुण हरणे यांच्या पत्नी कल्पना अरुण हरणे यांचे वयाच्या 53 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज दि. 3 एप्रिलला निधन झाले आहे. 
     
त्यांच्या पाठीमागे पती, हर्षाली संदीप आकरे, रुचाली या दोन मुली, व श्रेयश हा मुलगा आहे. येथील मोक्षधामवर दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लालगुडा येथे रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विठ्ठल रुखमाई देवस्थान समिती अहेरी द्वारा संचलित विठ्ठल मंदिर लालगुडा येथे रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा काढण्यात आली.

 या शोभयात्रेत प्रभू श्री राम घोड्यावर स्वार असलेली पूर्णपणे लाकडाने बनलेली मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली
 100 वर्षाचे वर सुरु असलेली परंपरा कोरोना काळात व अहेरी गाव पूर्वसन प्रकियेत खंड पडली होती. ती आता लालगुडा गावात नवीन मंदिरात नव्याने सुरु झाली आहे.

सकाळी राम जन्म कथा वाचण्यात आली. त्यानंतर गुरुदेव सेवा भजन मंडळ अहेरी यांनी आपली सेवा सादर केली. त्यानंतर काल्याचे किर्तन झाले.व सायंकाळी शोभयात्रा काढण्यात आली.