लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी च्या वतीने शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ ला महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. रमेशजी बोहरा यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे सचिव अॅड. लक्ष्मणराव भेदी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच वणीतील नागरीक उपस्थित होते.
या ग्रंथ प्रदर्शन व विक्रीमध्ये विविध प्रकाशनाच्या पुस्तकांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी स्पर्धा परिक्षा उपयोगी पुस्तके, अभ्यासक्रमीक पुस्तके, मराठी साहित्यातील दुर्मिळ तसेच नविन प्रकाशित पुस्तके या प्रदर्शनामध्ये उपलब्ध होती. प्राध्यापकांनी, कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या ज्ञान साहित्यात भर पडावी याकरीता पुस्तकांची खरेदी सुध्दा केली. तसेच त्यांना आवश्यक असलेल्या पुस्तकांची प्रकाशकाकडे नोंद करुन ते पुस्तक प्राप्त केले.
संपुर्ण दिवस चाललेल्या या ग्रंथ प्रदर्शनाला अनेक पुस्तक प्रेमी मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला. या ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे तसेच ग्रंथालय कर्मचारी श्री. जयंत शेंडे, श्री. सुरेंद्र समर्थ, श्री. संतोष चांदेकर, कु. सुवर्णा गंधमवार तसेच श्री. आनंद नगराळे यांनी अथक परिश्रम घेऊन हे ग्रंथ प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडले.

बंगाली डॉक्टर लूटमार प्रकरण:मारेगाव ताब्यातील "त्या" आरोपींची आदिलाबाद कारागृहात रवानगी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव स्थित डॉ हाजरा यांना 13 मार्च रोजी मारेगाव-वणी या महामार्गांवर फिल्मीस्टाईलने लूटमार करून खंडणी मागणाऱ्या प्रकरणातील त्या आरोपींना परप्रांतीय राज्यातून मारेगावात आणले, a त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, सोन्याची अंगठी व चैन व वापरलेली कार जप्त करण्यात अजून यश आले नाही. मारेगाव ठाण्याचा पिसीआर संपून शनिवारला "त्या" आरोपींची परराज्यातील आदिलाबाद कारागृहात रवानगी करण्यात आली.

नवरगाव येथे सुपरिचित दवाखाना असलेल्या बंगाली डॉ.पोभासा हाजरा यांना 13 मार्च रोजी सायंकाळ सुमारास मारेगाव कडे जात असतांना आंतरराज्यातील टोळक्यांनी बंदुकीचा व धारदार शस्त्राचा धाक दाखवित त्यांच्या जवळील कॅश रकमेसह सोन्याची अंगठी व चैन लांबवून कार ने पोबारा केला होता. या धक्कादायक घटनेने जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा तपास सुरू असतांना सदर आरोपींनी दुसऱ्याच दिवशी सीमालगत तेलंगणा राज्यात कंटेनर वर डाव साधला. दरम्यान, कंटेनर लूटमार प्रकरणात इचोडा जिल्हा आदीलाबाद पोलिसांच्या जाळ्यात हे आरोपी  अडकले. आरोपींनी या प्रकरणात पोलिसांना गुमराह करण्यासाठी दुसरीच कार वापरली होती असे समजते.

दरम्यान,आरोपींना इचोडा पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्यातील टोळीचे धागेदोरे मारेगाव प्रकरणाशी जुळते का? व आरोपी हेच आहे का? यासाठी मारेगाव पोलिसांनी डॉ हाजरांना तिथे नेवून हेच ते चौघे का म्हणून कन्फर्म म्हणून परतले. तिथली प्रोसेस झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी हालचाली करित हे आरोपी 25 मार्च रोजी मारेगाव पोलीस स्टेशन ला आणून सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली.

परिणामी, मारेगाव ठाण्यात आणलेल्या आरोपीमध्ये मो.अर्षद अब्दुल्ला (वय 32) रा.जिराहिरा ता. पहारी जिल्हा भरतपूर (राजस्थान) तर जाकीर खान हासनी (वय 31), मुजाहिर खान इंद्रिस (वय 27), मुश्ताक खान प्रताप (वय 33) हे तिघेही राहणार हातीया ता. छाता जिल्हा मथुरा (उत्तरप्रदेश) यांनी मारेगाव लूटमार प्रकरणाचा गुन्हा गेल्या बुधवार ला कबूल केला. पण त्यांच्या कडील मुद्देमाल हस्तगत झाला नाही. मात्र, इचोड पोलिसांनी आरोपीकडून 2 बंदूक, 1 चाकूसारखे धारदार शस्त्र, 14 काडतुस, 2 देशी कट्टे जप्त केले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) कुठे? आणि ते आंतरराज्यातील टोळीतील हे सराईत गुन्हेगार कुठे?...नेमकं काय प्रकरण असेल? हा प्रश्न मात्र तालुक्यातील नागरिकांच्या डोक्यात घोंगावत आहे.

शेतीसह नर्सरी विकसित करून साधली शेतकरी बांधवाने आर्थिक उन्नती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नवनवे प्रयोग व उत्कृष्ट रोपांसाठी स्वत:ची नर्सरी तयार करून मोर्शी तालुक्यातील एका शेतकरी बांधवाने आर्थिक प्रगती साधली आहे.

शेती विकासासाठी सूक्ष्म सिंचन, नाविन्यपूर्ण पीक, अद्ययावत तंत्रज्ञान अशी विविध प्रयोगशीलता जोपासणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन मोर्शी येथील ओमनगरमधील प्रफुल्ल गणपतराव हेलोडे यांनी आपली प्रयोगशीलता व विविध शासकीय उपक्रमांची साथ यांची सांगड घालून उत्कृष्ट शेती फुलवली आहे.

प्रफुल्ल हेलोडे यांनी कृषी विभागाच्या क्रॉपसॅप व पाणलोट प्रकल्पात काही काळ काम केले. त्यांनी नोकरी न करता स्वत: शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:ची शेती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी 17 एकर शेती करार तत्वावर घेतली व या सर्व शेतीत ठिबक सिंचन यंत्रणा बसविली. शेतीत त्यांनी नाविन्यपूर्ण पीके घेतली. दोन एकरात ॲशगार्डच्या (पेठा) लागवडीचा प्रथम प्रयोग केला. त्यात एकरी 25 टन उत्पादन मिळाले. या पिकाचे उत्तम उत्पादन त्यांनी सातत्याने घेतले. नागपुरातील नामांकित खाद्यपदार्थ उद्योगाने त्यांच्याकडून या उत्पादनाची नियमित खरेदी केली. त्यामुळे हेलोडे यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.

जैविक शेतीचाही प्रयोग त्यांनी केला. तळणी येथे शेती विकत घेऊन त्यांनी सर्व शेतावर मल्चिंग केले. बांबूच्या शेडवर काकडीचे तीन महिन्याचे पीक घेऊन उत्पादन सातत्य ठेवले. मल्चिंग पेपरचा वापर संपूर्ण शेतावर आच्छादित ठेवण्यासाठी ट्रॅक्टरचलित मशिन तयार केली.

भाजीपाल्याची रोपे स्वत: तयार करता यावी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी नर्सरीला भेटी दिल्या. अभ्यास करून स्वत: रोपे तयार केली. शेतात शेडनेट व पॉलिहाऊस उभारण्यासाठी ‘आत्मा’मार्फत तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण घेतले.

कृषी विभागाच्या एमआयडीएच योजनेच्या माध्यमातून पॉलिहाऊस व शेडनेटची उभारणी केली. त्यात ते मिरची, काकडी, कोबी, टमाटे आदी भाजीपाला रोपे, टरबुज, खरबूज आदी रोपांची निर्मिती करत आहेत. त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला. फुलांचेही उत्पादन त्यांनी घेतले. आपल्या नर्सरीत ते शेतकरी बांधवांना रोपांची विक्रीही करतात. पॉलिहाऊस व शेडनेटनंतर त्यांनी द्वारका हायटेक नर्सरीची उभारणी केली. त्यांची 50 लाखांवर रोपविक्री झाली. आता तर त्यांची वार्षिक उलाढाल दीड- दोन कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. ते शेतकरी बांधवांना विविध पिकांसंदर्भात मार्गदर्शनही करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने त्यांना उद्यान पंडित म्हणून गौरविले आहे.

- हर्षवर्धन पवार
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

प्रत्येक गटाला तीन वर्षात 10 लाखांचे आर्थिक सहाय्य मिळणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जमिनीची सुपिकता व सेंद्रिय कर्ब वाढविणे, तसेच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात चाकूर तालुक्यात पंधरा शेतकरी गटांचे क्लस्टर तयार करणात आले असून नळेगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, नळेगाव या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाणार आहे. प्रत्येक गटाला तीन वर्षात एकूण दहा लाखांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा मोठ्या प्रमणात वापर होत आहे. पाण्याचा जास्त वापर, जमिनीची होणारी धूप, एकच पीक वारंवार घेणे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर पुरेशा प्रमाणात होत नसल्याने जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापीक होत आहेत, पिकांचे उत्पादन कमी होवू लागले आहे. उत्पादित शेतमालाची प्रतही खालावली असून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात परंपरागत कृषि विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत आहे. ही योजना गट आधारित असून जिल्हास्तरावर कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.

सेंद्रिय शेतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक गटाला तीन वर्षात टप्प्या-टप्प्याने दहा लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये सहाय्यकारी संस्थांमार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रादेशिक परिषदेद्वारे पी.जी.एस. प्रमाणीकरण, डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन, मूल्यवृद्धी, विपणन आणि प्रसिद्धी आदी बाबींसाठी प्रति हेक्टर प्रमाणे पहिल्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 16 हजार 500, तर दुसऱ्या वर्षी 17 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मातीचे नमुने तपासणी, चर काढणे अथवा बांध घालणे, हिरवळीचे खत, कंपोस्ट डेपो लावणे आणि जीवामृत, अमृतपाणी, बिजामृत, दशपर्णी यासारख्या निविष्ठा खरेदीसाठीही अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

शेतकरी गटांच्या मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती :

सेंद्रिय शेती संदर्भात पीक संवर्धन, पीक संरक्षण, सेंद्रिय प्रमाणीकरणाविषयी प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे, सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी आवश्यक माहिती अद्ययावत करणे, पीक पेरणी अहवाल, उपलब्ध शेतमाल व गुणवत्ता याबाबत अचूक माहिती सादर करण्यासह इतर बाबींविषयी गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे तज्ज्ञ प्रशिक्षक शेतकरी गटाला उत्पादित शेतमालाच्या सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत.

सेंद्रिय निविष्ठा निर्मिती ते सेंद्रिय प्रमाणीकरणसाठी आवश्यक बाबींचे मिळणार प्रशिक्षण:

सेंद्रिय शेतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय खतांची निर्मिती करण्यासह मुलस्थानी जलसंधारण, पीक नियोजन, आंतरपीक लागवड, बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन यासारख्या विविध बाबींचे प्रशिक्षण दरवर्षी दिले जाणार आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण मानके, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, मालाची प्रतवारी, विपणन व्यवस्थान आदी बाबींच्या प्रशिक्षणाचाही यामध्ये समावेश असणार आहे.

आगामी खरीप हंगामापासून 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीला प्रारंभ:

लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यामध्ये परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत सेंद्रिय शेतीसाठी पंधरा गटांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. या गटांमध्ये प्रत्येकी 20 शेतकऱ्यांचा समावेश असून हे शेतकरी आगामी खरीप हंगामात प्रत्येकी एक हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करणार आहेत. अशाप्रकारे एकूण 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाणार आहे. यामध्ये नळेगाव, आजनसोंडा खु., सावंतवाडी, हटकरवाडी, उकाचीवाडी, हुडगेवाडी, लिंबाळवाडी, सुगाव आणि घरणी गावामधील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जमिनीची सुपीकता वाढणार, ग्राहकाला रसायनमुक्त शेतमाल मिळणार:

जमिनीची सुपीकता व जमिनीतील सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवण्यासह त्यामध्ये वाढ होण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांचा व सेंद्रिय कीटकनाशकांचा सलग तीन वर्ष वापर आणि सेंद्रिय शेतीच्या रूपांतरणाच्या इतर बाबी अवलंबिल्यास, रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर होऊन तयार होणारा शेतमाल हा रसायनमुक्त होऊ शकतो. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, तिचे प्रमाणीकरण करणे तसेच सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रीय गट निर्मिती करणे व ग्राहकाला रसायनमुक्त शेतमाल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

"या" लाभार्थ्यांनी घ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊया…

पात्र लाभार्थी – सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट / एफपीओ / सहकारी संस्था

आवश्यक कागदपत्रे – 7/12 व 8 अ, आधारकार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

समाविष्ट बाबी - कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) यांचा समावेश असणार आहे. यात अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के औजारे अशी मदत मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख तर इतर औजारेसाठी 40 टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. औजारे बँक या घटकांतर्गत समाविष्ट बाबींमध्ये ट्रॅकर आणि इतर पसंतीनुसार औजारे यांचा समावेश असणार आहे .10 लाखापर्यंत अनुदान 40 टक्के (चार लाख), 25 लाखापर्यंत 40 टक्के अनुदान (10 लाख) असणार आहे.

संपर्क - अधिक माहितीसाठी mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ तसेच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.