जाणून घ्या आजचे राशीभविष्य : ३१ मार्च शुक्रवार...!


               राशीभविष्य : ३१ मार्च शुक्रवार...!

मेष:
करिअरच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास दिवस असेल. तुमचा कोणताही नवीन करार निश्चित होऊ शकतो, तुम्हाला राज्याकडून विशेष सन्मानही मिळू शकतो. भौतिक विकासाची शक्यताही निर्माण होत आहे. तुम्हाला सामाजिक कार्यात खर्च करावा लागेल, परंतु या खर्चामुळे तुमची कीर्ती वाढेल.

वृषभ
वृषभ राशीचे लोक नवीन योजनांमध्ये व्यस्त राहतील. पवित्र स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल. कायदेशीर वादात यश मिळेल. या राशीचे लोक जे स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत, त्यांची योजना यशस्वी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप सर्जनशील असणार आहे. काही सर्जनशील आणि कलात्मक काम पूर्ण करण्यात तुम्ही दिवस घालवू शकता. तुम्हाला सर्वात जास्त आवडते काम तुम्हाला करायला मिळेल. तुम्हाला खूप समाधान वाटेल. तुमच्या मनात नवीन योजनाही येतील.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस खूप सर्जनशील असणार आहे. तुम्ही कोणतेही काम समर्पित भावनेने कराल, त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. अपूर्ण कामे मार्गी लागतील. यासोबतच महत्त्वाच्या चर्चाही पाहता येणार आहेत. रात्री लग्नसमारंभाला जाण्याची संधी मिळू शकते.

सिंह:
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. पण, धर्म आणि अध्यात्माच्या बाबतीत थोडा वेळ अभ्यास करून लिहिणे योग्य ठरेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याबाबत थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

कन्या:
कन्या राशीच्या लोकांनी संयम आणि सावधगिरीने काम करावे. तुमचा आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे आपले वर्तन लक्षात घेऊन सर्वांशी वागा. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने तुमचे काम करा.

तूळ:
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. कामाच्या वर्तनाशी संबंधित सर्व वाद आज मिटू शकतात. नवीन प्रोजेक्टवर काही कामही सुरू होऊ शकते. रिअल इस्टेटच्या बाबतीत तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.

वृश्चिक:
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस खूप मजबूत आहे. तुम्हाला दिवसभर लाभाच्या चांगल्या संधीही मिळू शकतात. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. नोकरी किंवा व्यवसायात काही नावीन्य आणता आले तर भविष्यात त्याचा फायदा होईल. कामात नवीन जीवन येईल.

धनु:
धनु राशीच्या लोकांनी दिवस जपून आणि सावधपणे सांभाळावा. व्यवसायात थोडीशी जोखीम पत्करली तर मोठा फायदा होण्याची आशा आहे. दैनंदिन कामांच्या पलीकडे काही नवीन कामांमध्ये हात आजमावून पहा. तुमचा एखादा नातेवाईक तुम्हाला पैशाची व्यवस्था करण्यास सांगू शकतो.

मकर:
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला असणार आहे. तुम्हाला दैनंदिन घरातील कामे हाताळण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुला-मुलीच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

कुंभ:
कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान बदलामुळे समशीतोष्ण विकार होऊ शकतो. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठी दिवस आनंददायी राहील. घाईघाईत चूक होऊ शकते, त्यामुळे संयमाने काम करावे लागेल.

मीन
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. तुम्हाला व्यवसायात जोखीम पत्करून परिणाम मिळेल. संयमाने आणि तुमची मृदू वर्तणूक सुधारून समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तुम्ही एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केल्यास ते शुभ होईल.


मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नांदेड : नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ काल भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. जखमी व्यक्तींबाबत विचारपूस करुन त्यांना तातडीने योग्य ते उपचार उपलब्ध करुन देण्याबाबत अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे यांना सूचना दिल्या आहेत.

मृतांमध्ये ज्योती रमेश भोई वय 32, राहणार मेहकर, गालिअम्मा कल्याण भोई वय- 35, रा.गेवराई, वेजल कल्याण भोई वय वर्ष 1, रा.गेवराई, पुंडलीक कोल्हाटकर वय-70, रा माळसावरगाव ता. भोकर, तर दवाखान्यात नेताना वाटेत विद्या संदेश हटकर वय 37, रा. इजळी ता. मुदखेड यांचा समावेश आहे. चार मृतदेह शवविच्छेदनासाठी मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले आहेत. तर अपघातातील गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे.

जखमीमध्ये लक्ष्मी राजू गोडमंचे वय वर्षे 30, दिपा महेश गोडमंचे वय वर्षे 20, पुजा गोडमंचे वय वर्षे 40, सोहम हटकर वय वर्षे 10, सोनाक्षी हटकर वय वर्षे 13, शोभा भांगे वय वर्षे 35, शेख मोईद्दीन शेख जिम्मीसाब वय 45, पल्लवी विजय शामराव वय वर्षे 30, यांचा समावेश आहे.

चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया!


सह्याद्री चौफेर वृत्तसंस्था 

सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी वाढतांना दिसत आहेत. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, अनुवांशिक नसलेले कर्करोग अशा आजारांनी घरात प्रवेश केला आहे. आपल्या भारतातील पारंपरिक तृणधान्य- भरडधान्याच्या उपयोगाद्वारे या समस्येवर उपाय शोधता येईल.

 दुष्काळात तग धरणारे शेवटचे पीक म्हणजे तृणधान्य! अल्पभूधारक शेतकऱ्याला स्वतःच्या आरोग्यासाठी, त्याच्या गाई-ढोरांच्या वैरणासाठी, इंधनासाठी ते उपयुक्त आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, तसेच कमी पाण्यात होणारे हे पिक आहे.
मोठे तृणधान्य म्हणजे ज्वारी व बाजरी आणि छोटे तृणधान्य म्हणजे नाचणी, भगर, राळ, कोद्रो, सावा, वरी, छोटा सावा. छोट्या तृणधान्यांना विविध भागात नागली, मोर, भादली, कांगणी असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पूर्वी ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके खळ्यात मळणे या प्रक्रियेने तयार केली जात असे. पण छोट्या तृणधान्याचे वरील आवरण, टणक असल्यामुळे भरडावे किंवा कांडावे लागत असे आणि म्हणून यांना भरडधान्ये म्हटली जातात. काळाच्या ओघात शेतात हे पीक कमी घेतले जावू लागले. तसेच भरडणे व कांडणे ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे मनुष्याचा आहारातून अशी ही मूल्यवान तृणधान्य नाहीशी झाली.
समाजात आहार व आरोग्याविषयी जागरूकता आल्याने भरडधान्य आता ताटात दिसू लागले आहे. भारताच्या प्रयत्नाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणूनही साजरे केले जात असल्याने आणि त्यासाठी जनजागृतीचे विवध उपक्रम आयोजित केले जात असल्यानेदेखील नागरिकांना भरडधान्याचे महत्व कळले आहे.

तांदूळामध्ये असणारा ०.२ ग्रॅम प्रति ग्रॅम तंतू व भगरमध्ये असणारा १०.१ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम तंतू ही तुलना लक्षात घेतल्यास भरडधान्याचे महत्व लक्षात येते. आहारतंतू हे वजन नियंत्रित करणे, लठ्ठपणा कमी करणे, पोट साफ ठेवणे, पित्ताशयात खडे न होऊ देणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, यासाठी उपयुक्त असतात. तंतू हे इन्शूलिनचा प्रतिसाद वाढविण्याचे कार्य करतात, त्यामुळे साखर नियंत्रित रहात असल्याने या धान्यांना जगभरात मागणी आहे.
लहान मुली मुलांपासून ते पौगडावस्था, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यामध्ये लोहाची कमतरता असते. लहान मुलांमध्ये मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त असो लोह आहारात समाविष्ट असणे जरुरी आहे. बाजरीतील ८ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम, राळमधील ६.३ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम लोह व तुलनेत तांदूळातील १ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम असणाऱ्या लोहाचे प्रमाण लक्षात घेतल्यास आहारात भरडधान्याची उपयुक्तता लक्षात येते.

शरीराच्या प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी लागणारे कॉल्शिअम तसेच हाडांच्या वाढीसाठी व हाडे मजबूत राहण्यासाठी लागणारे कॉल्शिअम हे नाचणीमध्ये ३४४-३६४ मिलीग्रॅम प्रति १०० ग्रॅम आहे. नाचणी आहारातून बाजूल सारल्याने कॅल्शिअमच्या पूर्ततेसाठी औषधे घ्यावी लागतात. डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले केरोटिन बाजरीमध्ये असते.
तृणधान्य- भरडधान्य मध्ये असणारी साखर ही जटील कर्बोदके स्वरुपाची असल्याने रक्तात विरघळण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तिमध्ये साखर नियंत्रित करण्यात व वजन कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. या धान्यांमध्ये असणारे ॲन्टिऑक्सिडंट पेशींना इजा होऊ देत नाही. तसेच कर्करोग प्रतिबंधूसाठी ॲन्टिऑक्सिडंटचे कार्य उपयुक्त असते. तृणधान्य- भरडधान्य यामध्ये असणार ७ ते १२ टक्के प्रथिन हे स्नायू बळकटीकरण व शरीराच्या प्रक्रियामध्ये उपयुक्त असता.

जीवनसत्व, सूक्ष्मपोषकद्रव्ये युक्त असल्यामूळे शरीरातील पेशींची वाढ व कार्य व्यवस्थित राहते. व तसेच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. मानसिक आरोग्य चांगले राहणे, झोप शांत लागणे यासाठी उपयुक्त आहेत. भरडधान्य खातांना त्यांना अगोदर कमीतकमी ६ तास भिजवून ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या तंतूत पाण्याचे शोषण होणे शरीरासाठी उपयुक्त आहे, यांच्यापासून पोळी-भाकरी, ठोसा, इडली, आप्पे, विविध प्रकारच भात, खिचडी, बिस्कीट , ब्रेड, पिझा बेस आपण बनवू शकता.
शासनाच्या कृषि विभागाने पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध स्तरावर या धान्याचे महत्व समजावले जात आहे. एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त् असलेले हे धान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने आणि आपल्या आरोग्यासाठीदेखील आपण आहारात तृणधान्य-भरडधान्याचा समावेश करूया!

-डॉ.अर्चना ठोंबरे
(लेखिका वैद्यकीय व्यावसायिक आणि पौष्टिक अन्नधान्य विषयातील अभ्यासक आहेत.)

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन.

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था       

वणी : विद्यार्थ्यांमध्ये असणारे विविध सूप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक २ ते ४ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये युवा भरारी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.    
या उपक्रमात पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पुष्पगुच्छ सजावट, मेहंदी, रांगोळी, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी एकल नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, पोस्टर प्रेसेंटेशन या स्पर्धांसह कॅरम आणि बुद्धिबळाची पुढील सामने घेण्यात येतील.
      
तिसऱ्या दिवशी समूह नृत्य, सुगम संगीत यांच्या सादरीकरणासह स्पर्धांचे अंतिम सामने खेळण्यात येतील. शेवटी समारोपीय कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरणाने या युवा भरारी उत्सवाची सांगता होईल.       
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अभिजित अणे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे, डॉ.विकास जुनगरी, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रभारी प्रा. किसन घोगरे, क्रीडा विभाग संचालक डॉ. उमेश व्यास तथा ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येत या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वतरांगा, उत्तुंग सागवृक्ष, मिश्र वनांचे पट्टे, धबधबे यांनी समृद्ध मेळघाटात गौर, सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या, तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणारा आहे.

व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांबाबत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल प्रकल्पातर्फे टायगर फोरमकडे सादर करण्यात आला. फोरमच्या चमूने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांची पाहणी केली. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी या चमूत सहभागी असतात. या चमूने प्रत्यक्ष कामे, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षण दर्जा याची तपासणी करून अहवाल ग्लोबल फोरमला दिला. त्यानुसार फोरमकडून जागतिक मानक प्रकल्पाला जाहीर करण्यात आले आहे.

‘कॅटस्’नंतर ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॅल्यूशन’तर्फे विविध विषयांवर पाहणी केलेली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सकारात्मक गुण प्राप्त करेल, असा विश्वास प्रकल्पाच्या संचालिका जयोती बॅनर्जी यांनी व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संवर्धन व संरक्षण कार्यात अहोरात्र झटणा-या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले असून, या सर्वांचे अभिनंदन श्रीमती बॅनर्जी यांनी केले.