मारेगांव : तहसिल कर्मचाऱ्याच्या दिरंगाई कारभाराने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी व शेतकरी सन्मान निधी खात्यात वर्ग करण्यास विलंब होत असल्याने, वारंवार खंडीत वीज पुरवठा होणे, प्रोत्साहन निधी, पिक विमा मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. या सह इतरही गहन प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मारेगाव काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात तहसिल प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रसंताचे भजन गात शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून "जो पर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाही तो पर्यंत उपोषण सुरु राहील" असे गौरकर यांनी सांगितले.
गेल्या पाच ते सहा महिन्याअगोदर अतिवृष्टीने व महापूरात तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब पाहता मारेगाव काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, काँग्रेस सेवादल प्रफुल विखणकर, माजी बाजार समितीचे संचालक अरविंद वखनोर यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयासमोर कालपासून अनोखे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. या प्रसंगी शेतकऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने गात यात आंदोलनात आपला सहभाग नोंदविला. यावेळी तालुक्यातील काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.