तहसिल प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रसंताचे भजन गात काँग्रेसचे उपोषण

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मारेगांव : तहसिल कर्मचाऱ्याच्या दिरंगाई कारभाराने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी व शेतकरी सन्मान निधी खात्यात वर्ग करण्यास विलंब होत असल्याने, वारंवार खंडीत वीज पुरवठा होणे, प्रोत्साहन निधी, पिक विमा मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. या सह इतरही गहन प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मारेगाव काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात तहसिल प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रसंताचे भजन गात शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून "जो पर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाही तो पर्यंत उपोषण सुरु राहील" असे गौरकर यांनी सांगितले. 
      
गेल्या पाच ते सहा महिन्याअगोदर अतिवृष्टीने व महापूरात तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब पाहता मारेगाव काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, काँग्रेस सेवादल प्रफुल विखणकर, माजी बाजार समितीचे संचालक अरविंद वखनोर यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयासमोर कालपासून अनोखे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. या प्रसंगी शेतकऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने गात यात आंदोलनात आपला सहभाग नोंदविला. यावेळी तालुक्यातील काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.

श्रुष्टी राठोडने पटकावलं मॅक गोल्ड मेडल


सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : कारंजा (लाड) येथील सौ शोभनाताई एन चवरे विद्यालयात पाचव्या वर्गात शिकत असलेली श्रुष्टी संतोष राठोड हिने थंब पेंटिंग मध्ये भाग घेतला होता, या पेंटिंग स्पर्धेत श्रुष्टीने गोल्ड मेडल मिळवलं आहे. श्रुष्टी ही मारेगाव जि. यवतमाळ येथे कार्यरत असलेले तलाठी संतोष राठोड यांची मुलगी आहे. तिला अभ्यासात हुशार असून पेंटिंग मध्ये फार रुची असल्याचे वडील संतोष राठोड यांनी सांगितले. 

ती तीच्या यशाचे श्रेय विद्यालयातील मुख्याध्यापिका, आर्ट शिक्षक व आई जयमाला राठोड वडिल संतोष राठोड यांना देते. या सर्वांच्या साथीने मी हे मेडल मिळवू शकले आहे असं ती आनंदाने सांगते. या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बोरी शिवसेना-युवा सेना, ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम विभागाला बोरी दुतर्फी हायवे तथा कंजरा दहिफळ दुधगाव रोडची तात्काळ दुरुस्तीबाबत निवेदन


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : बोरी शिवसेने तर्फे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दारव्हा व जि. प बांधकाम विभाग उपविभागाचे उप अभियंता सुनील राठोड ,दारव्हा यांना रस्ते दुरुस्ती बद्दल निवेदन देण्यात आले.बोरी शहरातील दुतर्फी हायवे तात्काळ दुरुस्तीबाबत- बोरिअरब ग्रामस्थ. तालुका दारव्हा. जिल्हा यवतमाळ यांच्यावत़ीने
वरील विषयांवर शिवसेना तथा ग्रामस्थांच्या वतीने, निवेदनाद्वारे करण्यात आले.

यवतमाळ दारव्हा बोरी शहरातील हायवे. वरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे मोठी धूळ निर्माण होऊन संपूर्ण धूळ धुळीचा त्रास नागरिकांना अत्यंत त्रासदायक ठरत असून त्यामुळे हायवेवरील दवाखान्यात येत असलेल्या पेशंट तथा वृद्धांना सुद्धा त्रास होत आहे. एवढेच नव्हे तर बरेच मोठे खड्डे सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले असून खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून याकडे सातत्याने संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून अडाण नदी पुलाचे सुद्धा बांधकाम संथ गतीने होत असल्याचने आणि त्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण रोड ला मोठे खड्डे पडले असून यामुळे अपघातास निमंत्रण दिल्या जात असल्यामुळे संपूर्णपणे नागरिक त्रस्त आहे, त्याचप्रमाणे बोरी सर्कलमधील बोरी- दहिफळ, दुधगाव तसेच कंजरा या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याने एखादा पेशंट ज्ञान करायचा असेल तर मध्येच रस्त्यात दगावण्याची शक्यता असून एवढेच नव्हे तर असे अपघाती घटना सुद्धा घडले आहेत तरीसुद्धा प्रशासन डोळेझाक का करतोय हे कळत नसल्याने संपूर्णतः शिवसेना बोरिवासी तथा शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात असून तात्काळ यावर विचार करावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल या संबंधिित आज संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी तथा ग्रामस्थ यात,नानाभाऊ राऊत( अध्यक्ष -बोरी कृषक सहकारी सोसायटी) युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरजानंद कळंबे, आशिष सावंकार, पुंडलिक भुरे ठेकेदार, सचिन कोरडे, प्रफुल गायकवाड ,अविनाश क्षीरसागर, जुनेद शेख, सुरेश तिजारे आदी मान्य उपस्थित होते.

निवृत्त माजी सैनिकांनी सामाजिक बदल घडविण्यासाठी काम करावे – पालकमंत्री संजय राठोड 

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांनी निवृत्तीनंतर शांत न बसता सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान द्यावे. समाजाच्या हितासाठी पुढे येऊन काम करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

सीमा सुरक्षा दलाचा ५७ वा वर्धापनाचा कार्यक्रम ईश्वर नगर येथे सीमा सुरक्षा दल निवृत्त अधिकारी वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री बोलत होते. बीएसएफच्या ध्वजाचे ध्वजारोहण तसेच फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड, नगरसेवक प्राध्यापक प्रवीण प्रजापती, शिक्षणाधिकारी श्री सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, बी एस एफ हे भारताचे एक प्रमुख निमलष्करी दल आहे. जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल म्हणुन या दलाची ओळख आहे. बी एस एफ च्या १९२ बटालियन सुमारे साडेसहा हजार लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करतात. यात पर्वतिय प्रदेश, वाळवंट, नदी-दऱ्या आणि बर्फाच्छादित प्रदेशाचा समावेश आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितित काम करुन ते आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यांच्यामुळेच देशातिल नागरिक सुरक्षित आहेत.

म्हणूनच बी एस एफ मधून निवृत्त जवानांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या, वीर पत्नी व वीर माता यांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले. ईश्वर नगर लेआउट मधील जागेवर सभागृह बांधण्यासाठी नियमानुसार काय तरतुदी आहेत हे जिल्हाधिकारी यांचेकडुन तपासुन घेऊन जागा उपलब्ध करुन देतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, देशात, गावात सामान्य नागरिक सुरक्षित राहण्यासाठी आपल्या जवान सीमांवर लढत असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते आपल्या देशाची सेवा करतात. कुटुंब, परिवार, नातेवाईक यांचा विचार न करता देशाच्या संरक्षणासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळे सैनिकांच्या कोणत्याही समस्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून सदैव उपलब्ध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोडे तसेच नगरसेवक प्रवीण प्रजापती यांनीही स्थापना दिवसानिमित्त उपस्थित सैनिकांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी मेजर जीवन कोवे, गगन चव्हाण मुकेश चुडे गजानन ठाकरे याचा यावेळी ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला निवृत्त सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता उपस्थित होत्या.

५५१ रुग्णांवर मोतिबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया; पूर्णपणे अंध झालेल्या ६२ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी – पालकमंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आनंदवन येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी येत असल्याचे कळताच त्यांना विनंती करून यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. समाजाच्या तळागाळातील अगदी गरीब व्यक्तींची त्यांनी अशा शिबिरातून शस्त्रक्रिया केली आहे. जिल्ह्यातील ५५१ लोकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायम त्यांच्या ऋणात राहीन, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

स्व. वसंतराव नाईक वैद्यकीय महविद्यालयात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या रुग्णांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ रागिणी पारेख, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. सुरेंद्र भुयार व त्यांचा चमू तसेच अधिष्ठाता मिलिंद फुल पाटील उपस्थित होते.

श्री.राठोड म्हणाले, नेत्र शस्त्रक्रियेचा हा पहिला टप्पा आज संपन्न झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण‌्यात येणार आहेत. डॉक्टर लहाने यांना जसा जसा वेळ मिळेल तशा त्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. डोळे हा अतिशय नाजूक भाग आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्ग्णांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घ्यावी.

यावेळी बोलताना डॉक्टर लहाने यांनी या शिबिरात पूर्णपणे अंध झालेल्या ६२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली असल्याचे सांगितले. एका महिलेचे हिमोग्लोबिन पाच असूनही भूल न देता तिचे ऑपरेशन केले. मला कितीही दुखले तरी चालेल पण मला दृष्टी द्या असे जेव्हा ती मला म्हणाली, तेव्हा वाईट वाटले. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आज तिची दृष्टी परत मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या शिबिरासाठी अथक कार्यरत असलेली वैद्यकीय महाविद्यालयाची चमू, डॉ. जळके यांनी 125 च्या वर शस्त्रक्रिया केल्या आहेत, सिव्हिल सर्जन यांची पूर्ण टीम यांचे त्यांनी आभार मानले. तसेच शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्णांना डोळ्याची निगा कशी राखावी आणि काय काळजी घ्यावी, या संदर्भात मार्गदर्शन केले.