जमिनीच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावासह वहिनीची हत्या...


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : तालुक्यातील गायडोंगरी येथे जमिनीसाठी झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मनोहर निंबाजी गुरुनुले (वय 62 वर्ष), शारदा मनोहर गुरुनुले (वय 50) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी धनराज निंबाजी गुरुनुले (वय 52) यास अटक करण्यात आली आहे.

जमिनीवरुन भावांमध्ये जोरदार झगडा झाला. त्यातच लहान भाऊ धनराज गुरुनुले यांनी आपल्या मोठा भाऊ मनोहर व वहीणी शारदा हिला सब्बलने मारहाण केली.. त्यात मनोहर गुरुनुले हा जागीच ठार झाला, तर शारदा गुरुनुले हिला प्रथम ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र तिचाही मृत्यू झाला. या घटनेची माहीती पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले.

आरोपी विरोधात कलम 302, 307 भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास नारायण येगेवार, अशोक मोहुर्ले, वसंत नागरीकर, सुरज शेडमाके, प्यारेलाल देव्हारे, जनार्धन मांदाळे, राजू केवट आदी पोलीस कमर्चारी करीत आहेत.

एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी येते दि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुध्याध्यापक श्री क्षीरसागर सर तर प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ चे सहसचिव श्री अशोक सोनटक्के व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती व भाषणे दिली तर तर आंतरशालेय नृत्य स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अशोक सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्व पटवून सांगून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घुगरे तर आभार बुजोने सर यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते.

जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थीसाठी स्वतंत्र वसतिगृहे तात्काळ सुरू


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करित असतांना महाराष्ट्रातील ओबीसी (OBC), एसबीसी (SBC), विजेएनटी (VJNT) विद्यार्थी मात्र उच्च शिक्षणापासून वंचित आहे.

विदर्भातील सर्व सामाजिक ओबीसी, विजेएनटी, एसबीसी संघटनांच्या माध्यमातून 7 ऑगस्टला मंडल दिनाचे औचित्य साधून 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत "मंडल यात्रा" काढण्यात आली होती. ही यात्रा नागपूर येथून निघून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा असे मार्गक्रमण करत पुन्हा नागपूर येथे समापन झाले. ह्या यात्रे दरम्यान  जवळपास 35 ठिकाणी भेटी दिल्या गेल्या, 15 हजारांच्यावर सामान्य ओबीसी जनमानसाच्या समस्या जाणून घेतल्या. सर्वच 36 ठिकाणी ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी विचारणा केली गेली. ग्रामीण भागात शिक्षणाच्या व रोजगाराच्या योग्य सोयी उपलब्ध नसल्याने ओबीसींच्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच हाक सामान्य ओबीसींची होती. 
1931च्या जातीनिहाय जनगणनेनुसार 52 टक्के असलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी, विजेएनटी, एसबीसी समुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यास अनेक अळथळे येत आहेत. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहरात वास्तवास राहावे लागते, परंतु विद्यार्थ्यांना शहरात मोफत निवास व भोजनाची व्यवस्था उपलब्ध नसल्याने गरीब ओबीसी (OBC) होतकरू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित आहे.

महाराष्ट्र विधान मंडळाच्या इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या ऑक्टोबर, 2015 मधील पुणे दौऱ्यात जिल्हास्तरावर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी नवे शासकीय वसतिगृहे सुरू करण्याची शिफारस राज्य सरकारला केली गेली होती. 4 वर्षानंतर 15 जानेवारी 2019 ला आपण मंत्री असलेल्या सरकारच्या मंत्रिमंडळात मान्यता दिली गेली होती.
मागील महायुतीच्या मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या 30 जानेवारी 2019 च्या शासन आदेशानुसार ओबीसी विजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 वसतिगृहांना मान्यता मिळाली होती. मा.उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये, मा. बहुजन कल्याण मंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्यात, प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी 2 स्वतंत्र असे 72 वसतिगृहे होतील. परंतु शोकांतिका अशी की, मागील दोन्ही सरकारने याविषयी काहीही केले नाही. मागील 75 वर्षांपासून तर मागासवर्गीय विद्यार्थी आर्थिक विवंचनेत भरडला जात आहे. मागासवर्ग कल्याण समितीच्या शिफारशींना सुद्धा आता 7 वर्षे पूर्ण झाले आहेत व विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयाला सुद्धा 4 वर्षे होत आहेत. 
आता, पुन्हा महाराष्ट्रातील जनतेने आपणास सेवा करण्याची संधी दिली आहे. तेव्हा ओबीसी (OBC), विजेएनटी (VJNT), एसबीसी (SBC) विद्यार्थ्यांचे वसतिगृहे आपल्या सरकारच्या प्राथमिकतेत असावेत.

2022-2023 या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालय सुरू झालेले आहेत. गरीब ओबीसी,विजेएनटी,एसबीसी विद्यार्थी शहरात उच्च शिक्षणासाठी येण्यास उत्सुक आहेत. परंतु गुणवत्ता असूनही वसतिगृहे नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. विद्यार्थ्यांना गावाच्या आसपास निम्न दर्जाचे अभ्यासक्रम घ्यावे लागत आहेत. यामुळे गरीब,ग्रामीण परंतु होतकरू विद्यार्थ्यांचा विकास खुंटला जात आहे.
विदर्भातील सर्व ओबीसी संघटना,आणि ओबीसी,विजेएनटी, एसबीसी समन्वय समिती विदर्भ यांची मागणी आहे की, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे लवकर सुरू करावेत व वसतिगृहे सुरू होईपर्यंत तात्काळ सप्टेंबर महिन्यापासूनच, अनुसूचित जातीच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी,विजेएनटी, एसबीसी 500 विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर तर 1000 विद्यार्थ्यांना महसूल विभागस्तरावर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने स्वाधार योजना सुरू करावी.
लवकरात लवकर 72 वस्तीगुहांवर निर्णय व्हावा अशीच आमची आग्रही मागणी आहे. अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आंदोलने आणि निदर्शने केली जातील.
तेव्हा मागणीकडे लक्ष देवून आमच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या न्याय आणि रास्त मागण्या पूर्ण करून आमच्या गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना,बेरोजगार युवकांना न्याय द्यावा. आपल्या सरकारने ओबीसींचे हक्क आणि अधिकार द्यावेत ही अपेक्षा आहे.




गणपती विसर्जन निमित्त सूरमाज फाउंडेशनच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चोपडा : गणेश उत्सव हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्वाचा सण आहे जो गेल्या 2 वर्षांपासून करुणेमुळे साजरा केला जात नव्हता आणि यावर्षी आपल्या हिंदू बांधवांनी कोणत्याही धर्माच्या श्रद्धेला धक्का न लावता तो शांततेत साजरा केला आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपल्या देशाचे आघाडीचे कर्मचारी पोलीस प्रशासन यामध्ये गणेशोत्सवासाठी जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आपली कौटुंबिक वैयक्तिक कामे सोडून फक्त आमच्यासाठी संपूर्ण ५ दिवस आपले कर्तव्य पूर्ण जबाबदारीने पार पाडतात. म्हणून सूरमज फाऊंडेशन आपल्या सर्व हिंदू बांधवांचे आभार मांडले. पोलीस प्रशासन व त्यांच्या कार्याला चालना देत त्यांना 500 पाण्याच्या बाटल्या व काही फळे गणपती विसर्जनाच्या दिवशी 04/09/2022 ला वाटप करण्यात आली जेणे करून त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण शक्तीने पार पाडावे. पोलीस निरीक्षक अवतारसिंग चौहान साहेब, हाजी उस्मान शेख (अध्यक्ष, सूरमज फाऊंडेशन), अब्लुस शेख, डॉ. एम. डी. रगीब जुबेर बाग, शोएब शेख, डॉ. मोहम्मद जुबेर शेख, इम्रान शेख, शाहिद शेख, अझीम शेख, शाहरुख शाह, साजिद कुरेशी, सादिक शेख, शाहिद भाई आणि सूरमाज फाऊंडेशनच्या सदस्यांनी चोपडा शहराच्या निर्मितीसाठी योगदान दिले. आम्हाला हे काम करण्याची परवानगी दिल्याबद्दल सूरमाज फाऊंडेशन मनापासून अवतार सिंह चौहान साहेबांचे आभार मानले आणि त्याचवेळी हे काम शांततेत पार पाडण्यासाठी मदत केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार; समाजमाध्यमांद्वारे होणार थेट प्रसारण

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. ५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी १ वाजेपासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोरोना संकटानंतर अलीकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान ऊहापोह होणे अपेक्षित आहे. या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.