यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय देशमुख विजयी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली. एकून 30 फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी डा.पंकज आशिया यांच्याहस्ते त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीस टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर मतपेट्या असलेली स्ट्रागरुम उघडी करून मशीनची मोजणी करण्यात आली. एकून 30 फेऱ्यांमध्ये मतदारसंघाची मतमोजणी झाली. त्यात सर्वाधिक मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना 5 लाख 94 हजार 807 मते मिळाली.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे, राजश्री हेमंत पाटील महल्ले (शिवसेना) 5 लाख 334 मते, हरिसींग (हरिभाऊ) नसरू राठोड (बहुजन समाज पार्टी) 17 हजार 396 मते, अनील जयराम राठोड (समनक जनता पार्टी) 56 हजार 390 मते, अमोल कोमावार (हिंदराष्ट्र संघ) 3 हजार 377, उत्तम ओंकार इंगोले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमोक्रॅटीक) 2 हजार 975 मते, धरम दिलीपसिंग ठाकूर (सन्मान राजकीय पक्ष) 4 हजार 555 मते मिळाली.

अपक्ष उमेदवारांना पुढीलप्रमाणे मते मिळाली. त्यात डा.अर्जुनकुमार सिताराम राठोड (अपक्ष) 1 हजार 863 मते, प्रा.किसन रामराव अंबुरे 1 हजार 720 मते, गोकुल प्रेमदास चव्हाण 1 हजार 94 मते, दिक्षांत नामदेवराव सवाईकर 1 हजार 103 मते, नुर अली मेहमुद अली शाह 1 हजार 958 मते, मनोज महादेवराव गेडाम 2 हजार 794 मते, रामदास बाजीराव घोडाम 6 हजार 781 मते, विनोद पंजाबराव नंदागवळी 6 हजार 298 मते, संगिता दिनेश चव्हाण 7 हजार 180 मते, संदीप संपत शिंदे 5 हजार 514 मते मिळाली.

एकून 9 हजार 391 मतदारांनी नोटाला मतदान केले तर टपाली मतपत्रिकेतील एकून 71 मते अवैध ठरली. मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी संजय उत्तमराव देशमुख विजयी झाल्याची घोषणा केली व त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. संपुर्ण मतमोजणीची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली.

भाऊ हरले, ताई जिंकल्या...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्रीय व कॅबिनेट मंत्र्याना पराभूत करण्याची परंपरा ही धानोरकर कुटूंबीयाची राहिलेली आहे. 16 व्या फेरीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा 2 लाख 4 हजार 300 एवढं मताधिक्य घेवून विजयाच्या मार्गाने निघालेल्या इंडिया, महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांनी ही परंपरा कायम राखली आहे. मंत्र्यांचा पराभव करण्याची धानोरकर कुटूंबाची परंपरा व इतिहास पुन्हा कायम राखला गेला आहे अशी प्रतिक्रिया आमदार धानोरकर यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.
आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 सकाळी 8 वाजता पासून पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणीला सुरूवात झाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्याच फेरीत मुनगंटीवार यांच्यावर दहा हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी प्रत्येक फेरीत वाढत गेली.

एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दिड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील मोठे नेते असून त्यांना राजकारणाचा 30 ते 40 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणे साधे नव्हते. 
आतापर्यंत लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो धानोरकर कुटूंबियांनी थेट मंत्र्यांना पराभूत केल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या विधानसभा निवडणूकीत स्व. बाळू धानोरकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवितांना तेव्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा काँग्रेस उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणूकीत स्व.खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी थेट केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पराभूत केले होते.

मोदी लाटेत राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर हे निवडून आले होते. तसेच विधानसभा निवडणूकीत वरोरा मतदार संघात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव करीत निवडून आल्या आहेत. तर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आ. प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन म्हणजे 7 लाख 18 हजार 410 अशी एकूण मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मिळालेली मते 4,58,004 अशी आहे.
त्यामुळे धानोरकर कुटूंबियांनी मंत्र्यांना पराभूत केल्याची हॅट्रीक साधली जात आहे. स्व. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर कुटूंबियांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मंत्र्यांचा पराभव केल्याचा इतिहास या विजयाने कायम राखल्या गेल्याचे मत आ. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी भाऊंची आठवण करून देत या निवडणूक आणि भरघोस मताधिक्य संदर्भात विचारणा केली असता आ. धानोरकर म्हणाल्या की, आज स्व. खासदार बाळू धानोकर शरीराने आपल्या सोबत नसले तरी, त्यांचे विचार व मनाने ते आपल्या सोबत आहे. त्यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षात उतरविली. त्यामुळे हा विजय संपादन करता आला. माझा विजय हा निश्चितच होता. परंतु इतक्या मताधिक्याने विजय होईल याबाबत खात्री नव्हती. मात्र, एक ते दिड लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावाही धानोरकर यांनी यावेळी केला. हा विजय माझ्या एकटीचा नसून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा हा विजय असल्याचे त्या म्हणाल्या.

यंदाच्या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला लॉटरी लागण्यामागची 5 प्रमुख करणे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कौलांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे. मात्र विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून जबरदस्त टक्कर मिळत आहे. भाजपच्या ‘अबकी बार 400 पार’च्या घोषणेचा काही विशेष परिणाम पडला नसल्याचं दिसून येत आहे.

याशिवाय मोदी सरकारविरोधी लोकांमध्ये जो काही असंतोष होता, त्याचा संपूर्ण फायदा विरोधी आघाडीला झाल्याचं पहायला मिळतंय. यासाठी आणखी कोणती पाच कारणं महत्त्वाची ठरली, ते पाहुयात..

निवडणुकीचा प्रचार : 
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना दोन्ही बाजूंनी कस लावला होता. मात्र आरक्षण संपवण्याच्या आणि संविधान बदलण्याच्या गोष्टींना मुद्दा बनवण्यात विरोधी पक्षांना यश मिळाल्याचं दिसून येत आहे. 

- स्थानिक पक्षांच्या दबदब्याचा परिणाम : 
निवडणुकीच्या आधी एका सर्वेक्षणात असं म्हटलं गेलं होतं की भाजपला स्थानिक पक्षांकडून कठोर आव्हान मिळू शकतं आणि देशभरात अशा 200 हून अधिक जागा सांगितल्या गेल्या होत्या. सध्या निकालाच्या कलांमध्येही हेच चित्र दिसून येत आहे. 

- मुस्लीम मतदार इंडिया : 
आघाडीसोबत एक्झिट पोलमध्ये समोर आलेले आकडे आता जरी निकालाच्या कलांशी मिळतेजुळते दिसत नसले तरी, मुस्लीम मतदारांशी संबंधित सर्वेक्षण योग्य ठरतंय. इंडिया आघाडीला सर्वाधित मतं ही मुस्लीम समुदायाकडून मिळाली आहेत, हे स्पष्ट होतंय.

- तरुण मतदार एक्झिट : 
पोलमध्ये तरुणांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. तर भाजपाचे अधिक मतदार हे 35 हून अधिक वर्षांच्या वयोगटातील आहेत. 18 ते 25 आणि 25 ते 35 वयोगटातील मतदारांना बदल आणि त्वरित परिणाम अपेक्षित होता. त्यांचं मत इंडिया आघाडीला मिळाल्याची शक्यता आहे.

- काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा : 
काँग्रेसची न्याय स्कीम यावेळी कामी आली, असं म्हणायला हरकत नाही. न्याय योजना तर राहुल गांधींनी 2019 मध्ये पण आणली होती, मात्र त्याचं महत्त्व ते नीट समजावू शकले नव्हते. यावेळी त्यांनी त्यात आणखी काही गोष्टी जोडल्या आणि त्याचाच फायदा झाला. 


कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई, : विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा उद्देश असतो. नवीन कायदा, वेळोवेळी कायद्यात झालेले बदल आणि बदलाची असणारी आवश्यकता याबाबतची माहिती समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी प्रसारमाध्यमांची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना निश्चितच उपयोग होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात महासंचालक श्री. सिंह बोलत होते. मंचावर प्रमुख वक्ते म्हणून विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते.

जगभरात बातमीचा प्राथमिक स्त्रोत समाजमाध्यमे झाली असल्याचे सांगत महासंचालक श्री. सिंह म्हणाले की, केवळ बातमीचाच नाही, तर बातमीच्या खात्रीचा स्त्रोतही समाजमाध्यमे झाली आहेत. समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या मजकूराप्रती समाजमाध्यम जबाबदार नसते, तर प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीप्रती माध्यमे जबाबदार असतात. त्यामुळे समाज माध्यमांच्या गर्दीतही वृत्तपत्रे, वाहिन्या यांचे महत्त्व अबाधित आहे. माध्यम प्रतिनिधींना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना सदस्यांच्या विशेषाधिकाराला धक्का लागणार नाही, याची दक्षताही घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोड म्हणाले, माध्यमांमध्ये आलेल्या नवपत्रकारांना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना माहितीअभावी बऱ्याच अडचणी येत असतात. अशा नवपत्रकारांना या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा निश्चितच वार्तांकन करताना लाभ होणार आहे. कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना पात्रता ठरविणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल म्हणाले की, लोकशाहीच्या गुणात्मक वाढीसाठी चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांची गुणवत्ता वाढ होणे गरजेचे आहे. विधिमंडळातील कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. माध्यमांची गुणवत्ता वाढल्यास लोकशाही गुणात्मकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, महासंचालनायाचे अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर लोकसभेत कोण मारणार बाजी... निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : दिड महिन्याभराखाली पार पडलेल्या या लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काही तास शिल्लक राहीले असून या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेतून दुहेरी लढतीत कोण बाजी मारणार याकडे आता खेड्या, पाडयातील नागरिकाचे लक्ष लागले आहे,तर निकालाची उत्सुकता नेते, पुढारी, सामान्य लोकांची उत्कंठा चांगलीच वाढली असून मोबाईल, सोशल मिडिया, टीव्हीकडे नागरिकांचे अधिक लक्ष आता लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
१३-चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान शांततेत पार पडले असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चांगल्या प्रकारे झाली आहे. गेल्या दिड महिन्या भरापूर्वी मतदान झाले असून देशातील लोकसभेचा निकाल (४ जून) रोजी लागणार आहे. मतदानानंतर आता निकालाची तारीख व वेळ जवळच आली असल्याने या निकालाबाबत मतदारात तर्क, वितर्क लावत कोण निवडून येणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार,याबाबत कडक उन्हाच्या तापमानाप्रमाणेच गरम अशी खमंग चर्चा रंगली आहे.तर रविवारपासून विविध इलेट्रॉनिक माध्यमावर देखील "एक्झिट पोल" प्रसारित झाल्याने धाकधूक वाढली असून आजची रात्र कळ सोसण्याची आहे. उद्या जिंकणार तर आम्हीच असा दावा दोन्ही समर्थकात असून निकालाने मात्र नेमकं कोणाचं गणित बिघडवणार हे बघण्यासाठी मतदारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 
चंद्रपूर लोकसभेसाठी मतदारसंघातील शहरी, ग्रामीणसह दुर्गम भागात दुहेरी लढत झाली आहे.या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर या दोघांमध्ये चांगली चुरस झाली आहे दोघांनाही चांगल्या प्रकारे मतदारांनी पसंती देत मतदान केले आहे.परंतु या दुहेरी लढतीमध्ये आता कोण जिंकणार. व कोण किती मताने निवडून येईल याबाबत गावागावातील मतदारांमध्ये तर्क, वितर्क लावत सोशल मिडियावर पाहावयास मिळत आहे.