यंदा मतदार कोणती भूमिका घेईल हे महत्वाचे आहे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता जोमाने कामाला लागलेले दिसत आहे. त्यामुळे चौकाचौकात, शेतशिवारात केवळ राजकारणाच्याच चर्चा मोठ्या रंगत आहेत. परंतु निवडणुका म्हटलं की अमाप बजेट. आणि बजेट असल्याशिवाय विजय मिळवण अवघड आहे. "माल लगाव माल पाव" असा प्रकार सुरु झाल्यामुळे लोकशाही मध्ये सामाजिक कार्यकर्त्याना निवडणुकी मध्ये विजयाची संधी मिळत नाही. त्यामुळे निवडणुकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी यंदा मतदार कोणती भूमिका घेईल हे महत्वाचे आहे. 

पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात आहे. आणि कालपासून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. परंतु पाहिजे तसा प्रभाव प्रचारातून दिसून येत नाहीये. फक्त सोशलच्या माध्यमातून विजय आपलाच असं भासवलं जात आहे. तर काटे कीं टक्कर वैगेरे वैगेरे..असं आभासी वातावरण जरी असलं, तरी मात्र प्रत्यक्षात अस काहीच चित्र दिसत नाहीये. सध्या चर्चेत असलेल्या एकाही उमेदवाराकडे जनतेचे प्रश्नच नाही, उलट जनतेचे प्रश्न बाजूला सारून आपला विजय आणि पक्षाच्या सिटा कशा निवडून येईल, इतकाच कल दिसत आहे. तूर्तास हुकूमशाही व चारशे पार एवढंच. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न हद्दपार झाल्याने बेरोजगारी,महागाई ह्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने प्रचारात दम नाही अशी चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र,राजकीय जाणकाराकडून ही निवडणूक फार अत्यंत महत्वाचे आहे असं म्हटलं जातं. आणि चंद्रपूर वणी आर्णी तर फार अटी तटीची निवडणूक होणार आहे असे देखील चर्चील्या जात आहे. त्यामुळे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून कोण बाजी मारतो अशी रंगतदार चर्चा मतदार संघातील गल्लोगल्ली सुरु आहे. 

विशेष म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण या धोरणाचा फटका नागरिकांना बसला आहे. अशी ओरड मतदारात असून याबाबत देशभरात आवाज उठवला गेला होता. परंतु राज्यकर्त्यांना साधा पाझरही फुटला नसल्याचे जनतेत तीव्र संताप यानिमित्ताने उमटत आहे. निवडून आलेला लोक प्रतिनिधी देश हितापेक्षा स्वहीत साधण्यात धन्यता मानत असून ईडीच्या धाकाने आपली निष्ठा धुळीत मिसळत असल्याचे उदाहरण ताजे आहेत. सामान्यांचा वाली कोणी नाही. त्यामुळे हा बनवाबनवीचा खेळ मतदार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. 


राजू उंबरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघांचे भाजप-महायुतीचे उमेदवार राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मनसे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या निवासस्थानी व कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
 
मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांची ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (ता.3) एप्रिल ला लक्ष्मी नगर येथील निवासस्थानी भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच मुनगंटीवार समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या भेटीदरम्यान उंबरकर परिवाराकडून मुंगटीवार यांचे आदरतिथ्य करत तृप्ती राजु उंबरकर यांनी औक्षण केले तर मनसेच्या वतीने मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती न देण्यात आल्याने नेमकी कोणत्या मुद्द्यांवर भेट होती याबाबत अजून तरी अस्पष्टता असून नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना? यासह अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. 

दरम्यान,नागरिकांमध्ये अनेक चर्चा सुरू असून मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

महाविकास आघाडीचा रंगनाथ स्वामी मंदिरातून प्रचार कार्याला सुरुवात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणूकीचा प्रचाराला सुरुवात झाली असून काल वनोजा देवी (ता. मारेगाव) येथील प्रसिद्ध मंदिर जनामाय कासामाय येथे काँग्रेस चे अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराचे नारळ फोडले. यावेळी असंख्य कार्यकर्त्ते उपस्थित होते.

चंद्रपूर,वणी,आर्णी या लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर, भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तर वंचित कडून राजेश बेले निवडणूक रिंगणात आहेत. आज 4 एप्रिल रोजी रंगनाथ स्वामी मंदिर येथील प्रचाराचा श्रीगणेशा संपन्न झाला, यावेळी कार्यक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह विविध आघाडी पक्षातील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कालपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली असून ग्रामीण भागासह वणी शहरातील जत्रा मैदान परिसरात असेलेले रंगनाथ स्वामी मंदिर येथे पूजा झाली. त्यानंतर या भागातील नागरिकांपर्यंत प्रचार पोहचला, दरम्यान इंडिया आघाडी च्या प्रचाराला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक चूरशीची लढत होणार आहे. हे निश्चित!


‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : लोकसभा निवडणूक 2024 करीता 13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे व नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘माय व्होट इज माय फ्युचर : पावर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स, पोस्टर्स मेकींग व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाहीमध्ये मतदानाला अत्यंत महत्व आहे. देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तसेच दिशा देण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदान करायलाच हवे. याचाच एक भाग म्हणून स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. 13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये रिल्स, पोस्टर व मिम्सचे विशेष आकर्षण असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता विशेष रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. रिल्स स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला प्रथम बक्षीस 15 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 10 हजार तर तृतीय बक्षीस 5 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये आहे. तसेच मिम्स स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये देण्यात येणार आहे.

मतदान करण्याबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविणे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी स्वतः बनविलेले रिल्स, पोस्टर्स व मिम्स् 12 एप्रिल 2024 पर्यंत अपलोड करून पाठवावे. सदर लिंक जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी – पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि ही सर्व ‘माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. समाज माध्यमांवरून कुठेही नियमांचे उल्लघंन होणार नाही, यासाठी सायबर क्राईम विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स इत्यादी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट, तथ्यहीन माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत विभागामार्फत कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची ऑनलाइन होणारी फसवणूक व गुन्हे रोखण्यासाठी सायबर विभागामार्फत कशा प्रकारे दक्षता घेण्यात येत आहे, याबाबत पोलिस उप महानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात श्री. शिंत्रे यांची मुलाखत गुरूवार दि. ४, शुक्रवार दि. ५, शनिवार दि. ६ आणि सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, तर 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या लिंक:






Comment