वन्यजीव संवर्धन : काळाची गरज

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मानवी अस्तित्व उत्क्रांतीत वन्यजीव संपदेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याची जाणीव प्रत्येकाला असावी, या हेतूने दिनांक ३ मार्च हा दिवस जगभर “जागतिक वन्यप्राणी दिन” म्हणून साजरा केला जातो. १९७३ च्या जागतिक संकटग्रस्त वन्य प्राणी आणि वनस्पतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधी परिषदेतील ठरावास संयुक्त राष्ट्रांनी स्वाक्षरी केल्याची आठवण म्हणून वर्ष २०१३ पासून वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी कटिबद्धतेचे प्रतीक म्हणून जागतिक पातळीवर वन्यप्राणी दिन साजरा करण्यात येतो.

या निमित्ताने मानव वन्यजीव संघर्षांची किनार काही भागात गडद असताना नैसर्गिक परिसंस्थेच्या समतोल विकासासाठी संवर्धनाचे उपाययोजनाचे चिंतन केले जाते. “वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी” ही २०२३ यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. विविध कारणांनी मानवाकडून नैसर्गिक परिसंस्थेस हानी पोहचविली जात आहे, ज्यामुळे वन्यजीव संपदा (प्राण्यांचे आणि वनस्पतीचे) अस्तित्व धोक्यात येत आहे.

जागतिक निसर्ग संरक्षण संघटनेने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आजमितीला सुमारे ८ हजार ४०० वन्यजीव प्रजाती या धोक्याच्या पातळीवर आहेत तर सुमारे ३० हजार प्रजाती संकटग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाचा समतोल हा केवळ वन्यजीवांसाठी गरजेचा नसून मानवी अस्तित्वासाठी देखील महत्त्वाचा ठरतो म्हणून वन्यजीव संपदेचे संवर्धन समजून घेणे आवश्यक आहे.

वन्यजीव संपदा महत्त्व

भारत हा एक खंडप्राय देश असून देशाच्या भौगोलिक विविधमुळे आढळणाऱ्या वन्यजीव संपदा प्रजातींमध्ये विविधता आढळून येते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने २.४ टक्के भूभाग असलेल्या आपल्या देशात जगाच्या एकूण वन्यजीव संपदेच्या ८ टक्के वन्यजीव अधिवास करतात. उ हिमालयापासून ते हिंदी महासागरपर्यंत विविध वन्य प्राणी आणि वनस्पति निपजल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या भूप्रदेशातील माती, पाणी, हवामान आणि लोकजीवन इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक जीवसृष्टीवर होत असतो. भारतीय जैवविविधता पाहता, हिमालय, पश्चिम घाट, अंदमान निकोबार बेटे, सुंदरबन सारखे भूभाग जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचे आहेत. जगातील जैविक विविधता संपन्न अशा प्रमुख १७ देशात भारताचा अग्रक्रम असून ११ बायोस्पीयर रिजर्व आणि २६ रामसार (पाणथळ) स्थळे आहेत.

वन्यजीव प्रजातींचे वैविध्य पहिले तर, भारतात सुमारे ४०० सस्तन प्राणी, २०६० पक्षी, ३५० सरिसृप प्राणी, २१६ उभयचर आणि ३० लाख कीटकवर्ग नोंदले गेले आहेत. काळवीट, सोनेरी माकड (कपी), सिंहपृच्छ वानर, पिग्मि होग सारखे प्राणी जगाच्या पाठीवर केवळ भारतातच आढळतात. एकट्या हरिण वर्गाचा विचार केल्यास ९ विविध प्रकारच्या हरणाच्या प्रजाती (कस्तुरी, कोटरा, चितळ, बारसिंगा, सांबर, होगहिरण, थमिन, हंगल, संगई) आपणास दिसतात. जंगली कुत्रे, रानम्हशी, गवे, हत्ती, गेंडे, सिंह आणि वाघ हे भारतीय वन्यप्राणी जगभरातील वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांचा आकर्षणचा विषय आहेत. भारताला जगाच्या पाठीवर निसर्गसंपन्न असे राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देणार्‍या या वन्यजीव संपदेचे संरक्षण करणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. भारतीय वन्यजीव संपदा संरक्षित ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य आहे. बंगाली वाघ-राष्ट्रीय वन्यप्राणी, मोर- राष्ट्रीय पक्षी, गंगेतील डॉल्फिन- राष्ट्रीय जलचर प्राणी तर हत्ती-राष्ट्रीय वारसा प्राणी आहे.

वन्यजीव संपदेस धोके

मानवी वसाहत मूलतः जंगलाच्या कुशीत आणि वन्यजीवांच्या सहचर्यात सुरू झालेली असल्याने आजही अनेक आदिवासी मानवी वसाहती खाद्य, इंधन, औषधी, निवारा इत्यादि अनेक बाबींच्या गरजेपोटी जंगलांच्या सान्निध्यात आहेत. त्यांची उपजीविका आणि आर्थिक संधी जंगलापासून उपजलेल्या विविध वस्तूंवर अवलंबून असल्याने माणूस व वन्यजीवांचा संघर्ष अनेकदा बघायला मिळतो. अनेक दुर्मिळ वन्यजीव प्राण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बेकायदेशीर छुप्या पद्धतीने तस्करी करून पैसे कमविण्याच्या खटाटोपात वन्यजीवांची शिकार केली जाते. जंगलालगतच्या शेती असणाऱ्या पशुपालकांना अधिवास, अन्न, निवारा या बाबीसाठी शोधत असणाऱ्या वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी, पशुधनाची शिकार वगैरे समस्यांना तोंड द्यावे लागते. वन्यजीवांना असणाऱ्या बहुतांश धोक्यांमध्ये त्यांचे नैसर्गिक अधिवास अवैध जंगलतोडीने नष्ट होणे यासह कातडी, नखे, सुळे वगैरे हस्तगत करण्यासाठी होणारी शिकार, विषबाधा, रस्ते अपघात यांसारखे मानवनिर्मित धोके मोठ्या प्रमाणावर असतात. दुर्गम व जंगल क्षेत्रात विकासकामांच्या रूपाने होणारे धरणे, महामार्ग बांधणी, सारख्या बाबींमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक परीक्षेत्रात मानवी वावर मोठ्या प्रमाणात वन्यजीवांना त्रासदायक ठरतो. याशिवाय वणवा, प्रदूषण, मानव आणि पशुतील सामायिकपणे संक्रमीत होणारे संसर्गजन्य रोग, वातावरणातील बदल इत्यादी घटक वन्यजीव संपदेस धोकादायक आहेत.

वन्यजीव संपदा संरक्षण

एखाद्या विशिष्ट भूभागात वन्यजीवांच्या एकूण संख्येपैकी विविध प्रजातींच्या पैदासक्षम प्राण्यांची सरासरी संख्या त्यांचे नैसर्गिक परिसंस्थेतील अस्तित्वदर्जा ठरवतात. धोक्याच्या पातळी बाहेर, संकटग्रस्त, नामशेष प्रवण, नष्ट अशा विविध प्रवर्गात वर्गवारी करता येईल. त्यानुसार दुर्मिळ वन्य प्रजातींना संरक्षण देण्याचे काम कायद्यान्वये वन विभागामार्फत केले जाते. विविध निसर्ग अभ्यासक, शास्त्रज्ञ यांचे संशोधनातून संरक्षण पद्धतीचे नियोजन करण्यास मदत होते. IUCN या निसर्ग संवर्धनाचे काम करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालनुसार भारतात आजमितीला एकूण १७२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. यात सस्तन प्राण्याच्या ५३, पक्ष्यांच्या ६९, सरीसृप – २३ आणि उभयचर प्राण्याच्या ३ प्रजातींचा समावेश होतो. पट्टेरी भारतीय वाघ, सिंह, जंगली मांजर, काश्मिरी काळवीट, राजहंस, माळढोक, कासव असे अनेक वन्यपशुपक्षी संकटग्रस्त आहेत.

काही प्रमुख वन्यजीव संरक्षक कायदे : वन्य पक्षी संरक्षण कायदा (1887), हत्ती जतन कायदा(1879), भारतीय मत्स्य कायदा(1897), भारतीय वन कायदा(1927), बॉम्बे वन्य पशू व वन्य पक्षी संरक्षण कायदा (1951), प्राणी क्लेश प्रतिबंधात्मक कायदा (1960), वन्यजीव संरक्षण राष्ट्रीय प्रणाली (1970), वन्यजीव संरक्षण कायदा(1972(सुधारित 1991), भारतीय जैवविविधता कायदा (2002) याप्रमाणे.

भारतीय वन्यजीवांच्या संरक्षणार्थ शासकीय आणि बिगरशासकीय पातळीवर अनेक अंगांनी प्रयत्न केले जात आहेत. अवैध शिकार, जंगलतोड, तस्करी यांना आळा घालण्यासाठी संवैधानिक कायदे व नियम केले गेले आहेत. १९७२ मध्ये अस्तित्वात आलेला वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव उद्याने (एकूण १०४), वन्यजीव अभयारण्ये (एकूण ५४३) , व्याघ्र प्रकल्प, पक्षी अधिवास यांच्या माध्यमातून वन्यजीवांना अभय देण्यात येत आहे. तसेच प्रोजेक्ट टायगर(१९७३), प्रोजेक्ट एलिफंट(१९९३), ईको डेवलपमेंट प्रोजेक्ट, सुसर पैदास प्रकल्प (१९७५) अशा विशिष्ट प्रकल्पांतून अति संकटग्रस्त प्राण्यांना विशेष संरक्षण दिल्या जाते. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून व संकटग्रस्त प्रजातीसाठी संवर्धन प्रयोगशाळा (सीसीएमबी), हैदराबाद सारख्या शासकीय संस्थेसह वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया, बीएनएचएस अशा अनेक नामांकित बिगरशासकीय संस्था संशोधन आणि लोकप्रबोधनाचे महत्वाचे काम करत आहेत. याशिवाय भारतात विविध शहरात असलेल्या वन्यप्राणी संग्रहालयाच्या, सर्पोद्यान माध्यमातून जनसामान्यात जनजागृतीचे कार्य केल्या जाते आहे.

महाराष्ट्रात वन्यजीवांच्या संरक्षणार्थ राष्ट्रीय उद्याने (एकूण ५- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली; पेंच, ताडोबा, नवेगाव, गुगामल), व्याघ्र प्रकल्प (एकूण ४- मेळघाट, ताडोबा- अंधेरी, पेंच, सह्याद्रि), अभयारण्य (एकूण ३२) संरक्षित क्षेत्रे आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणात पशुवैद्यक क्षेत्राची भूमिका महत्वाची असून वन्य प्राण्यांचे रोगनिदान, औषधोपचार, लसीकरण, भूल, शवविच्छेदन, फॉरेन्सिक चाचण्या अशा विविध प्रसंगी तज्ञ पशुवैद्यक असणे जसे गरजेचे आहे तसे विविध भागातील वन्यजीव संपदेचे संरक्षण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने पशुगणना, प्रजनन आणि आनुवंशिकता लक्षात घेत पैदास व्यवस्थापन, संसर्गजन्य रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आणि वन्यजीव व्यवस्थापन करण्याहेतू पशुवैद्यकांचे शास्त्रीय दृष्टीकोन इतर जीवशास्त्रज्ञांच्या समवेत योजनाबद्ध नियमावली करण्यासाठी दिशादर्शक ठरू शकतात. राज्य शासनाच्या वन विभाग आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर यांचे संयुक्त प्रयत्नातून गोरेवाडा, नागपुर येथे साकारलेले “ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर” तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या संयुक्त प्रयत्नातून स्थापित “झुनोसेस सेंटर” याप्रमाणे सर्पदंश लस निर्मितीसाठी “हाफकिन संशोधन संस्था, मुंबई” वगैरे संस्था वन्यजीव संपदा संरक्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत.

आजच्या तरुण पिढीने वन्यजीव संरक्षणासाठी पुढे सरसावणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवर आपली तडफदार पर्यावरणवादी भूमिका मांडणारे युवा वन्यजीव शिक्षण, संशोधन, विस्तारकार्य, प्रशासन अशा विविधांगी भूमिकातून जोरकसपणे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. आपल्या परिसरातील वन्यजीव संबंधी कार्यरत संशोधन, शैक्षणिक तथा समाजसेवी संस्थांशी जोडले जावे. वन्यजीव संपदा ही निसर्गातील विस्तृत परिसंस्थेतील महत्वाचा घटक असून वने, मानव यांचेशी सामायिकपणे जोडलेले असल्याने वन्यजीवांचे संरक्षण हे पुढील काळातील मानवी अस्तित्वासाठी देखील तितकेच आवश्यक आहे.

माहिती:

डॉ. प्रवीण बनकर, सहाय्यक प्राध्यापक, पशू आनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था, अकोला

डॉ. स्नेहल पाटील, पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशू सर्वचिकित्सालय, बार्शीटाकळी जिल्हा अकोला
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना एका वर्षात २० दिवसांची नैमित्तिक रजा

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० (वीस) दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आले आहे. याबाबत ३ आँक्टोबर २०२२ ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सन २०२२ -२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील विधानसभेत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. आज गृह ,कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्दोग,उर्जा व कामगार विभागाच्या सन २०२२ -२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली. त्यावर सभागृहातील सदस्यांनी आप आपल्या मतदारसंघातील समस्यां मांडून विविध सूचना केल्या.

विधानसभेतील सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांनाकळविण्यात येणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत,कृषी मंत्री अब्दुल सत्तार या मंत्री महोदयांनी विधानसभेत सांगितले.

वणीकरांनो पोट धरून हसा...अती दिड शहाणे घेवून येतेय हास्याची जत्रा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : खळखळून हसणे हा चेहऱ्यासाठी एक प्रकारचा उत्तम व्यायाम आहे. हसण्यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो आणि चिरतरुण राहण्यास मदत मिळते. पण सध्या या  धकाधकी च्या जीवनात चेहऱ्यावरील हास्य या अँड्रॉइड युगामुळे हरवल्याने पेन किलर आहे तुमचं हास्य, म्हणून सन्यानी "हशाचा डोस" घेवून अती दिड शहाणे येत आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय हास्य कवी संमेलन.

मागील २५ वर्षांपासून वणीकरांना हसवण्यासाठी अखिल भारतीय हास्य कवी संमेलनाचा कार्यक्रम दरवर्षी धुळवड ला आयोजित केला जातो. या दिवशी रंगपंचमीमुळे सर्वत्र रंगारंगचा माहोल असतो. परंतु कोरोना आला आणि चेहऱ्यावरचं हास्य हिसकावून घेतलं या हाश्याला परत आणण्यासाठी या "धुळवड" दिवसाचा धुरळा उडवायला यंदा हास्य कवी संमेलन कार्यक्रमाला आणखी बहारदार करण्यासाठी हास्य अभिनेता एहसान कुरेशी (मुंबई) येणार आहे. त्यांच्या सोबतीला हास्य सम्राट किरण जोशी, हास्य कवी झिनत परवीन, व मुंबई चा लाडका रोहित शर्मा या कवीवर्यांची सुद्धा उपस्थितीसह हाश्याची जोड असणार आहे.


येत्या 7 मार्च 2023 रोजी रंगपंचमीला हे संमेलन वणी येथील शासकीय मैदान, पाण्याची टाकी येथे सायंकाळी सुसंपन्न होणार आहे. अशी आयोजकाच्या वतीने पत्र परिषदद्वारे वणी विश्रामगृह येथे माहिती दिली आहे, या होणाऱ्या हास्य कवी संमेलन कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन समिती च्या वतीने केले आहे. 


ॲड. अरुण खानझोडे यांच्या "Thought For Today" पुस्तकाचे प्रकाशन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
        
वणी : दत्त संप्रदाय संवर्धक समर्थ सद्गुरु श्री. विजय काका पोफळी महाराज यांच्या पावन हस्ते वणी येथील ॲड. अरुण विनायक खानझोडे यांच्या Thought For Today या पुस्तकाचे एका अत्यंत कौटुंबिक स्वरूपाच्या कार्यक्रमात विमोचन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर श्री. विजय काका पोफळी यांच्यासह वेदमूर्ती भूषण आर्वीकर, विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड, लेखक अरुण खानझोडे तथा सौ. माणिक खानझोडे उपस्थित होते.
        
प्रास्ताविक करताना लेखकांचे सुपुत्र प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी आई-वडिलांच्या खडतर जीवनाचा मागोवा घेत या विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी सांभाळलेले स्वत्व आणि पुढील पिढीला संक्रमित केलेले संस्कार याविषयी गौरवोद्गार काढले.
       
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार प्रकाशित करण्याच्या योग्यतेचा असायला हवा असे म्हणत मानवी जीवनातील विचारांचे अलौकिकत्व स्पष्ट करून पुस्तकाच्या उपयोगित्वाला अधोरेखित केले.लेखकांच्या अमृत महोत्सवानिमित्त या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याने याप्रसंगी करण्यात आलेल्या ऐंद्री शांतीचे स्वरूप आणि महत्त्व सांगत वेदमूर्ती भूषण गुरुजींनी श्रोत्यांच्या ज्ञानात शास्त्रीय भर घातली.
      
आपल्या अत्यंत खुसखुशीत मनोवेधक शैलीतील मनोगतामध्ये लेखकांनी आयुष्यात लाभलेली गुरुकृपा, चांगल्या लोकांची संगती, स्वतःच्या कर्माप्रती असणारी निष्ठा या जीवन पैलूंना स्पष्ट करीत भावी पिढीने वाचावे म्हणून पुस्तक मुद्दाम इंग्रजीत लिहीत आहे अशी भावना व्यक्त केली.
श्री. विजय काका पोफळी यांनी जीवनातील कर्माचे महत्त्व, अमृतत्वाच्या शोधासाठी येथून पुढील जीवन सत्कारणी लावण्याची भारतीय भूमिका अशा विविध विषयांवर आशीर्वचन प्रदान केले.
        
या पुस्तकास विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव, इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ अभिजित अणे यांची प्रस्तावना प्राप्त झाली आहे. या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मुग्धा खानझोडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. प्रज्ञा (श्रुती) फडणवीस यांनी केले.

युवकाची विष प्राशन करून आत्महत्या, खंडणी येथील घटना

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील खंडणी येथील एका युवकाने स्वगृही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 1 मार्च रोजी घडली. 

विजय किसन वाघाडे (22) रा खंडणी असे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने बुधवारी 1 मार्चला दुपारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचीघटना घडली. घटनेची माहिती वडील किसन वाघाडे व भाऊ अजय वाघाडे यांना कळताच लगेचच उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता, मात्र, उपचारादरम्यान बुधवारला सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.

त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचे पाठीमागे आई-वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. विजय यांचे पार्थिवावर आज गुरुवारी खंडणी येथे 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे असे निकटवर्तीयांनी माहिती दिली.