लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.

या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर 12, अकोला 6, अमरावती 8, औरंगाबाद 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदुरबार 4, उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्ण-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राज्यात लोकसभा निवडणूक 2024 पाच टप्प्यात होणार आहे. पूर्व-प्रमाणित करण्याबाबतचे दिनांक पुढीलप्रमाणे :

टप्पा पहिला – 19.4.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 18.4.2024 आणि 19.4.2024

टप्पा दुसरा – 26.4.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 25.4.2024 आणि 26.4.2024

टप्पा तिसरा – 7.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 6.5.2024 आणि 7.5.2024

टप्पा चौथा – 13.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 12.5.2024 आणि 13.5.2024

टप्पा पाचवा – 20.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 19.5.2024 आणि 20.5.2024

गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणे ही यांची संस्कृती - विजय वडवेट्टीवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : इंडिया आधाडी व महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे प्रचारार्थ चंद्रपूरात संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते. आणि कार्यकर्त्याची शंका मिटली. तत्पूर्वी लोकसभा उमेदवारीवरून मतदार संघात विविध चर्चेला उधाण आले होते, त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. साहेब काय आता बोलणार याकडे सर्व आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते.

वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पार्टी वर जोरदार टिकास्त्र करित ताई शंका बाळगण्याचं कारण नाही मी प्रचार मैदानात उतरणार आहे. यावेळी टाळ्यांचा गडगडाट आणि जयघोषाने सभामंडळ दुमदूमला होता. त्यांनी सोयाबीन, कपाशी ला भाव काय, यावर आपली प्रखर भूमिका मांडली. पुढे बोलताना ते म्हणाले की, मणिपूर व देशात होत असलेल्या महिलावर अन्याय अत्याचार हे उघड्या डोळ्यांनी बघणारे सरकार असून गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणे ही यांची संस्कृती आहे. महिलांचा अपमान देश कधीच विसरू शकत नाही.
हा देश वाचवण्यासाठी, हा देश मजबूत करण्यासाठी गांधी चा मोठा वाटा आहे. या देशाच्या मातीत इंदिराजींचं रक्त, राजीवजींच रक्त आहे. गांधींचं रक्त जो पर्यंत आहे,तो पर्यंत काँग्रेस संपवणारा पैदा होणार नाही. आणि पैदा होऊच शकत नाही. असे विरोधकांना ठणकावून सभेतून म्हणाले. आज देशात बनवाबनवी सुरु आहे, लूट सुरु आहे. वीज बिलावर दहा टक्के वाढवून अडाणी चे नवीन मिटर येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ते गरगर फिरवतील परंतु तुम्ही त्यांना या निमित्ताने गरगर फिरवा असेही ते म्हणाले. 

रमेशजी चेनीथल्ला, महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक, मा. मुकुलजी वासनिक सरचिटणीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, मा. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मा. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा, सौ पल्लवी रेनके प्रदेश काँग्रेस अध्यक्षा VJNT सेल, यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता, इम्पेरियल पॅलेस बालाजी मंदिराजवळ, दाताळा रोड, चंद्रपूर येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला जिल्हाभरातून इंडिया आघाडी व महाविकास आघाडी चे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पटवारी कॉलनीत धाडसी चोरी, लाखोंच्या वर मुद्देमाल लंपास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील दीनानाथ नगर पटवारी कॉलनी परिसरात दहशत निर्माण करत चोरट्यांनी एका घरामध्ये धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना आज गुरुवारच्या मध्यरात्री घडली. या घटनेत चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने, कागदपत्रे व रोख रक्कम असा आठ लाखांच्या वर असलेला ऐवज लंपास केला आहे. चोरीच्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पटवारी कॉलनीतील दिनानाथ नगर येथे सुभाष वासुदेव पिदूरकर (65) हे पत्नी आणि एका मुली सह राहतात. दि.4 एप्रिलला नेहमी प्रमाणे जेवण करून सर्व झोपी गेले होते, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान घराच्या बेडरूम ला लात मारण्याचा आवाज आला. त्या आवाजाने सर्व उठले आणि घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत चार ते पाच इसमानी "हिलना नही, नही तो मार दूंगा" म्हणत धारदार शस्त्राचा धाक दाखवत कपाट आणि अंगावरील दागिने लुटले. यात अंदाजे जवळपास 8,89000/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केले. घरातील मंडळी मध्यरात्रीच्या दरम्यान साखर झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. त्याअगोदर दीनानाथ नगर मधील  घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी सुद्धा लांबविले असल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा धाडसी चोरीचा थरार घडल्याने पिदूरकर कुटुंबिय या घटनेने दहशतीत आले आहे. 

घरात लोक असताना देखील चोरटे या पद्धतीने चोऱ्या करत असल्यामुळे दीनानाथ नगर व पटवारी कॉलनीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने दीनानाथ नगर पटवारी कॉलनीतील घटनेचा गांभीर्य लक्षात घेत विविध टीम ला पाचारण करून तपास सुरु केला असून पोलिस प्रशासनासमोर या चोरट्यांना शोधून काढण्यासाठी फार मोठे तगडे आव्हान आहे.


इंडिया आघाडीचा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचा राजूर सर्कल येथील भांदेवाडा जय जगन्नाथ देवस्थान येथे नारळ फोडून प्रचारास सुरुवात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दिनांक 4 एप्रिल रोजी राजूर येथील इंटक कामगार युनियन ऑफिस मध्ये राजूर सर्कल मधील इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने आज दिनांक 5 एप्रिल रोजी भांदेवाडा येथील जय जगन्नाथ देवस्थान येथे जाऊन इंडिया आघाडीतील स्थानिक नेत्यांनी नारळ फोडून रीतसर प्रचारास सुरुवात केली. 

या वेळेस भांदेवाडा येथील काही नागरिकांशी संवाद साधण्यात आला. देशातील मूठभर भांडवलदारांना देशाची साधने अर्पण करून देशातील सार्वजनिक उद्योग भाजपचा मोदी सरकारने विकली, त्याच सोबत 19 लाख कोटी रुपयांचे भांडवलदारांचे कर्जे माफ केली, 83 टक्के बेरोजगारी वाढविली, महिलांवरील अत्याचारांना पाठीशी घातले, मणिपूर येथील आदिवासी वर होणारे अत्याचार थांबवण्यास मोदी सरकार अयशस्वी ठरले, लद्दाक येथील स्थानिक जनता संविधानाचे 6 व्या अनुसुचीची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन करीत असताना त्याला दुर्लक्ष केले, असंविधानिक निवडणूक रोख्या च्या माध्यमातून देशात बोगस लोकांना खैरात वाटून करोडो रुपयांचा निधी उकळून प्रचंड कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार भाजपचा मोदी सरकारने केला आहे. भाजपने इडी, सीबीआय व आयकर ह्या स्वायत्त संस्थेचा गैरवापर करून विरोधकांना भीती दाखवून भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भेदाभेद करून त्यांची प्रकरणे संपविली तर जे यांचा भीती पुढे मान झुकविली नाही त्यांना तुरुंगात टाकले, हे सर्व मुद्दे ह्या प्रचारात घेऊन देशात मोदी सरकारचे रूपाने असलेली हुकूमशाही संपविण्यासाठी, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचा प्रतिभाताई यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. 

या वेळेस काँग्रेसचे डॅनी संड्रावार, वसुंधराताई गजभिये, रमेश देवतळे, चेतन देवतळे,महादेव तेडेवार, महाकाली पामुलवार, डेव्हिड पेरकावार, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, शिवसेनेचे नितीन मिलमिले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.