आज झालेल्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यातील प्रकल्पांचे वैशिष्ट्य

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

                   नऊ किलोमीटरचा उड्डाणपूल :

इंदोरा चौक- पाचपावली-अग्रसेन चौक-अशोक चौक-दिघोरी चौक पर्यंतच्या दाट लोकवस्तीतून जाणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपूलाची लांबी 8.9 किमी तसेच या प्रकल्पातील सर्व्हिस रोडची लांबी 13.82 किमी राहणार आहे. या पूलाच्या बांधकामासाठी 998.27 कोटी रुपये मंजूरी देण्यात आली असून काम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दोन लेन सह 12 मीटर रुंदीच्या या उड्डाणपुलाची रचना अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीटने केली असून या प्रकल्पात दोन रेल्वे उड्डाणपुल आणि रेल्वे भुयारी मार्गाचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात आला आहे. या भागात होणारी वारंवार वाहतूक कोंडी, अपघात, रेल्वे क्रॉसिंगवर जाम या समस्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाने सुटणार असून प्रवासाचा वेळ आणि इंधनाची सुद्धा बचत होणार आहे.

                        वायशेप उड्डाणपूल:

रामझुला ते एलआयसी चौक आणि रिझर्व बँक चौक पर्यंतचा वाय आकारातील उड्डाणपूलावर रामझुलाकडून एकेरी वाहतूक राहणार आहे. तर रिझर्व बँक किंवा एलआयसी चौकाकडून रेल्वे स्थानक किंवा सि.ए. रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पुलाखालील रस्ता राहणार आहे. 935 मीटर लांब या उड्डाणपुलाच्या बांधकामाला 65 कोटी रुपये खर्च आला आहे.

                          नवीन लोहापूल:

मानस चौक ते कॉटन मार्केट चौकाला जोडणारा 47 मीटर लांब भुयारी मार्ग असलेला नवीन लोहा पूल हा 25 कोटी रुपये खर्चातून दोन वर्षाच्या विक्रमी अल्प कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे. याची उंची 4.5 मीटर उंच आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी बॉक्स पुशिंग तंत्र आणि रेल क्लस्टर पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. येथे मानस चौक ते कॉटन मार्केट चौकापर्यंत ची वाहतूक नवीन लोहापूल मार्गे होईल तर कॉटन मार्केट चौक ते मानस चौकापर्यंत वाहनांचे येणे जाणे जुन्या लोहापूल मार्गे होईल.

'चला जाणूया नदीला’ उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | प्रदीप गावंडे 

नांदेड : अनादी काळापासून नदीचे आणि मानवाचे नाते अधिक दृढ आहे. चांगल्या संस्कृतीचा उदय नदीच्या काठावर झाला आहे. नद्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून त्यासाठी आपला सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. नदी संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असून लोकसहभागातून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनात आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासनाने “चला जाणुया नदीला” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नदी संवाद यात्रा व जलसाठ्यांना गाळातून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील मन्याड नदीचा गाळ काढण्याच्या उपक्रमाचा प्रातिनिधीक शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपवनसंरक्षक वाबळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, शिवाचार्य बेटमोगरेकर, नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी मल्हार नाना पाटेकर, जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी हे उपस्थित होते. मांजरा नदी समन्वयक अनिकेत लोहिया, प्रमोद देशमुख, दीपक मोरतळे, सीता नदी समन्वयक बाळासाहेब शेंबोलीकर, नंदन फाटक, लेंडी नदी समन्वयक कैलास येसगे, वसंत रावणगावकर, यादव बोरगावकर, मन्याड नदी समन्वयक प्रमोद देशमुख, शिवाजीराव देशपांडे, दुधाना नदी समन्वयक रमाकांत कुलकर्णी, कयाधू नदी समन्वयक दयानंद कदम, जयाजी पाईकराव, आसना नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ परमेश्वर पौळ, वरुणा नदी समन्वयक सुनील परदेशी, राहुल जोरे आदीची उपस्थिती होती.
पाणी ही महत्त्वाची नैसर्गिक साधन संपत्ती असून या संपत्तीचे संवर्धन करणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील मन्याड नदीपात्रातील परिसर पुरमुक्त व दुष्काळमुक्त करण्यासाठी गाळ काढणे आवश्यक असून याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना झाला पाहिजे. मराठवाडा मुक्तीचा हा लढा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करावयाचा असेल तर शेतकरी, कष्टकऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चला जाणूया अभियाना अंतर्गत देशातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. यात आता लोकसहभागातून वाढ होवून 117 नद्या अमृतवाहिन्या करण्यावर भर देण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चला जाणूया नदीला या उपक्रमातर्गत आज मन्याड नदीपात्रातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला जनआंदोलनाचे स्वरुप आले असून संस्था व लोकसहभागातून मन्याड नदीतील 20 लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. यावेळी मी मन्याड या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी जिल्ह्यातील सर्व नद्याच्या पाण्याचे कलश पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुमंत पाडे यांनी केले. यावेळी भूजल गाथा फिल्मचे सादरीकरण करण्यात आले.

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यासाठी 12 हजार 655 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रामुख्याने आदिवासी समाजासाठी एक लाख घरे बांधली जाणार असून, त्यासाठी एक हजार 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना राज्यात पहिल्यांदा राबवली जाणार आहे. यामध्ये हजारो आदिवासी पाडे हे रस्त्यांच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांकरिता 4240.44 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परिक्षा शुल्क व शिक्षण शुल्क इत्यादी बाबींकरीता 459.35 कोटी तरतूद करण्यात आली आहे. तसेच लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष शिकवणी, पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण अशा प्रशिक्षण कार्यक्रमांकरिता 55.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बांधकामविषयक योजनांकरिता 762 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5 टक्के अबंध निधी अर्थसहाय्याकरिता 271.50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा’ योजनेंतर्गत 118.50 कोटी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत तसेच गावपाडे स्तरावरील मूलभूत सुविधा कामांकरिता 390 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी लाभार्थ्यींच्या घरकुलासाठी ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेखाली राज्य हिष्यासाठी 275 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत निकषात न बसणारे आदिवासी नागरिक घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी 1200 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. अशी आदिवासी लाभार्थ्यींच्या घरकुलासाठी एकूण 1475 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाकरिता 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे याचबरोबर आदिम जमाती विकास योजनेंतर्गत 25 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

‘शासकीय आश्रमशाळा समूह’ या योजनेंतर्गत आदिवासी मुलांना निवासी शिक्षण, भोजन, बेडिंग साहित्य तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. सन 2017-18 पासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य तसेच साधन सामुग्री खरेदी करिता आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सद्य:स्थितीत विभागाच्या अधिनस्त 499 शासकीय आश्रमशाळांमध्ये सुमारे 1.97 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या योजनेकरिता रु.1810.50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत एकूण 556 अनुदानित आश्रमशाळा मंजूर असून त्यापैकी 64 प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा व 492 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जातात. या 492 माध्यमिक आश्रमशाळांपैकी 155 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये चालविण्यात येतात. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या 541 अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण विद्यार्थी संख्या 2.41 लाख इतकी आहे. या योजनेकरिता 1750 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना गांव, तालुका, जिल्हा व विभागाच्या ठिकाणी माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आली आहेत. राज्यात 487 शासकीय वसतीगृहे कार्यरत असून त्यामध्ये एकूण 48 हजार 933 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास व आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येते. सन 2017-18 पासून बेडिंग साहित्य, वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य इत्यादी उपलब्ध करून घेण्याकरिता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट निधी जमा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, सन 2018-19 पासून महानगर, विभागीय आणि जिल्हास्तरावरील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना आहाराकरीता थेट लाभ हस्तांतर (DBT) योजनेद्वारे लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेकरीता रु.546.61 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून, नामांकित शाळेमार्फत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा खर्च शासनामार्फत करण्यात येतो. या योजनेंतर्गत आजतागायत एकूण 157 नामांकित शाळांमध्ये 46 हजार 226 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळांची निवड व त्यांचा दर्जा निश्चित करुन दर्जानुसार थेट शाळांना निधी वितरित करण्याची ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून याकरीता 300 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम्’ योजनेंतर्गत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात येत आहे. सन 2017-18 पर्यंत या योजनेंतर्गत महानगर, विभाग स्तर व जिल्हा स्तर या ठिकाणी कार्यरत शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत होता. सन 2018-19 पासून तालुका स्तरावरील कार्यरत शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना देखील योजनेचा लाभ देण्यात येत असून या योजनेकरीता 120 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत 5% अबंध निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरीता 271.50 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यातील बेघर तसेच कुडा-मातीची घरे असणाऱ्या आदिवासींना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शबरी आदिवासी घरकुल’ योजना सुरु करण्यात आली आहे. ‘शबरी आदिवासी घरकुल’ योजनेंतर्गत ग्रामीण भागाकरीता शौचालय बांधकामासह प्रति घरकुल अनुदान देण्यात येते. या योजनेकरीता 1200 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे.

राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमाती घटकांच्या वस्त्यांना तसेच गावांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना राबविण्यात येते. त्यामध्ये वेळोवेळी कालानुरूप आवश्यक बदल करण्यात आले आहेत. शासनाने सन 2022-23 पासून राज्यातील अनुसूचित जमाती घटकांच्या वस्ती तसेच गावांचा विकास करण्याबाबत सुचविण्यात येणाऱ्या कामांना शासन स्तरावरून व जिल्हास्तरावरून मान्यता देऊन राज्य व जिल्हास्तरारून योजना राबविण्याचा व या योजनेंतर्गत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी यंत्रणा व इतर निकष सुधारित करण्याचा निर्णय 3 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. या योजनेकरिता 118.50 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत प्रत्येक आदिवासी व्यक्तिस किंवा कुटुंबास लाभाची आर्थिक मर्यादा 50,000 रू. आहे. या योजनेंतर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक आदिवासी लाभार्थी एकत्र आले तर सामूहिक प्रकल्प किंवा कार्यक्रम सुद्धा मंजूर करता येतात. या योजनेकरीता एकूण 40 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, विद्यार्थी अष्टपैलू व्हावेत म्हणून शिक्षणाव्यतिरिक्त खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण व विशेष पाठ्येत्तर शिक्षण देणे यासाठी केंद्र शासनामार्फत नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावरील ‘महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीमार्फत ‘एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल’ स्कूल सुरु केले आहेत. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या (CBSE) 39 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मंजूर असून यापैकी 37 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल सुरू आहेत. यामध्ये 8048 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्य:स्थितीत 12 शाळांकरीता इमारत बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित 21 शाळांचे बांधकाम विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहे.

अनुसूचित क्षेत्रात कमी वजनाची बालके जन्मास येणे, कुपोषण इत्यादीवर मात करणे तसेच महिला व बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी शासनाद्वारे गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार’ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून याद्वारे गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना आठवड्यातून 6 दिवस एक वेळ चौरस आहार देण्यात येत असून, या योजनेकरिता 228.20 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

विविध योजनांना आवश्यक निधी उपलब्ध करुन आदिवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

- शैलजा पाटील
       विसंअ

वणी येथे ५ एप्रिल ला स्वा. सावरकर गौरव यात्रेचे आयोजन



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : या देशात महान क्रांतिकारकांचे शिरोमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार होत असलेला अपमानाचा प्रखर विरोध करण्यासाठी व स्वातंत्र्यवीराचा गौरव करण्यासाठी दि. ५ एप्रिलला वणी शहरात स्वा. सावरकर गौरव यात्रेचे आयोजन लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.

वणी विधानसभा मतदार संघातील साधू, संत, हभप मंडळी, सर्वसमाजातील सामाजिक संघटना, संस्था व्यावसायिक व विविध संघटनांच्या सहभागाने दि. ५ एप्रिल ला सायंकाळी ५ वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावरून  "होय मी सावरकर" अशी टोपी घालून या गौरव यात्रेची सुरुवात होणार आहे.

या गौरव यात्रेत स्वा. सावरकरांच्या सन्मानार्थ ही यात्रा पाण्याच्या टाकीपासून निघणार असून टिळक चौक, संभाजी चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, स्वा. सावरकर चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक ते टिळक चौकात येऊन या गौरव यात्रेचा समारोप होणार आहे. समारोपानंतर रात्री ८ वाजता गाढे अभ्यासक दयाशंकर तिवारी यांचे स्व. सावरकर यांच्या जिवन चरित्रावर मार्गदर्शन लाभणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व सावरकर प्रेमींनी या स्वा. सावरकर गौरव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन येथील शासकीय विश्रामगृहात आज १ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बोदकुरवार यांनी केले.

या पत्रकार परिषदेला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, भाजपाचे जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर, भाजपा नेते विजय पिदुरकर, माजी जि. प. सदस्य बंडु चांदेकर, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, संतोष डंभारे, संदीप बेसरकर, अभिजित ठाकुरवार हे उपस्थित होते.


मार्डीत रंगला नृत्याच्या तालावर महिलांचा विलोभनीय नृत्याविष्कार...


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्डी येथे सामूहिक महिला नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमात मोठी बहर आणली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाने मार्डीकर तसेच परिसरातील जनतेला मंत्रमुग्ध केले.     
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दि.31 मार्चला जनहित कल्याण संघटना मारेगावचे संस्थापक अध्यक्ष श्री. गौरीशंकर खुराणा यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन जनहित कल्याण महिला संघटनेच्या सचिव सुवर्णाताई खामणकर, अध्यक्षस्थानी संघटनेच्या अध्यक्षा कविताताई मडावी, प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयाताई मोरे, वनविभाग कर्मचारी प्रेमीला सिडाम, मारेगावच्या माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर, विभा ताटकोंडावार, पूजा तेलंग, नूतन तेलंग, अश्विनी खाडे, रसिका गेडाम, सपना वनकर उपस्थित होत्या.
या स्पर्धेमध्ये एकूण 24 समूह नृत्य संघांनी सहभाग नोंदवला. सर्वच संघाच्या महिलांनी आपली कला बहारदारपणे सादर केली. चंद्रपूर, चिमूर, पांढरकवडा, मारेगाव अशा लांबून आलेल्या महिला नृत्य समूहानी आपल्या नृत्य कला अविष्काराने हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 25 हजार एक व स्मृतीचिन्ह जय अंबे महिला समूह ग्रुप मारेगाव, द्वितीय क्रमांक 17 हजार एक व स्मृतिचिन्ह नटराज समूह नृत्य ग्रुप चंद्रपूर, तृतीय क्रमांक 11 हजार एक व स्मृतिचिन्ह कण्यका समूह ग्रुप पांढरकवडा, तर दोन प्रोत्साहनपर 5 हजार एक आणि स्मृतिचिन्ह आदिशक्ती महिला ग्रुप मारेगाव आणि सावित्रीबाई समूह ग्रुप नवरगांव यांनी पटकावले. या नृत्यांनी एवढे मनोरंजन केले की नृत्य सुरु असतांना अनेकांनी या समूह नृत्य ग्रुपला वैयक्तिक बक्षीस दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनहित कल्याण महिला संघटना, जनहित कल्याण संघटना, आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भास्करराव धानफुले, मोरेश्वरराव ठाकरे, सुमित हेपट, माणिक कांबळे, भास्कर राऊत, सुरेश नाखले, भैय्याजी कनाके, गजानन देवाळकर, गजानन आसूटकर, आनंद नक्षणे, सुमित गेडाम, सुरेश पाचभाई, धनराज खंडरे, शरद खापणे, प्रफुल ठाकरे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाला मार्डी तसेच परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आणि नृत्य स्पर्धेचे सूत्रसंचालन माधुरी लोहकरे, ऋतुजा पाटणे, नीता निमसटकर, पल्लवी गौरकार यांनी केले. प्रास्ताविक देवकन्या सवाई यांनी तर आभार अनिता चाफले यांनी केले