सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी जामणी : एकीकडे आपल्या कृषी प्रधान देशात जय जवान जय किसान चा नारा लावून शेतकऱ्यांचा सन्मान l जातो तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिक विमा संदर्भातील मागण्याकडे शासन दुर्लक्ष का करीत आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपला भेट दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विमा कंपनी व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असे आवाहन उपोषण कर्ते यांनी तहसिलदार यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
उपोषण कर्ते २ जानेवारी पासुन आमरण उपोषणाला बसले आहै. वेळोवेळी निवेदने देण्यात आली तरी शेतकन्यांना न्याय देण्यात उशिर का होत आहे. महसूल प्रशासनाचा, विमा कंपनीचा प्रतिनिधी व कृषी विभागाचा अधिकारी उपोषणाचा दुसरा दिवस असुनही कोणी आले नाही. या वरुन शेतकरी पुत्र मेले तरी चालेल पण यांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. अशी निवेदनातून तक्रार मंगळवारी (ता. ३) तहसीलदार यांना देण्यात आली. तहसीलदार गिरीश जोशी यांनी कृषी अधिकारी व विमा अधिकारी यांना तहसील कार्यालयात बोलावले त्यांनतर चर्चा विनिमय झाल्यानंतर नायब तहसीलदार महेश रामगुंडे, कृषी अधिकारी अमोल आमले, मंडळ कृषी अधिकारी किनाके, एआयसी विमा प्रतिनिधी राजू ढोके व प्रवीण चंदेल यांनी उपोषण मंडपात भेट दिली. त्यावेळेस कृषी अधिकारी अमोल आमले यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्याच शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे पिकाचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी ४८ तासाच्या आत विमा प्रतिनिधीला सूचना देण्याची आवश्यकता होती. त्यानंतर पंचनामे झाले. ज्या शेतकऱ्यांनी सूचना दिली त्या शेतकऱ्यांना आता शुक्रवारपासून (३० डिसेंबर) पैसे जमा होत आहे पुढेही टप्प्याटप्प्याने तीन महिन्यात पैसे जमा होईल असे आश्वासन दिले. परंतु उपोषण कर्ते यांनी कृषी अधिकारी अमोल आमले यांचे मौखिक व लिखीत आश्वासन फेटाळून लावले. संदीप बुर्रेवार यांनी सांगितले की शेतकऱ्यांना या वर्षी अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसान झाले आहे शासनाने ठरविलेल्या कालावधीत विमा मिळाला नाही त्यामुळे १२.१ % व्याज दराने विलंब शुल्क सह १००% नुकसान भरपाई देण्यात यावी. जो पर्यंत १०० % नुकसान भरपाई ४६ हजार २०० रुपये प्रती हेक्टरी देण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण कर्ते उपोषण सोडणार नाही असे सडेतोड उत्तर उपोषण कर्ते शेतकरी संदीप बुर्रेवार, निलेश येल्टिवार, राहुल धांडेकर, हरिदास गुर्जलवार, नितिन खडसे, गंगाधर आत्राम, सुभाष कुडमेथे, चेतन मॅॅकलवार, राकेश गालेवार यांनी दिले.