विमा कंपनी व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा- उपोषण कर्त्यांची मागणी


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : एकीकडे आपल्या कृषी प्रधान देशात जय जवान जय किसान चा नारा लावून शेतकऱ्यांचा सन्मान l जातो तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिक विमा संदर्भातील मागण्याकडे शासन दुर्लक्ष का करीत आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपला भेट दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विमा कंपनी व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असे आवाहन उपोषण कर्ते यांनी तहसिलदार यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

उपोषण कर्ते २ जानेवारी पासुन आमरण उपोषणाला बसले आहै. वेळोवेळी निवेदने देण्यात आली तरी शेतकन्यांना न्याय देण्यात उशिर का होत आहे. महसूल प्रशासनाचा, विमा कंपनीचा प्रतिनिधी व कृषी विभागाचा अधिकारी उपोषणाचा दुसरा दिवस असुनही कोणी आले नाही. या वरुन शेतकरी पुत्र मेले तरी चालेल पण यांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. अशी निवेदनातून तक्रार मंगळवारी (ता. ३) तहसीलदार यांना देण्यात आली. तहसीलदार गिरीश जोशी यांनी कृषी अधिकारी व विमा अधिकारी यांना तहसील कार्यालयात बोलावले त्यांनतर चर्चा विनिमय झाल्यानंतर नायब तहसीलदार महेश रामगुंडे, कृषी अधिकारी अमोल आमले, मंडळ कृषी अधिकारी किनाके, एआयसी विमा प्रतिनिधी राजू ढोके व प्रवीण चंदेल यांनी उपोषण मंडपात भेट दिली. त्यावेळेस कृषी अधिकारी अमोल आमले यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्याच शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे पिकाचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी ४८ तासाच्या आत विमा प्रतिनिधीला सूचना देण्याची आवश्यकता होती. त्यानंतर पंचनामे झाले. ज्या शेतकऱ्यांनी सूचना दिली त्या शेतकऱ्यांना आता शुक्रवारपासून (३० डिसेंबर) पैसे जमा होत आहे पुढेही टप्प्याटप्प्याने तीन महिन्यात पैसे जमा होईल असे आश्वासन दिले. परंतु उपोषण कर्ते यांनी कृषी अधिकारी अमोल आमले यांचे मौखिक व लिखीत आश्वासन फेटाळून लावले. संदीप बुर्रेवार यांनी सांगितले की शेतकऱ्यांना या वर्षी अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसान झाले आहे शासनाने ठरविलेल्या कालावधीत विमा मिळाला नाही त्यामुळे १२.१ % व्याज दराने विलंब शुल्क सह १००% नुकसान भरपाई देण्यात यावी. जो पर्यंत १०० % नुकसान भरपाई ४६ हजार २०० रुपये प्रती हेक्टरी देण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण कर्ते उपोषण सोडणार नाही असे सडेतोड उत्तर उपोषण कर्ते शेतकरी संदीप बुर्रेवार, निलेश येल्टिवार, राहुल धांडेकर, हरिदास गुर्जलवार, नितिन खडसे, गंगाधर आत्राम, सुभाष कुडमेथे, चेतन मॅॅकलवार, राकेश गालेवार यांनी दिले.

अविनाश लांबट यांचा मनसे तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष अविनाश लांबट (Avinash lambat) यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे दिला.

लांबट (Avinash lambat) यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, माझ्या पारिवारिक अडचणीमुळे मी पक्ष संघटनेसाठी पुरेसा वेळ देवू शकत नाही. करिता आपल्या पक्षाची मनसे तालुका अध्यक्ष मारेगाव पदाचा राजीनामा देत आहोत असे नमूद आहे.

सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून सक्रीय असून गेल्या सहा महिन्यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून निष्ठेने प्रामाणिकपणे सर्व घटकांना बरोबर घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. आणि यापुढे ही करेन असे त्यांनी "सह्याद्री चौफेर" बोलतांना सांगितले.

दरम्यान राजू उंबरकर यांच्या निवासस्थानी अविनाश लांबट यांनी भेट घेतली, त्यांना आपल्या पारिवारिक समस्यांचे कारण देत लांबट यांनी राजीनामा दिला आहे.  

विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

 
सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली.
       
सर्वप्रथम संपूर्ण सावली नगरातून शालेय विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली काढण्यात आली. "जय ज्योती जय क्रांती" च्या जयघोषाने सावली नगरी दुमदुमली. त्यानंतर शालेय परिसरात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रवींद्र मुप्पावार सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राऊत सर,सुपले सर, खर्चे मॅडम,बिडवई मॅडम,बारेकर, मॅडम,कोतपल्लीवार मॅडम, गेडाम मॅडम,देवतळे मॅडम मंचावर उपस्थित होते.
              
जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून खर्चे मॅडम यांनी स्त्री शिक्षण तसेच समाज परिवर्तनाची दिशा आणि तत्कालीन समाज परिस्थिती यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
             
जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्याकडून भाषणे आणि गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या संचालन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षिका प्रसन्ना मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका गेडाम मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

ठाणेदारांनी केली वाळू तस्करावर कारवाई; ५ लाख १२ हजार रुपये चा मुददेमाल जप्त


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांना गोपनीय माहीती मिळाली की दुर्भा ते लिगंटी रोडवर एक इसम आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये अवैध रित्या वाळू भरुन नेत आहे. अशा माहीतीवरून पाटणचे ठाणेदारांनी ट्रॅक्टर लाल रंगाचा वाययुव्हीओ ५७५ थांबवुन ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये पाहणी केली असता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये २ ब्रास रेती आढळून आली. वाळू भरून नेणाऱ्या गैर अर्जदारास रेती वाहतुकीचा परवाना संबंधीत कागदपत्रे बाबत विचारणा केली असता, ट्रॅक्टर चालकाजवळ व मालकाजवळ वाळू वाहतुक परवान्याचे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये २ ब्रास रेती किमंत १२ हजार रुपये व ट्रॅक्टर सह ट्रॉली किंमत ५ लाख रूपये असा एकूण ५ लाख १२ हजार रुपये चा मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेतला दोघेही बिनापरवाना अवैधरित्या रेतीची चोरी करीत असतांना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरुन सुनील अशोक बाभुळकर रा. पाटण, नवन अशोक बदमवार रा. दुर्भा या दोघांवर गुन्हा नोंद करुन ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस अधीक तपास करीत आहे.


पाटण पोलीसांची कोंबड्याच्या झुंजीवर धाड; १ लाख ३२ हजार ७४० रु.चा मुद्देमाल जप्त


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांना मिळालेलल्या गोपनीय माहीतीवरुन ग्राम कोडपाखिंडी जंगलामध्ये गेले असता काही इसम हे कोंबड्याला काती बांधुन त्याची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ खेळवित असताना दिसुन आले. लपत छपत जावुन धाड टाकली असता पोलीसांना पाहुन काही ईसम पळुन गेले व काही ईसम हे मोक्यावर मिळुन आले व त्यांच्या जवळुन १ लाख ३२ हजार ७४० रु.चा मुद्देमाल जप्त करून पाच जुगार बहाद्दरवर जुगार ॲक्ट नुसार कारवाई करण्यात आली.

ठाणेदार यांना माहिती मिळाल्यानंतर तत्काळ एक चमू तयार करून ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड्याच्या झुंज चालू असलेल्या ठिकाणी ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अमलदार सुरेश राठोड, संदीप सोयाम, अमित पोयाम, प्रशांत तलांडे, रत्नाकर सलामे यांना पाठवण्यात आले. कोडपाखिंडी येथील जंगलात पोलीस कर्मचारी लपत छपत जाऊन त्या ठिकाणी कोंबड्याला काती बांधून हार जितचा खेळ सुरू असताना दिसून आले. पोलीसांना पाहताच काही इसम धावून पळून निघून गेले व काही इसमाला त्या ठिकाणी पोलीसांकडून पकडण्यात आले. त्यामध्ये अनिल तेजराव खडसे (३७) रा. कोडपाखिंडी, सचिन गोविंदराव बावणे (३७) रा. सुभाष नगर आदिलाबाद, गोपाळ वसंता आत्राम (२४) रा. कृष्णापुर तालुका केळापूर, जीवन किरणसिंग चंदेल वय (२४) रा. घोंसी तालुका केळापूर, शुभम किसन आत्राम (२८) रा. खडकडोह तालुका झरी जामणी यांचे कडून नगदी रक्कम १९७० रुपये, २ जिवंत कोंबडे किंमत ७५० रुपये व २ काती किंमत २० रुपये व २ मोटर सायकल किंमत १ लाख ३० हजार रुपये असा एकूण १ लाख ३२ हजार ७४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांचे वर १२ ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.