वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ९ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदारयादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदारयादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे.
श्री. देशपांडे म्हणाले, ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदाराची वगळणीही महत्त्वाची असते.
श्री. देशपाडे म्हणाले, यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी, तर २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जातील. तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा एनव्हीएसपी (NVSP), व्होटर पोर्टल (Voter Portal) या संकेतस्थळावर आणि व्होटर हेल्पलाईन (Voter Helpline) या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत.
श्री. देशपांडे म्हणाले, ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १० नोव्हेंबर रोजी राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

वणी शहरातील कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे याची विल्हेवाट लावा- राष्ट्रवादी युवक पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वणी शहरातील प्रभागात,शाळेच्या आवारात ठिकठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विविध ठिकाणी दुर्गंधी पसरली असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याची व घाणीची तात्काळ विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवारी मुख्याधिकारी अभिजित वायकोस  यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वणी शहरातील प्रभागात व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, महापुरुषांच्या पुतळ्या जवळ कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. परिणामी कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी, जर आपण कचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही तर, याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनामध्ये होईल. त्यामुळे स्वच्छता अभियान राबवून वणीकरांच्या आरोग्याचा विचार करावा. असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष मनोज वाकटी यांच्या नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस विजय नगराळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू डावे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, ओबीसी सेल अध्यक्ष गुणवंत टोंगे, युवक तालुका अध्यक्ष हेमंत गावंडे, युवक तालुका उपाध्यक्ष मोबिन शेख, युवक विद्यार्थी शहर अध्यक्ष संदेश तिखट, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबर पासून 100 मुलांचे वसतीगृह सुरु होईल यांचे कालबद्ध नियोजन करावे, तसेच याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी तसेच वसतीगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करावी.
केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या 
योजनेंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य याकरिता रुपये 50 हजार रुपये देण्यात येणार असून विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी ची प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम अदा करण्यात येणार आहे.
मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थीं परदेशातील नामांकित विद्यापीठामधील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी प्रती वर्षी रुपये 30 लाख मर्यादेत आणि पीएचडी साठी रुपये 40 लाखाच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले.

मतदानाच्या दिवशी मतदान कल चाचणीस प्रतिबंध

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने १६६- अंधेरी (पूर्व) या महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित केली केली आहे. या निवडणुकीकरिता दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

या मतदानाच्या दिवशी म्हणजेच दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० या कालावधीत मतदान कल चाचणी (EXIT POLL) घेण्यास तसेच EXIT POLL चे निकाल प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर किंवा अन्य माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.

वणीचे सुपुत्र शहीद लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रोहपट येथे वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणीचे सुपुत्र शहीद लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे 300 वृक्षारोपण करण्यात आले. मंगळवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहास नांदेकर तसेच डॉ. सचिन दुमोरे व प्रणाली दुमोरे तसेच टच फाउंडेशनचे डॉ. सॅमराज पोन्नुमणी यांची प्रमुख उपस्थिती होती. वणीतील सामाजिक संस्था स्माईल फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या महिन्यात भारत व चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना वणीचे सुपुत्र ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांना हरित श्रद्धांजली देण्यासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे देशी झाडे उपस्थित मान्यवर व स्वयंसेवकांद्वारे लावण्यात आले.
ले. कर्नल वासुदेव आवारी हे परिसरातील तरुणांसाठी एक आदर्श होते. झाडांच्या माध्यमातून त्यांना वाहलेली ही श्रद्धांजली कायम तरुणांना प्रेरणा देणारी ठरणार, असे मनोगत डॉ. सचिन दुमोरे यांनी व्यक्त केले. तर लावलेले 300 रोपे हे कायम ले. कर्नल आवारी यांच्या स्मृतींना उजाळा देत राहणार व तरुणांना खंबीरपणे जगण्याचे बळ देत राहणार, असे मनोगत स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी स्माईल फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष आत्राम सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, महेश घोगरे, तन्मय कापसे, तुषार वैद्य, अनिकेत वासरीकर, दिनेश झट्टे, सचिन काळे, कृनिक मानकर, रोहित ओझा, तेजस नैताम, कार्तिक पिदूरकर, घनश्याम हेपट, आकाश राजूरकर, मनीष मिलमिले, मयूर भरटकर, राज भरटकर, सिद्धार्थ साठे, अतुल राठोड इत्यादी सदस्य व स्वयंसेवकांची उपस्थिती होती.