जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली.

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना; तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.

सध्या 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज (ता. 5 ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर 13 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी; तर 12 जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील, असे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

नागपूर : भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला.

तत्पूर्वी डॉ. गोऱ्हे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांना प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला, त्यांना न्याय मिळण्याकरीता कायदेशीर मदत करणार असल्याची ग्वाही देखील दिली.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पीडित महिलेच्या प्रकृतीची विचारणा केली. तिच्या संपूर्ण उपचारासाठी शासकीय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली. या दरम्यान भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक (का.) अनिकेत भारती यांनीही या घटनेचा अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती दिली.
या घटनेबाबत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेच्या सर्व संबंधित आरोपीस लवकरात लवकर जेरबंद करावे, घटनेचा तपास जलदगतीने करावा, घटनेतील आरोपीस मदत करणाऱ्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व कडक कलमे लावण्यात यावीत, पीडित महिलेचे समुपदेशन करावे तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोर्जे यांना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे दिल्या.

ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे – विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : कोरोनाच्या कालावधीत हिरमुसलेले विद्यार्थी आता नियमित शाळा सुरू झाल्याने विविध उपक्रमाप्रतीही तेवढेच उत्सूक आहेत. शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेत आज घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या ग्रामीण भागातील प्रभावी आयोजनाचा शुभारंभ व जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून घेण्यात आलेल्या तिरंगाचे प्रातिनिधीक वाटप करण्यात आले. या छोटेखाणी समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 6 लाख 86 हजार 821 विद्यार्थी संख्या आहे. जवळपास 24 हजार 343 शिक्षक आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत वेळोवेळी शिक्षकांवर विविध जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांनी समर्थपणे पेलून दाखविल्याचे गौरवउद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी काढले.

सैनिक हा देशाचा श्वास तर शिक्षक हा देशाचा विश्वास असल्याचा उल्लेख या समारंभात शिक्षकांनी केला होता. याचा धागा पकडून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घरोघरी तिरंगाचा आणि भारतीय स्वातंत्र्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रशासनातर्फे टाकलेला विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवाल, असे सांगितले.
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामपातळीवरील ग्रामसेवकापासून, शिक्षकांपासून ते तालुका पातळीवरील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांच्या परस्पर समन्वयातून घरोघरी तिरंगासाठी व्यापक नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

'हर घर झेंडा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीद्वारे जनजागृती

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या अभियानात सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.5 ऑगस्ट) चंद्रपूर शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथून आमदार किशोर जोरगवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक समशेर सुभेदार, पोलिस निरीक्षक श्री. मुळे आदी उपस्थित होते. सदर रॅली जिल्हा क्रीडा संकूल येथून मित्रनगर, केवलराम चौक, सेंट मायकल स्कूल, जटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, परत जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवासस्थान या मार्गाने गेल्यानंतर जिल्हा क्रीडा संकूल येथे समारोप करण्यात आला.
सायकल रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सायकल क्लब, विविध क्रीडा मंडळे, अधिकारी व कर्मचारी, क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील कर्मचारी व इतर खेळाडूंनी सहकार्य केले.

जिवनावश्यक वस्तूच्या महागाई विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारने महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढविलेल्या जी एस टी (GST) च्या विरोधात आज शुक्रवार (ता.5 ऑगस्ट) शुक्रवारला शहरातील जिजाऊ चौक रेल्वे क्रॉसिंग चिखलगाव येथे "राज्यव्यापी आंदोलन" करण्यात आले.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड देविदास काळे, जिल्हा बँक अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर अध्यक्ष प्रमोद निकूरे, मोरेश्वर पावडे, सुरेश काकडे, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरुषोत्तम आवारी, संजय खाडे, डॉ. महेद्र लोढा, सुनील वरारकर, जयसिंग गोहकार, अनंतलाल चौधरी, ओम ठाकूर, डेनी सेंड्रावार, प्रशांत गोहकार, जय आबड, अशोक नागभिडकर, प्रदीप खेकारे, प्रमोद लोणारे, रफिक रंगरेज, अरुण झाडे, तेजराज बोढे, सूरज महातळे, पलाश बोढे, कमलाकर काळे,बाबरावजी ठाकरे,निकेश आसुटकर, शेषराव खापने, प्रभाकर डावरे, दिनेश पाऊंनकार, प्रदीप गाताडे, संध्याताई बोबडे, सविताताई ठेपाले, निलिमाताई काळे, शारदाताई ठाकरे, कविताताई चटकी, व असंख्य काँगेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महागाई, बेरोजगारी अग्निपथ व जीवनावश्यक वस्तू वरील वाढविलेल्या जी एस टी (GST) विरोधात दरवाढीचा निषेध करित केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. सरकारने घेतलेल्या इंधनदरवाढीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना जीवन जगण्यासाठी धरपड करावी लागत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या जीवघेण्या महागाई विरोधात आंदोलन छेडण्यात आले.