अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत यांचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी तसेच या क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नातं असलेल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, येणाऱ्या काळात नाट्य मंदिराचे नाट्यचित्र मंदिर करता येईल का याबाबत नाट्यगृह बांधताना किंवा नूतनीकरण करताना तज्‍ज्ञ लोकांचा सल्ला घेण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

राज्यातील नाट्यगृहांची स्थिती आणि उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत बैठका घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ५२ पैकी रविंद्र नाट्यगृह सांस्‍कृतिक विभागाकडे असून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत. यासंदर्भातील अडचणी दूर करुन नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना देऊन यासंदर्भातील तज्‍ज्ञ व कलावंत यांच्यासोबत देखील चर्चा झाली. नाट्यगृहात सोलर व्यवस्था व्हावी यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. नाट्य चळवळ सुरू राहावी याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडीशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळ्या बाबींचा समावेश असणे आवश्यक असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

कोरोनाच्या काळात मराठी नाटक आणि कलावंत यांच्यावर देखील इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक संकट कोसळले. आता हे क्षेत्र रुळावर येऊ लागले आहे, तरी देखील मुंबईतील नाट्यगृहे जून 2023 पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याशी चर्चा केली आहे. अल्प दरात हौशी कलावंतांना नाट्यगृह उपलबद्ध व्हावेत असाही प्रयत्न असणार आहे. नाट्यस्पर्धेच्या परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आणि स्पर्धेतील विजेत्या संघातील प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

"गाव तीथे ग्रामगीता" या अभीयानाची पूर्णत्वाकडे वाटचाल...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथाचे "गांव तिथे ग्रामगीता" अभियान गुरुदेव सेवा मंडळ मारेगा तालुका वतीने 25 डिसेंबर 2022 पासून ग्रामगीतेच्या 67 व्या वर्धापन दिनाच्या पावन पर्वावर सुरू करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालूक्यात हे अभियान राबविण्यात येत असून तालूक्यात एकून 106 गावापैकी जवळपास 82 गावामधे जनजागृती करून प्रत्येक गावामधे ग्रामगीता भेट दिली आहे. हे अभियान सुरळीत पार पडण्याकरिता तालूक्यातील गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व सेवक अथक परिश्रम घेऊन अभियान यशस्वी करत आहेत.
महिन्यातील दर रविवारला हे अभियान राबविले जाते. त्यामुळे आज दि 26 मार्च रोजी खेकडवाई, जळका, घोगूलदरा, श्रीरामपूर, टाकळी, कूंभा येथे राबविण्यात आले.

प्रगल्भतेचा आणि पूर्णतेचा राजमार्ग आहे नीतिशतकम् - डॉ. स्वानंद पुंड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : "मानवाला इतर सर्व पशुंपेक्षा वेगळा करणारी विशिष्ट गोष्ट म्हणजे नीतिमत्ता. पशुंना केवळ खाणे,पिणे, झोपणे हेच जमते. मात्र माणसाला यापेक्षा मिळालेल्या अनेक अधिकच्या गोष्टींमध्ये नैतिकता, संस्कार या गोष्टीं प्रधान आहेत. या नीतीमत्तेच्या संस्कारांच्या आधारेच आपण आपली जीवन प्रगल्भ आणि अंतिमतः पूर्ण करू शकतो. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने नीतिशतकांचा अभ्यास आवर्जून करायला हवा." असे आवाहन सुप्रसिद्ध संस्कृत अभ्यासक, लेखक तथा वक्ता विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांनी केले.
           जैताई देवस्थानच्या चैत्र नवरात्रोत्सवात दुसऱ्या दिवशीची माळ गुंफताना संस्कृत भारती वणी शाखेद्वारे आयोजित व्याख्यानात नीतिशतकम् या विषयावर ते व्यक्त होत होते.
          
लॉकडाऊन च्या काळात केवळ आपल्या विद्यार्थ्यांच्या शाश्वत अध्ययनाची सोय म्हणून निर्माण झालेल्या गीर्वाण वाणी यूट्यूब चैनल स्वरूपातील हा उपक्रमाची पार्श्वभूमी विशद करीत पुढे आपले विद्यापीठ त्यानंतर सर्वच विद्यापीठ आणि शेवटी सर्वच संस्कृत प्रेमी जनांसाठी या उपक्रमाचे वाढवित नेलेले विस्तारित स्वरूप आणि त्याला देशाविदेशातील आबाल वृद्धांचा मिळालेला अफाट प्रतिसाद हे संस्कृत भाषेप्रती जनतेच्या मनात असलेल्या आत्मीयतेचे प्रतीक आहे हे त्यांनी अधोरेखित केले. आजही हजारो लोक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत याच पार्श्वभूमीवर मुद्दाम या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
          
साहित्य,संगीत आणि कला यांचे वैशिष्ट्य स्पष्ट करीत मानवी जीवन यांच्याशिवाय पशुतुल्य आहे ही महाकवी भर्तृहरींची भूमिका सुस्पष्ट करीत नीतिशतकम् च्या विविध श्लोकांच्या आधारे त्यांनी या ग्रंथाचे आणि त्यातील विवेच्य विषयाचे विविधांगी निरूपण सादर केले.
        
ग्रंथाच्या आरंभी असलेले अज्ञलक्षण जीवनात सुधारण्यासाठी किती आवश्यक आहे? हे स्पष्ट करीत आपल्यातील अज्ञान करणे हाच विकासाचा पहिला टप्पा आहे असे म्हणत त्यानंतर येणारी विद्या पद्धती, त्या विद्यावंताला मिळणारा मान, अशा आत्मसन्मान संपन्न व्यक्ती जवळच धन असायला पाहिजे म्हणून त्यापुढे धन पद्धती असे सांगत मुळात प्रत्येक सुभाषित स्वतःच्या ठाई वेगळे असले तरी त्या सगळ्यांमध्ये देखील एक अंतर संगती शोधता येते अशी अभिनव मांडणी विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी सादर केली
         
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताई देवस्थानचे सचिव श्री माधव सरपटवार यांनी तर आभार प्रदर्शन विश्वस्त श्री चंद्रकांत अणे यांनी केले. वणीकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला बहुसंख्येतील प्रतिसाद व्याख्यान विषयाप्रती जनतेच्या मनात असलेल्या औत्सुक्याचा निदर्शक होता.
      
आपल्या गावातून निर्माण झालेल्या आणि सध्या ९५०० वर लोकांनी रसास्वाद घेतलेल्या या गीर्वाण वाणी यूट्यूब चैनल वरील नि:शुल्क उपक्रमाचा अधिकाधिक संस्कृत प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

आरे च्या निसर्गरम्य १०० एकरात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारणार - डॉ. राजन माकणीकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : बुद्धभूमी मुंबईत आरे च्या निसर्गमय वातावरणात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारणार असून 100 एकर जागेची मागणी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथरावं शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन ईश्वर माकणीकर यांनी केली आहे.*
 
दि बुध्दाज बोधी ट्री या संस्थेचे संस्थापक डॉ. माकणीकर म्हणाले की, भारत देश हा मूळ बुद्धाचा आणी धम्माचा जानला जातो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे देशातील महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगर आणी आजूबाजूचा परिसर लेण्यांनी व्याप्त आहे.
बुद्धाची शिकवण ही जगाला तारणारी आहे. त्यामुळे तथागत बुद्धाची शिकवण व संस्कृती आपण जोपासने आत्यावश्यक आहे.

बौद्धकालिन सुपारक म्हणजेच नाला सोपारा येथे तर प्रत्यक्ष तथागत गौतम बुद्ध आले होते. त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते. पण ती जागा मात्र आजही भग्नाअवस्तेत पडली असून स्थानिक लोकांना सुद्धा त्या जागेचा किंवा नालासोपऱ्याचा इतिहास आजही माहिती नाही. ही फार मोठी शासन व धम्म् बांधवांची शोकांतिका असल्याची खंत विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.

त्याच प्रमाणे जिथे नॅशनल पार्क जवळ कान्हेरी लेणीवर बौद्ध सम्राट अशोकाचे पाऊल पडले होते. त्यांच्या अनाहुत पाऊल् खुणा सुद्धा मुंबइकर विसरले मुंबई बेट म्हणजे बौद्ध कालीन शहरच होय. असा मनोदय डॉ. एम राजन यांनी व्यक्त केला.

बुद्ध धम्म आणी या दोघांचा संघ वाचवायचा असेल आणी आपल्या भारताची खरी संस्कृती जपायची असेल तर बुद्ध धम्म ज्ञान व शिकवणींचा चा प्रचार आणी प्रसार होने महत्वाचे असून
आरे कॉलोनी च्या जंगलात बरीच जाती धर्मांची श्रद्धास्थाने, प्रार्थनाघरे व देवी देवतांची मंदिरे उभारली गेली आहेत, त्याबद्दल आमचे दुमत नाही. परंतु याचं धरती वर आरे कॉलोनी परिसरात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारण्यात यावी असा आमचा आग्रह आहे.

बुद्धाची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व आरे येथील घनदाट जंगलात बुद्धिस्ट मोनेस्ट्री साठी 100 एकर जागा देऊन देशाची खरी संपत्ती बुद्ध संस्कृती जपावी असा आग्रह आरपीआय संविधान पक्षाच्या वतीने पॅन्थर माकणीकर यांनी धरला आहे.



कार व माल वाहतूक ट्रक ची एकमेकांना भिडत, एक जण गंभीर

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या राज्य महामार्गांवरील एका बार समोर अल्टो कार व माल वाहतूक ट्रकची जबर धडक झाली. यात एक गंभीर जखमी असून कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. ही भीषण घटना आज 25 मार्च,शनिवारला दुपारी 5 वाजताच्या दरम्यान,घडली असल्याचा कयास आहे.

तालुक्यातील सालेभट्टी ची घटना ताजी असतांना आज शनिवारी पुन्हा अल्टो कार क्र. एमएच-34- एए-9445 आणि माल वाहतूक ट्रक क्र. एम एच 16 सी सी 5252 ची जबर धडक होऊन अपघात झाला. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, ट्रकचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला असल्याचे समजते.
अपघातातील कार चालक शुभम गोलर रा. वणी हा जखमी झाला असून त्यास मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. ही धडक समोरासमोर दिल्याने कार चालक गंभीर जंखमी असून घटनेची माहिती नागरिकांना मिळताच नागरीकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.