Showing posts with label नाशिक. Show all posts
Showing posts with label नाशिक. Show all posts

मैत्री आणि प्रेम कवितांनी रंगली युवा साहित्य मंचची काव्य मैफिल

सह्याद्री : चौफेर न्यूज 

नाशिक : युवा साहित्य मंच, महाराष्ट्र आणि नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. 

जगात जगण्यासाठी मिञा साथ असावी 
मजेत जगण्यासाठी मिञा साथ असावी.

कोण कुणाचे नाही मिञा येथे परके सारे 
दोन घरांच्या भिंती मधूनी साद असावी

असेच राहू दुनियेमध्ये मित्र बनुनी मिञा
जगण्यासाठी वाट ही आपली एक असावी..

तुझे नी माझे नाते जुळले पुन्हा एकदा 
सुदाम आणि कृष्णा सारखी मैत्री असावी...

निस्वार्थी मैत्री विषयी अपेक्षा व्यक्त करीत कवी बाळासाहेब गिरी यांनी साद घातली . 
विरहात पोळते ती,स्वप्नांतही ती छळते
श्वासांत धुंद होणे, केवळ तिलाच कळते ! 
अशी प्रेम कविता कवी पंकजकुमार गवळी यांनी गात कवी संमेलनात रंग भरले तर 
हिर्वी बोली माझे मला कळेना
सुचतात कशा ह्या ओळी ?
का बोलते हे रान 
माझ्याशी हिर्वी बोली
असे म्हणत संमेलन अध्यक्ष जेष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी ग्रामीण जीवनाची सुंदरता निसर्ग कवितेतून सादर करीत रसिकांची भरभरून दाद मिळवली. 
भुजबळ फार्म येथील जेष्ठ नागरिक हॉलच्या सभागृहात रंगलेल्या काव्य मैफिलीत व्यासपीठावर पुंजाजी मालुंजकर, अजय बिरारी, प्रवीण जोंधळे, रविकांत शार्दुल,ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाने, सुभाष सबनीस, युवा साहित्य मंचाचे अध्यक्ष किरण सोनार, संजय गोरडे, संजय गोराडे, माणिकराव गोडसे, सावळीराम तिदमे उपस्थित होते.  

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाने यांनी केले. कवी संमेलनात नाशिक आणि नाशिक बाहेरून आलेल्या ४० हून अधिक कवींनी आपली कविता सादर करत ही काव्य मैफिल रंगवली. यावेळी कवी देवदत्त चौधरी यांनी "बाबा मालं साळा शिकून, मोठी होऊ दे रं!" ही सामाजिक कविता सादर केली तर राज शेळके यांनी "चाल पुढेच सारखा कर उद्याचा विचार, अपयशाच्या ढगाला असे यशाची किनार" असे म्हणत युवा वर्गाला प्रेरणा दिली . सर्वेश साबळेने विठ्ठल भक्तीची कविता सादर करीत वातावरण भक्तिमय केले. तसेच उपस्थित सारस्वतांमध्ये शुभांगी पाटील , भारती देव, रवींद्र दळवी, किरण मेतकर, विनायक पाटील, साहेबराव पाटील, योगिता जाधव, मंदाकिनी हांडे, सत्यजित पाटील, अनिल देवरे, गोकुळ वाडेकर, नंदकुमार ठोबरे, वृषाली साटम, विलास गोडसे, डॉ अंजना भंडारी, गोविंद दराडे, राजू रसाळ, पलाश तांदळे, शुभम मोरे, संदीप पगारे, रणजित तिडके यांनी व्यवस्थेवर, समाजावर ओरखेडे ओढणारी शब्द रचना सादर केली.
शेवटी आभार प्रदर्शन यु. सा. मं. उपाध्यक्ष रमेश वाघ यांनी केले. सूत्रसंचालन यु. सा. मं. कार्याध्यक्ष विशाल टर्ले, सरचिटणीस वर्षा शिदोरे, चिटणीस अश्विनी भालेराव यांनी केले. यावेळी युवा साहित्य मंच, महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष किरण सोनार यांनी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांची उपस्थिती युवा मंचास कशा प्रकारे उंचीवर घेऊन जाणारी ठरेल याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व साहित्यिक मान्यवर आणि काव्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज गवळी, पलाश तांदळे, सर्वेश साबळे, राजू रसाळ, नवे नाशिक जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

परदेशात शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती; ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नाशिक, (०४ ऑगस्ट) : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते . कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता आदिवासी विकास विभागाकडून या शिष्यवृत्तीसाठी आवेदनपत्रे सादर करण्याची मुदत ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. असे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, परदेशातील विविध विद्यापीठात अनेक नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याच हेतूने,आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशा दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आदिवासी विकास विभाग त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. तथापि, ज्या परदेशी विद्यापीठांचे जागतिक रँकिंग ३०० पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती देय असणार आहे.

या शिष्यवृत्तीमध्ये आदिवासी विकास विभाग परदेशातील ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यापीठास ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या खात्यावर ट्युशन फी आणि परीक्षा फी जमा करणार असून विद्यार्थ्याचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. निर्वाह भत्त्यामध्ये निवास आणि भोजन खर्च याचा समावेश असेल. याव्यतिरिक्त विमानप्रवास खर्च, व्हिजा फी, स्थानिक प्रवास भत्ता, विमा आणि संगणक अथवा लॅपटॉप यांचा खर्च विद्यार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. असेही आदिवासी विकास विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी कळविले आहे.


हे विद्यार्थी पात्र ठरतील 

विद्यार्थ्याचे वय जास्तीत जास्त ३५ असावे.
नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा ४० असेल.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६.०० लक्ष इतकी असेल.
परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किंवा IELTS या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष विचार यात केला जाईल.
भूमिहीन आदिवासी कुटुंबातील , दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यास प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य असणार आहे. 
 

अर्जप्रकिया : 

सर्व अपर आयुक्त कार्यालये आणि सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये तसेच https://tribal.maharashtra.gov.in येथून आवेदनपत्राचा नमुना उपलब्ध करून घ्यावा.
यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेले आवेदन पत्र आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये येथे दिलेल्या मुदतीच्या आत जमा करावीत. 

 
अशी होईल निवड प्रक्रिया

संबंधित विद्यार्थ्याने विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या कालावधीत संबंधित प्रकल्प अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
प्रकल्प स्तरावर अर्जाची योग्य छाननी होऊन सदर अर्ज अपर आयुक्त यांचेमार्फत आदिवासी विकास आयुक्तालयास सादर होईल.
यानंतर आयुक्तालय स्तरावर गठीत केलेल्या निवड समितीद्वारे विद्यार्थी निवड होईल. सर्व आवश्यक शैक्षणिक प्रक्रिया, व्हिसा या पूर्ण होतील.
 

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विभाग सतत प्रयत्नशील असून या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील ज्ञानाची कवाडे खुली होतील. याचसोबत उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

आत्महत्या - एक संवाद


आत्महत्या - एक संवाद

‘आत्महत्या’ म्हटलं की डोळ्यासमोर एक विदारक चित्र उभं राहतं ज्यात एक शेतकरी - ज्याने गळ्याला लावलेला फास, एक विद्यार्थी - ज्याने विझवून टाकलेला ज्ञानाचा दिवा, एक महिला/स्त्री - जिने वैतागून घेतलेली उडी, अभिनेते - नैराश्याला बळी ठरलेले ! बस्स... इतकंच असतं का हे? यामागे दडलेल्या वेदना, यातना, मानसिक ताणतणावाच्या भावना, सामाजिक निराशेच्या आशा यातील या नि अशा कित्येक संवेदना आत्महत्या या एका समस्येमागील कारणीभूत समस्या आहेत हे मुळात आपण चुकूनही शोधायचा प्रयत्न करत नाही. किती भयावह आहे ना हे...!
एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेते तेव्हा हा निर्णय नक्कीच सोपा नसेल यात मुळीच शंका नाही. परंतु त्यामागील कारण समजून घेताना ती व्यक्ती कुणाकडे, केव्हा आणि कधी व्यक्त होते का हे बघायला हवे. शेवटी मनात दडून राहिलेल्या अव्यक्त गोष्टी या मानसिक खच्चीकरणाला कारणीभूत ठरत असतात. आणि एकदा माणसाचे मानसिक खच्चीकरण झाले तर त्यातून पुन्हा सावरणे खूप कठीण जात असते. त्यामुळे आत्महत्या करणारी व्यक्तीच एकमात्र दोषी नसून समाजाचा एक घटक म्हणून आसपासचा गोतावळाही तितकाच दोषी असतो.
प्रत्येक व्यक्तीला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच इच्छामरणाचा अधिकार कायद्याने देण्यात आलेला असला तरी त्यावर आत्महत्या हा मार्ग नव्हे. इच्छित मृत्यू आणि आत्महत्या यात शब्दांचाच नव्हे तर यामागील कारणांचाही भेद अभेद्य आहे. इच्छामृत्यू म्हणजे आधीच असलेल्या आजार किंवा मानसिक, शारीरिक इत्यादी वेदनांतून इच्छित सुटका परंतु काही निकषांसह तर आत्महत्या ही समस्याच मुळात एक मानसिक आजार आहे आणि अशा व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या सहानुभूतीची नव्हे तर आधाराची, समजून घेण्याची, म्हणणे मांडण्याची योग्य संधी यांची अधिक गरज असते.
मागील वर्षी (वर्ष २०२०) सर्वोच्च न्यायालयाने 'आत्महत्या - एक मानसिक आजार' असा निकाल देताना अनेक गोष्टींचा उहापोह केला होता. ज्यातून 'आत्महत्या - मानसिक आजार की सामाजिक समस्या की दोन्हींचा मेळ' असा नवा पेच उभा राहतो. जसे आपण म्हणतो एका गोष्टीमागे हजारो कारणं असतात मग या हजारो कारणांमागे निदान एक सामान्य समस्या किंवा समस्येतून उद्भवलेली नवीन समस्या नक्कीच असू शकते ना ? न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आत्महत्या हा जर मानसिक आजार मानला तर आजाराची सुरुवात एकाएकी होत नाही, त्याच्या मुळाशी अनेक गोष्टींची मूळं जन्माला आलेली असतात व त्यामुळे माणसाचं मन कमजोर होत जातं. असेच एक मूळ म्हणजे सामाजिक गोष्टी अर्थात समाज !
एखादा शेतकरी जेव्हा परिस्थितीपुढे असह्य होतो, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो, एखादी महिला अन्याय/अत्याचाराला कंटाळते अथवा एखादा अभिनेता नैराश्याच्या विळख्यात अडकतो तेव्हा त्याच्या ध्यानीमनी फक्त अपराधाची भावना असते. आपण चुकतोय इतकंच त्याच्या बोलण्यात, वागण्यात आढळून येतं. ही अपराधीपणाची भावना एका किंवा काही दिवसांची नसते तर समाज - जो दूरदूरपर्यंत ओळखीचा असून अनोखळी असतो त्याच्या चष्म्यातून स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण होते. उद्या आपल्याबद्दल बाहेर कळले तर त्याचे परिणाम प्रत्यक्ष होण्याआधीच ते अशा व्यक्तीच्या दृष्टिपटलापुढे चित्रपटासमान उभे राहतात. अनेक दृष्यांच्या वाटा त्याला वेगवेगळ्या दिशेने खेचत असताना आधार म्हणून एक वाट तो निवडू शकत नाही, कुणापुढे आपले म्हणणे मांडू शकत नाही, कोण समजून घेईल अन कोण वेड्यात काढेल या आणि अशा कित्येक शंका-कुशंका त्याच्या मनात घोळत असतात. तेव्हा आपल्या जवळच्या माणसापुढे व्यक्त व्हायला घाबरणारा अशा वेळी भल्यामोठ्या समाज नावाच्या अमर्यादित घटकापुढे कसा निभावणार ? यातूनच मग आत्महत्या हा एकमात्र मार्ग निवडला जातो. 
अर्थातच, या संवेदनशील बाबीकडे बघताना माझ्या-तुमच्यासारखा मोजक्या लोकांचा स्वतःवर परिणाम होऊ देणारा एक गट म्हणेल, आसपास इतकी माणसं असताना एकटं वाटणं यापेक्षा वेगळा एकटेपणा असू शकतो ? 'लोक क्या कहेंगे' इतकं महत्वाचं असतं ? स्वतःच्या नजरेतून तपासलेली साधी गोष्टसुद्धा हजारदा तपासणारे आपण समाज आपल्या घराचा उंबरठा ओलांडून मनाच्या दरवाजापर्यंत येऊन ठेपतो तरीही साशंक का ? आपल्याच माणसासमोर मन मोकळं करता येत नसेल तर इतका गोतावळा हवाच कशाला ? स्वतःवर समाजाचा किती परिणाम होऊ दयायचा हे त्या व्यक्तीच्या हातात नाही का ? यावर नक्कीच सकारात्मक उत्तर असू शकेल पण नैराश्याच्या टोकावर उभा ठाकलेल्या व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं असता यामागे कुठे ना कुठे माणूस म्हणून माणसाची मानसिकता, माणुसकी जबाबदार असल्याचे आढळून येईल.
कुटुंबासमवेत वेळ घालवत असताना एकमेकांना आपण किती समजून घेतो याचा कानोसा घेतला गेला पाहिजे. लोकांच्या विचारातून एखाद्याकडे बघण्यापेक्षा आपण समोरच्या व्यक्तीचे अधिक जवळचे असल्यामुळे तिच्या हालचालींतून काहीतरी वेगळं घडतंय का हे टिपता यायला हवे. परंपरांच्याआड लपून व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला घातला जाऊ नये याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मित्रपरिवारात सामील होताना मनातलं चांगलं-वाईट सहज सांगता येईल असं कुणीतरी जवळचं असलं पाहिजे. समाजापासून वेगळं होता येत नसलं तरी समाजाचा आपल्यावर मर्यादित परिणाम होऊ देणं जमायला हवं. कुणीतरी जवळचा विश्वास ठेऊन आपल्याजवळ व्यक्त होईल अशी आपली माणुसकी असायला हवी. मात्र, मदतीचा हात देऊ करताना निःस्वार्थ माणुसकी आपल्या स्वभावगुणात प्रत्यक्षरित्या रुजलेली हवी.
जसे बाह्य जग दोषी असतं तशीच ती व्यक्तीसुद्धा स्वतःच्या वागण्यासाठी तितकीच दोषी मानावी लागेल. या 'सो कॉल्ड सोशल मीडिया' नावाच्या व्हर्चुअल रिंगणात खरा रिंगमास्टर नेमका कोण हे वेळीच ओळखता यायला पाहिजे. व्हर्चुअल जगतातली नोंद कायमस्वरूपी असली तरी त्यातल्या प्रत्येक गोष्टीला आपण व्यक्तिशः जबाबदार असतो. पण जे आपण शेअर करणार तेच ते साठवणार असतं. तंत्रज्ञान कितीही अचूक होत असलं तरी त्याला सुरु करणारी नि रोखणारी आपलीच बोटं आहेत. त्यामुळे अशा या प्लॅटफॉर्म्सवर काय बोललं, लिहिलं अथवा दाखवलं जातं त्याचा परिणाम आपल्या हळव्या मनावर कुठपर्यंत होऊ द्यायचा हे नैराश्य बळी ठरलेल्या व्यक्तीने वेळीच हेरलं पाहिजे. तसंच काहीसं आसपासच्या ओळखी/अनोळखी लोकांचं. म्हणतात ना, 'ऐकावं जनाचं करावं मनाचं' योग्यच आहे की !
आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या हृदयपटलावर एक छाप सोडून जात असतो. मग ती चांगली की वाईट हे जरी येणारी वेळ ठरवत असली तरी आपलीच माणसं जेव्हा आपल्याला समजून घेत नाहीत तेव्हा जी निराशा होते त्यातूनच तर मनावरचा दबाव आणखी खोल होत जात असतो. त्यामुळे स्वतःकडे दयेच्या भावनेने न बघता सकारात्मक भावनेने बघणे गरजेचे ठरते. जसे आपल्या यशासाठी आपण स्वतः हक्काने स्वतःला जबाबदार ठरवतो तिथे अपयश पचवण्याची हिंमत ठेवलीच गेली पाहिजे. ज्यामुळे असे नैराश्य मानसिक तणावापासून आपल्याला दूर ठेऊ शकेल आणि कुणाचीतरी सततची भासणारी उणीव कायमची नाही पण थोड्याफार प्रमाणात कमी होऊन अयोग्य निर्णयापर्यंत पोहचण्यावर मात करणं शक्य होईल. पण याचा अर्थ असा नव्हे की नैराश्यातून जाणाऱ्या व्यक्तीला कुणाच्या असण्याची गरज कधीच पडणार नाही. फक्त ती गरज उपकारार्थी नसून अत्यंत भावनिक जवळीकतेतून दिली गेली पाहिजे. जेणेकरून आत्महत्या हे पाऊल उचलण्यापासून आपण कुणालातरी रोखू शकू. कारण आजच्या धकाधकीच्या जीवन प्रवासात उद्या ही वेळ कुणावर कधी आणि केव्हा येईल हे सांगता येत नाही.
ज्याप्रमाणे शून्याच्या डावीकडे अंक लावल्याशिवाय त्याची किंमत वाढत नाही त्याप्रमाणे आयुष्यात उजव्या-डाव्या व्यक्तिमत्वाचं सावट अन आपली किंमत वाढवणारं जिवंत भावनेतून सोबत असणारं कुणीतरी असेल तोपर्यंत स्वतःला संपवण्याचा हा अनुचित मार्ग मात्र नक्की टाळला जाईल. कारण अशा व्यक्तीसाठी आपल्यानंतर कोण याचं उत्तर तरी निदान हे टाळू शकेल, अशी सार्थ आशा !
एकूणच व्यक्तीच्या मनावरचा मानसिक ताण, समाजातल्या छोट्या-छोट्या गोष्टींचे मनावर येणारे दडपण आणि या दोन्हींचा मेळ यातून आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे ठोस असा उपाय नसलेल्या या मानसिक आजारापासून स्वतःस आणि सोबतच इतरांना रोखायचं असेल तर 'संवाद' हेच उत्तम साधन आणि एक सर्वोत्तम मध्यम मार्ग समजून एकमेकांना मानसिक तणावातून बाहेर काढायला साथ दिली गेली पाहिजे.
© ® वर्षा शिदोरे
नाशिक जिल्हा
मो. नं. ८७९३७९९७७७