फेब्रुवारी एंडिंग'ला भीषण अपघात; 2 ठार तर 1 गंभीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला 27 आणि आज मंगळवार 28 रोजी भीषण अपघाताची नोंद झाली. काल 27 रोजी नायगाव जवळ उभ्या असलेल्या ट्रक ला दुचाकीस्वार धडकला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर, ही घटना ताजी असतांना आज 28 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर हायवे वरील सावर्ला जवळ कार आणि दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला. यात दोघे ठार तर एक गंभीर जखमी आहे. 

आकाश गाऊत्रे (28) रा.रंगारी पुरा व अमोल मडावी (29) रा जैताई नगर अशी या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर रानु तुमराम (27) रा भीम नगर, हा युवक गंभीर जखमी असून त्याचा उजवा पाय फॅक्चर झाला असल्याचे समजते. हे तीनही युवक वणी शहरातील रहिवासी आहे.

वरोरा येथून हे तिघेही काम आटोपून युवक दुचाकीने वणीकडे निघाले, वणी कडे परत येत असताना सावर्ला-नायगाव जवळ त्याच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार व दुचाकीचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर, एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. व एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनासथळाकडे धाव घेत जखमींना उपचारासाठी रवाना केले. तर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविला. मात्र,कार चालक व मालकाचे नाव मात्र कळू शकले नाही. फेब्रुवारी आरंभ झाला आणि गेल्या काही दिवसापासून अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत असून फेब्रुवारी एंडिंग भीषण अपघाताने नोंद झाली.

सदरील घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे राज्‍यस्‍तरीय अधिवेशन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वन खात्‍याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्‍यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्‍यास मदत होते, असे प्रतिपादन वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

फॉरेस्‍ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्‍ट्र द्वारे आयोजित राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात बोलताना श्री.मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला फॉरेस्‍ट रेंजर असोसिएशनचे महाराष्‍ट्र अध्‍यक्ष कांतेश्‍वर बोलके, अरुण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस नीलेश गावंडे, नागपूरचे मुख्‍य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष विनोद देशमुख, संस्‍थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते.
श्री.मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक आर.एफ.ओ. कडे वन विभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभिर्याने प्रत्‍येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे. फॉरेस्‍ट सर्व्‍हे ऑफ इंडिया यांच्‍या एका अहवालानुसार महाराष्‍ट्राचे हरित क्षेत्र 2550 स्‍वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोजचे क्षेत्र सुद्धा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्‍या गोष्‍टी चांगल्‍या होत आहेत. त्‍यामध्‍ये तुमचा तसेच वनविभागाच्‍या सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्‍या काही वर्षात विदर्भात वाघांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. त्‍यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुद्धा तुम्‍ही सर्वजण उत्‍तम पद्धतीने करता ही आनंदाची गोष्‍ट आहे. वनविभागाच्‍या संवर्धनामध्‍ये तुमच्‍यासह सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्‍ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावा, असे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले. या कार्यक्रमात आपण अनेक विषय मांडले आहेत. यात बऱ्याच मागण्‍या सुद्धा आहेत, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.

प्रास्‍ताविकात असोसिएशनचे सरचिटणीस श्री. गावंडे यांनी आर.एफ.ओ. चे विविध अधिकार व समस्‍यांवर सादरीकरण केले.

विदर्भ निर्माण यात्रेच्या समारोपाला वणी उपविभागातील शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रु ते 5 मार्च 2023 पर्यँत पूर्व विदर्भातून कालेश्वर सिरोंचा गडचिरोली ते नागपूर व पश्चिम विदर्भातून सिंदखेडराजा जिजाऊ माहेरघर बुलढाणा ते नागपूर या दोन्ही यात्रा निघालेल्या असुन त्या नागपुरच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. विदर्भातील ११ जिल्हे व ७० पेक्षा ज्यास्त तालुके आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये सभा व भेटीच्या माध्यमातून विदर्भ निर्माणा बाबत जनजागरण होत आहे. या यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत होत असुन लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
विदर्भातील विविध समस्या जसे शेतकरी आत्महत्या, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, बेरोजगारी, सिंचन,व इतर क्षेत्रातील अनुशेष, कुपोषण,प्रदुर्षण,व इतरही समस्येचे एकमेव उत्तर म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य ! विदर्भचे स्वतंत्र राज्य निर्माणा शिवाय या समस्येची सोडवणूक नाही.
म्हणुनच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची गरज करीत या दोन्ही यात्रेचा समारोप 5 मार्च 2023 ला नागपूर येथील संविधान चौकात होणार आहे.पुढील तिव्र आंदोलनाची दिशा याच ठिकाणी जाहीर होणार आहे.
वणी,मारेगाव,झरी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील हजारो विदर्भ प्रेमी जनतेनी व कार्यकर्त्यांनी या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा.पुरुषोत्तम पाटील, विदर्भ प्रदेश युवक सचिव राहुल खारकर प्रा. बाळासाहेब राजूरकर, रफिक रंगरेज,देवराव धांडे,जिल्हा संघटक राजु पिंपळकर,शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर, तालुका अध्यक्ष नामदेव जेणेकर, दशरथ बोबडे,होमदेव कनाके,देवा बोबडे,अमित उपाध्ये, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई आगबत्तलवार, सुरेखा वडीचार, कलावती शिरसागर, अलका मोवाडे, धीरज भोयर, पुंडलिक पथाडे, मुक्तानंद भोंगळे, राकेश वराटे,संदीप गोहोकार, राहुल झट्टे, यांनी केले आहे.

गजानन कासावार यांची अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील उच्च श्रेणी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन तुकाराम कासावार यांची अमरावती विद्यापीठावर मा. राज्यपालांनी सिनेट सदस्य म्हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
    गजानन कासावार हे विद्यार्थी जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते एक उत्कृष्ठ अध्यापक म्हणून ओळखले जातात. ते विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनामध्ये सक्रिय सहभागी आहेत. सावित्रीबाई फुले दत्तक पालक समितीच्या माध्यमातून सन 2001 पासून आर्थिक दृष्टीने मागास 300 ते 325 मुलींना शैक्षणिक दृष्ट्या समाज सहभागातून दत्तक घेऊन दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे पालकांच्या हस्ते वाटप करीत असतात. ते विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक उपाध्यक्ष आहेत. भारतीय शिक्षण मंडळात विदर्भ प्रांताचे प्रकाशन सह प्रमुख आहेत. विदर्भ नगर परिषद शिक्षक संघटनेचे ते केंद्रीय कार्याध्यक्ष आहेत. येथील नगर वाचनालायत सचिव या नात्याने मागील 15 वर्षांपासून विविध उपक्रम राबवित असतात. 2001 मध्ये त्यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ते विविध वृत्तपत्रातून लिखाण करीत असतात. वणी येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनानिमित्त निघालेली स्मरणिकेचे त्यांनी संपादन केले आहे. 
      त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

मार्डी येथे धनोजे कुणबी समाज प्रबोधन मेळावा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
    
मारेगाव : धनोजे कुणबी समाजाला सामाजिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने मार्डी येथे धनोजे कुणबी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    
5 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मेळावा सुसंपन्न होणार असून या मेळाव्याचे खासदार बाळू धानोरकर यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी शेतकरी नेते वामनराव चटप हे असतील.

आमदार प्रतिभाताई धानोरकर, भालचंद्र चोपणे, विश्वास नांदेकर, टीकारामजी कोंगरे, संजय देरकर, आशिष कुळसंगे, अ‍ॅड.देविदास काळे, तारेंद्र बोर्डे, सुनील कातकडे, संजय खाडे, सौ अरुणाताई खंडाळकर, डॉ.मनीष मस्की, वसंतराव आसुटकर, अरविंद ठाकरे, रविंद्र धानोरकर, अशोक धोबे, गजानन खापणे, माजी उपसभापती संजय आवारी, सुभाष पिंपळशेंडे, रविराज चंदनखेडे, मारोती गौरकार, सुधाकर डाहुले आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शेतात वर्षभर कष्ट करून काळ्या मातीत सोने निर्माण करणारा बळीराजा ज्याला संबोधल्या जाते त्या समाजाला जगाला तोड नाही.अशा या धनोजे कुनबी समाज बांधवाचे प्रबोधन करण्याचे उद्देशाने "धनोजे कुनबी समाज प्रबोधन मेळावा" आयोजित केला आहे. मेळाव्यात उपस्थिती दर्शवून समाजातील तमाम नागरिकांनी प्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थे तर्फे करण्यात आले आहे.

अग्रलेख : बालपणीच्या गोड आठवणी म्हणजे "पळसाचे झाड"

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

"लहानपणी रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी आम्ही भावंड पळसाची फुले वाटून बाटली मध्ये भरून ठेवायची. धुळीच्या दिवशी लाल केशरी रंगाने एकमेकांवर रंग टाकून खेळत असत. शेतातील बांधावर असणाऱ्या पळसाच्या फुलांचे एक अनामिक आकर्षण लहानपणी वाटायचे. बालपणीच्या गोड आठवणी म्हणजे "पळसाचे झाड"

शिशिराची थंडी ओसरायला लागली की, सृष्टी लपेटून घेतलेली पानांची हिरवी शाल हळूहळू बाजूला सारून ठेवते. त्या काळात भरपूर पानगळ होते. उघडी पडतात वृक्षराने. नव्या पोपटी पालवीचे लेणे अंगावर मिरवत वसंत आपल्या आगमनाची सूचना देतो. वसंत म्हणजे सृष्टीच्या रसिकतेचा सूचक. वसंताच्या येण्याने पुन्हा एकदा सृष्टी नटते, बहरते, फुलते, सावरते. अनेक रंगांची उधळण करीत रंगोत्सव सुरू होतो.
कुठे पिवळा बहावा, कुठे तांबडा गुलमोहर, पांढरा चाफा, पांढरा पांगारा, केशरी पांगारा, लाल चुटुक काटेसावर, मंद पिवळा हादगा. या सर्वांची येण्याची घाई गडबड सुरू होते. हळूहळू एकेक झाड पाऊल टाकते आणि होळीच्या सुमारास सारेच अगदी मुक्त रूपात बहरून येतात. यातच एक देशी जुने तपस्वी दिसतील त्यांचे नाव आहे पळस. हो पळसाला तपस्वीच म्हणावे लागेल कारण भारतातील रुक्ष डोंगराळ भागात उष्ण प्रदेशात शतकानुशतके उभा आहे तपस्या प्रमाणे.कुठे त्रागा नाही, कुठे चिडचिड नाही. होळीच्या थोडे आधी येतो हा पळस.उघड्या बोडक्या झालेल्या शेताला रानाला केसरी लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला सर्वत्र आढळतो.

जर तुम्ही या काळात प्रवास केला तर राने आणि शेते पळसामुळे लाल तांबडी दिसतात. विस्तवाच्या गोळ्यासारखे भासतात म्हणूनच तर पळसाला 'फ्लेम ऑफ द फॉरेस्ट' असे संबोधतात. पळसाचे नाव ढाक, टेसू , ब्रह्मपुष्प असेही आहे. पळस उत्तर प्रदेशाचे 'राज्यफुल'आहे. भारतीय डाकतार विभागातर्फे सन्मान म्हणून पळसाच्या फुलांचे पोस्टाचे तिकीट छापले होते. कालिदासांनी तर पळसाला ' ऋतुसंहार ' हे नाव दिले आहे.असे वाचले की पळस हा चंद्र या उपग्रहासाठी आहे आणि तो दक्षिण पूर्व (आग्नेय) दिशेला लावावा. पळस पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लावावा आणि पळसाला पर्याय बेल आहे.
पळस लावता येत नसेल तर बेल लावावा. पण माझ्या पाहण्यात तर वनविभागाने सोडून इतर कुठेही पळस लावल्याचे ऐकिवात नाही. तो आपसूकच उगवलेला पाहिलाय. पळसाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी वारंवार तो तयार होत असतो. त्याची नाळ जुळलीय शेतात, जंगलात, वनात, डोगरटेकडीवर. त्याला शहरातील जगमगाट नको. ईमारतींच्या जंगलाची नावड आहे तर खेड्यातल्या कौलारु घरांचा, झोपड्यांचा सहवास हवा असतो पळसाला.पळसाची गंमत अशी आहे की याला भरपूर पाने असतात तेव्हा फुले नसतात आणि फुले आली की निष्पर्ण असतो पळस. त्यामुळे लाल तांबड्या फुलांचे घुमारे फुलतात सर्वत्र पळसाला. संस्कृतमध्ये पळसाला 'पलाश'असे म्हणतात पलाश चा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा आहे.

लाल केशरी भगवा आणि पिवळा असे रंग असतात पळसाचे. विदर्भात नारिंगी रंगाचे बिनवासाची फुले आढळतात. फांद्यांच्या टोकास किंवा बगलेत लांब मांजरीवर फुले फुलतात.थोड्या जाडसर, वक्राकार पण पोपटाच्या चोची प्रमाणे बाकदार अर्धचंद्राकृती पाकळ्या असतात, त्यातून बाहेर डोकावणारे परागकण असतात आणि पाकळी बंदिस्त करण्यासाठी काळ्या रंगाचे छोटेसे आवरण असते. ही रंगसंगती अगदी सुंदर दिसते. हे फुल जर उलटे ठेवले तर माकडाचे तोंड असल्यासारखे दिसते. फुलाचा रंग भडक असल्यामुळे पक्षी आकर्षित होतात विशेषतः पोपट. त्यामुळे नारंगी फुलांच्या ताटव्यावर हिरवे पोपट खूपच दृष्ट लागन्या सारखा दिसतो हा सोहळा. पक्षी फुलातील मध लुटतात आणि झाडावर गर्दी करतात त्यामुळे एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर परागकण नेण्यास सहाय्य होते.
विदर्भाच्या पडीक जागेवर शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेने अगदी टेकडीवरही पळस सर्वत्र आढळतो. कधी तर टेकडीवर एकटाच जाऊन बसतो. पळस हा विदर्भाला वरदान स्वरूपात लाभला आहे, कारण डोंगराळ भागातही हा फुलतो आणि विदर्भातील रखरखीत भूमीवर पळस हिरवाई आणतो. त्याची उंची जास्त नसते पानगळी वृक्ष आहे पळस.खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात, तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते. पाने आकाराने मोठी असतात आणि गोलाकार असतात. तीन पाने असतात प्रत्येक देठावर म्हणूनच 'पळसाला पाने तीन'असे आपण म्हणतो. ही केवळ एक उक्ती नसून त्यात गहन अर्थ दडलेला आहे. असंग्रह आणि संयमाची सूचना देणारी उक्ती आहे ती. कितीही माया गोळा करा पण तुम्ही प्रमाणातच वापरू शकता, उपयोगी लावू शकता,बाकी सर्व व्यर्थ आहे असा संदेश आहे यात.

याची पाने त्रिदली असल्यामुळे याचे संस्कृत नाव 'त्रिपत्रक' आहे.पाने लांब देठाची असून दले मोठी कठीण चिवट वरून काहीशी चकचकीत आणि खालून पांढरट लवदार असतात. थंडीत पाने गळतात आणि नवी पालवी एप्रिलमध्ये किंवा एप्रिलअखेर मध्ये येते. या पानांपासून पंगतिला जेवायला पत्रावळी व द्रोण तयार करतात.पावसाळा आला की खेड्यात घरावर शाकारण्यासाठी पळसाच्या फांद्या वापरतात. त्यामुळे घरे पावसाळ्यात जास्त गळत नाही. यवतमाळला पोळा या सणाशी या पळसाचा विशेष संबंध आहे. बैलपोळ्याच्या दिवशी प्रत्येक घरी पळसाची छोटी डहाळी दाराच्या दोन्ही बाजूला एक एक ठेवतात, त्याला एक विशेष नाव आहे 'मेढे', दुसऱ्या दिवशी त्या मेढ्यांना एकत्र करून गोळा करून त्याला गावाबाहेर नेऊन टाकतात किंवा जाळतात. त्यामागे वाईट व्रुती जाळून नष्ट करणे असा भाव आहे.
पळसाच्या फुलांचा उपयोग अबीर व गुलाल बनवण्यासाठी करतात.तुरटी,चुना किंवा क्षार मिसळून पक्का नारंगी रंग तयार करतात. पळसाची फुले भिजत घालून नैसर्गिक रंग मिळवतात, हा रंग धुळवडीला वापरतात. पळसाची फुले उष्णता शामक आहे म्हणून होळीच्या वेळी ती आपल्या कडे उगवतात. पळसाच्या मुळापासून दोऱ्या तयार करतात. सतरंजी आणि कागद तयार करण्यासाठी पळसाच्या खोडातील तंतूंचा उपयोग करतात. पळसाच्या पातळ फांद्यांपासून तयार केलेला काथ पश्चिम बंगालमध्ये खातात. पळसाच्या जाड फांद्या जाळून कोळसा तयार करतात. पळसा पासून गोंद मिळतो. पळस हे वैद्यराजही आहेत. उष्णतारोधक, वातवर्धक, मलरोधक, पित्तशामक रुधिरविकार व कुष्ठनाशक आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात काही उगवत नसेल तरी त्याच्या सोबतीला पळस उभा राहतो. पळस आणि कडुलिंब त्याचा दोस्त होतो. हे दोन्ही जिवलग दोस्त शेतकऱ्याची काळजी घेतात. अधिक पाऊस आला तर पळसाची पाने तोडून त्यापासूनच बचाव करण्यासाठी शेतकरी त्या पळसाच्या पानांच्या टोप्या तयार करतो.
सृष्टी कर्त्याने काही संकेत दिलेले आहेत. हे संकेत निसर्गाचे व्यवस्थित निरीक्षण केले तर सहज लक्षात येतात. जिथे पळस असतो तिथे पाण्याची कमतरता असते. अशा ठिकाणी दुसरे कोणतेही झाड टिकत नाही तिथे पळस टिकतो, वाढतो, बहरतो आणि मानवावर अनंत उपकार करतो. आहे की नाही पळस एक तपस्वी.पळस तसा दुर्लक्षित आहे पण परोपकार करण्याचे काम तो तत्परतेने, निरंतर आणि निरपेक्षपणे करतो आहे.

खरंतर बालपणीच्या गोड आठवणी म्हणजे "पळसाचे झाड" हा अग्रलेख पाचवे 'सह्याद्री चौफेर" वर्धापन दिन निमित्त समर्पित आहे. अवघ्या काही दिवसावर होळी, धुळवड आहे आणि आपल्या सर्वांच्या बालपणी च्या आठवणी ताज्या या सनानिमित्ताने होत असतात.  सह्याद्री चौफेर आणि संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा...!!

- मंगलाताई 

मराठीचे मराठीपण जपणे आपले कर्तव्य- मनोज मोहिते


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : "मराठी भाषा आणि तिच्या बोलींचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी संवाद, संज्ञापन आणि लेखन सारे काही या बोली,प्रमाणभाषांतूनच केले पाहिजे,मराठीचे मराठीपण प्रत्येकाने जपले तर मराठी भाषा, साहित्य आणि मराठी संस्कृतीचे जतन संवर्धन होईल मराठीचे मराठीपण जपणे आपले कर्तव्य आहे," असे प्रतिपादन पत्रकार व महाराष्ट्र टाइम्सचे वृत्तसंपादक मनोज मोहिते यांनी वणी येथे केले.
स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यातील विशेष व्याख्यानात मनोज मोहिते बोलत होते.यावेळीइंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मानसकुमार गुप्ता अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात मनोज मोहिते पुढे म्हणाले,
"मराठीचे मराठीपण कशात आहे? तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांत, तिच्या लवचीकतेत, तिच्या हातात हात घालून बागडणाऱ्या बोलीत आणि आपल्यात.आपण विचार मराठीतून करतो. म्हणजेच आपले भाषेवर प्रभुत्व आहे. मराठीचे मराठीपण जसे बोलण्यात आहे, तसे ते लिहिण्यात आहे आपण लिहिले पाहिजे. व्यक्त झाले पाहिजे."

यावेळी प्रा.दिपाली ठावरी, आणि प्रा.राहुल खोंडे यांचा मनोज मोहिते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 
अध्यक्षीय भाषणात डॉ. मानसकुमार गुप्ता म्हणाले, ''मातृभाषा असणाऱ्या आपल्या मराठी विषयीची उदासीनता भाषेच्या विकासातील मोठी अडसर आहे.मातृभाषेविषयीची अनास्था न बाळगता सजगपणे आणि निर्भयपणे संवादात भाषेला स्थान दिले पाहिजे."

मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख डॉ. अजय देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन मनोज जंत्रे यांनी केले.प्रा.बाळा मालेकर यांनी आभार मानले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजेन्द्र कोठारी,
प्रा. उमेश व्यास, डॉ. विकास जुनगरी, डॉ. गुलशन कुथे, 
प्रा.किशन घोगरे,प्रा.प्रिया नगराळे,दिनकर उरकुंडे, जयंत त्रिवेदी,पंकज सोनटक्के यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाला मराठी भाषा आणि साहित्य विभागातील सुमारे ३५० विद्यार्थी उपस्थित होते.

मारेगाव मैत्री कट्टा द्वारा याही वर्षी महिलांकरिता भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त्य विविध स्पर्धा
मारेगाव मैत्री कट्टा द्वारा याही वर्षी महिलांकरिता भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : हरातील "मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप" च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतीक महिला दिनानिमित्य  दि.11 व 12 मार्च 2023 ला शनिवार व रविवार रोजी येथील महिलांसाठी भरगच्च विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकेकाळी मारेगाव येथे बरीच सांस्कृतिक चळवळ चालायची. कालांतराने येथील जुने मित्र,मैत्रिणी हे कुटुंब,व्यवसाय, कामानिमित्त बाहेरगावी गेले. पुन्हा एकदा याच मारेगावच्या सुपुत्रांनी नव्या जोमाने सांस्कृतिक चळवळ चालविण्याचा निर्धार केला आणि याचाच एक भाग म्हणून हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.                                                                                    
दिनांक ११ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता डॉ.बाबा साहेब आंबेडकर चौक येथून भव्य महिला सांस्कृतिक रॅली निघणार आहे .यात महिलांचे भांगडा नु्त्य,आदिवासी नृत्य,लेझिम पथक, कराटे पथक राहणार आहे. विषेश म्हणजे मारेगावं चे खास आकर्षण असणारे हिरकणी ढोल ताशा पथक यात सामील होणार आहे. हे पथक खास दोन महिन्यापासून अहोरात्र सराव करीत आहे, हे विशेष उल्लेखीय.
ही आकर्षक रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पटवारी चौक, नगर पंचायत, संभाजी चौक, ते बसस्थानक असा मार्गक्रमण करीत जाणार आहे.                                                                                                                  
दुसऱ्या दिवशी 12 मार्च ला सायंकाळी 4 वाजता शेतकरी सुविधा केंद्र, मारेगाव येथे सामूहिक महिला नृत्य स्पर्धा होणार असून यात प्रथम पारितोषिक ११००० 
द्वितीय पारितोषीक 7000 तृतीय पारितोषिक
5000 राहणार आहे.त्याची प्रवेश फी रु ५०० ठेवण्यात आली आहे.तसेच महिलांची एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यात प्रथम पारितोषिक 7000
 द्वितीय पारितोषीक ५००० तृतीय पारितोषिक
3000  राहणार आहे. यासाठी प्रवेश फी 200 रूपये ठेवण्यात आली आहे.

 विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे...

नृत्य स्पर्धा करिता प्रवेशासाठी संपर्क करा सौ. प्रतिभाताई डाखरे ९९२२६६९६४८,  सौ. मालाताई बोढे ९७६६१३०१८६,  सौ. मयूरीताई जैस्वाल ७०६६००६६८४, 
यांचेशी संपर्क साधण्याचे व रॅली मध्ये सर्व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने दिपक जुनेजा, सौ.बिना दुपारे हेपट, उदय रायपुरे, खालिद पटेल, गजानन जयस्वाल, किशोर पाटील, इत्यादीनी केले आहे.

रिव्हर्स घेतांना बस सहाय्यक कर्मचाऱ्याला धडकली


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आगारातील दुरुस्त झालेल्या बसची ट्रायल घेत असतांना येथील एका कर्मचाऱ्याला मागून बस धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 8. वाजता चे दरम्यान रविवारी घडली. यावेळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

कमलेश सेनापती धोपटे (41) रा.भोंगळे ले आऊट वणी, असे अपघातात मरण पावलेल्या सहाय्यक मॅकॅनिक कर्मचाऱ्याचे नाव आहे. वणी आगारातील हेड मॅकॅनिक वर्कशॉप मधून दुरुस्त झालेली बस क्र. एम एच 40 एन 8641 या गाडीचा ट्रायल घेत असतांना मागे कमलेश दुसऱ्या बस चा टायर दुरुस्त करित असतांना हेड मॅकॅनिक दुरुस्त बस रिव्हर्स घेतांना मागे असलेल्या कमलेशला बसचा ब्रेक न लागल्याने त्याला धडकली. यात त्याला गंभीर दुखापत झाली, कमलेशला तात्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात भरती केले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासुन त्याला मृत पावल्याचे घोषित केले.
या मनमिळाऊ स्वभावाने कमलेश ओळखले जायचे त्यांच्या अशा दुर्दैवी निधनाने वणी आगार कर्मचारीवर्गात व शहरात हळहळ व्यक्त होत आहे. यांचे पार्थिवावर 27 फेब्रुवारी ला अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांचे पश्चात आई वडील,भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे.


शेतकऱ्याचा 10 क्विंटल चना जळून खाक; मारेगाव तालुक्यातील घटना

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगांव : मौजे सगणापुर येथे 26 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान, एका शेतकऱ्याचा शेतातील चना अज्ञात इसमाने आग लावली. जमा करून ठेवलेली  गंजी जळून खाक झाली. यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

वणी तालुक्यातील विठ्ठल झोलबाजी वैद्य या शेतकऱ्याची सगणापुर येथे 9 एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी 3 एकरात चना पिकाची लागवड केली होती व ऊर्वरीत शेतात गहु आणि कपाशी या पिकांची लागवड केली. सध्या परीसरात चना पिकाच्या कापणीला सुरूवात झाली असून चना जमा करून शेतातच ठेवला जात असतांना विठ्ठल यांनी सुद्धा आपल्या शेतातील हरबरा पिकांची कापणी करून शेतातच चना जमा करून ठेवला होता. रविवारच्या सायंकाळी सालगडी दिवसभर शेतातील काम करुन घरी गेल्यानंतर शेताकडे काही तरी जळत असल्याचे निदर्शनास येताच सालगडी व गावातील काही नागरीकांनी लगेच शेताकडे धाव घेतली असता, त्यांना शेतातली चण्याचे ढीग जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चण्याला आग लागली कशी या चर्चेला उधाण आले असून या आगीत शेतकऱ्याची कमाई जळून खाक झाली. या घटनेबाबत शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. 

अज्ञात इसमाकडून हरबऱ्याच्या गंजीला आग लावल्याचा कयास असून यात शेतकऱ्याचे 8 ते 10 क्विंटलचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आधीच शेत मालाला भाव नाही, कापसाच्या चोरीचे प्रमाण वाढले, शेतातील साहित्य लंपास केले जात असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असतांना आता एका शेतकऱ्याचा हरभरा जळाल्याची घटना समोर आली. यात मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर बाबीबाबत मारेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. अज्ञाताविरोधात कलम 435 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

लाचखोर भुमापक एसीबीच्या जाळ्यात अडकला; 12 हजाराची लाच शेतकऱ्याला मागितली

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील भूमिअभिलेख कार्यलयात कार्यरत असलेले भुमापक हे लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कार्यवाही रविवार दि.26 फेब्रुवारी रोजी 5 वाजताचे दरम्यान रंगेहात पकडून त्याला अटक करण्यात आली.

वणी येथील भूमिअभिलेख येथे के एम कवडे नामक हे भुमापक म्हणून कार्यरत होते, त्यांनी एका शेतकऱ्याला मोजणी साठी बारा हजाराची मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्याने नियमानुसार सर्व पूर्तता केली. परंतु कवडे वारंवार मोजणीत त्रुटी काढुन मोजणी शीट देण्याचे टाळत होते. दरम्यान,मोजणीसाठी बारा हजार रुपयाची मागणी केली. तडजोडअंती दहा हजार रुपये देण्याचं ठरल्यानंतर शेतकऱ्याने भुमापकाला पैसे न देता यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दिली.

काल रविवारी मोजणीसाठी कवडे शेतात (पुरड) जावून आले व एका हॉटेल मध्ये ठरल्याप्रमाणे कबूली लाच घेण्यासाठी बसले असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून भुमापक कवडे यांना दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईने वणी उपविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

आता झेडपीची शाळा ५ मार्चपासून भरणार सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत; उन्हाळ्यामुळे घेण्यात आला निर्णय...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार असून दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो.

उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीला १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांत शाळांची वेळ सकाळीच असते. यंदा १ मार्चऐवजी ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरु होणार आहेत. पण, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देतील. त्यानंतर तेच सोमवारी (ता. २७) त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत.

नवे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून यंदा प्रथमच सर्व शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. परंतु, जून-जुलैमध्ये होणाऱ्या बदल्या फेब्रुवारी संपला तरीदेखील पूर्ण झालेल्या नाहीत. आता पुढील आठवड्यात त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल, पण त्यांना नवीन शाळेवर कधीपासून रुजू व्हावे लागेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच सुरु होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


जाणून घ्या आजचे रशिभविष्य: 26 फेब्रुवारी रविवार

             राशीभविष्य : २६ फेब्रुवारी रविवार..! 


मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. तुमचे वैवाहिक जीवन आज खूप चांगले असेल. आज तुम्ही मित्रांसोबत एखाद्या लांबच्या सहलीवर जाण्याचा विचार करू शकता. आज एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद झाले तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते, त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नवीन नातेसंबंधांमुळे आज तुमचे नशीब चमकत आहे. सामाजिक सन्मान मिळेल. आज नशीब 90 टक्के तुमच्या बाजूने असेल. गरिबांना कपडे आणि अन्न दान करा.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र जाईल. आज तुम्हाला तुमचे लक्ष नवीन योजनांवर केंद्रित करावे लागेल, कारण त्यातून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल, दुसरीकडे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे लक्ष द्या. संध्याकाळी समाजबांधवांकडून तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 79 टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या कपड्यात बांधून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य आज साथ देत आहे. या दिवशी नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित काही समस्यांचे निराकरण होताना दिसेल. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, त्यामुळे तुमच्या मनात अशी भावना असेल तर ते दूर करा आणि मनापासून तुमचे काम करा. आजची संध्याकाळ मित्र आणि कुटुंबियांसोबत हसण्यात आणि मस्करी करण्यात घालवली जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच नफा घेऊन येईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 82 टक्के तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालिसा पठण करा.

कर्क:
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असेल. आज तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त दिसाल. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याच्या टीकेकडे लक्ष देऊ नका आणि तुमचे काम आनंदाने करत राहाल, यामुळे भविष्यात यश तुम्हाला मिळेल. या दिवशी तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रात सुसंवाद वाढवण्यात यशस्वी होताना दिसाल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल आणि तुमच्या मनात आनंद निर्माण होईल. आज भाग्य 68 टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसन लाडू अर्पण करा.

सिंह
सिंह राशीच्या आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी फारसा अनुकूल नाही. आज जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत कोणताही व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात करू नका कारण तुमचे नुकसान होऊ शकते. आज अनावश्यक दु:ख आणि चिंतेमुळे मन उदास राहील आणि आज कठोर परिश्रम केल्यावरच नवीन यश मिळेल. तुमची सामाजिक जबाबदारीही वाढत आहे. आज नशीब 79 टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.

कन्या:
कन्या राशीचा आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांचा दिवस सुखकर जाईल. या दिवशी तुमच्या घरातील समस्या दूर होतील. आज तुम्हाला राजकीय मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होईल. आज तुम्हाला सुख-समृद्धी आणि कौटुंबिक शुभ कार्यात नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात व्यस्त राहाल. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या तत्परतेचा फायदा होण्याची आशा आहे. आज नशीब 86 टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढर्या चंदनाचा टिळा लावून तांब्याच्या भांड्यात शिवाला जल अर्पण करा.

तूळ:
आज तूळ राशीचे लोक अति महत्वाकांक्षी असल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात. समस्यांवर योग्य तोडगा न मिळाल्याने तुमचे मन अशांत राहील, ज्यामुळे तुम्ही उदास दिसाल. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचा योग असू शकतो आणि पुढे ढकलला जाऊ शकतो. जर तुमच्या घरात कोणतेही काम चालू असेल तर तुम्ही खूप अडकून पडाल. तुमचा दिवस संमिश्र दिसत आहे. आज नशीब 83 टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.

वृश्चिक:
वृश्चिक राशीच्या लोकांचे नशीब आज साथ देत नाही. आज तुमचा संपूर्ण दिवस काहीतरी खास करण्याच्या घाईत जाईल, ज्यामुळे तुम्ही खूप व्यस्त असाल. आज तुमचा अधिकाऱ्यांशी चांगला संबंध राहील. आज तुम्हाला तुमचे निराशाजनक विचार टाळावे लागतील. संध्याकाळचा काळ तुम्हाला खूप आनंद देईल कारण आज अचानक तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 88 टक्के तुमच्या बाजूने असेल. रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्या.

धनु:
धनु राशीच्या लोकांचे नशीब आज साथ देईल. आज तुमची ग्रहस्थिती चांगली असेल. काही खास कार्यक्रमांतर्गत, आज तुम्हाला आश्चर्यकारक मार्गाने अडकलेले पैसे मिळतील. तुम्ही धर्म आणि अध्यात्माकडे वाटचाल करत असताना तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. दैनंदिन कामात निष्काळजीपणा करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरदार लोक खूप धावपळ करत राहतील. आज नशीब 80 टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करावे.

मकर:
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप व्यस्त असेल. अचानक पाहुण्यांच्या आगमनामुळे तुमच्या खर्चात वाढ होताना दिसत आहे आणि तुमच्या क्षेत्रातील वरिष्ठांशीही मतभेद होऊ शकतात, परंतु तुमचे वैवाहिक जीवन प्रेममय राहील. आज तुमच्या शत्रूंचे मनोबल खचलेले दिसते. आज नशीब 90 टक्के तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा टिळा लावा.

कुंभ:
कुंभ राशीच्या लोकांचे नशीब आज साथ देत आहे. आज तुमच्यासाठी जमीन खरेदी करण्याचा आणि स्थान बदलण्याचा आनंददायी योगायोग दिसत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात आनंद निर्माण होईल. सुखसोयी आणि घरगुती वापराच्या प्रिय वस्तू खरेदी करता येतील. आज भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. या प्रभावाने आज तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 76 टक्के तुमच्या बाजूने राहील. ब्राह्मणाला दान द्या.

मीन:
मीन राशीचे लोक आज उत्साही आणि आनंदी असतील. मुलांकडून आनंद मिळेल, यासोबतच आज तुम्ही त्यांची कोणतीही समस्या सोडवू शकाल. आज तुम्ही एखादी स्पर्धा जिंकू शकता. आज तुमचे मन तुम्हाला मिळालेल्या विशेष यशाने आनंदी असेल, परंतु हवामानातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी क्षणांचा आनंद घ्याल. आर्थिक बाबतीत भाग्य लाभ देईल. आज नशीब 97 टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वती यांची पूजा करा.


"गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल" - नितीन गडकरी

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

नवसृजन, उद्यमशीलता यांच्या माध्यमातून ज्ञानाचे रूपांतरण आर्थिक संपदेमध्ये झाले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. ज्ञानासोबत विनम्रता व शालीनता आली पाहिजे हे सांगताना त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन व उद्योगपती रतन टाटा यांच्या विनम्र स्वभावाचे उदाहरण दिले.

उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्ये आवश्यक आहे असे सांगताना स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जलसुरक्षेसाठी जलसंवर्धन तसेच समुद्रात जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 'अन्नदाता शेतकरी' हा ऊर्जादाता झाला पाहिजे असे सांगून गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असे त्यांनी सांगितले. युवकांनी रोजगारामागे न लागता संपदा निर्माण करणारे उद्योजक व्हावे, असे त्यांनी सांगितले.

डॅमच्या कडेला कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मारेगाव : काम आटोपलं आणि सहजच डॅमचा आनंद लुटायला गेलेल्या कारने अनाचक पेट घेतल्याची घटना मार्डा डॅम वर घडली. यामध्ये कार जळून खाक झाली असून, कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. सदर घटना आज शनिवारी घडली.

राजुरा येथील बालाजी संभाजी लिपटे हे रेनो कंपनी कार क्र. एम एच 14 EU1963 या वाहनाने राजुरा येथून वरोरा मार्गे मुकटा (ता. मारेगाव) या परिसरातील शेत बघण्यासाठी आले असता वर्धा नदीवरील मार्डा डॅम वर असलेल्या पुलावर अचानक कारने पेट घेतला. दरम्यान कारमध्ये तिघे जण बसले होते. शनिवार दुपारची वेळ, कडक उन्हाचा पारा, कारमध्ये शॉर्टसर्किट होऊन किंवा इंजिन गरम झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. प्रसंगवधान साधून कार मधील बाहेर पडले त्यामुळे जीवीतहानी टळली.

बाहेरगाववरुन येणाऱ्या कारने अचानक पेट घेतल्याचे दृष्य कॅमेरात कैद होऊन वाऱ्यासारखे सोशल माध्यमावर परसले, याबाबत स्थानिकांशी चर्चा केली असता नानाप्रकारची चर्चा ऐकावयास मिळतेय... या लागलेल्या अचानक आगीत कार जळून खाक

झाली. 

रेल्वे प्रशासनाने नागरिकांना बेघर करु नये – पालकमंत्री श्री. मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

चंद्रपूर : जलनगर येथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरसकट कारवाई करून नागरिकांना बेघर करु नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. नियोजन सभागृह येथे जलनगर रेल्वे प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासन, रेल्वेचे अधिकारी व नागरीकांसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, ब्रिजभूषण पाझारे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘सर्वांना घरे’ ही प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, एकीकडे नागरिकांना घरे देण्याची योजना असताना रेल्वे प्रशासन नागरिकांना बेघर करीत आहे. अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे बोर्डाचा कोणताही आदेश आला तर सर्वात प्रथम जिल्हा प्रशासन व पालकमंत्री कार्यालयाशी रेल्वे प्रशासनाने संपर्क करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाला जमिनीची आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मागावे. नागरिकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्यात यावे. सरसकट कारवाई करून नागरिकांना बेघर करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
३५-४० वर्षांपूर्वी जेव्हा अतिक्रमण झाले तेव्हा रेल्वेने काहीही म्हटले नाही. रेल्वेला आता अतिक्रमणाची आठवण आली. या शहरावर पहिला हक्क स्थानिकांचा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रथम नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करावी, नंतरच अतिक्रमणाला हात लावावा. तसेच रेल्वेने आता कोणतेही नवीन अतिक्रमण होऊ देऊ नये, मात्र जुन्या घरांना हात लावू नका. राज्य शासनाच्या घरकुल योजनेत रेल्वेनही आर्थिक सहकार्य करावे. याबाबत आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

भाषागौरव दिनी वणीत मनोज मोहिते यांचे व्याख्यान

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या विदर्भ आवृत्तीचे वृत्तसंपादक मनोज मोहिते यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता मराठीचे मराठीपण या विषयावर होणाऱ्या या व्याख्यानप्रसंगी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक व इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मानसकुमार गुप्ता हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लोकमान्य टिळक सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानास अभ्यासक नागरिक पालक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे, आवाहन मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख डॉ. अजय देशपांडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजेन्द्र कोठारी, प्रा.उमेश व्यास, प्रा.मनोज जंत्रे, प्रा.किशन घोगरे, डॉ.विकास जुनगरी, प्रा.बाळा मालेकर, प्रा.प्रिया नगराळे, प्रा.राहुल खोंडे, प्रा.दिपाली ठावरी, पंकज सोनटक्के हे परिश्रम करीत आहे.

भावना म्यान केल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही : सागर मुने


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी :   "माता पितांबद्दल परम श्रद्धा आणि त्यांच्या स्वप्नानुसार वागणे,शत्रूंना देखील विश्वास वाटावा असे अद्वितीय चरित्र आणि सर्वसामान्य प्रजाजनांमध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवत अठरा पगड जातीचे मर्द मावळे तयार केले. स्वराज्य आणि स्वदेश याबाबतीत प्राण समर्पित करणे इतकी निष्ठा जागृत करणे. या सर्वच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू काही भगवान राजा रामचंद्र यांच्या चरित्राचे अनुकरण करीत प्राप्त केल्या, त्यामुळेच शिवछत्रपतींचे राज्य रामराज्य प्रमाणे आदर्श राज्य ठरले. माता पिता आणि संस्कृती बद्दलचा आदर, चारित्र्य आणि राष्ट्रनिष्ठा हाच शिवप्रभूंची शिकवण आहे. महाराजांचे विचार, लिहण्याचे, ऐकण्याचे, पाहण्याचे नसून जगण्यासाठी आहे. प्रसंगी भावना म्यान केल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही." असे विचार युवा पत्रकार आणि व्याख्याते सागर मुने यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असलेल्या माझं गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेच्या अठराव्या सत्रात "थोरलं राजं सांगून गेलं !" या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार तथा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे उपस्थित होते. प्रास्ताविकात माधव सरपटवार यांनी आज प्रथमच व्याख्याता म्हणून उपस्थित होत असलेल्या युवा पत्रकाराचे स्वागत करीत हाच या उपक्रमाचा उद्देश आहे हे अधोरेखित केले.
      
आपल्या शांत,संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषणात सागर मुने यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग मांडत त्यातून महाराजांनी आजच्या काळात आपल्याला दिलेला बोध उलगडून दाखविला. रामचरित्रासोबत शिवचरित्राचा असलेला सहसंबंध हा त्यांच्या विवेचनाचा विशेष आकर्षण बिंदू ठरला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये छत्रपती शिवराय हा डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात साठवण्याचा विषय आहे असे प्रतिपादन डॉ. दिलीप अलोणे यांनी केले.
        
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी तर आभारप्रदर्शन सचिव डॉ अभिजित अणे यांनी केले. जुमडे मॅडम यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेंगावार, प्रमोद लोणारे, देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

चंद्रपूर : कृषीपासून ते उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर भारत करण्याचा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे. कृषी क्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून ख-या अर्थाने शेतकरी हाच खरा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चांदा क्लब येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक नंदकुमार घोडमारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुळकर उपस्थित होते.

कृषी क्षेत्राच्या भरभराटीसाठी जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ राबविण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे सिंचनाच्या व्यवस्था करण्यात येईल. राज्यातील सर्व माजी मालगुजारी तलावाच्या नुतणीकरणासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती आपण उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. येत्या अर्थसंकल्पात ही घोषणा होणार असून पहिल्या टप्प्यात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी हे अमृत आहे. आपली गावे कसे वॉटर न्यूट्रल करता येतील, त्याबाबत नियोजन करावे. यासाठी खनीज विकास निधी, नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ.

पाच दिवस चालणा-या या कृषी महोत्सवात एकूण 211 स्टॉल लागले असून यातून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक माहिती मिळेल. जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रेसर राहावा, यासाठी आपण कटिबध्द आहोत. अर्थमंत्री असतांना आपण सहकारी शेतीची संकल्पना मांडली. राज्यात 1 कोटी 37 लक्ष शेतकरी भोगवटादार असून 1 कोटी 7 लक्ष शेतकरी अल्पभुधारक आहेत. ‘चांदा ते बांदा’ योजनेत कृषी आर्मी करण्याचा आपण संकल्प केला होता. दुस-याचे पोट भरणारा शेतकरी उपाशी राहणे योग्य नाही. त्यासाठी सामुहिक शेती हा चांगला पर्याय आहे. शेतकरी प्रक्रिया उद्योगांचे जाळे विणण्यासाठी शेतकरी समोर येत आहे.

पुढे पालकमंत्री म्हणाले, रक्त आणि पोट भरणारे धान्य कृत्रिमरित्या निर्माण करता येत नाही. अलिकडच्या काळात शेती करण्याकडे कल कमी झाला आहे. शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय होणे आवश्यक आहे. शेत तिथे मत्स्यतळे अशी योजना राबविण्यात येणार आहे. किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अल्पदरात शेतक-यांना कर्ज मिळू शकते. जिल्ह्यात भाजीपाला क्लस्टर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कृषी स्टार्ट अपमध्ये पहिला शेतकरी आपल्या जिल्ह्यातून व्हायला पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. शेतक-यांनो केवळ कृषी प्रदर्शनी बघू नका तर नवीन तंत्रज्ञान घेऊन शेती जगविण्याचा विचार करा.

पुढील वर्षी कृषी महोत्सव हा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावा. या कृषी महोत्सवाकरीता शेतकरी, नागरीक यांच्या सुचना मागण्यासाठी आजपासूनच येथे एक बॉक्स ठेवा. उत्कृष्ट सुचना देण्या-यांना आपल्या स्वत:कडून 11 हजार, 5 हजार व 3 हजार असे बक्षीस देण्यात येईल. तसेच पुढील महोत्सवात एक दिवस कृषी साहित्य अधिवेशन, एक दिवस सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन असे सत्र आयोजित करावे. अत्याधुनिक नर्सरीच्या बाबतीत शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी नाविन्यपूर्ण किंवा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला आहे. त्यामुळे पशुधनासाठी चांगले कुटार उपलब्ध होईल. कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा शेतक-यांनी अवलंब करावा. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शेतक-यांपर्यंत शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान पोहचविणे, हा यामागचा उद्देश आहे. शेतक-यांनी खाजगी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे दुबार – तिबार पिके घेतली तर शेतक-यांचे उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार उपसंचालक रविंद्र मनोहरे यांनी मानले. कार्यक्रमाला शेतकरी प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधी, विविध स्टॉलचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

पशु प्रदर्शनीला भेट :
जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चांदा क्लब समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडवर पशु प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व पशुपालकांशी संवाद साधला.

वीर बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र सर्वत्र ऐकू यावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन    

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

चंद्रपूर : वीर बिरसा मुंडा यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. शूरता आणि वीरतेचे प्रतिक म्हणजे बिरसा मुंडा होय. त्यांचे कार्य जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहचावे, हाच उद्देश्य बिरसा मुंडा यांच्यावर आधारित नाटकामागे आहे. नाटकाच्या रुपाने वीर बिरसा मुंडा हे घराघरापर्यंत तर पोहोचतील परंतु त्यांची शूरता आणि वीरता यांचे अनुकरण करणेही गरजेचे आहे. वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनगाथेच्या माध्यमातून सर्वांनी सकारात्मक शक्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सांस्कृतिक विभागाच्यावतीने पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) येथे आयोजित व अनिरुद्ध वनकर अभीनित क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्यावर आधारित ‘धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, आशिष देवतळे, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, आदिवासी मोर्चाचे प्रकाश गेडाम, अल्का आत्राम, धनराज कोवे, उपविभागीय अधिकारी ढवळे, गटविकास अधिकारी मरसकोल्हे, तहसीलदार कनवाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष घोडे, अनिरुद्ध वनकर उपस्थित होते.

देशाचा सन्मान वाढविण्यासाठी जे जे काही समर्पित भावनेने देता येईल, ते ते देण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने केले. पोंभूर्णाच्या भूमिमध्ये मोठी शक्ती आहे. या गावाला ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा आहे. त्यामुळे वीर बिरसा मुंडा यांच्यावरील नाटक येथे होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार झटत आहे. पोंभूर्णाच्या एमआयडीसीत ‘प्लग अँड प्ले’ अशा पद्धतीने अल्प भांडवलावर आधारित उद्योग उभारणीचे काम सुरू आहे. यापूर्वी मिशन शौर्यच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी मदत करण्याची संधी प्राप्त झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख श्री. मुनगंटीवार यांनी केला.

चंद्रपुरातील आदिवासी तरुण-तरुणींसाठी ‘स्किल डेव्हलपमेंट’चे उपक्रम राबिवण्यात येत आहेत. बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गावर एसएनडीटीच्या माध्यमातून भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. येथे 62 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील सिम्बॉयसिसपेक्षाही दर्जेदार असे हे केंद्र राहणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळ उपलब्ध आहे. ‘फ्लाइंग क्लब’च्या माध्यमातून येथे तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे.

या उपक्रमात चंद्रपूर, गडचिरोलीतील आदिवासींना 50 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा श्री. मुनगंटीवार यांनी केली. देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील आदिवासी बांधवांचा नेहमीच गौरव केला आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाची मान गौरवाने उंचावली आहे, असे श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.


आजपासून झमकोला येथे श्रीमद भागवत सप्ताह

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

झरी : झमकोला येथे आजपासून 'श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे प्रथम वर्ष असून भागवत कथेचे हभप. राजू महाराज विरदंडे पिंपरी (ईजाळा) ता,घाटंजी यांच्या हस्ते भागवत कथेला सुरुवात होणार आहे. 25 ते 3 मार्च 2023 पर्यंत चालणाऱ्या सप्ताह मध्ये दररोज सकाळी 6. वाजता सामुदायिक ध्यान व रमधून निघेल.

भागवत संच गायक, दिनेश महाराज आडकिने, झुली 
तबला वादक, रविभाऊ एकोनकार, आकपुरी 
आर्गन वादक, संजयभाऊ मेश्राम, पिसगाव, पखवाज वादक गजानन भाऊ वानखडे, मोदल, दारव्हा, साथसंगत, प्रेमभाऊ राठोड, वाकी यांची असणार आहेत. 

तसेच सप्ताहात विनावादन हभप. पांडुरंग कोवे महाराज खडकडोह, भारुडकार, हभप. सुधाकर महाराज कावडकर वनसडी कोरपना, ग्रामगीता पारायण रविवार दी, 26/02/ 2023 ते 03/03/2023 सकाळी 8 ते 10 दुपारी, 2 ते 5 वाजेपर्यंत ग्रामगीता पारायण कर्ते हभप. यशवंतराव वेट्टी, वल्हासा, हभप. नागोराव उईके, खडकडोह, हभप. डोंगरकर महाराज, दहेगाव, हभप वाघाडे महाराज, सुसरी, तसेच 
सामुदायिक प्रार्थना व हरिपाठ रविवार 26/02/2023 ते शुक्रवार 03/03/2023 पर्यंत सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत. 

काल्याची प्रमुख उपस्थिती 
हभप पेन्दोर महाराज, दाभाडी,  कुमरे महाराज, दाभाडी, चंद्रभागा मधुकरराव गंधेवार, घोन्सा, सुधीरभाऊ मत्ते ग्रामगीताचार्य, घोन्सा, निळकंठ नेहारे महाराज , तुकडोजी म विचारक वल्हासा, कुमरे महाराज, चिचघाट, तात्याजी गोहणे ,जूनोनी हे आहेत. 

काला किर्तन 
शनिवार दि, 04/03/2023 ला दु.12 ते 2 वा हभप. राजु महाराज विरदंडे यांच्या अमृतमय वाणीतून संपन्न होईल.तसेच पालखी व शोभायात्रा शनिवार दि.04/03/2023 आयोजन केले आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहून भागवत कथा सप्ताहची शोभा वाढवावी असे ग्रामवासियांनी जाहीर आवाहन केले आहे.

आज वसंत जिनींग येथे कार्यशाळेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरातील दि वसंत जिनिंग सभागृहात 26 फेब्रुवारीला संपन्न होणाऱ्या उद्घाटन सोहळ्या पूर्वी आज 25 फेब्रुवारीला नवोदित पत्रकार, पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आणि समाजातल्या जाणत्या वर्गासह शिक्षक, वकील यांच्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आशिष खूलसंगे यांचे हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

मराठी भाषा प्रमाण, शुद्धलेखन, व्याकरण याबरोबरच प्रसार माध्यमे या विषयाचा व्यासंग असलेले विचारवंत, व्याख्याते, कवी, लेखक, खर्डे पत्रकार, निर्भीड वक्ता आणि लेखनिक म्हणून ज्याची संपूर्ण विदर्भात ख्याती आहे.
असे प्रा. दिपक गोविंद रंगारी यांच्या कार्यशाळेचे, व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून वणी शहरात वसंत जिनिंगचे हॉलमध्ये आज सकाळी  11. वाजता आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

आजपासून होऊ घातलेल्या कार्यशाळेत परिसरातील तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे असे, आवाहन व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटना यांनी केले. 

कात्री येथील दिवान मार्केटिंग योजनेची चौकशी करा - कुणाल आठवले यांची मागणी


सह्याद्री चौफेर | रूस्तम शेख

कळंब : कळंब तालुक्यातील कात्री येथे संबधित विभागाची कोणतीही परवानगी नसतांना दिवान मार्केटिंग योजने अंतर्गत अवैद्यरित्या लकी ड्रा सुरु आहे.

 या लकी ड्रॉ च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांची करोडो रुपयाची आर्थिक फसवणूक होऊ नये या उद्देशाने कात्री येथील दिवान मार्केटिंग योजनेची (लकी ड्रा) चौकशी करावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी सचिव कुणाल आठवले यांनी निवेदना व्दारे केली आहे.

 तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात आली नाही तर पार्टीच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल असा तिर्व इशारा कुणाल आठवले यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.

सदर लकी ड्रा चे पायेमुळे खोलवर रूजले असुन संपुर्ण तालुक्यात याचे जाळे पसरलेले आहेत.
पोलीस विभागाने कसून चौकशी केल्यास अनेक अवैद्य धंदयात दिवाण मार्केटिंगचे मालक शेख शब्बीर यांचे हितसंबंध असल्याचे उघडकीस येऊन या मध्ये मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता आहे.

तरी पोलीस विभागाने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने करण्यात येत आहे.

आमदार बोदकुरवारांच्या उपस्थितीत मारेगाव तालुक्यातील विविध समस्यांची आढावा बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शहरी व ग्रामीण भागातील विविध प्रश्न, समस्याबाबत चर्चा - विमर्श कारणासाठी आढावा बैठक 
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी (23 फेब्रुवारी) रोजी पार पडली. या बैठकीत आमदार बोदकुरवार यांनी तालुक्यातील विविध समस्या जाणून घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले.      
शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी गांव,पातळीवरील समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत जलजीवन मिशन 'हर घर जल' अंतर्गत 100 टक्के कुटूंबियांना नळ जोडणी करून पाणीपुरवठा करण्याचे ध्येय असल्याचे श्री कुरडकर उपअभियंता पाणीपुरवठा विभाग वणी यांनी सांगितले तसेच संभाव्य पाणीटंचाई व उपाययोजना यासंदर्भात आढावा घेण्यात आला तसेच विद्युतवितरण कंपनी च्या वतीने वीज ग्राहकांचा समस्या, सार्वजनिक बांधकाम विभाग व जि प विभाग यांच्या वतीने ग्रामीण रस्ता यासारख्या पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, कृषी, वनसंपदा या क्षेत्रातील विविध समस्या व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मारेगाव तालुक्यातील सरपंचांनी समस्या मांडल्या 
या प्रसंगी तहसीलदार दिपक पुंडे, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित वायकोस, माजी जि.प. सदस्या अरुणाताई खंडाळकर, माजी जि.प.सदस्य अनिल देरकर, माजी सभापती शितलताई पोटे, माजी उपसभापती संजय आवारी, ज्ञानेश्वर चिकटे उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुधाकर जाधव यांनी केले.

एमआयडीसीच्या धर्तीवर राज्यात वन औद्योगिक विकास महामंडळ सुरु करणार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता वन औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वन विकास महामंडळाच्या नागपूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. क्रीडा स्पर्धा व्यक्तीमधील निकोपतेला चालना देते. वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांनी ही निकोपता कर्मचाऱ्यांना शिकवली आहे.

लवकरच वन विभागाच्या आणि वन विभाग विरुद्ध वन विकास महामंडळ अशा विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. हे महामंडळ केवळ वन क्षेत्राच्या विकासासाठीच काम करीत नाही, तर वन विभागातील कर्मचाऱ्यांना एखाद्या कुटुंबाप्रमाणे मानत त्यांच्याही सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करीत आहे. 

वन विकास महामंडळातील खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये यश मिळवावे. वन विकास महामंडळातील खेळाडूंचे कौतुक यासाठी करावे लागेल की विदर्भातील उष्णतामान जास्त असतानाही ते मैदानी खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत आहेत. एफडीसीएमच्या खेळाडूंचा चपळता व कार्यकर्तृत्वाच्याबाबतीत चित्ता असा उल्लेख करीत मंत्री मुनगंटीवार यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करायचे असेल तर शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्वाचे आहे. खेळांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम देखील महत्वाचे आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने सांस्कृतिक महोत्सव देखील घ्यावे, असे आवाहन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केले. वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. राज्यातच नव्हे तर देशात वन विभागाचे काय सर्वोत्तम ठेवण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढे आहे.

राज्यातील वनक्षेत्रात मोठी वाढ: नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार २ हजार ५५० वर्ग किलोमीटरचे वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे. कांदळवनांमध्येही १०२ वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कांदळवन संवर्धनाची संकल्पना देशभरात राबविण्याची घोषणा केली, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

यावेळी वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, विभागीय व्यवस्थापक ए. आर. प्रवीण, नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना अटक करण्याचे आदेश

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

चंद्रपूर : राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश प्राप्त झाले असून, आता जिल्हाधिकाऱ्यांना खरोखच अटक होणार की प्रशासकीय पातळीवर कायदे आणि नियमांचा अभ्यास करुन काही वेगळी भूमिका घेतली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. 

राजुरा तालुक्यातील कुसुंबी गावामध्ये माणिकगड कंपनी आदिवासींच्या जमिनी बळकावत असून तिथे अतिक्रमण करत आहे. या अतिक्रमणासाठी जिल्हा प्रशासनाने मदत केल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश निघाले होते. ही चौकशी 16 फेब्रुवारीला आयोगापुढे होणार होती. मात्र, या चौकशीला विनय गौडा हे हजर राहिले नाहीत. त्यांच्या ऐवजी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी या चौकशीला हजर राहिल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश काढले. त्यांना अटक करुन येत्या 2 मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्यात यावे, असे आदेश महासंचालकांना देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करुन आणण्याचे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री.रजनीश सेठ मुंबई यांना आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांनी दिले आहे. आयोगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अटक करून हजर करा असे आदेश आज दिनांक 21/2/2023 ला पारीत केले होते, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना संविधानिक अधिकार अनुच्छेद 338/A असतानांही जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा यांनी न्यायालयाचे, आयोगाच्या,समन्सचे उल्लंघन केले.

त्यामुळे आयोगाच्या आदेशाने महसूल प्रशासनात प्रचंड खडबळ उडाली. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने आदेशात स्पष्ट म्हटलं की आदेशाचे पालन करा. 

तलाठी विनोद खोब्रागडे यांची पुढीलप्रमाणे मागणी: 

1. कुंसुबीचा 24 आदीवासींची 63.62 हे.आर.तिच जमीन जशीचा तशी वापस करणे.
2. 42 वर्षांपासून आजपर्यंत माणिकगड सिमेंट कंपनीला दिलेली बेकायदेशीर लिज तात्काळ बंद करणे.
3. 42 वर्षांपासून जमीनीचा भुपुष्ठभाडेचा मोबदला कुंसुबीचा आदिवासीना देणे.
4. कंपनी व जिल्हाधिकारी चंद्रपूर,व समंधित अधिका-यावर फौजदारी गुन्हे,अट्रासिटीचा कलमाअंतर्गत दाखल करणे.
अशी मागणी आयोगाकडे तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केली आहे.


चंद्रपूरचे रहिवासी असलेल्या विनोद खोब्रागडे यांनी आयोगासमोर एक याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी म्हटले होते की, राजुरा तालुक्यातील कुसुंबी गावामध्ये माणिकगड कंपनी आदिवासींच्या जमिनी बळकावत असून तिथे अतिक्रमण करत आहे. या अतिक्रमणासाठी जिल्हा प्रशासनाने मदत केल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला होता. सदर प्रकरणाची सुनावणी करत असताना आयोगाने जिल्हा प्रशासनाचे याबाबत म्हणणे काय आहे हे जाणून घेण्यासाठी गौडा यांना आयोगासमोर 16 फेब्रुवारी रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. अनेकदा सांगून, समन्स जारी करूनही ते आयोगासमोर हजर न झाल्याने त्यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत.


राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूह जो पूर्वी माणिकगड नावाने प्रसिद्ध होता. या उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर पाठिमागील 36 वर्षांपासून कब्जा केला आहे. हा कब्जा पूर्णपणे अवैध आणि आदिवासींच्या जमीनींवर केलेले अतिक्रमण आहे असा उल्लेख या तक्रारीत आहे. या प्रकरणावर पाठिमागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाही सुरु आहे. दरम्यान, याच प्रकरणाच्या चौकशीसाठी चंद्रपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: हजर न होता उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवून दिले. त्यामुळे आयोग संतप्त झाला. तसेच, ज्या अधिकाऱ्यांचा संबंध नाही ते या चौकशीसाठी का हजर राहिले, असा सवाल करत जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश..

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता.

परंतु ही परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची उमेदवारांची मागणी व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी उमेदवारांनी केलेली मागणी, या बाबी विचारात घेऊन फेरविचारांती सुधारित परीक्षा योजना व नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

विमा कामगारांसाठी बल्लारपुरात १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात विविध औद्योगिक आस्थापना असल्यामुळे येथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत विमा असणाऱ्या कामगारांसाठी बल्लारपूर येथे 100 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्लारपूर येथे विमा कामगारांसाठी सेवा दवाखान्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, आशिष देवतळे, संचालक (प्रशासन) महेश वरुडकर, निलेश खरबडे, मनीष पांडे, वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. सतीश नलगुंडवार, डॉ. नितीन टाकरखेडे, डॉ. प्रमोद बोदेले,मनिष डांगे आदी उपस्थित होते.

विमा कामगारांसाठी बल्लारपुरात रुग्णालय सुरु करण्याबाबत मुंबईत बैठक घेतली, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, बैठकीनंतर केवळ दीड महिन्यात हा दवाखाना सुरू झाला, याचा आनंद आहे. चंद्रपूर आणि बल्लारपुर ही कामगार नगरी आहे. 14632 विमाधारक कामगारांच्या कुटुंबांना या दवाखान्याचा उपयोग होणार आहे. योग्य क्षणी उपचार मिळाले तर पुढील त्रास कमी होतो, या निमित्ताने या दवाखान्याचे महत्व आहे. या रुग्णालयात रुग्णवाहिका, एक्स – रे मशीन, ईसीजी, रक्तचाचणी, लघवी चाचणी, केअर युनीट आदी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्या, अशा सुचना त्यांनी कामगार विमा सोसायटीला केल्या.

पालकमंत्री पुढे म्हणाले, ज्या जिल्ह्यात 50 हजारांपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी होते, तेथेच 100 खाटांचे रुग्णालय मंजूर केले जाते. आपल्या जिल्ह्यात कामगारांच्या नोंदणीचा आकडा 50 हजारांपेक्षा कमी आहे. ही बाब केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्या कानावर आपण व्यक्तिश: घातली. त्यामुळे केंद्र सरकारनेही या निकषात विशेष सूट देऊन 100 खाटांच्या रुग्णालयासाठी होकार दिला आहे. आपल्या राज्याची सुरवात ‘चांदा ते बांदा’ अशी होते. त्यामुळे चांदा मागे राहू नये, यासाठी आपण सदैव कटिबध्द आहोत.

बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावर कामगार रुग्णालय उभे राहणार असून यासाठी पाच एकर जागेची आवश्यकता आहे. चंद्रपूरात अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टाटा कॅन्सर हॉस्पीटल नंतर आता कामगार विमा सोसायटी अंतर्गत 100 खाटांचे रुग्णालय उभे राहत आहे. येथील जनतेची सेवा करणे, हे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे सौभाग्य समजतो.

बल्लारपूरात एसएनडीटी विद्यापिठाच्या उपकेंद्रांतर्गत 43 नव्हे तर 63 कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, विमा रुग्णालय, विद्यापीठ हे सर्व मोठे वरदान ठरणार आहे.

नागरिकांचे आरोग्य नेहमी उत्तम राहावे, अशी आपली नेहमीच सदिच्छा राहिली आहे. दवाखान्यात जातांना रुग्णाच्या चेहऱ्यावर त्रासाचे भाव असले तरी उपचार घेऊन घरी परत जातांना त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव असावे. या दृष्टीने रुग्णांना सेवा द्यावी. चंद्रपुरातील उन्हाळा बघता या रुग्णालयात वातानुकूलित यंत्रणा बसवावी. येथील कामगारांसाठी एक हक्काचा दवाखाना उघडू शकलो, याचे नक्कीच समाधान आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. सतिश नलगुंडवार यांनी तर संचालन भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंग यांनी केले. यावेळी डॉ. अमृता सुतार यांच्यासह कामगार कुटुंब उपस्थित होते.

मारेगाव पोलीस स्टेशन आवारातील पेट्रोल पंपाचे उदघाटन संपन्न


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : यवतमाळ जिल्हा पोलिस कल्याण शाखेचे पेट्रोल पंप हा उत्पन्नाचेच साधन नव्हे तर परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध झालेली सेवा आहे. या माध्यमातून जनतेचे इंधन बचत, आर्थिक बचत, वेळेची बचत होणार आहे. तसेच पोलीस विभागाने गाळेचा प्रश्न मार्गी लावून बेरोजगार यांनी रोजगार उपलब्ध करून द्यावे. मी पोलीस वेल्फेअर पेट्रोलियम व यवतमाळ जिल्हा पोलिस कल्याण शाखाला धन्यवाद मानतो, असे प्रतिपादन आमदार संजीवरेड्डी बोदकूरकर यांनी पेट्रोल पंपाच्या उदघाटन प्रसंगी केले.
शहरात पेट्रोल पंप नसल्याने शेतीसाठी इंधन, वाहन धारकांना वेळ वाया घालुवून लांब जावून खर्च करावे लागत असल्याने भारत पेट्रोलियम उभारून वाहन धारकांच्या सेवेसाठी पेट्रोलपंपची उपलब्धता करण्यात आली. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी कोनशिलेचे बटन दाबून पेट्रोलपंपचे रितसर उद्घाटन आज दि.23 गुरुवार ला केले.
स्थानिक पोलीस स्टेशनच्या प्रांगणात उभारलेल्या भारत पेट्रोलपंप उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार होते.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळेकर, तहसीलदार दिपक पुंडे, नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की, बि.पी.सी.एल. (BPCL) चे क्वॉडीनेटर गजेंद्र कुशवाह यांची मंचावर उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलतांना नाईकनवरे म्हणाले, मारेगावचे पेट्रोलपंप चालवितांना पारदर्शकता राहील. पेट्रोल पंपाची उपलब्धताच पोलीस व भारत पेट्रोलपंप सहकार्यातून उभारण्यात आली. पोलिस वेलफेअर कडून 24 तास चालणार असे सूतोवाच करीत वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती विषद केली.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित गजेंद्र कुशवाह, सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे तर ठाणेदार राजेश पुरी यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे, सामाजिक कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.