नवंवर्षाभिनंदन 2023 निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा


                     || नवंवर्षा अभिनंदन 2023 ||

नुकतेच "2022" वर्ष संपले आहे. या मागील वर्षी आपण संकटकाळी माझ्या खंबीर पाठीशी उभे राहलेल्या सर्व हितचिंतक व युवा शेतकऱ्यांना तसेच मित्रांना "2023" नवंवर्ष अभिनंदन.. सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया...
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया...! 

नवंवर्षाअभिनंदन २०२३ निमित्त सर्वाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- विठ्ठल पा खारकर, वरोरा 
संचालक तथा मार्गदर्शक सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, मोहबाळा रोड, वरोरा जि. चंद्रपूर 

2023 नवंवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


                 "नवंवर्षा अभिनंदन 2023"

2022 वर्ष संपले आहे. मागील वर्षी संकटकाळी माझ्या खंबीर पाठीशी आपण उभे राहलेल्या सर्व हितचिंतक व युवा मित्रांना "2023" नवंवर्ष अभिनंदन..
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया...
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया...! 

शुभेच्छुक :- राहुल सूर, मारेगाव 
तथा राहुल सूर मित्र परिवार अमरावती पदवीधर मतदार संघ

दहावी-बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची बातमी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले, त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे.

पहा सविस्तर 

दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘http://www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

तसेच छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. 

तसेच सीबीएसई बाेर्डानेही दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान, तर बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून http://cbse.gov.in या संकेतस्थळावर हे वेळापत्रक पाहता येणार आहे.


सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : न्यू गाईज युवा मंच वणी द्वारा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात रांगोळी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, काव्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त वणीकर जनतेने सहभाग नोंदवावा या स्पर्धे साठी आधी नोंदणी करावी.

या सर्व स्पर्धांचे आयोजन 3 जाने 2023 रोजी धनोजे कुणबी सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे, तरी वणी मारेगाव झरी तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे, आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
                            (बघा कार्यक्रमाची झलक)

प्रवेश संपर्क : 
 विनोद कुमार आदे - 8788473009
 शंकर घुगरे - 9657440743
 शैलेश आडपावार - 9764716124
 आनंद नक्षणे - 9767112410

मारेगाव येथे सोमवार ला अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : भिमा कोरेगाव शौर्यदिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मारेगाव येथे येत्या २ जानेवारी (सोमवार) ला राष्ट्रीय प्रबोधनकार, वादळवारा कॅसेट फेम, विद्रोही व क्रांतिकारक गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
     मारेगाव तालुक्यात सामाजिक चळवळीला ऊर्जा मिळावी आणि भिमा कोरेगाव शहीद हुतात्म्यांच्या बलिदानाची शौर्यगाथा समाजमनात कायम तेवत रहावी, त्यांच्या आहुत्यांना उजाळा देण्यासाठी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित आहे.

     स्थानिक राज्यमहामार्गचे बाजूला, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पटांगणात सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर भूषविणार आहे.
    तालुक्यातील तमाम जनतेंनी वैचारिक मेजवानीची पर्वणी असलेल्या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारेगाव फुले- शाहू- आंबेडकर प्रबोधन विचार मंच तथा मारेगाव, वणी - झरी तालूका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

चंद्रपूर कुंभार व इतर विट उद्योजकाला माती उतखननाला राॅयल्टी परवाना देण्यात यावे- ॲड.हरीश मंचलवार

 सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

चंद्रपूर : चंद्रपूरातील कुंभार व इतर विट उद्योजकाला गेल्या काही दिवसापासून मातीच्या लाल विटा तयार करण्या करिता लागणारी माती उत्तखननाला रॉयल्टी तापूर्त्या परवण्या करिता शासकीय कार्यालयात फेऱ्या घालून तोडगा निघत नव्हता विट उद्योजक चे विधी तज्ज्ञ ॲड.हरीश मंचलवर कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच
 बीजेपी अनु. जाती मोर्च्याचे अध्यक्ष धम्म्यप्रकाश भस्मे , 
कुंभार समाजाचे सरचिटणीस आकाश खिरे यांच्या नेतृत्वात तोडगा काढण्याकरिता कुंभार समाजाचे आधारस्थंभ, विकासपुरुष, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी तात्काळ नागपूर येथे भेट घेऊन तात्पुरता विट परवाना संबधी अडचण सांगितली, ना.सुधीर भाऊ नी तात्काळ जिल्हधिकारी यांना निर्देश दिले की विट उद्याजकांना तात्पुरता परवाना देण्यात यावा जिल्हाधिकारी यांनी सहमती दर्शवली, कॅबिनेट मंत्री ना.सुधीर भाऊ यांच्या निर्देशानुसार काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी समक्ष तहसीलदार,खनिज कर्म अधिकारी व विट उद्योजक यांची सविस्तर बैठक झाली त्या बैठकीमध्ये ॲड. हरीश मंचलवार यांनी वीट भट्टी उद्योजकांची प्रखर बाजू मांडण्यात आली व भारत का राजपत्र मधील परिशिष्ट 9 तरतुदीचे interpretation ( स्पष्टीकरण)समजवून सांगण्यात आले,त्यानंतर मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी तहसीलदार आणि खनिज कर्म अधिकारी यांना निर्देश देण्यात आले की तात्काळ मातीच्या विटा तयार करण्याकरिता लागणाऱ्या मातीची उत्खनन बाबत रॉयल्टी परवाने देण्यात यावे.

लिखीत आश्वासन डावलण्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे व उपोषण

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : बीएस इस्पात मार्की मांगली कोळसा खाण कंपनीच्या प्रदूषणामुळे लिज क्षेत्रातील खरेदी न केलेल्या शेतजमिनीचे पिकांचे मागिल ७ वर्षापासून नुकसान होत आहे. त्यामुळे या शेतजमीनी त्वरित खरेदी करण्यासाठी एका वर्षापूर्वी आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळी बी एस इस्पात कोळसा कंपनीने लिखीत आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता न करता लिखीत आश्वासन डावलण्याने शुक्रवारी सकाळी 10 वाजता पासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीच्या गेटच्या बाजूला धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.
कंपनीचे व्यवस्थापक अजय प्रजापतीने मागील उपोषणचे वेळी दि. 27 डिसेंबर 2021 ला सर्व प्रकल्पग्रस्ताना लिज क्षेत्रातील उर्वरित जमिनी 11 डिसेंबर 2022 पर्यंत खरेदी करण्याचे लिखित आश्वासन पत्र दिले होते. परंतु एक वर्षानंतर ही कंपनी व्यवस्थापक जमिनी खरेदी करुण घेण्यास टाळाटाळ करीत आहे. मागिल सात वर्षापासून कंपनी प्रदूषणामुळे लिज क्षेत्रातील खरेदी न केलेल्या जमिनीत शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. सात वर्षापासून प्रकल्पग्रस्ताना पिकाची नुकसान भरपाई मिळलेली नाहीत. प्रशासन विभाग निवेदनाला केराची टोपी दाखवीत आहे.
3 जानेवारी 2023 पर्यंत कंपनीने लिज क्षेत्रातील उर्वरीत जमीनी मार्केट रेटच्या चार पट मोबदला देऊन व रोजगार देऊन त्वरीत खेरदी करावी व मागिल सात वर्षापासूनचा पिक नुकसान भरपाई रकम कंपनीने द्यावी पूर्ण करावे. अन्यथा 10 जानेवारी 2023 पासून संपूर्ण मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त शेतकरी कूटूंबीयांना परिवारासोबत रस्त्यावर येणार असून कंपनीचे गेट समोर मूकूटबन पाटणबोरी रोडवर बेमुदत बेधडक चक्काजाम रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या जनतेच्या शारिरिक व मानसिक त्रासाला व इतर नुकसानाला कंपनी व प्रशासन स्वतः सर्वस्वी जबाबदार जबाबदार राहील असा इशारा धरणे व उपोषण करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
या बाबत 27 डिसेंबर ला जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी केळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी केळापूर, तहसिलदार झरी, पोलीस अधिकारी मुकूटबन, ग्रामपंचायत मुकुटबन व बीएस इस्पात मार्की मांगली बीएस इस्पात मार्की मांगली कोळसा खाण कंपनीच्या व्यवस्थापकाला निवेदन देऊन माहिती दिली होती परंतु बेतालपणे वागणाऱ्या कोळसा खाण कंपनीच्या व्यवस्थापकाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बोचऱ्या थंडीत वाऱ्यावर सोडले.

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सावली पोलिस स्टेशनचे निरीक्षक आशिष बोरकर यांचे आव्हान...


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : दरवर्षी प्रमाणे यंदा सुध्दा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकं पार्टी करित असतात. काही नवयुवक मद्य प्राशन करून गाडी वेगाने चालवीत असतात तर कुणी स्टंटबाजी करीत असतात यामुळे अनेक अपघात घडत असतात.

दरवर्षी चां अनुभव बघता सावली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांचे कडून ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ डिसेंबर रोजी सावली पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन गाड्या सतत पेट्रोलिंगसाठी राहणार आहेत.

परवानगी शिवाय परिसरात कोणताही कार्यक्रम करू नये. मद्य प्राशन करून गाडी चालवीनाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. असे त्यांनी म्हटले आहे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे.असे आवाहन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष बोरकर साहेब यांनी केली आहे.

दादासाहेब कन्नमवार यांची जयंती शासकीयस्तरावर साजरी करा - बेलदार समाजाची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शासकीय स्तरावर पुण्यतिथी, जयंती अनेकांच्या साजरी केल्या जातात. पण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दिवंगत कर्मवीर मारोतराव कन्नमवार याला अपवाद ठरत आहे. शासनाला दादासाहेब कन्नमवारांच्या कार्यकर्तृत्वाचा विसर पडला असून शासननिर्णयात 'जयंती दिना'चा उल्लेख टाळला जात आहे. अशा समाजाच्या वतीने भावना व्यक्त होत आहे.

स्व. कर्मवीर मारोतराव कन्नमवार साहेब महाराष्ट्र राज्याचे दुसरे आणि विदर्भातील पहिलेच मुख्यमंत्री होते, बेलदार भटक्या जमातीचे होते म्हणून की, काय त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली नाही. आज पावेतो संघटनेच्या वतीने अनेकदा शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी, सर्व शासकीय कार्यालयात त्यांची प्रतिमा लावावी अशी मागणी आहे.

यासाठी वारंवार पाठपुरावाही करण्यात आला आहे. तर देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे समाजात असंतोष पसरत आहे. येत्या 10 जानेवारी 2023 ला शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी, अशा आशयचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठविले असून शासनाने दखल घ्यावी अशी मागणी राज्याध्यक्ष अरविंद गांगुलवार, विनायक वद्देवार, राजेंद्र भंडारवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष केजी मूत्यालवार, संदीप पदलमवार, प्रीती तोटावार, आकाश कायपेल्लीवार यांनी केली आहे.

कसा असेल तुमचा आजचा दिवस...!

 
                राशीभविष्य : ३० डिसेंबर शुक्रवार..!


🐏 मेष 
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उद्योग-व्यवसायातील चढ-उतार हाताळण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वादविवाद करून तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठांशी जास्त वाद घालू नका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर या युगातील परिस्थितीशी तडजोड करणे हुशारीचे ठरेल.

🦬 वृषभ 
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, काही किचकट काम पूर्ण झाल्यामुळे अचानक नशिबाचे अडथळे दूर होतील. म्हणजेच आज तुम्हाला व्यवसायाच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमचे घरगुती जीवन नीट जगायचे असेल तर तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे.
👩‍❤️‍👨 मिथुन 
मिथुन राशीचे लोक आज नवीन कामाचा मार्ग अवलंबू शकतात. कोणतेही क्लिष्ट काम सहजतेने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आजही अशाच समस्येवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष तुमच्याकडे असेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

🦀 कर्क 
कर्क राशीच्या लोकांवर काही जड कामाचे ओझे असू शकते, यासाठी तुम्हाला तुमच्या कामातून सुट्टी घ्यावी लागेल. तुम्ही उद्योग चालवत असाल तर छोट्या कर्मचाऱ्यांच्या कामांवरही लक्ष ठेवायला विसरू नका.
🦁 सिंह 
सिंह राशीचे लोक चांगल्या कार्यक्षेत्रात प्रवेश करून आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही लोकांच्या टीकेलाही बळी पडू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही एक चांगला नेता बनू शकता. यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे.

👩🏻 कन्या 
कन्या राशीच्या लोकांवर आज काही महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते. आज तुम्ही कोणत्याही शंका आणि विचार न करता तुमच्या कर्तव्यात व्यस्त राहा. आज जे काही काम तुमच्यासमोर येईल ते तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. असे केल्याने आज तुमची गणना कार्यालयातील चांगल्या कार्यकर्त्यांमध्ये होईल.
⚖️ तूळ 
तूळ राशीच्या लोकांसाठी आज सकाळपासूनच काहीसे विचित्र वातावरण असेल. आज तुमच्या घरातील दैनंदिन कामेही अनेक अडथळ्यांसह पूर्ण होताना दिसत आहेत. आज तुमची व्यवसाय आणि नोकरीची स्थितीही नाजूक असणार आहे. व्यवसाय क्षेत्रातील चढ-उतारांचा परिणाम तुमच्यावरच नाही तर तुमच्या कुटुंबावरही होईल.

🦂 वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक कधी कधी अशा अवस्थेत अडकतात जिथून बाहेर पडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो. इतकेच नाही तर आजही व्यवसायातील काही अशाच गुंतागुंती तुम्हाला त्रास देऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या कामात साधेपणा ठेवायचा असेल तर तेच काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, ज्यामध्ये तुम्हाला लगेच फायदा मिळत नाही.
🏹 धनु 
धनु राशीच्या लोकांना आज पैसा मिळवण्यासाठी सरळ मार्गावर चालावे लागेल. यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब करू नका. व्यवसायात तुम्हाला जो तोटा सहन करावा लागत आहे, त्यासाठी तुम्ही तुमची जुनी कार्यपद्धती अवलंबणे अत्यंत आवश्यक आहे, असे केल्याने उत्पन्नाच्या दिवशी तुम्हाला होणारे नुकसान यामुळे टळू शकते.

🦐 मकर 
आज मकर राशीच्या लोकांमध्ये उर्जेचा भरपूर संचार होईल. सुट्टी असूनही बरीच कामे पूर्ण करावीशी वाटेल. पण तुमच्या कामाच्या ठिकाणी काम बाकीच्या ठिकाणी आहे त्या गतीने होणार नाही. तुम्हाला सर्वकाही तुमच्या नियंत्रणाखाली घ्यावे लागेल. तरच कामाला गती येईल.
🍯 कुंभ 
कुंभ राशीच्या लोकांना आज वाटेल की त्यांनी एकांतात थोडा वेळ घालवावा. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीमुळे जास्त पैसे खर्च करावे लागतील. आरोग्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकणार नाही.

🦈 मीन 
मीन राशीच्या लोकांना आज पैसे कमवण्याचे अनेक मार्ग दिसतील. तथापि, तुमचे सहकारी आणि भागीदार या वस्तुस्थितीवर भिन्न असू शकतात की कमाई करण्याचा कोणताही मार्ग वाईट नाही. हे देखील लक्षात ठेवा की कोणत्याही स्पर्धेत विजेते आणि पराभूत आहेत.

सोयाबीन, कापूस उत्पादकांना योग्य हमीभाव द्या !

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

नागपूर : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. योग्य हमीभाव देऊन आणि निर्यात धोरणात योग्य तो बदल करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठविले आहे.

हमीभाव वाढवण्याची गरज

राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी येते. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला 8 हजार 700 आणि कापसाला 12 हजार 300 रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी कृषिमंत्री सत्तार यांनी पत्रात केली आहे .

पत्रात या केल्या मागण्या

या पत्रात प्रामुख्याने योग्य हमीभावासह सोयाबीन ढेपीच्या निर्याती संदर्भात धोरणात बदल करावा, निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासह सोयाबीनच्या वायदे बाजारावरील बंदी उठवावी, सोयाबीन वरील 5 टक्के जीएसटी रद्द करावा, खाद्य तेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावा, कापसाचे आयात शुल्क 11 टक्के करावे, कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी या मागण्यांचाही पत्रात उल्लेख आहे.

आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते.
अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आता देशातील कुठल्याही भागातून मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. 
रिमोट मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आयोगाने तयारी केली आहे. त्यामुळे कुठूनही मतदान करता येणं शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यांकडून याबाबत मतं मागवली आहेत. 31 जानेवारीपर्यंत लिखित स्वरुपात यावरचं मत राज्यांना द्यायचं आहे. तर 16 जानेवारीला 8 राष्ट्रीय पक्ष आणि 57 प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला मागून धडक


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : वणी-यवतमाळ राज्य महामार्गांवर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज रोजी गुरुवारला साडे सात वाजताच्या दरम्यान, घडली असा कयास आहे.
गणेश बापुराव गुंजेकार (35) रा.बुरांडा (ख) असे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेश हे गवंडी काम करतात, परंतु तो आज वेगळ्या काही कामासाठी वणी येथे गेला असता तेथील काम आटोपून दुचाकीने गावाकडे कडे परत येत असताना वणी यवतमाळ महामार्गांवरील गौराळा फाट्यापासुन काही अंतरावर वणी कडून यवतमाळ कडे जात असलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला जावून आदळला. यात त्याला गंभीर मार लागल्याचे समजते. दरम्यान,घटनास्थळावरून अज्ञात वाहनासह वाहनचालक पसार झाला. अपघातग्रस्ताना लगेच उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.
सदर घटनेच्या अनुषंगाने काल घडलेल्या घटनेची आठवण ताजी असून वणी यवतमाळ राज्य महामार्गांवरील अज्ञात वाहनाच्या घटनेत दिवासेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. काल बुधवार रोजी वणी वरून साळ्याचे लग्न सोहळा आटोपून मारेगाव कडे जावई लग्न घरी परत येत असतांना नेमका आज घडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर गौराळा फाट्यावर पुन्हा आज दुचाकीचा अपघात घडला.
भरधाव वाहन चालवणे, रस्त्यावर ट्रक उभे ठेवणे, कट मारून पळ काढणे असे सर्रास घटनाबाबत ऐकण्यात येत असून हे प्रकार थांबेल की नाही असे चर्चील्या जात आहे.

गतिरोधकाच्या मागणीसाठी व्हॉईस ऑफ मिडीया संघटना सावली तर्फे तहसीलदारांना निवेदन

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : व्हॉईस ऑफ मीडिया संघ सावली तालुका यांच्या वतीने गडचिरोली–सावली–मुल मार्गावर तसेच सावलीच्या अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक लावण्यात यावा यासाठी सावली चे तहसीलदार परिक्षीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

तसेच सततचे होणारे अपघात आणि अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही मागणी रास्त आहे असे त्यांनी सांगितले. वरिष्ठांची चर्चा करून गतिरोधकाची समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिले.

निवेदन सादर करतांना व्हॉईस ऑफ मिडिया चे अध्यक्ष प्रवीण झोडे,कार्याध्यक्ष प्रा.गायकवाड,उपाध्यक्ष डॉ.शेखर प्यारमवार,सरचिटणीस नासीर अन्सारी, सह.सरचिटणीस उमेश गोलेपल्लीवार,कोषाध्यक्ष नितीन गोहणे,कार्यवाहक रुपचंद लाटेलवार,संघटक टिकाराम म्हशाखेत्री,प्रसिद्धी प्रमुख सौरव गोहणे आणि सदस्य चंद्रकांत प्रधाने उपस्थित होते.

मैत्री कट्टा तर्फे महिलांकरिता खास आगळी मोफत संधी

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेला ढोलताशा ची कमान आता महिलांनीही हाती घेतल्याच दृश्य अलीकडे मोठमोठ्या महानगरात बघावयास मिळते.

मारेगावातही महिलांना असंच हक्काचं व्यासपीठ मिळावं ह्या उदात्त हेतू ने मारेगांव मैत्री कट्टा गृप ने महिलांचा ढोलताशा पथक तयार करण्याचं मानस दाखवत नव्या वर्षात हिरकणी ढोलताशा पथक तयार करण्याचं ठरवलं. यात होतकरू हौशी निवडक तरुणी, महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येणार आहे आणि तेही मोफत.
 मारेगावात प्रथमच ही आगळी संधी उपलब्ध होत असतांना हौशी महिलांनी या संधीचं सोनं करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोजक्याच रिक्त जागेसाठी इच्छुक महिलांनी ह्या संधीचा लाभ घेण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दिपक जुनेजा - 8830897245
उदय रायपुरे - 7020615358
बिना दुपारे - 9356035463
प्रतिभा डाखरे - 8999515506
मीरा दुपारे - 9850197557

'पुष्पा'च्या घराला आग; कायर येथील घटना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मौजे कायर येथील पुष्पा अर्जुन आवारी यांच्या घराला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना आज दि.29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता च्या सुमारास घडली. 

वणी तालुक्यातील कायर येथे वास्तव्यास असलेल्या पुष्पा अर्जुन आवारी ह्यांच्या घराला आज सकाळी अचानक आग लागली, आगी मध्ये घरातल्या जीवनाश्यक वस्तू जळून राख झाल्या आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही.

पुष्पा यांच्या घराला आग शॉट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, या आगीत सौ आवारी यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले अशी माहिती संबंधित विभागाने दिली आहे. 

गोडावून मधून दीड लाखांचा कापूस पळवीला

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

मुकुटबन : गेल्या काही दिवसापासून या परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुरदेवी शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतात शिरून 20 क्विंटल कापूस लंपास केला.

झरी तालुक्यातील बोपापूर येथील रहिवाशी रवी प्रभाकर ढेंगळे यांचे सुरदेवी शिवारात शेत आहे. ढेंगळे यांनी त्यांच्या शेतात निघालेल्या कापूस शेतातीलच गोडावून मध्ये ठेवला होता. 26 डिसेंबर च्या सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी हे गोडावून फोडून दीड लाख रुपये किमतीचा 20 क्विंटल कापूस लंपास केला.

याबाबत रीतसर मुकुटबन पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आली असून, पुढील तपास मुकुटबन पोलीस करित आहे. 

सोनापूर येथील होतकरू युवा व्यवसायिकाचा अपघाती मृत्यू

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील सोनापूर येथील होतकरू व्यावसायिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.28 डिसेंबर बुधवारला सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान,वणी-यवतमाळ महामार्गांवरील गौराळा फाट्यावर समोर घडली.
विनोद किसन परचाके (46) असे अपघातात ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे. वणी वरून साळ्याचे लग्न सोहळा आटोपून दुचाकीने ते मारेगाव ला येत असतांना वाटेत ढाब्या च्या समोर अज्ञात वाहनाने चांदेकर (मारेगाव) यांचे जावई विनोद परचाके (सोनापूर) यांच्या वाहणाला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची वार्ता कळताच लग्न घरी दुःखाचे डोंगर कोसळले.
विनोद यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

तालुक्यात अज्ञात वाहनाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवाशी, दैनिक ये-जा करणाऱ्यांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. 

मुकूटबन येथे साप्ताहीक धावणाऱ्या रेल्वे गाड्याच्या थांबा देण्यात यावा - उपाध्यक्ष सुरेन्द्र गेडाम

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : मुकूटबन हे झरी जामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन परीसरातील लहान मोठे गावे मुकुटबन ला जोडलेले आहेत. मुकुटबन येथे बिर्ला सिमेन्ट कारखाना तसेच कोल माईन्स, डोलोमाईटच्या खाणी आहेत. मुकूटबन येथे मोठ्या प्रमाणात दुसऱ्या राज्यातील लोक कामानिमीत्य व शिक्षणासाठी राज्यात व बाहेर राज्यात जात असतात अशा वेळी व्यापारी व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मुकूटबनला साप्ताहीक धावणाऱ्या रेल्वे गाड्याचा तसेच नंदीग्राम एक्स्प्रेसचा थांबा देण्यात यावा अशी मागणी तालुका युवक कॉंग्रेस कमेटी कडून करण्यात येत आहे. 

संत्रा गाच्छी (12767) एक्सप्रेस कलकत्ता ते नांदेड, दिक्षाभुमी एक्सप्रेस (11045) धनबाद ते कोल्हापुर, पुर्णा - पटना ( 17610 ) पटना ते पुर्णा तसेच काजीपेठ - दादर (07196 ) धावते. अशा साप्ताहीक गाड्यापैकी सर्वच गाड्याचे थांबा मुकुटबन स्टेशन ला दिले तर झरी जामणी तालुक्यातील नागरीकाच्या फायदा होईल. तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस (11401) जी कोरोना पासुन फक्त अदिलाबाद पर्यंत येते तिला सुद्धा नागपुर पर्यंत सुरु करून मुकुटबन येथे थांबा देण्यात यावा. तसेच मुकूटबन येथे रेल्वे स्टेशनची मोठी व सुसज्य इमारत बांधण्यात आली आहे तिथे रेल्वेने आरक्षण काऊन्टर सुरू करण्यात यावे जेणेकरून तालुक्यातील लोकांना आरक्षण करण्यासाठी वणी किंवा अदिलाबाद जाण्याची गरज पडणार नाही. या सर्व बाबीवर रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. असे आवाहन झरी जामणी तालुका कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष सुरेन्द्र गेडाम यांनी केले आहे. रेल्वे थांबत नसल्यामुळे लोकामध्ये मोठा रोष निर्माण होत आहे या रेल्वे गाड्या मुकूट बन येथे थांबल्या नाहीत तर भविष्यात मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका युवक कॉंग्रेस कमेटी कडून देण्यात आला आहे.


शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा- युवक काँग्रेसची मागणी


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : तालुक्यातील 8074 शेतकन्यांनी पिक विमा काढला व 7006 शेतकऱ्याचे पिकांचे पंचनामे झाले आहे. पिक विमा सर्व शेतकऱ्यांना सरसकट व पंचनामा झालेल्या शेतकरी व पंचनामा न झालेले शेतकरी यांना विमा मिळावा यासाठी दिनांक 16 डिसेंबर रोजी तहसीलदार यांना युवक काँग्रेस कडून निवेदन देण्यात आले होते पण अजुनही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. यासाठी तहसीलदार झरी जामणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका समन्वय एग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआयसी), पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.

झरी जामणी तालुका युवक काँग्रेस कडून तहसीलदार यांना निवेदन दिले होते. तहसील प्रशासना कडुन मदती बाबत व कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तरी याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाले येणाऱ्या काळामध्ये अशीस परिस्थीती झाल्यास शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण होईल. झरी जामणी तालुक्यातील आणेवारी 50% आत आहे. ओला दुष्काळ सुध्दा जाहीर झाला व मागील तिन वर्षीचे आनेवारी 50% आत आहे. तरी मागील वर्षी खुप कमी प्रमाणात विम्याची रक्कम व या वर्षी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. सतत जर तिन वर्ष 50% आत आनेवारी असेल तर पिक विम्याची रक्कम जेवढा काढला तेवढा 100% मिळाले पाहीजे आणी त्वरीत मिळाले पाहीजे. बाजुच्या तालुक्याला भरपुर पिक विमा मिळतो आम्हाला का मिळत नाही, आमचा आदिवासी तालुका आहे. गोरगरीब शेतकरी आहे. खुप पावसाळा झाला शेताचे अतोनात नुकसान झाले तक्रार केल्यानंतर 24 तासाच्या आत पंचनामे करायला पाहीजे तसे न करता 15 दिवसांनी पंचनामा करायचा आणी नुकसानीची पातळी कमी दाखवायची जेणे करुन पिक विमा कमी मिळाला पाहीजे. कारण गरीब शेतकन्यांना ऑनलाईन समजत नाही.

तालुक्यातील पाचही मंडळांना पिक विमा मिळाला पाहीजे कारण मागील वर्षी काही मंडळे सोडण्यात आली तसे झाले नाही पाहीजे व मागील सोडलेल्या सर्व मंडळांना पिक विमा मिळावा. प्रशासनाला निवेदन देऊनही काही होत नाही माझ्या गरीब शेतकरी 8074 लोकांनी पिक विम्याचे पैसे किती भरले व केंद्र शासन किती भरले हा सर्व पैसा कंपणीच्या खिशात गेला आहे. याकडे कोण लक्ष्य देणार आहे. झरी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव या यवतमाळ जिल्यातील तालुक्यांना पिक विमा मिळाला नाही आणी जिल्यातील सर्व तालुक्यांना मिळाला अशी माहीती AIC कंपणीकडुन मिळाली या 5 तालुक्यांना पिक विम्यापासुन वंचीत ठेवण्यामागे का कारण तेलंगाणा राज्यामध्ये शेतकार्यांना वेळोवेळी सरसकट बियाणे लावल्या पासुन तर पिक निघे पर्यंत टप्या टप्याने अनुदान दिले जाते. तेलंगणा सरकारकडुन व आपल्या सरकारकडुन व शेती विमा कंपनीकडुन आम्ही भरलेल्या पिक विम्याची रक्कम आम्हाला मिळाली पाहीजे. हक्काची मिळाला ऐवढा का उशीर होतो. पण तेलंगाना सरकारकडुन कोणतीही अट न लावता सरसकट शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. त्याच प्रकारची मदत महाराष्ट्रातील सर्व शेतकन्यांना मिळाली पाहीजे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000/- रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार होते अजुन पर्यंत जमा झाले नाही त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुर्रेवार, दिग्रसचे सरपंच व तालुका सरपंच संघटनाचे अध्यक्ष नीलेश येल्टीवार, राहुल धांडेकर, हरिदास गुर्जलवार, संतोष जंगीलवार, गंगाधर आत्राम, रमेश संकसनवार, प्रतिक गंड्रतवार, राकेश गालेवार, चेतन मॅकलवार, नितिन खडसे, श्रीकांत आनुकुमवार, शंकर आकुलवार यांनी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यासह आम्ही दि. २ जानेवारी पासून आमरण उपोषणास बसण्याचा व या सर्व प्रकाराला प्रशासन व पिक विमा कंपनी जबाबदार राहील. असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

देवाळा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील देवाळा येथे एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची आज सकाळी नऊ वा.च्या दरम्यान, घटना उघडकीस आली. सदर घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच गावात शोककळा पसरली आहे.

जनार्दन कवडू महाकुलकर (38 वय) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जनार्दन हे वडिलांच्या नावावर असलेल्या पाच एकर शेत जमिनी वर आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करायचे, त्यातच यंदाच्या अस्मानी सुलतानी संकटाने आर्थिक अडचण, शिवाय डोक्यावर कर्जाचे ओझे यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या जनार्दन ने इतके टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या अशा निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याला मारेगाव येथे रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. 

जनार्दन यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

तालुक्यात सतत आत्महत्या होत आहे, विविध माध्यमातून जनजागृती, आवाहनं केली जातेय.. तरी देखील शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हा विषय आणखीनच गडद होत चालला आहे.

टँकरमुक्त जिल्हा हेच जलजीवन मिशनचे यश – सचिव संजीवकुमार जयस्वाल

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत नळ देण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यात भरपुर पाऊस झाला असून धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे 2023 - 24 या वर्षात जिल्ह्यात एकही टँकर न लागल्यास जलजीवन मिशन यशस्वी झाल्याचा तो सर्वात सबळ पुरावा राहील, असे मत पालक सचिव तथा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीवकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज पालक सचिव यांनी सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. पालक सचिव यांनी स्वच्छता व पाणी पुरवठा, जलजीवन मिशन, केंद्र शासनाच्या 13 फ्लॅगशिप योजना, जलसंधारण, कृषी पंप जोडणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाचे नुकसान, पोकरा योजनेची अंमलबजावणी, प्रधानमंत्री पिक विमा योजना, आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या योजना, आदींचा आढावा घेतला. यावेळी आढावा घेताना ते म्हणाले, जल जीवन मिशन ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे.

सन 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळ पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासन यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या योजनेची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी. भविष्यात जिल्ह्यात एकही टँकर लागणार नाही या दृष्टीने ही योजना यशस्वीपणे राबवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पिण्याचे पाणी, हॅन्डवॉश स्टेशन, शोष खड्डे आणि स्वच्छता इत्यादी व्यवस्था करण्यात यावी. जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रस्ताव शासन स्तरावर पाठवावे त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे श्री जयस्वाल म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा मागे आहे. शहरातील आवास योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची जेवढी मागणी आहे तेवढे सर्व प्रस्ताव पाठविण्यात यावे. यासाठी स्वतः पाठपुरावा करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री आरोग्य योजनेतील गोल्डन कार्डसाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी लोकांच्या सोयीनुसार शिबीर लावावे. तसेच पिक विमा योजनेचा वारंवार आढावा घेण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलजिवन मिशनचे सादरिकरण केले. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

उमानदीघाट (रत्नापूर) येथे भव्य धम्म मेळावा थाटात संपन्न


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : जागतिक महिला मुक्ती दिन व आठवा वर्धापन दिन कार्यक्रम "धम्म भूमी विकास समिती", रत्नापुर, नाचनभट्टी, शिवणी, नउमानदीघाट येथे "भव्य धम्म मेळावा"आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या चंद्रपुर (पुर्व) जिल्हा शाखेचे अध्यक्ष डाॅ.राजपाल खोब्रागडे यांनी भुषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, तसेच राष्ट्रीय सचिव व धम्मयान मासिकाचे सह संपादक बी.एम कांबळे मुबंई यांनीही मार्गदर्शन केले जगदीश गवईस उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आज भारतातील तमाम महिला सुशिक्षित झाल्या, सर्व दृष्टीने संपन्न झाल्याचे दिसते, त्यामध्ये परम पूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या त्यागाचे प्रतिबिंब पहायला मिळते. त्यांनी अत्यंत कष्टाने भारतीय संविधान निर्माण करून भारतातील तमाम जातीयवादी, वर्णव्यवस्थेला तडा दिला व सर्व मानवांची या गुलामगिरीतुन मुक्तता केली. परंतु आज येथील जातीयवादी सरकारमुळे, चुकीच्या धोरणांमुळे राज्य घटनेलाच मोठा धोका निर्माण झाला आहे.आपण सर्वच डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून या भारतीय राज्य घटनेला संरक्षण देवून ती आबाधित ठेवण्याची फार मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी संस्थेचे विदर्भ प्रदेशचे प्रमुख भीमराव फुसे, संघटक आनंदराव सायरे, नागपूर जिल्हा सरचिटणीस विलास उंदिरवाडे, महिला विभाग प्रमुख विजयाताई रामटेके यांनी देखिल समायोचित मार्गदर्शन केले.धम्मभूमि सेवा समितीचे अध्यक्ष मेश्राम यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन सभेचे अध्यक्ष डाॅ राजपाल खोब्रागडे यांनी पार पाडले. सरणतय होवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.याच ठिकाणी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमामध्ये सर्व छोट्या मोठ्या कलाकारांनी सहभाग घेतला.

१३५ कि.मी.ची. पदयात्रा करत धडकले शेतकरी


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वणी ते नागपूर 135 किलोमीटरची पदयात्रा काढून राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या मोर्चाने सोमवारी विधिमंडळावर धडक दिल्ली. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या झालेल्या नुकसानीचे त्यांनी पाढेच वाचले. या मोर्चासह ग्रामरोजगार सेवक, वीज कर्मचारी, व्यवसाय शिक्षक, बांधकाम मजूर, वस्तीगृह कर्मचारी, परिवहन कर्मचारी, आदिवासी विद्यार्थी, आंबेडकरी विचार मोर्चा, भूमिहीन शेतकरी, आदी 15 संघटनांनी मोर्चातून आपल्या मागण्या रेटून धरल्या.

महाराष्ट्र राज्य लाल बटवा शेतमजूर युनियनच्या बॅनरखाली 21 डिसेंबर रोजी वणीहून शेतकरी, शेतमजुरांचा निघालेला मोर्चा सोमवारी नागपुरात धडकला. मोर्चाला टेकडी रोडवर पोलिसांनी अडकविल्यानंतर त्यांच्ये सभेत रूपांतर झाले. धरणातील पाण्याचे व्यवस्थापन, कोळसा खाण व्यवस्थापनात उभारलेले वर्धा नदीच्या काठावरील मातीचे ढिगारे, थर्मल पॉवर स्टेशनचे राख व्यवस्थापन, जलयुक्त शिवार योजनेतील अशास्त्रीय कामे आणि पुरामुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या हानीबाबत न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करा व आपदग्रस्तांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी लावून धरण्यात आली.  
'प्रधानमंत्री पीक विमा योजने' अंतर्गत असलेले ॲडव्हान्स नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. यामुळे 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात झाल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी मोर्चाचे निवेदन महसूल मंत्री रामकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात आले. त्यांना मागन्यांसाठी मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
युनियनचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, राजन क्षीरसागर, अरुण बनकर, हिरालाल परदेशी, अनिल घाटे, हौसलाल राहंगडाले, गणेश कसबे, शिवकुमार गणवीर, राम बाहेती, अमृत महाजन, आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मागण्या : • पुरामुळे झालेली जीवित हानी व मालमत्तेच्या हानीबाबत न्यायालयीन चौकशी करून दोषींना शासन करा • आपदग्रस्तांना तत्काळ भरपाई द्या • तेलंगणाच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करा • पूर्व अतिवृष्टीमुळे बाधित पीक नुकसानीबाबत पिक विमा जोखीम रक्कम इतकी एमडीटी द्या • रकटून गेलेल्या सर्व जमिनीचे पंचनामे करा • हेक्टरी 40 हजार रुपयांची मदत करा • वनाधिकार कायद्यानुसार वनजमीनधारकांना पट्टे द्या • चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व रानटी पशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या 50 मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ताडोबा अभयारण्य सफारी बंद करा, सर्व प्रकल्पातील कालवा दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू करा, १८ तास वीज पुरवठा करा.


उद्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर कोतवाल संघटनेचा मोर्चा धडकणार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगांव : तालुक्यातील सर्व कोतवाल उद्या नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर विविध मागण्या घेऊन धडक मोर्चा काढणार असल्याबाबतचे निवेदन मारेगाव तहसीलदार दिपक पुंडे यांना देण्यात आले आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आपल्या मागण्या घेऊन अनेक संघटना सरसावल्या असतांना राज्य संघटनेच्या वतीने सुद्धा दि.28 डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढणार आहे. राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे, जिल्हाध्यक्ष शशिकांत निमसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सुरेश येरमे, तालुका उपाध्यक्ष गणेश उराडे व सचिव अतुल बोबडे यांनी सर्व कोतवालांना मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोतवाल संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून खालील मागण्या करण्यात आल्या:

कोतवालाला चतुर्थ श्रेणी प्रदान करणे, चतुर्थ श्रेणी प्रकिया पुर्ण होईपर्यंत समान काम समान वेतन नुसार १५०००/- लागु करणे, तलाठी पदभरतीत कोतवालांना २५ टक्के आरक्षण मिळणे, निवृत्ती नंतर कोतवालांना १०,००,०००/- निर्वाह भत्ता मिळणे, आदी प्रकारच्या मागण्यासाठी घेवून अधिवेशन वर धडकणार आहे.
यावेळी कोतवाल संघटनेचे सुरेश येरमे, गणेश उराडे, अतुल बोबडे, विनोद मडावी,अशोक पेंदोर, दिलीप पचारे, योगेश भट, प्रभाकर आत्राम, अमित कोयचाडे, देव मोहुर्ले, जगदीश भाऊ कनाके, व संदीप कुळसंगे आदींची उपस्थिती होती.