सरपंच संघटनेचे निवेदन, तीन दिवस काम बंद आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मौजा मस्साजोग ता. केज, जि. बीड या गावाचे माजी आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करूण निघून हत्येच्या निषेधार्थ 31 डिसें.2024 ते 02 जाने. 2025 पर्यंत पंचायत समिती मारेगाव अंतर्गत सर्व ग्रामपंचायत बंद ठेवून कामबंद आंदोलन सहभागी व्हावे अशा आशयचे निवेदन आज सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचे नेतृत्वात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्हनखंडे यांना देण्यात आले आहे.

 यावेळी तालुक्यातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ह्या सर्वांनी पंचायत समिती कार्यालय व मारेगाव पोलीस स्टेशन येथे आज मंगळवारी नमूद प्रमाणे निवेदन सादर करून तीन दिवशीय कामबंद आंदोलन पुकारले आहे.

यावेळी बहुतांश सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच महाराष्ट्र सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मारेगाव तालुक्यात रेती तस्करी वाढली, तीन ट्रक जप्त

सह्याद्री चौफेर : कुमार अमोल 

मारेगाव : दिवसेंदिवस रेती तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मारेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जात आहे. एकाच पावतीवर अनेकदा सुरू असलेल्या हा अवैध प्रकार महसूल विभागाने उघडकीस आणला असून तहसीलदार निलावाड यांच्या पथकाने रविवारी तीन ट्रक जप्त केले आहे. 

वर्धा नदी घाटातून रेती ची तस्करी सर्वश्रुत आहे. मात्र, तहसीलदार उत्तम निलावाड यांनी ही तस्करी कशी रोखता येईल यावर भर देत अनेकदा अनेक मार्गाने होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली आहेत. परंतु तरीही रेतीची तस्करी थांबलेली दिसत नाही. रात्रीच्या वेळी तर या वाहतुकीला मोठा जोर पकडलेला असतो. एकामागे एक गाड्यांची रांग लागलेली असते. एवढेच नाही तर दिवसाही बिनधोकपणे रेतीची तस्करी केली जात असल्याचे दिसून येते. हा सर्व प्रकार सामान्य नागरिकांना दिसून येतो. असे असताना प्रशासनाला दिसू नये, याचे आश्चर्य व्यक्त केले असताना रविवारीच्या रात्री तहसीलदार यांनी तीन ट्रक कोसारा परिसरातून जप्ती करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहे. वर्षाच्या अखेरीस करण्यात आलेल्या या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे.

वर्धा नदीच्या काठावर असलेल्या गावातून ही रेती रात्रीच्या वेळी ट्रक ट्रॅक्टरने मारेगाव सह ग्रामीण भागात आणली जाते. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. येथे वापरण्यात येणारी जवळपास सर्वच रेती चोरीची असल्याचे बोललं जात आहे. असे असताना महसूल विभागाने रेती तस्करी वर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. रेती तस्करी करणारे तीन ट्रक जप्त केले आहे. यामध्ये टिप्पर क्रमांक (एम.एच.29, टि.1680), टिप्पर क्रमांक (एम.एच. 13 ए एक्स 2093) आणि टिप्पर क्रमांक (एम.एच.29 टि. 1661) असा आहे. हे टिप्पर कोणाच्या मालकीचे आहेत याबाबतचा उलगडा अजुन पर्यंत झालेला नाही. ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, प्रशांत डंगारे, वाहन चालक विजय कनाके, तलाठी नाईक, कोतवाल दिलीप पचारे, कोतवाल चांदेकर, पोलिस पाटील प्रेमदास गाणार यांनी केली.

डी ए व्ही पब्लिक स्कूल नीलजई, सुंदरनगर (WCL) क्रीडामहोत्सव समारोह संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सुंदरनगर येथील डी.ए. व्ही पलीक स्कूल येथे वार्षिक क्रीडाम‌होत्सव शाळेच्या मैदानावर दि. २४ डिसेंबर २०२४ या दिवशी पार पडला.

समारोहाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विक्रम घोष', डायरेक्टर आणि डायरेक्टर प्रनिल, (डब्लू. सी. एल), श्री. ए. के. सिंह, जनरल मॅनेजर आणि सी. एस. आर, (डब्लू. सी. एल), श्री. सु. सी. गुप्ता, एरिआ जनरल मॅनेजर, (वणी नॉर्थ), श्री. ए. सी. सिंह, एरिआ जनरल मैनेजर, (वणी एरिआ), श्री. संजय मिश्रा, सबूरारिआ जनरल मैनेजर (वणी एरिआ) श्री. संजीव रेड्डी, जनरल मॅनेजर (ऑपरेशन), वणी एरिआ, एरिआ जे. सी. सी मेबर, केंद्रीय विद्यालय, न्यू साजरीचे प्राचार्य श्री. चंद्रमणी घोटे आणि पोद्वार इंटरनेशनल स्कूल, वणी येथील प्राचार्य श्री. भूषण अलोने व इतर मान्यवरांची उपस्थिती होती:

समारोहाचा शुभारंभ प्रारंभ प्रमुख पाहुण्यांच्या, हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आला. होता. त्यानंतर क्रीडा म‌होत्सवाला सुरुवात झाली. धावणे, उंच उडी, लांब उडी, भाला फेक, गोळाफेक अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या क्रिकेट, बास्केटबॉल हे सामने वर्गा-कार्यामध्ये झाले. सर्वजण विशेष कौतुकाने सामने पाहत होते. शाळेतील मुलांकडून विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले.

स्पर्धा संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांना सर्व स्पर्धकांची प्रशंसा केली. शाळेतील तीन हाऊसपैकी प्रथम विजयचिन्ह सरोजिनी हाऊसला व दृवितीय विजयचिन्ह इंदिरा हाऊसला मिळाले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले

शेवटी शाळेतील शिक्षिका श्रीमती दमयंती राम नानवानी व शाळेचे प्राचार्य मा. श्री मनोज कारेमोरे सर यांनी उपस्थितांचे, साभार मानले. राष्ट्रगीत संपल्यानंतर शिक्षकांनी क्रीडा महोत्सव संपल्याचे जाहीर केले.

घरात घुसून विनयभंगाचा प्रयत्न: आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : अंधाराचा फायदा घेत एका तरुणाने घरात घुसून 'नको त्या' प्रयत्नात असलेल्या त्या आरोपीविरुद्ध मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल होताच, त्याला लगेच अटक करून जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 
यशवंत रघु आत्राम (वय 23) रा. जानकाई (पोड) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील जानकाई (पोड) येथील तक्रारदाराच्या घराचे काम सुरु असल्यामुळे बांधकामाच्या बाजूला टिन आणि ताटव्याचे शेड मध्ये ते राहतात. रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून वडील बाजूच्या गोठ्यात झोपायला गेले.आणि दोन मुली आपल्या आजीसोबत टिन आणि ताटव्याच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या. रात्री अंदाजे 11 च्या दरम्यान, एक मुलगी लघुशंकेसाठी उठली. त्यावेळी वीज गेलेली होती. लघुशंका करून घरात येत असतांना अचानक वीज आली. त्यावेळी गावातीलच तरुण घरात घुसून नको त्या प्रयत्नात असतांनाच तक्रारदार मुलीने आरडाओरड केली. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच वडील धावत तेथे आले, तेव्हा संशयित आरोपी ह्याने पोबारा केला. 
दि. 28 डिसेंबरला सदर मुलीने आपल्या आईवडीला सोबत मारेगाव पोलीस स्टेशन ला येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा. न्या. सं. कलम 333,79 नुसार गुन्हा नोंद करून संशयित आरोपी यशवंत आत्राम याला तात्काळ अटक केली. व त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार संजय सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

भैय्याजी तोटेवार अनंतात विलीन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : भैय्याजी तोटेवार यांचं आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 74 वर्षाचे वय होते. ते पोस्ट मास्टर पदावरून सेवानिवृत्त झाले होते. पत्रकार विवेक तोटेवार यांचे ते वडील होत. 

श्री.तोटेवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं,एक मुलगी,स्नुषा व नातवंड असा बराच परिवार आहे. आज शनिवारी सायंकाळी 5 वा.स्थानिक मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

वणी शहरातील बेधुंद दुचाकीस्वारांवर तातडीने आवर घाला - अध्यक्ष रवी बेलूरकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरात बेधुंद वेगाने धुमाकूळ दुचाकीस्वारांनी मांडला असून यातून छोटे-मोठे अपघात घडत आहे. दि. 25 डिसेंबरला एल टी कॉलेज समोर एका 70 वर्षीय वृद्धाचा दुचाकीस्वाराच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या धूमस्टाईल वर तातडीने प्रतिबंधक घालण्याची मागणी वणी रामनवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बेलुरकर म्हणाले की, शहरातील मुख्य रस्त्यावर ऑटोचालकांचे थैमान सुरु आहे. सोबतच वणी शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अवैध धंदेही जोमात सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 
वरिष्ठांनी या बाबीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन या बेकायदेशीर प्रकारावर आळा घालावा, अशी मागणी पत्रपरिसदेतून रवी बेलुरकर यांनी यावेळी केली. या पत्रपरिषदेला वणी रामनवमी समितीचे कुंतलेश्वर तुरविले, संतोष डंभारे, मनोज सरमोकदम, कौशिक खेरा, आशिष डंभारे, प्रणव पिंपळे, पंकज कासावार, नितीन बिहारी, मयुर मेहता, पियुष चव्हाण, पवन खंडाळकर, कमलेश त्रिवेदी, सुरज निकुरे, निखिल एकरे, मयुर घाटोळे, नितीन बडघरे, तुषार घाटोळे, प्रणित महाकारकार, बालाजी भेदोडकर, शुभम इंगळे,आदी उपस्थित होते.
प्रशासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम
येत्या सात दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास पोलिस प्रशासनाच्या विरोधात स्वाक्षरी अभियान, धरणे आंदोलन, जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन तसेच गृहमंत्र्यांना निवेदन देण्याचे अभियान राबविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आयसर पिकअपची समोरासमोर धडक, तिघे जखमी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : काल शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताचे दरम्यान राज्यमहामार्गावरील शिवनाळा फाट्यानजीक आयसर व पिकअप वाहन एकमेकास धडकल्याने तिघे जखमी झाले, तर यातील एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. 

आयसर वाहन हे यवतमाळकडे जात होते तर विरुद्ध दिशेने पिकअप वाहन येत असतांना दोघेही एकमेकास धडकले. यात आयसर वाहनातील साहील शेख अमीर (19), सय्यद युसूफ शेख (45), शेख मोहम्मद शेख जमील (32) तिघेही रा. वणी हे जखमी झाले. 
यातील सय्यद युसूफ शेख गंभीररित्या जखमी झाल्याने तातडीने त्यांना जिल्हास्थळी हलविण्यात आले.
घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

विहिरीत आढळला विवाहित तरुणाचा मृतदेह

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील एका शेतातील विहिरीत 42 वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह झाल्याची घटना गोंडबुरांडा येथे घडली.

अमोल भदुजी पारखी रा.गोंडबुरांडा असे विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. 

अमोल हा गुरुवार दि. 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मक्त्याने केलेल्या शेतात तो गेला होता. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बैल हे स्वत:च घरी चालून आले परंतु अमोल काही हा घरी आला नसल्याचे समजते.त्यामुळे त्याचा शोध घेतला असता ठेक्याने केलेल्या शेजारील शेतात असलेल्या विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला. तो तिथे कसा पोहचला हे मात्र संशोधनाचा विषय असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जमादार दिगांबर किनाके करीत आहे.

मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू, केगांव येथील घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यात काही भागात अवकाळी पाऊस होऊन वीजा कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला.ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

मेघा गणपत पाणघाटे (वय 45) रा. केगांव असे थेट अंगावर विज पडून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अचानक वातावरणात बदल झाला अशातच त्या शेतातून घरी परतत असताना त्यांचे अंगावर वीज पडून मयत झाल्या आहे. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून मृतदेह शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. 

मृतक महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आहे. 


भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमीत्य मारेगाव येथील पक्षाचे कार्यालयात कार्यकर्ते व सहानुभुतीदारांचा स्नेहमेळावा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी महोत्सवा निमित्ताने दि 26 डिसेंबर 2024 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मारेगाव येथील पक्ष कार्यालयावर कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. दि. 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर उत्तरप्रदेश येथे स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 99 वर्षे पूर्ण होऊन 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 

शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्ष सभासद व त्यांचे कुटुंबीय तसेच समाजवादी, आंबेडकरवादी, कामगार - कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी - युवक, साहित्यीक - सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, वकील,सहानुभूतीदार, धर्मनिरपेक्ष पक्ष तथा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कार्यालयावर शहराचे लक्ष वेधेल अशी‌ रोषनाई करण्यात आली.काॅ.अनिल हेपट यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. लाल झेंड्याला सलामी दिल्यांनंतर मेळावा झाला.अध्यक्षस्थानी काॅ.मोतीराम धनरे होते.तर अतिथी म्हणुन काॅ.अनिल हेपट,अनिल घाटे,वासुदेव गोहणे,बंडु गोलर,प्रविण आडे,अॅड.संजय मडावी, अॅड.मेहमुद खाॅ.पठाण,गणेश कळसकर,पंढरी मोहीतकर,तालुका सचिव विलास ढुमणे होते.प्रस्तावना अनिल घाटे यांनी,संचालन बंडु गोलर यांनी तर आभार‌ प्रदर्शन प्रविण आडे यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

चर्मकार महासंघाच्या वतीने सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दि.15 फेब्रुवारी 2025 ला सामूहिक भव्यदिव्य विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार संघाचे विदर्भ अध्यक्ष संभा वाकुजी वाघमारे यांच्या सुबक संकल्पनेतून करण्यात येत आहे. 
समाजातील युवक युवतीनी तसेच इच्छुकांनी सामूहिक विवाह सोहळ्यात आपले नावाची नोंद दि.१५ जानेवारी २०२५ पुर्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले असून या विवाह सोहळ्याला नाव नोंदविण्यासाठी ८६५७४१२३८९ ९९२२९५६९५६,९७६३५७८४३३, ७६६६०८९३२७ या क्रमांकावर परिसरातील युवक-युवतींनी संपर्क साधण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे यांनी केले आहे.




थोर संताच्या पुण्यतिथी निमित्त मोहदा येथे विविध कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी :  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी व थोर समाज सुधारक राष्टसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मोहदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावात पहाटे 5 वा.ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली.त्यानंतर पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. दरम्यान, श्री गुरुदेव भजन मंडळ, महिला भजन मंडळ तसेच पदावली भजन मंडळानी सहभाग घेतला होता. पुण्यतिथी निमित्ताने गावातील पुरुष महिला बालक एकत्र होत पुढील कार्य सोहळ्यास सुरुवात झाली. राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहल्या नंतर 6 वा.सामुदायिक प्रार्थना झाली. दिवस भर विविध कार्यक्रम संपन्न झाल्यावर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा लाभ घेत या कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, श्री दत्त गुरुदेव पदावली भजन मंडळ, जय हनुमान भजन मंडळ,व समस्त ग्रामवासी मोहदा उपस्थित होते.

बळीराजा व्याख्यानमाला २०२४ चे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
                           
वणी : शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष.२०१५ पासुन प्रारंभ झालेल्या या व्याख्यानमालेला सुरुवातीपासूनच श्रोत्यांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही व्याख्यानमाला बौद्धिक मेजवानीत रस घेणाऱ्या सुजाण श्रोत्यांनी स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीतून आयोजित करण्यात येते. 
          
यावर्षी ही व्याख्यानमाला २८ व २९ डिसेंबर २०२४ रोज शनिवार व रविवार ला बाजोरिया लॉन येथे पार पडेल.सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होणाऱ्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेला प्रख्यात साहीत्यिक प्रा.रंगनाथ पठारे संबोधित करतील.पहिल्या दिवशीचे स्मृतीपुष्प रामचंद्र जागोजी सपाट यांना समर्पित असुन "सामाजिक वास्तव: काल आज आणि उद्या" या विषयावर विचारमंथन होईल.तर नारायणराव सांबशिव देवडे यांना दुसरे दुसऱ्या दिवशीचे स्मृतीपुष्प समर्पित असुन "साहित्य कशासाठी?" या विषयांवर पठारे संबोधन करतील.दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजन समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रशासकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

दरवर्षी प्रमाणेच श्रोत्यांनी याही वर्षी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा बौद्धीक आस्वाद घ्यावा.असे आवाहन शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपुत,निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी वणीकरांना केले आहे.

वाहनांशी संबंधित नियमांत बदल,न पाळल्यास भरावा लागेल 'इतका' दंड!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) {नंबरप्लेट} बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2025 पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल. जर नियम पाळला नाही तर 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.  

काय आहे HSRP?
HSRP म्हणजे हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही प्लेट
- विशेष ॲल्युमिनियमपासून बनवलेली असते.  
- परावर्तित रंगांचा वापर करते, त्यामुळे रात्रीही सहज दिसते 
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज ट्रॅक केली जाऊ शकते   
- अशोक चक्र आणि 'INDIA' लोगो यावर मुद्रित असतो 

जर HSRP नसली तर काय होणार?
- मोटार वाहन कायद्यांतर्गत ₹10,000 चा दंड आकारला जाईल.  
- वाहन नोंदणी किंवा पत्ता बदलणे यासारख्या सेवा बंद केल्या जातील   
- चोरी झालेली वाहने शोधण्यात अडथळे येतील 

HSRP बसवण्यासाठी किती खर्च? 
- दुचाकी/ट्रॅक्टर– ₹450  
- तीनचाकी वाहन– ₹500  
- प्रवासी वाहन – ₹745  

HSRP कुठे बसवायची?
आरटीओने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीकडूनच ही प्लेट बसवली जाईल. वाहन तपशीलांची पडताळणी करून योग्य क्रमांक प्लेट दिली जाईल.  

 महत्त्वाच्या तारखा:
2029 पूर्वीच्या वाहनांना सुद्धा HSRP बसवणे बंधनकारक
- 31 मार्च 2025: सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक.  
- 1 एप्रिल 2025: नियम लागू; पालन न करणाऱ्यांना दंड 

HSRP उपक्रमाचा उद्देश:
- वाहनांची सुरक्षा वाढवणे 
- चोरी गेलेल्या वाहनांना परत मिळवणे.  

HSRP बसवा आणि नियमांचे पालन करा; सुरक्षित आणि जबाबदार वाहनचालक बना! 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई : राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज ऊपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख ऊपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज ऊपलब्ध होणार आहे. तसेच शासनावरचा बोजा देखील कमी होणार आहे. सध्या आपण राज्यातील शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचे काम आपण दोन वर्षापासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठीचे मोफत वीज योजना ही सरकारवर बोजा राहणार नाही आणि शेतकऱ्यांना दिवसाही वीज ऊपलब्ध होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उंबरठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मच्छिन्द्रा गटग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मच्छिन्द्रा गट-ग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्याचा उद्देश पेसा ग्रामपंचायतींतर्गत पेसा गावांमध्ये पेसा कायद्याविषयी जनजागृती करावी, नागरिकांपर्यंत पेसा कायद्याची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे, नागरिकांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पेसा दिवस साजरा करावा या बाबत जनजागृती करण्यात आली.
त्यामध्ये ग्रामपंचायत चे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पेसा अध्यक्ष, व इतर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट, मोबाईलायजर आदी कर्मचारी व गावातील नागरिक आणि महीला वर्ग उपस्थीत होते.

सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली, त्यानंतर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. शाळेतील मुलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन, मार्गदर्शन व आभार प्रदर्शन सचिव श्री.एम ए तिरपूडे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतची सभा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

खैरी रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा; ग्रामवासीयांनी आंदोलन छेडून केली मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : खैरी स्टॉप ते वरोरा कडे जाणाऱ्या सिमेंट रोडचे अर्धवट काम तत्काळ सुरु करा, यामागणीला घेऊन खैरी ग्रामस्थांनी आज मंगळवारला सकाळी 11 वाजता नमूद रस्त्यावरच आंदोलन सुरु केले. यावेळी किमान एक तास वाहतुक कोलमडली होती.

गेल्या दिड वर्षांपासुन खैरी गावाच्या मुख्य मार्गाचे काम अतिशय संथगतीने आहे. त्यामुळे खैरी गावातील शाळेतील विद्यार्थी, शेतकरी, तसेच वाहनचालकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत होता,रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात होऊन किरकोळ दुखापतीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना पण येजा करावी लागत असल्याने अनेकदा मोठ्या वाहनांचे चाक रस्त्याच्या खाली उतरुन रस्त्यावरील रखडलेली गिट्टी विद्यार्थ्यांच्या डोक्याला लागत असल्याची ओरड होत असल्याने सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागाकडून काम विलंब होत असल्यामुळे संथगतीने होणारे रोडचे काम हे जलद गतीने करून लवकरात लवकर रोडचे काम पूर्ण करण्यात यावे,या मागणीसाठी खैरी गावातील ग्रामस्थांनी आज चक्क रोडवर बसुन "चक्काजाम आंदोलन" करण्यात आले. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी आंदोलनास भेट देऊन रोडचे काम हे सुरु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन जोरदार मागणी केली होती. 

माजी आमदार बोदकुरवार यांच्या मुळे शेतकऱ्याचा कापूस खरेदी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथे सी.सी.आय कडून कापूस खरेदी सुरू आहे. दिनांक 23 डिसेंबरला शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर कापूस विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत गाड्या आणल्या होत्या. दिवसभर खरेदी होवूनही सायंकाळ पर्यंत 150 ते 200 गाड्या बाजार समितीच्या आवारात उभ्या होत्या. वेळ झाल्यामुळे सी.सी. आय. ने खरेदी बंद केली. ही बाब माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना समजताच त्यांनी बाजार समिती गाठून वरिष्ठांशी बोलणी करून तत्काळ कापसाच्या गाड्या खरेदी करायला लावल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज सी.सी. आय. ठरलेल्या वेळेपर्यंतच कापूस खरेदी करते. परंतु खेड्या - पाड्यावरून आलेल्या शेतकऱ्यांना येथे बाजार समितीत कापसाच्या गाड्यासह मुक्काम करणे अतिशय त्रासदायक आहे. काल शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या बाजार समिती परिसरात उभ्या असल्याची माहिती मिळताच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सायंकाळी 6 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. तिथे शेतकरी बांधवांच्या अवस्था पाहून त्यांनी लगेच अकोला झोनचे मुख्य व्यवस्थापक निरज कुमार यांच्याशी संपर्क साधून सी.सी.आय. ने कापूस खरेदी सुरू करून बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या शेतकरी बांधवांच्या गाड्या सोडण्यात याव्या याविषयी विनंती करून वणी केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्वरित 10 मिनिटात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायला भाग पाडले. यावेळी उपसभापती विजय गारघाटे,सतीश दोरखंडे उपस्थीत होते.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे या परिसरात असलेल्या शेतकऱ्याची होणाऱ्या हाल अपेष्टा पासून सुटका मिळाली. सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार बोदकुरवार यांचे मनापासून आभार मानले.

सौ. तृप्ती उंबरकर यांच्या वाढदिसानिमित्त वृक्षारोपण


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य, प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल. 

वृक्षारोपण वृक्षसंवर्धन "एक वृक्ष आरोग्य स्वस्थ" चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया. ही संकल्पना घेऊन मनसे नेते राजू उंबरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. तृप्ती उंबरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मनसे परिवाराला सोबत घेऊन शहरातील देशमुख वाडी, विठ्ठलवाडी या भागात वृक्षारोपण करण्यात आले. मनसे परिवारातील प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाला असे अभिनव उप्रकम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून सौ. उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले..

या प्रसंगी मनसे परिवारातील असंख्य महिला व सदस्य उपस्थित होते..

आपण आपल्या समाजाला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून वाचवू शकत नाही - जसिंता केरकट्टा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : आदिवासी समाजाचे अस्तित्व व निसर्ग वाचवण्यासाठी स्वराज्यासाठी सक्षम होण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावे लागेल. केवळ नाव आणि प्रतिष्ठा मिळवून आपण आपल्या समाजाला वाचवू शकत नाही.असे प्रतिपादन विचारवंत, पत्रकार तथा कवियत्री जसिंता केरकट्टा ह्यांनी केले. 

आपल्याला समाजात जावं लागेल व त्यांना भेटावं लागेल. त्यासाठी वाचन, लेखन, घडवण्याची, संघटित होण्याची, आपल्यातील कमतरता आणि बलस्थाने ओळखण्याची गरज आहे. वडगाव रोड सहकार सांस्कृतिक भवन, यवतमाळ येथे 'तिसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कवियत्री केरकट्टा बोलत होत्या.

साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक वसंत कनाके, प्रब्रह्मानंद मडावी, डॉ. संजय जी लोहकरे, डॉ.अरविंद कुळमेथे, बाळकृष्ण गेडाम, शीतलताई ढगे, राजू मडावी, शंकर मडावी, कुसुम अलाम, विद्याताई परचाके, कनाके, पैकू आत्राम, ऍड. अरविंद सिडाम आदी उपस्थित होते.

या प्रसंगी विचारवंत, पत्रकार तथा कवियत्री जसिंता केरकट्टा (झारखंड) यांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना जसिंता केरकेट्टा म्हणाल्या की, विकास आणि धर्माच्या नावाखाली आदिवासींचा बळी देणारी मोठी व्यवस्था ओळखण्याचीही गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासींनी एकत्र येण्याची गरज आहे. चांगल्या जगाची स्वप्ने पाहणाऱ्या सर्व लोकांना जुडण्याचे आणि जोडण्याचे मार्ग देखील आपण शोधले पाहिजेत. यावेळी त्यांनी या साहित्य परिषदेला शुभेच्छा देत आयोजकांचे मानले. त्यानंतर इतरही मान्यवरांचा सत्कार व आपापले विचार मांडले. या 'तिसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेला राज्यभऱ्यातून मान्यवर व साहित्य प्रेमी उपस्थित होते.

डॉ.आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात निषेध मोर्चा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : डॉ. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दि. 23 डिसें. 2024 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, वणी तालुक्याच्या सदस्यांनी उपविभागीय कार्यालय वणी गाठले व तीव्र शब्दात निषेध करत गृहमंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली. आज सोमवारी महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या बाबत निंदनीय वक्तव्य केले. त्यामुळे जगभरातील आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी व तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सर्वांनी एकाच आवाजात केली असून निदर्शने केली. त्यांनी महामहिम राष्ट्र्पती व पंतप्रधानांना एक मागणी पत्र दिले.

संताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी वणी, आंबेडकरी विचार मंच, भीम टायगर सेना, व विविध सामाजिक संघटना आदींचा समावेश होता.


राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात गणित दिनाचे आयोजन करण्यात आले. 
गणित अधिक मनोरंजन व सोप्या पद्धतीने कसा शिकवला जाऊ शकतो व गणित विषय व्यावहारिक जीवनाशी कसा संबंधित आहे हे विविध उपक्रम व कृतिद्वारे याप्रसंगी दर्शविण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी सर होते तर, प्रमुख अतिथी म्हणुन मराठी विज्ञान परिषद वणी विभागचे अध्यक्ष प्रा.महादेवराव खाडे होते.त्यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर व कार्यावर माहिती दिली. 
गणितातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने सादर करण्यात आल्या विद्यार्थ्यांकडून कोडी उखाणे म्हणी यांच्या साह्याने गणित कसे शिकवल्या जाऊ शकते याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तसेच अध्यक्षीय मार्गदर्शनान पारखी सर यांनी गणीतातील संबोध सोपे कसे करता येईल व मनोरंजनातुन शिक्षण या बाबीवर प्रकाश टाकला. सर्व विद्यार्थ्यांनी याप्रसंगी उस्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अनिता टोंगे, संचालन श्री तुषार गाणे तर आभार प्रदर्शन सौ श्रेया ढवस यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.

अपघातात पत्नी ठार तर,पती गंभीर



सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : नांदेपेरा मार्गांवर दुचाकीला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली तर, पती गंभीर जखमी झाले असून त्याचे वर नागपूर येथे उपचार सुरु आहे. ही घटना रविवारी २२ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.

शुभांगी पुंडलिक वऱ्हाटे (वय अंदाजे ४८ वर्षे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर महिलेचा पती पुंडलिक वऱ्हाटे (वय अंदाजे ५५ वर्षे) या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे.ते वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील रहिवाशी आहे.

वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील हे दाम्पत्य बारशाच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील लाखापूर येथे आले होते. लाखापूर येथे नातेवाईक हरिभाऊ बल्की यांच्या कडील कार्यक्रम आटोपून ते पती-पत्नी हे दुचाकीने आपल्या स्वगावी परत जात असतांना वणी-नांदेपेरा मार्गांवरील स्वर्णलीला शाळेच्या पुढे सोयाबीन कंपनी नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे समजते. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन हे भरधाव वेगात घटनास्थळावरून पसार झाल्याचेही बोलल्या जात आहे. 

थार नावाचे हे वाहन असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर वणी नंतर चंद्रपूर वरून नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस प्रशासनाकडून जलदगतीने शोध घेतला जात आहे. घटनेचा अधिक तपास वणी पोलीस करीत आहे.

विहिरीत उडी मारून विवाहित तरुणाची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील मांगरूळ येथील गोपाल मधुकर ठाकरे (36) या विवाहित तरुणाने गावाजवळील शेतात असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक गोपाल हा शेत कामासह मिस्त्री (स्टाईल) चे काम करत होता. रात्रभर बेपत्ता असलेल्या गोपाल ठाकरेंचा मृतदेह एका विहिरीत 3 वाजता आढळून आला. नात्यातील लोकांनी लगेंच पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. सदर तरुणाचा मृतदेह विहिरीतून वर काढला होता. मारेगाव पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह वैद्यकीय इस्पितळात शिवचिकित्सेसाठी पाठवला.

मयत गोपाल ठाकरे यांच्या पाठीमागे आई वडील,पत्नी व एक मुलगी आणि चार विवाहित बहिणी आहेत. गोपाल यांनी का विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हे कळले नाही. यासंबंधीचा तपास मारेगाव पोलिस निरीक्षक संजय साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय किसन संकुरवार करत आहेत.

विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील नांदेपेरा ते वणी मार्गांवरील नांदेपेरा चौफुली वर २१ डिसेंबर रोजी दुपारी दीड च्या सुमारास विना परवाना वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण परिसरातून तसेच नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होऊनही महसूल विभाग किरकोळ कारवाई करत आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरूच आहे. याबाबतची माहिती वणी पोलिस प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे नांदेपेरा चौफुली वर ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असताना ताब्यात घेतला.

ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९ सि बि ८३१६ हा ट्रॉलीसह जप्त केला असून पोलीस स्टेशन आवारात जमा केला आहे. आराेपी ट्रॅक्टर चालक गणेश नंदकिशोर गोहोकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळावा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार भीमनगर वणी, येथे उपवर - वधु परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
            
सद्या धकाधकीच्या जीवनामध्ये भेटीगाठी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे एकमेकांसोबत बरेच दिवस भेट होत नसल्याने एकत्र आणण्याकरीता तसेच समाजातील पालक आणि उपवर- वधुसाठी हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधव एकत्रित यावे आणि उपवर- वधु यांचा परिचय होऊन लग्नगाठ बांधण्याचा उद्दात हेतू आहे. 
                                                                              
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मपाल माने सर यवतमाळ तर या कार्यक्रमाचे उदघाटक विवेक मेश्राम सर वर्धा, प्रमुख उपस्थिती पंढरीनाथ आडे सर राहणार आहेत, या मेळाव्यामध्ये युवक युवतीचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधू यांची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी मेळाव्याच्या दिवशी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान करण्यात येईल. उपवर-वधु यांनी मेळाव्यात येताना एक फोटो सोबत आणावा. या मेळाव्यात उपवर-वधु घटस्फोटित वधु-वर विधवा -विधुर वधु-वर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक इंदुताई वाघमारे ८६६८४६०४०५ सुहास नगराळे. विलासजी वाघमारे साहेब. यांनी केले आहे.

चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुख पदी आ.संजय देरकर यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शिवसेना - पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता संपर्कप्रमुखपदी आमदार संजय देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
गेल्या वर्षभऱ्यात आ.देरकर यांनी पक्षाला वणी विधानसभेत वैभव प्राप्त करून दिले. वणी विधानसभा प्रमुख पदी असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांमध्ये नवंसंजीवनी निर्माण केली. त्याच जोरावर आज ते आमदार झाले आणि आज त्यांची चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा सह अभिनंदनचा वर्षाव होत आहेत. 

जिल्हा प्रमुखांच्या कार्यक्षेत्रात बदल 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात बदल करण्यात आला आहे. कार्यक्षेत्रात बदल केलेल्या बदलामध्ये संदीप गिन्हे - जिल्हाप्रमुख (विधानसभा - चंद्रपूर, बल्लारपूर), मुकेश जीवतोडे - जिल्हाप्रमुख - (विधानसभा राजूरा, वरोरा-भद्रावती) आणि रवींद्र शिंदे जिल्हाप्रमुख - (विधानसभा - चिमूर, ब्रह्मपुरी) या पदांचा समावेश आहे.

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून १७ विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरातील हिरवळीवर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासह शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या अधिवेशनात मांडलेल्या ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजना यापुढेही सुरु ठेवण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपत्ती बाधीत ५५ हजार संत्रा शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. कापसाला बोनस देण्यात आला आहे. सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली असून १२ जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरु राहणार आहे. बाजारात कापूस आणि तुरीचे खरेदी दर जास्त असल्याने शेतकरी आपला माल बाजारात विकत आहेत. विविध माध्यमांतून पिकांना सहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँकेबरोबर प्रकल्प करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ०.७२ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी ३५८६ कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. ‘मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण, बांबू अभियान यासारख्या उपक्रमांना देखील आशियाई विकास बँक मदत करणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात सर्वासामान्य माणसांच्या आयुष्यात बदल घडविणारे अनेक निर्णय घेतले आहेत. आता आमची जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्यांच्या-मायभगिनींच्या प्रगतीसाठी, रक्षणासाठी यापुढेही एक टीम म्हणून काम केले जाणार आहे. या अधिवेशनात नागरिकांच्या, राज्याच्या चौफेर विकासाचा संकल्प करण्यात आल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले आहे.

या परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, संजय राठोड, आशिष जयस्वाल, नितेश राणे आदी उपस्थित होते.

लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी विविध उपक्रमासह संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गोहोकार आणि प्रा. नार्लावार उपस्थित होते. संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी संत गाडगेबाबा म्हणजे जनजागृतीचे चालते फिरते विद्यापीठ होते, आधी करावे मग सांगावे असे संत गाडगेबाबांचे महान कार्य होते समाजासाठी जे करता येईल ते त्यांनी मनोभावे केलं याच प्रेरणेने विद्यार्थ्यांनी सुद्धा काहीतरी त्यांच्याकडून शिकावं म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमामध्ये पूर्ण पणे सहभागी व्हा आणि समाज उपयोगी कार्य करा असा संदेश आपल्या मनोगतातून त्यांनी दिला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छतेवर व जनजागृती वर आधारित सप्ताहाचे आयोजन केले आहे याबाबतचे माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर वांजरी या गावात पुढील सात दिवसात संपन्न होणार आहे आणि संत गाडगे महाराजांच्या दशसूत्री ला अनुसरून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यानिमित्ताने संत गाडगे महाराजांच्या स्मृतीला उजाळा देऊन हे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न होणार आहे अशी माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कुमारी रजनी गारघाटे हिने केले. या कार्यक्रमासाठी संजू बिलोरिया यांचे सहकार्य लाभले तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.

पोलिसांवर हल्ला करुन जिवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील हिवरी येथे गेले असता आरोपी हा वॉरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण करुन लाखडी दांडक्याने राजेंद्र कुडमेथे याला डोक्यावर वार करुन त्याला जागीच ठार केले व ईतर पोलिस कर्मचा-यावर लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्यांना जख्मी केले. या प्रकरणी पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश साहेब ए. एम. देशमुख यांनी समक्ष पो.स्टे. मारेगाव, येशील अप.क. ३९९/२०१८ कलम ३०२, ३०७, ३५३, ३३३, ३३२, ३२४ भा.दं.वि.अंतर्गत फौजदारी प्रकरण सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणामध्ये आज रोजी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होऊन आरोपी नामे अनिल लेतु मेश्राम, वय ४१ वर्षे रा. हिवरी याला ३०२ भा.दं.वि. मध्ये मनुष्य वध प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व १०,००० रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावास, तसेच भादवी चे कलम ३०७ मध्ये १० वर्षे सश्रम कारावास ३००० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावास, भादवीचे कलम ३५३ अंतर्गत १ वर्षे शिक्षा व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधा कारावास, भादवीचे कलम ३३३ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व २००० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने कारावास, भादवीचे कलम ३३२ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षीची शिक्षा व ३२४ भादवी अंतर्गत २ वर्षे कारावास व २००० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा आज दि. २१/१२/२०२४ रोजी ठोठावण्यात आली, सर्व शिक्षा एकत्र भोगायचे असा आदेश पारीत करण्यात आला.

या प्रकरणातील हकिकत अशी की, दि. २६.११.२०१८ रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल लेतु मेश्राम यांचेवर गैरजमानती वॉरंटची बजावणी करण्याकरीता राजेंद्र बाजीराव कुडमेथे पो. शिपाई मधुकर निळकंठ मुके पोलिस हवालदार व प्रमोद खुपरे पोलिस कॉन्स्टेबल असे शासकिय वाहनाने आरोपीचे गावी मौजा. हिवरी (ता. मारेगाव) येथे गेले असता आरोपी हा वॉरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण करुन लाखडी दांडक्याने राजेंद्र कुडमेथे याला डोक्यावर वार करुन त्याला जागीच ठार केले व ईतर पोलिस कर्मचा-यावर लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्यांना जख्मी केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पोलिस कर्मचा-याची साक्ष व शवविच्छेदन अहवालावरुन फिर्यादी मधुकर मुके याने पो.स्टे. मारेगाव येथे घटनेचा रिपोर्ट दिला त्यावरून पो.स्टे. मारेगाव येथे अपराध कमांक ३९९/२०१८ मध्ये कलम ३०२, ३०७, ३५३, ३३३, ३३२, ३२४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यानी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

प्रस्तुत प्रकरणात अभियोजन पक्षाने एकुण ०९ साक्षदार तपासले. तसेच बचावपक्षातर्फे कोणीही तपासण्यात आले नाही. अभियोगपक्षातर्फे न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला सबळ पुरावा आणि सहायक सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट रमेश डी मोरे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून परिक्षण न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व रू. १०,०००/- दंड न भरल्यास दंड न भरल्यास ६ महिन्याचा सश्रम कारावास व इतर गुन्हयाअंतर्गत वरील प्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली. प्रस्तुत प्रकरणाचा तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास केला व पैरवी अधिकारी म्हणुन ए.एस.आय दिपक गावंडे यांनी काम पाहिले.