मंजूर झालेले पंचायत भवन इथेच करा, इतरत्र हलवू नका अन्यथा...!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत वागदरा-वसंत नगर येथे नव्याने मंजूर झालेले पंचायत भवन हे वसंत नगर याठिकाणीच बांधकाम करा, इतरत्र हलवून बांधकाम करू नका अन्यथा... आम्ही गावकरी उपोषणास बसू असा थेट ईशारा आज (ता.30) रोजी दिलेल्या निवेदनातून पंचायत समिती कार्यालयाला दिला. यावेळी वसंत नगर येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

मारेगाव तालुक्यातील वसंतनगर हे वागदरा गट-ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ असून दोन्ही गावे 500 मी. अंतरावर लागुन आहे. मौजा वसंतनगर येथे यापुर्वीपासुन गट ग्रामपंचायत कार्यालय आहे. तसेच गुरांचे पशु चिकीत्सालय दवाखाना व जि.प.शाळेची इमारत सुध्दा आहे. मात्र,आता वसंतनगर येथे नविन पंचायत भवनचे कार्यालय बांधकाम करणे हे नव्याने मंजुर झाले आहे. त्याकरीता लागणारी जागा सुध्दा उपलब्ध आहे. परंतु ग्राम पंचायतचे तत्कालीन सरपंच दादाराव ढोबरे हे बुध्दीपुरस्कर वसंतनगर येथे बांधकाम न करता गट ग्राम. मधील वागदरा येथे हलवण्यासाठी आग्रही असल्याची तक्रार निवेदनातून गट विकास अधिकारी पद्माकर मडावी यांना करण्यात आली आहे. पुढे निवेदनात असेही नमूद केले आहे की, मी सरपंच आहे. मी माझे मताने ग्राम पंचायत अंतर्गत मंजुर झालेले कोणतेही कामे माझे स्वतःचे मर्जीने कुठेही व कसेही करु शकतो. यास गावातील जनता माझे काही करु शकत नाही. व मला ग्राम पंचायतचे कोणत्याही सदस्याने अथवा गावातील जनतेने अडथळा निर्माण करु नये, अशा प्रकारचे स्पष्ट वक्तव्य वागदरा येथील गट ग्रामपंचायतचे सरपंच करीत असल्याचे निवेदनात म्हटलं आहेत. 

यापुर्वी सुध्दा वसंतनगर येथे असलेल्या गट ग्रामपंचायतचे कार्यालयाला ऑनलाईन महानेटचे केबल कनेक्शन मंजुर झाले होते ते सुध्दा तत्कालीन सरपंचांनी सरपंच नसतांना वसंतनगर येथे कनेक्शन देण्यास अडविले होते. व ते वागदरा येथील ग्रा.पं.कार्या. मध्ये बसविण्याचा घाट घातला होता. शिवाय सरपंच हे वसंतनगर येथे कोणतेही विकास कामे करत नसुन सदर सरपंचाच्या हुकूमशाही भूमिकेमुळे वसंतनगर येथील ग्रामस्थ पूर्णतः त्रस्त झाले आहे.आता आमचे वसंतनगर येथे नविन पंचायत भवन बांधकाम मंजुर झाले, त्यासाठी जागा उपलब्ध असुन सुध्दा सरपंच ठोबरे हे नविन होणारे बांधकाम वागदरा येथील हद्दीत बांधकाम करण्याच्या प्रयत्नात असल्याची वसंतनगर हे गावातील जनतेची तक्रार आहे. दिलेल्या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत. 

विशेष म्हणजे वसंतनगर येथे मंजुर झालेले पंचायत भवन चे बांधकाम वसंतनगर येथेच करा. इतरत्र हलवू नका, अन्यथा  गावकऱ्यांच्या वतीने जन आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्याशिवाय राहणार असा गर्भीत ईशारा वसंतनगर येथील शेकडो ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. त्यामुळे गावाकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल संबंधित अधिकारी दखल घेतात की? नाही की, सरपंचाना पाठीशी घालतात! याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत. 


हिवरा दरणे येथे शेतकरी मार्गदर्शन व गुलाबी बोंड अळी नियंत्रण जनजागृती कार्यक्रम साजरा

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख

कळब : तालुक्यातील हिवरा दरणे येथे कापूस उत्पादक शेकऱ्यां साठी एलडीसी गुलाबी बोंडअळी नियंत्रण जनजागृती तसेच शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
     
एलडीसी सीएसआर जागृती प्रकल्प अंतर्गत स्पेक्ट्रम कॉट फायबर, वाधवानी ग्रुप व कृषी विभाग कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक नियंत्रण तसेच कापूस उत्पादकता वाढ व कृषी पायाभूत सुविधा निधी योजना प्रचार व प्रसार या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एल डी सी चे तुकाराम बादाडे पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली गायकी ,वाधवानी ग्रुप,दिनेश उगले, कृषी सहाय्यक, मोहन बरडे ,प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, नरेश बाजरे,पियू मॅनेजर,मुकेश मडावी,राम राऊत, वाधवाणी ग्रूप,सचिन दरणे,उमेश दरणे, ग्रामपंचायत सदस्य,वैभव मेघळ,लक्ष्मण यादस्कर, हितेश भोयर,आनंद मांढरे,नागसेन सुटे,सागर शुक्ला,वैभव इजपाडे,संदीप जगताप,शुभम डफळे,प्रियांका ओंकार व कोमल राऊत इत्यादी प्रक्षेत्र अधिकारी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
      
एल डी सी तर्फे कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापना संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जागृती प्रकल्पाबाबत तसेच इतर कृषी निर्विष्टांच्या योग्य वापरा संदर्भात आणि शेतीमध्ये होत असलेल्या आधुनिक बदलांबाबत एल डी सी चे कृषी विश्लेषक तुकाराम बादाडे पाटील यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. तसेच वाधवाणी संस्थेने तयार केलेले कॉटन एस हे ॲप्लिकेशन कशाप्रकारे शेतकऱ्यांच्या गुलाबी बोंड अळीच्या संभाव्य धोक्याबाबत जागरूकता करते, तसेच योग्य वेळी योग्य नियोजनाचा सल्ला देते, याबाबत सोनाली घिके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक उगले सर यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. स्पेक्ट्रम कॉट फायबर एलएलपी चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मोहन बरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शेती मधला अतिरिक्त होणारा खर्च कसा कमी करता येईल व शेती करताना काय काय उपाययोजना करायला हव्या याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना एल डी सी मार्फत गुलाबी बोंड अळी तसेच कपाशीवरील इतर रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रत्येकी आठ कामगंध सापळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले. पियू मॅनेजर नरेश बाजरे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्पेक्ट्रम कॉट फायबर एलएलपी,वर्धा संस्थेच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इस्रोमध्ये करिअर करायचे? तर निवडा 'हे' कोर्स


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

इस्रोमध्ये वैज्ञानिक नोकरी ही मुख्य नोकरी आहे. इस्रो वैज्ञानिक असणं म्हणजे फक्त उत्तम करिअर नसून एक सामाजिक प्रतिष्ठादेखील आहे या करिअरमधून देशाची सेवा करण्याची संधी मिळते. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. या व्यतिरिक्त इतर भरती देखील होतात.

इस्रोमध्ये हे आहात करिअरचे पर्याय :

Aerospace Engineering
स्पेसेसशिपमधील किंवा उपग्रहांमधील प्रणालीचे एकीकरण आणी कार्यप्रणालीवर नजर ठेवण्याचे कामही एरोस्पेस इंजिनिअरिंग करतात. शिवाय, अत्याधुनिक वैमानिक वाहनांचे डिझायनिंग आणि उत्पादन हाही यातील मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे.

Avionics Engineering
एव्हीओनिक्स इंजिनिअरिंग केलेली व्यक्ती नवनवीन डिझाईन्स विकसित करणे आणि त्यांची चाचणी करण्याचे काम करतात. ISRO मधील एव्हीओनिक्स अभियंते विमान आणि अंतराळ यानाचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करणार्‍या इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे काम सुरळीतपणे सुरु असल्याचे सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही यांच्यावर असते.

Geospatial Engineering
भौगोलिक डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्याचा अर्थ लावणे म्हणजे भौगोलिक अभियांत्रिकी. ISRO भूस्थानिक अभियंते मॅपिंग, नेव्हिगेशन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचा वापर करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील डेटा गोळा आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो. 

Remote Sensing
इस्रो रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ उपग्रह आणि इतर रिमोट सेन्सिंग डेटा गोळा आणि विश्लेषण करतात. ते पृथ्वीची जमीन, समुद्र, वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांबद्दल डेटा गोळा करण्यासाठी ऑप्टिकल आणि रडार सेन्सर वापरतात. हा डेटा हवामानाचा अंदाज, कृषी निरीक्षण आणि पर्यावरणीय मूल्यमापनासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.

कशी होते इस्रोमध्ये वैज्ञानिकांची भरती:
इस्रोचे वैज्ञानिक बनणे हा एक उत्तम करिअरचा पर्याय मानला जातो. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड (ICRB) द्वारे इस्रोच्या विविध अंतराळ केंद्रे आणि विभागांसाठी शास्त्रज्ञांची भरती वेळोवेळी केली जाते. या रिक्त पदांसाठीची अधिसूचना मंडळाने इस्रो वेबसाइटच्या करिअर विभागात शेअर केली आहे. ही isro.gov.in/Careers वेबसाइट आहे. उमेदवार येथे दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सबमिट करू शकतात.

पात्रता काय असावी ?
इस्रोच्या विविध केंद्रांसाठी शास्त्रज्ञ पदांच्या थेट भरतीसाठी, उमेदवारानं भरतीशी संबंधित विषयात किमान 65% गुणांसह BE/B.Tech किंवा इतर कोणतीही पदवीधर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना (SC-ST, OBC, EWS, दिव्यांग इ.) केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, सहसंचालक सुधीर मोरे हे उपस्थित होते.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य, होतकरू आणि गरीब कुटुंबातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी जे आवश्यक असेल ती मदत त्यांना सराव आणि स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीयस्तरावरील विविध क्रीडा संकुलांची बांधकामे सुरू असून ती दर्जेदार करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. तसेच ती कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घ्यावीत. खेळाडूंना सरावासाठी देण्यात येणारा निधी कमी पडणार नाही आणि वेळेत मिळेल यासाठी लक्ष द्यावे.

विभागाकडे निधी विषयी मंजुरीसाठी प्रस्ताव असतील, तर ते तत्काळ सादर करावेत. नवीन योजना आणण्यासाठी खेळाडूंची बाजू समजावून घेण्याकरिता अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. यावेळी त्यांनी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विभागात अधिकाधिक नवीन योजना राबविण्यात येणार असून त्यासंबंधी लवकर प्रस्ताव सादर करावेत. राज्याला क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी कसलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे सांगून विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना मंत्री श्री. बनसोडे यांनी दिल्या.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कुलगुरूंची नेमणूक करण्यात आली आहे. सुरूवातीला साधनसामुग्री असलेल्या ठिकाणी विद्यापीठ सुरू करावे. इमारतीसह पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध होतील त्या ठिकाणी स्वतंत्र्यरित्या सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतला विविध विभागाचा आढावा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी आज (ता.30 ऑगस्ट) मारेगाव तहसील कार्यालयाच्या विविध विभागातील कामाचा आढावा घेतला. त्यात पंचायत समिती, कृषी, पोलीस स्टेशन, नगरपंचायत, आरोग्य विभाग, सा. बां.विभाग मारेगाव, वनविभाग, भूमिअभिलेख, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक, म.रा.वि.म., जिप बांधकाम उपविभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मृदू व जलसंधारण उपविभाग,व सर्व मंडळ अधिकारी इत्यादिंचा समावेश होता.
आज सकाळी 11 वाजता येथील महसूल भवन येथे विविध विभागातील अद्यावत माहितीचा आढावा घेण्यात आला. अमोल येडगे यांच्या जागेवर डॉ पंकज आशिया यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर प्रथमच वणी उपविभागावात त्यांनी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या बैठकी आढावात तालुका स्तरावरील उपविभाग, कार्यालयाच्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये मा.तहसीलदार निलावाड, गटविकास अधिकारी श्री. पद्माकर मडावी, कृषी श्री निकाळजे, ठाणेदार खंडेराव, नप मुख्याधिकारी श्री भगत साहेब (प्रभारी), ता. आरोग्य अधिकारी देठे मॅडम, सा बा अधिकारी श्री.आसूटकर, वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. हटकर, उपअभियंता श्री पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे श्री.कळमकर,सहाय्यक निबंधक च्या वरवाडे मॅडम, जि प बांधकामचे श्री. उमाटे, व नमूद विभागातील अधिकारी आदी न चुकता बैठकीला उपस्थित होते.
यावेळी विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मारेगाव च्या विद्यार्थिनींनी मारेगाव तहसील कार्यालयात मा. जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना "रक्षाबंधन" च्या निमित्ताने राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला. त्यानंतर ते आपल्या ताफ्यासह वणी कडे रवाना झाले. 

सद्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा वाढता कल- खारकर पाटील

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

दिवसेंदिवस शेतकरी आणि विक्रेता यांचा परस्पराकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी चिघडण्याची चिन्हे दिसत आहे, आज शेतकरी कोणत्याही कनेंट molecule चा अभ्यास न करता मेंढरागत तेलंगणातील औषधी चा सर्रास वापर करित आहे. 

शेतकऱ्यांनी कोठून औषधे घ्यावीत, कोणती औषधें फवारावीत हा त्यांचा अधिकार आहे. परंतु कोणत्या औषधाने काय फायदा होतो,त्याचे पिकावर नुकसान आहे का? हे जाणून घेणे गरजेचे नाही का? वाढीच्या अवस्थेत जर कपाशीवर एखादे औषध फवारल्यास कपाशीची वाढ होत असेल तर त्यात काय फार मोठी बाब नाही ते कार्य आपण २४५/- रुपयाच्या नॅनो युरिया ने सुद्धा करू शकतो. त्या साठी इतका खर्च का करतो शेतकरी? पराटी ची पाने धोप्यागत करू शेतकरी काय हेतू साध्य करणार आहे,? ज्या औषधा मध्ये कोणत्याही molecule चे वर्गीकरण नाही. केवळ जैविक औषधी च्या नावाखाली शेतकरी औषधी घेत असेल तर ते स्वतःची फसगत करून घेत आहे असे वाटत नाही का? cotton ची वाढ ही ५५ ते ६० दिवसापर्यंत होते हे सर्वांना माहिती आहे. मग नुसत्या वाढी साठी पाने धोप्या सारखी होण्यासाठी एवढा अट्टाहास का? बरे. त्यात पैसे वाचतात असेही काही नाही तेवढ्याच पैशात दर्जेदार औषधे बाजारात उपलब्ध आहेत. आपण असली औषधें वापरून बोंड अळी, पर्ण सन्भार वाढल्यामुळे पांढरी माशीचा वाढता प्रादुर्भाव हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरणं आहे. (सध्या परिस्थितीत सोयाबीन वर yellow vain mozaik, व कपाशीवर पाढऱ्या माशीचा प्रादुर्भावं वाढला आहे) बोंडातील अंतर वाढत आहे, तसेही आज पर्यंत विक्रेत्यांचा शेतकऱ्यावर असणारा विस्वास कमी होत चालला आहे. आतापर्यंत शेतकरी नगदी उधारी मध्ये विस्वास असलेल्या दुकानातून माल खरेदी करत होता,आता उधारी दुकानात, नगदी बेल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याविषयी अविस्वासाची भावना निर्माण होत आहे, (यात सर्वच शेतकरी आहे, असे माझे मत नाही) दिवस कसा येईल कोणालाच माहिती नाही.

पिकेल तर ठीक पण नाही पिकले तर? शेतकऱ्याच्या पाठीशी असणारा विक्रेता हा आधारस्तंभ आता राहणार नाही आणि शेतकरी नेहमी साठी नगदी स्वरुपात खरेदी करेल यातही शंकाच आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामागे उभा असलेला विक्रेता वर्ग सारे दिवस का? पाठीशी राहील हाही प्रश्नच आहे.

मा. विठ्ठल पा. खारकर
संचालक तथा मार्गदर्शक सुमेध ऍग्रो ट्रेडर्स,वरोरा
संपर्क : 9421722604
 
 
 
 

 

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीने राज्याच्या योजनांचा घेतला आढावा

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई, : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे आज बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून समितीस दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या स्मारकाबाबत माहिती देणारी चित्रफित सादर केली.

या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर- सिंह, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, अपर पोलिस महासंचालक (नाहसं) श्री. सुखविंदर सिंग तसेच मंत्रालयीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयुष भारत डॉक्टर असो.जिल्हाध्यक्ष पदी डॉ. विवेक चौधरी यांची निवड

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

यवतमाळ : आयुष भारत डॉक्टर असो.च्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी डॉ. विवेक चौधरी यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आमीर मुलाणी साहेब यांनी केली. ही नियुक्ती राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. शाहीर मुलाणी, राष्ट्रीय सचिव डॉ.आनंद भोसले,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विश्वास वाघमारे,राष्ट्रीय नॅचरोपॅथी सचिव डॉ. जलील शेख,राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ.सुतार मॅडम,राष्ट्रीय अल्टरनेटिव्ह मेडिसिन अध्यक्ष डॉ. सुतार सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.मनीषा गुरव,राष्ट्रीय कायदेविषयक अध्यक्ष डॉ. गणेश पाटील,डॉ. फैयाज शेख,डॉ. तन्वीर देशमुख,डॉ. नामदेव मोरे,डॉ. राजेंद्रकुमार नवले,डॉ. स्वाती राजे मॅडम,डॉ. फैझान इनामदार,डॉ. सेंड्रा डिसोझा मॅडम,डॉ. शब्बीर पठाण,डॉ. फिरोझ पठाण,विदर्भ अध्यक्ष डॉ. विनोद देशमुख सर,तसेच राष्ट्रीय विधी सल्लागार कमिटी,राष्ट्रीय पद नियुक्ती समिती,राष्टीय फोर ऍक्शन कमिटी,तसेच सर्व कमिटी च्या सहमतीने नियुक्ती करण्यात आली आहे.संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी लढाणारी देशातील सर्वांत मोठी आयुष भारत असोसिएशन /संघटना आहे.आयुष भारत संघटनेचे कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन,गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण सेवा पुरवीने,वैद्यकीय क्षेत्रात नौकरी,वैद्यकीय क्षेत्रात कार्यान्वित असणाऱ्या सर्व डॉक्टर साठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी,प्रत्येक जिह्यात वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवीने,२४ तास मोफत ऍम्ब्युलन्स सेवा,डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्वरित मदत,डॉक्टरांना वैद्यकीय कायदेविषयक सल्ला-मदत देणे तसेच डाक्टरांच्या समस्या, डाक्टरांच्या विविध प्रश्नासाठी कार्य करणारी देशातील सर्वांत मोठी संस्था म्हणून "आयुष भारत असोसिएशन "म्हणून ओळखल्या जाते...
डॉ विवेक चौधरी यांची आयुष भारत डॉक्टर असो जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी अभिनंदन केले आहे.

मारेगाव: काँग्रेसची भारत जोडो यात्रेनंतर आता 'जनसंवाद यात्रा'

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत लक्ष वेधून घेतले होते. त्याच धर्तीवर प्रदेश काँग्रेसने 3 ते 11 सप्टेंबर दरम्यान जनसंवाद पदयात्रा काढण्याचे घोषित केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. याच अनुषंगाने मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र पा ठाकरे यांनी आयोजन विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने वणी विधानसभेचे समन्व्यक आशिष खुलसंगे, सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, घनश्याम पावडे, रविंद्र धानोरकर, यादव पांडे हे विचारपीठावर होते. 

महाराष्ट्र प्रदेश कमिटी च्या वतीने आयोजन केलेल्या यात्रेत मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी होणे अनिवार्य असल्याचे त्या अनुषंगाने काल सोमवारला एक सभा आयोजित करण्यात आली होती. विभागीय समन्वयकांनी या सभेला उपस्थिती दर्शविली, मात्र स्थानिक काही नेत्यांची अनुपस्थिती दिसून आल्याने पुन्हा गट बाजीचा विषय राजकीय वर्तुळातून समोर आला. 

पक्षाचे नेते राहुल गांधी पक्षाची मोट बांधण्यात रात्रंदिवस एक करत आहे. मात्र स्थानिक गट बाजीने सहभागी पदाधिकारीच्या नाराजीने पक्षाला धुळीस मिळविले जात आहे. अशी सामान्य कार्यकर्त्या मध्ये चर्चा आहे. मात्र पक्ष श्रेष्टीने दिलेल्या आदेश सर्वांनाच पाळणे अनिवार्य असून त्याचे पालन होते की, नाही हे पाहणं या निमित्ताने औचित्याचे असणार आहे. पदयात्री आरंभ ते समारोपपर्यंत यात्रेत सहभागी सर्व हेवेदावे विसरून हजर असतील. असे तालुका कमिटी कडूनच निर्विवाद अपेक्षा आहे.

यावेळी आकाश बदकी, गंगाधर ठावरी, सय्यद समिर, आनंद मसराम, अंकुश माफूर, मारोती सोमलकर यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

पोषण आहार सप्ताहामध्ये सहभाग नोंदविण्याचे अधिक्षिका बरडे यांचे आवाहन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या ७ दिवसांमध्ये पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पुर्ण सप्ताहात बचतगट आरोग्य सेविका, आशावर्कर, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अधीसेविका वंदना बरडे उपजिल्हा रुग्णालय वरोरा या नं. ९९२२०१३२४३ संपर्क करावा. या कार्यक्रमात डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक जनरल सर्जन, अधीसेविका वंदना बरडे, आहारतज्ज्ञ गीतांजली ढोक, समुपदेशक वंदना बुर्रेवार, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी यांत सहभाग नोंदवावा असे, आवाहन आयोजिका वंदना बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी केले आहे.

...तर तालुका उपाध्यक्ष पदी उदय खिरटकर यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुकाच्या मनसेच्या तालुका उपाध्यक्षपदी चोपण येथील युवा कार्यकर्ते उदय खिरटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडीबद्दल उदय खिरटकर यांचे अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मान्यतेने उदय खिरटकर यांची नियुक्ती पक्ष नेते राजू उंबरकर यांनी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढील कार्यात जनतेच्या न्याय हक्कासाठी सैदव लढण्याची तप्तपरता दाखवून सक्रिय राहावे असे, मत नियुक्ती पत्र देतांना उंबरकरांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा सर्व टीम च्या वतीने देण्यात आल्या. आमच्या प्रतिनिधीने नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले की, पक्ष स्थापनेपासून मी पक्षात आहे, पक्षाची धोरण, आदेश मी एकनिष्ठाने पाळली. सोबत सर्वसामान्य जनतेचे कार्य करित असल्यामुळे, माझ्या पक्ष मित्र परिवाराकडून यासाठी खूप मोठी साथ मिळाली, त्याचे चीज झाले. विशेषतः आमचे लाडके नेते राजू भाऊंचे खूप खूप आभार.. त्यांनी मला उपाध्यक्ष पदाची ही जबाबदारी दिली. तसेच सर्वांचे आपल्या माध्यमातून धन्यवाद, आभार मानतो. 
यावेळी धनंजय त्रंबके, शहराध्यक्ष शिवराज पेचे, माजी तालुका अध्यक्ष अनंताभाऊ जुमडे, मारेगाव नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, यासह असंख्य मनसैनिक उपस्थित होते.


सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार; अखेर शिक्षक भरतीची तारीख फायनल!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार असून ५ सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे 'पवित्र' पोर्टल उघडले जाणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावरून भरली जाणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. 
अशी होणार प्रोसेस...
◆ सुरवातीला प्रोफाईल तयार करून घ्यावे लागेल. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. 
◆ दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना रिक्तपदांची जाहिरात 'पवित्र'वर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार त्या खासगी संस्थेत पाठविले जातील. त्यांची निवड मुलाखतीतून होणार आहे.

आता तातडीने बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली जात आहे. पाच-सहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टल सुरू होईल..
अंदाजे २३ हजार जागांची भरती
राज्यात मागे २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही. विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षकांअभावी हाल होवू नये या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश आहे.


मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला पडला विसर...ना फॉगिंग मशीनद्वारे फवारणी; ना स्वच्छतेचा जागर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट-ग्रामपंचायत मच्छिन्द्रा मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना आजपर्यंत ग्रामपंचायतच्या वतीने कुठलीही जंतुनाशक कीटकनाशक फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी न केल्याने सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येवून विविध आजार डोकं वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या पावसाचे दिवस चालू असल्याने अनेक रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात नाल्या गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. साहजिकच ही जबाबदारी ग्रामपंचायत यांची आहे. परंतु मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला विसर पडला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळा सुरू होऊन एक- दोन महिन्याचा कालावधी लोटूनही मुहूर्त सापडलेला दिसत नाही, किंबहुना ग्रामपंचायत हेतू पुरस्पर दुर्लक्ष याकडे करित असल्याचे बोलल्या जात आहे. 
पेसा ग्रामपंचायत, पावर सुशिक्षित युवकांकडे असून देखील गावात घाणीचे साम्राज्य. नियोजन शून्य असल्यामुळे विकास थंड बस्त्यात आहे. शासन योजना देतील त्या आम्ही राबवू यावर डिपेंड राहून चालणार नाहीतर सरपंच महोदयांनी तालुका स्तरावर जाणे येणं, भेटीगाठी, योजनाची माहिती काढणे, योजना राबविणे, योजना खेचून आणणे हे अपेक्षित असते. तसेच आपल्या गावात जाऊन गावपातळी वरील किरकोळ समस्या कडे लक्ष द्यायला हवे. परंतु असे होतांना दिसत नाही. मात्र, सध्या पावसाळा सुरु आहे, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी कधी करणार? असा सवाल आहे. 

विशेष म्हणजे सरपंचाचे विद्यार्थी दशेच वय,त्यामुळे वेळेअभावी अनुभव कमी पडत असल्याने आता तालुका पंचायत समिती प्रशासनाने धूर फवारणीचे तत्काळ आदेश देऊन विविध प्रकारच्या जंतूनाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे हे रोगराई मिशन पूर्ण करावे. तसेच गावात स्वच्छता मोहीम, आरोग्य अबाधित राहावे याबाबतची जनजागृती, ठिकठिकाणी जमा असलेले सांडपाणी याची विल्हेवाट लावण्यात यावी व सामान्यांना रोगराई, गावात डासांचा प्रचंड वाढलेल्या प्रकोप पासून दिलासा देण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे. 



देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित केला असून, खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे, तर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे.

देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लघु जलसिंचन योजना आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. भूजल योजनेतही उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आहेत. भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे.

जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल 26 ऑगस्ट रोजी प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार देशामध्ये 23.14 दशलक्ष लघु जलसिंचन योजनांची नोंद झाली आहे, ज्यापैकी 21.93 दशलक्ष (94.8%) योजना भूजल आणि 1.21 दशलक्ष योजना(5.2%) भूपृष्ठावरील जल योजना आहेत.

लघु जल सिंचन योजनांमध्ये डगवेल्सचा सर्वाधिक वाटा आहे. त्याखालोखाल कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक डगवेल्स, भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याच्या आणि उपसा सिंचनाच्या योजना आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब ही राज्ये अनुक्रमे कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांमध्ये आघाडीवर आहेत. सर्व लघु सिंचन योजनांपैकी 97.0 टक्के योजना वापरात आहेत, 2.1 टक्के योजना तात्पुरत्या स्वरुपात वापरात नाहीत, तर 0.9 टक्के योजना कायमस्वरुपी बंद आहेत. लघु सिंचन योजनांपैकी बहुसंख्य (96.6 टक्के) योजना खासगी मालकीच्या आहेत. भूजल योजनांपैकी खाजगी मालकीचा वाटा 98.3 टक्के आहे, तर भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये खासगी मालकीचा वाटा 64.2 टक्के आहे.

भूजल योजनांमध्ये डगवेल्स, कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. भूपृष्ठावरील योजनांमध्ये पृष्ठभागावरील वाहते पाणी आणि उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. 5 व्या सिंचन योजना गणनेच्या तुलनेत 6 व्या गणनेत लघु जलसिंचन योजनांमध्ये 1.42 दशलक्ष योजनांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर भूजल आणि भूपृष्ठावरील अशा दोन्ही योजनांमध्ये अनुक्रमे 6.9 टक्के आणि 1.2 टक्के वाढ झाली आहे.

महागाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी नामदेव वाघमारे व गजानन गायकवाड यांना तत्काळ शासकीय मदत करा-रामदास आठवले


सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : तालुक्यातील तिवरंग येथील नामदेव संभाजी वाघमारे या शेतकऱ्याने कर्जामुळे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तसेच अंबोडा येथील शेतकरी गजानन फकीरा गायकवाड या शेतकऱ्याचे दिनांक 21 व 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पुरात शेती खरडून गेली होती. यामुळे आता लोकांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तसेच मध्यवर्ती बँकेच्या कर्जामुळे व मुलांना शिक्षणासाठी पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. दोन्ही शेतकऱ्यांच्या घरी रिपाई आठवले चे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी सांत्वना पर भेट दिली होती. तसेच शासनाकडून आजपर्यंत कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या परिवारांनी सांगितले.

आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आले असता सदर शेतकऱ्यांच्या समस्या महेंद्र मानकर यांनी आठवले यांना सांगितल्या समस्या ऐकताच आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून सदर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अजूनही कोणती शासकीय मदत झाली नाही. दोन्ही शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे व त्यामुळे तिवरंग येथील शेतकरी नामदेव वाघमारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली व अंबोडा येथील गजानन गायकवाड यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबाला ताबडतोब शासकीय मदत देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

"त्या" कायद्याच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : केंद्र सरकारने नुकताच बिआयएस हा नवीन कायदा आणला आहे. या कायद्यान्वये कमी गुणवत्तेचा कापूस खरेदी केला जाणार नाही व खरेदी केल्यास जिनिंग धारकांना दोन वर्षाची शिक्षा किंवा खरेदी केलेल्या मालाची 10 पट दंडाची तरतूद या कायद्यात असणार आहे. हा शेतकऱ्यांचा जीव घेणारा कायदा केंद्र सरकार अमलात आणू पाहत आहे. ह्याच कायद्याच्या विरोधात, केंद्र मोदी सरकारचा मारेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करित सदर कायदा रद्द करावा, यासाठी आज दि.28 ऑगस्ट रोजी कृ उ बा समितीचे माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान सभापती गौरी शंकर खुराणा व काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्फत निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मारेगाव हे महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दुर्लक्षित तालुका आहे. मारेगाव तालुक्याच्या दोन खास ओळख. मागासलेला तालुका, आत्महत्याग्रस्त तालुका. मारेगाव हे असेच एक बेरोजगारीने कळस गाठलेला तालुका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येथे मागासलेला दुर्लक्षित आदिवासी समाज यासह शेतकरी वर्ग मोठा असून यांचा मुख्य व्यवसाय हा शेती. त्यांचे मुख्य पिक कापूस हे पिक असून शेतीवरच येथील जीवन आहे. मागील वर्षांपासून अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा सुरु असल्याने कपाशीचे पिक हे दर्जेदार येत नाही, तर मध्यम दर्जाचे कपाशी चे पिक येतात. अशातच मात्र, केंद्र सरकारने मध्यम दर्जाचा किंवा कमी गुणवत्तेचा कापूस व्यापाऱ्याने खरेदी करायचा नाही, असा कायदाच काढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त करित आता जगायचे की, मरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला.
2014 ला भाजपच्या नेत्यांनी 'अच्छे दिना'चे नारे देऊन सरकार स्थापन केल. परंतु आज शेतकऱ्यांना मात्र,हेच का अच्छे दिन असा प्रश्न पडू लागला असताना या कायद्याने शेतकऱ्यासाठीचे धोरण हेच शेतकऱ्याच मरण ठरु पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मरणाच्या दारात झोकणारा सदर कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा काँग्रेस पार्टी च्या वतीने जन आंदोलन छेडण्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड ईशारा मारेगाव कमिटी च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी नरेंद्र पा. ठाकरे (संचालक पणन, मुंबई), कृ. उ बा समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, विजय घोटेकर, यादव पांडे, आकाश बदकी, गंगाधर ठावरी, विनोद आत्राम, प्रफुल विखणकर, सय्यद समीर, आकाश भेले, मंगेश उईके, भाऊराव मेश्राम, विलास काळे,विजय बोथले, दिवाकर हस्ते, मारोती सोमलकर, विनोद धोबे, आनंद मसराम, प्रकाश पिदूरकर, जनार्दन गाडगे, आदीसह असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

संघर्षातून सिद्धीकडे... लेखक पवन कुसुंदल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जीवन जगत असताना आपण पाहतो,कधी अस वाटत आता सर्व मार्ग बंद झालेत आणि आपण हताश होतो व नकारात्मक भूमिका मनावर हावी होऊन पुढे पाहणच बंद करतो.अनेकांनी ह्या स्थितीचा अनुभव जीवनात एकदा तरी घेतला असेलच.जीवन हे संघर्षाने उज्वल बनते हे काही नवीन नाही प्रत्येकजण जीवन जगण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत राहतो ज्यामध्ये उपजीविका भागवण्यासाठी विविध प्रकारची कामे असतील कुणी नोकरी तर कुणी व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात संघर्ष आहेच.

         शिक्षण,आकलनशक्ती,चातुर्य, समज आणि बुद्धिमत्ता जरूर सर्वांच्या वेगवेगळया असतील परंतु जगण्याची जिद्द सर्वांची सारखी असते व यासाठी मनुष्य अविरत प्रयत्न करत राहतो.पशू ,पक्षी आणि जीवजंतू हे सुद्धा जगतच असतात मग त्यांचा उदरनिर्वाह कोण चालवतो कारण ते तर माणसा सारखे काहीच काम,व्यवसाय करत नाहीत.ईश्वराने जन्म दिला आहे तेंव्हा त्याची काळजी सुद्धा तो करणारच.पृथ्वीतलावर केवळ मनुष्य धडपडत राहतो आणि जीवनाबद्दल कायम उदासीन सुद्धा राहतो.
        आपण मोठ-मोठ्या व्यक्तीबद्दल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रखरतेने लक्षात येईल की कुणाचेच जीवन हे सुखकर नव्हते सर्वांनी आकंठ संघर्षातून जीवन घडवले आहे.हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढून त्यांनी ते साध्य करून दाखवलं जे इतर लोकांना अशक्य वाटत असे.अखंड स्वराज्याची स्थापना केवळ संकल्पना होती परंतु शिवकालीन इतिहास पाहिला तर बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात हीच संकल्पना साध्य करून दाखवली,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली व त्या शिक्षणाच्या ताकतीने संविधान निर्मिती करून मोलाचे योगदान दिले.भारत सुध्दा एक दिवसात स्वतंत्र झाला नसून त्यात अनेक थोर लढवय्या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रबळ इच्छाशक्तीचा वाटा आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अदम्य साहस,लोकमान्य टिळकांची संघटन शक्ती,सावित्री बाई फुले यांनी महिलांसाठी शिकण्याची मुहूर्तमेढ रोवली तर भगतसिंग यांनी अगदी पोर वयात बलिदान दिले व हे सर्व करू शकले कारण त्यांनी नकारात्मक भावनेला जीवनात थारा दिला नाही.
         एक एक धागा जोडून सुंदर वस्त्र निर्मिती होते.एक एक विट रचून इमारती बांधल्या जातात.पक्षी एक एक गवताची काडी जमा करून घरटे तयार करतात म्हणून कुठेतरी छोटीसी सुरुवात केल्यानंतरच मोठं मोठी ध्येय साध्य होऊ शकतात.एक छोटी ठिणगी संपूर्ण जंगल उध्वस्त करण्याचं सामर्थ्य ठेवते आणि हीच ठिणगी जर मनात एक जिद्द पेटवण्यासाठी पडली तर माणसासाठी काहीच अशक्त राहत नाही.झाडावर चढताना साधी मुंगी सुध्दा हजारदा पडते परंतु जिद्दीने पुन्हा एकदा प्रयत्न करतेच.माणसाने मधाची पोळी काढून घेतली म्हणून मधमाशी कधी मधसंचयाचे काम सोडत नाही मग जर हे करू शकतात तर माणूस बलशाली,बुद्धीशाली असून का खचून जातो.एक शारीरिक विकलांग भिक मागताना दिसतो तर कुठेतरी असाच एक विकलांग काम करताना पण आपण पाहतो मग विकलांगता ही शारीरिक अपंगत्वाचे कारण नसून मानसिक अपंगत्वाचे आहे हे सिद्ध होते.नकळतपणे फेकलेले बी रुजते तर खडकातून वर मान काढत सुंदर रोपटे जन्म घेऊ शकते कारण मनाची तयारी भक्कम असेल तर सुरुवात कुठूनही करता येते.
        संघर्षमय जीवन जगासाठी उदाहरण बनून जाते.लढाई न करता हार मानन्यापेक्षा लढत मरणे कधीही उत्तम.

साप्ताहिक राशीभविष्य : २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३


कसा राहील तुमच्यासाठी हा आठवडा? या आठवड्यातील कोणते दिवस तुमच्यासाठी शुभ आहे? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्यच्या माध्यमातून...!_

मेष आठवडा भविष्य
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय शुभ आहे. धनाच्या आगमनासाठी योगायोग घडत आहेत. कोणत्याही गुंतवणुकीबाबत मनात संभ्रम राहील, पण नंतर यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकाल. कामाच्या ठिकाणी काही त्रास वाढू शकतात. महत्त्वाच्या व्यवसाय किंवा कार्यालयीन कामासाठी या आठवड्यात तुम्हाला बाहेरगावी जावे लागेल. मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या शेवटी अनेक सुधारणा होतील.
शुभ दिवस: २९, ३०, ३१

वृषभ आठवडा भविष्य
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि मान-सन्मानही वाढेल. जिने कष्ट करून जीवनात स्थान मिळवले आहे अशा व्यक्तीची मदत मिळू शकते. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आर्थिक लाभ होईल पण तो तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल, त्यामुळे तुम्हाला या आठवड्यात संघर्ष करावा लागू शकतो. या आठवड्यात केलेल्या प्रवासातूनही शुभ परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: २८, २१

मिथुन आठवडा भविष्य
मिथुन राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करतील आणि तुमचा सन्मान वाढेल. या आठवड्यात एखादा नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम आणू शकतो. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा शुभ असून आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होत आहे. या आठवड्यात तुम्हाला पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये एखाद्याची मदत देखील मिळू शकते. या आठवड्यात प्रवास टाळलात तर बरे होईल. त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होईल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल.
शुभ दिवस: २८, ३१

कर्क आठवडा भविष्य
या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत पैसा वाढण्याची चांगली शक्यता आहे आणि पैसा विशेषत: फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत खूप सावध राहाल. तुम्हाला प्रवासाचे शुभ परिणामही मिळतील आणि तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी कोणतीही बातमी मिळाल्याने मन उदास होऊ शकते. या आठवड्यात प्रवासादरम्यान, तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटू शकता जो भविष्यात तुमच्यासाठी चांगली बातमी आणू शकेल.
शुभ दिवस: २८, २९, ३१

सिंह आठवडा भविष्य
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ आहे आणि या आठवड्यात धनलाभही होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल पुन्हा विचार करावा लागेल. भविष्यासाठी काही ठोस निर्णयही घेऊ शकता. अनेक संधीही उपलब्ध होतील. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टबद्दल बरीच माहिती गोळा करू शकता. या आठवड्यात तुम्ही काही धार्मिक कार्यासाठी प्रवास करण्याचा निर्णयही घेऊ शकता किंवा एखाद्या शांत निर्जन ठिकाणीही जाऊ शकता. अगदी आठवड्याच्या शेवटी, आपण ज्या प्रकारचे बदल शोधत आहात ते मिळविण्यासाठी वेळ लागेल.
शुभ दिवस: २९, ३१

कन्या आठवडा भविष्य
कन्या राशीच्या लोकांचे भाग्य तुम्हाला या आठवड्यात साथ देईल. क्षेत्रात मेहनत घेऊन नेटवर्किंग आवश्यक आहे, तरच प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. या आठवड्यात पैसा खर्च जास्त असू शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रवासाच्या माध्यमातून हा आठवडा शुभ परिणाम देणारा आहे. आठवड्याच्या शेवटी प्रतिकूल वेळ येईल. यावेळी काळजी घ्या.
शुभ दिवस: २८, ३०

तूळ आठवडा भविष्य
तूळ राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात या आठवड्यात प्रगती होईल आणि प्रकल्पातील यश पाहून मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत तुमच्या विचारावर ठाम राहा, तरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. धनलाभ होईल. भागीदारीत केलेले आरोग्यविषयक क्रियाकलाप तुमच्यासाठी शुभ परिणाम आणतील आणि निरोगीपणाकडे नेतील. या आठवड्यात प्रवास टाळलात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या विशिष्ट ठिकाणाबाबत मन चिंतेत राहू शकते.
शुभ दिवस: २९, ३०

वृश्चिक आठवडा भविष्य
या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्य क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कोणत्याही गुंतवणुकीकडे लक्ष देऊ शकाल आणि आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात काही बाबतीत तुम्हाला पैशाची चिंता लागू शकते आणि तुमच्या काही कामांवर परिणाम होऊ शकतो. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही थोडे अस्वस्थ वाटू शकता.
शुभ दिवस: २९, ३१

धनु आठवडा भविष्य
धनु राशीच्या लोकांना या प्रवासात यश मिळेल. या आठवड्यात प्रवासातून यश मिळेल आणि प्रवास यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अशा स्त्रीची मदत मिळेल जिने कठोर परिश्रम करून जीवनात स्थान प्राप्त केले आहे. कामाच्या ठिकाणीही एकटेपणा जाणवेल आणि मन अस्वस्थ राहील. या आठवड्यात आर्थिक खर्चही जास्त असेल. सप्ताहाच्या शेवटी वेळ अनुकूल राहील व मन प्रसन्न राहील.
शुभ दिवस: २८, ३०, १

मकर आठवडा भविष्य
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत विशेष असेल आणि आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त मेहनत कराल तितके यश मिळेल. या आठवड्यात प्रवासातही यश मिळेल आणि मन प्रसन्न राहील.
शुभ दिवस: २८, २९, ३१

कुंभ आठवडा भविष्य
कुंभ राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करतील आणि तुम्ही जितके विचारपूर्वक आणि संशोधन करून तुमच्या प्रकल्पावर निर्णय घ्याल, तितकी तुम्हाला जीवनात शांतता मिळेल. आर्थिक दृष्टीकोनातून काळ अनुकूल असून आर्थिक लाभाचे सुंदर संयोग निर्माण होत आहेत. गुंतवणुकीत काही नवीन विचार करायचा ठरवलात तर चांगले परिणाम समोर येतील. या आठवड्यात प्रवासाच्या पद्धतीतही बदल दिसून येत असून प्रवास यशस्वी होतील. आर्थिक बाबतीत खर्च अधिक होईल. सप्ताहाच्या शेवटी जीवनात अनेक बदल दिसून येतील आणि प्रवासातून यश मिळेल.
शुभ दिवस: २८, २९, ३१

मीन आठवडा भविष्य
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ आहे. धनलाभ होईल. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. भावनिक कारणांमुळे कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल. कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमच्या प्रवासात दुःख आणू शकतो.
शुभ दिवस : २९, १


सप्टेंबरमध्ये १६ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या दिवशी आणि काय आहेत कारणे? जाणून घ्या..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

सप्टेंबर महिन्यात अनेक सण-उत्सव असल्यामुळे देशभरातील बँका एकूण 16 दिवस बंद राहणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यात पुढील महिन्यातील प्रादेशिक सुट्ट्या, शनिवार, रविवारचा समावेश आहे. रविवारच्या एकूण 4 सुट्ट्या असतात. त्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. त्यामुळे या 6 सुट्ट्या निश्चित असणार आहेत. त्यात अजून काही दिवस बँका बंद राहणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात राज्यनिहाय बँकाच्या सुट्ट्यांची यादी.

▪️6 सप्टेंबर, बुधवार - श्री कृष्ण जन्माष्टमी
▪️7 सप्टेंबर, गुरुवार - जन्माष्टमी (श्रावण वद-8) / श्री कृष्ण अष्टमी
▪️8 सप्टेंबर, सोमवार - वर्षसिद्धी विनायक व्रत / विनायक चतुर्थी
▪️19 सप्टेंबर, मंगळवार - गणेश चतुर्थी / संवत्सरी (चतुर्थी पक्ष)
▪️20 सप्टेंबर, बुधवार - गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) / नुखाई
▪️22 सप्टेंबर, शुक्रवार - श्री नारायण गुरु समाधी दिन
▪️23 सप्टेंबर, शनिवार - महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन,
▪️25 सप्टेंबर, सोमवार - श्रीमंता शंकरदेव यांची जयंती,
▪️27 सप्टेंबर, बुधवार - मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस)
▪️28 सप्टेंबर गुरुवार - ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी - (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिन) (बारा वफत)
▪️29 सप्टेंबर शुक्रवार- -उल-नबी नंतर ईद-ए-मिलाद इंद्रजात्रा
यामुळे शेवट च्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी ग्राहकांनी बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करणं आता अधिक महत्वाचे ठरणार आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहाल निकाल?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला दुपारी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. 
कसा पाहाल निकाल?
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. यात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
 दहावीची पुरवणी परिक्षा 10 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. याचाच निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.


महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून यावर्षीचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. श्रीमती मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद समीक्षा शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आयसीटी अवॉर्डही मिळालेला आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शहरातील बांधकामात प्रचंड अनियमितता व नियमाला डावलून काम सुरु असल्याबाबत युवासेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात विविध विकासात्मक बांधकाम सुरु आहेत. मात्र, ही सर्व बांधकामात अनियमितता व नियमाला डावलून काम सुरू आहे, अशा आशयचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत युवासेनेने मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले. निवेदनावर अक्षय हेपट, अक्षय चन्ने, ऍड. अमोल कळस्कर, प्रफुल बोरडे, कौशिक शेख, राजू वाघमारे, सुरज चित्तलवार, श्रीनिवास डादलवार, शीतल येडलावार, विक्की परगंटीवार, योगेश पोद्दार, अमोल नक्षणे, राहुल खोब्रागडे, यांच्या सह्या आहेत. 
तक्रारीत युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी म्हटले की, शहरात नगरपरिषदेच्या वतीने बांधकामे सुरु आहेत, त्यात जैताई मंदिर परिसर, टिळक नगर, सत्यसेवा हॉस्पिटल जवळ खुसपुरे ते भुसारी यांच्या घरापर्यंत. भारत माता चौकापासून ते टागोर चौक रस्ता अशा प्रमाणे कामे शहरात सुरु आहेत. काही काम पूर्ण झालेले सुद्धा आहेत. मात्र, सदर नालीचे कामे सुरु असताना सिमेंट पाईप रस्त्यावर असताव्यस्त टाकलेले असून त्यामुळे रहदारी करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना बरेच किरकोळ अपघात झालेले आहेत.
दरम्यान, शाळेचे चिमुकले सुद्धा किरकोळ जखमी झाले आहे. विशेषता शहरात अशाप्रकारे बांधकामावर नगरपरिषदेचे अधिकृत सेवेत असलेले इंजिनीयर यांची देखरेख असणे आवश्यक आहे. परंतु ते कुठेही दिसत नाही. त्यामुळे त्यांचेवर सुद्धा कडक कारवाई होणे जरुरी आहे. याशिवाय नमूद कामाचे इस्टिमेट, नकाशे, कामाचा फलक, करारनामा पुरवण्यात यावा. त्यामुळे त्याच (कामाची) गुणवत्ता चाचणी सुद्धा घेता येईल. अशा विविध मागणीचे निवेदन युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी आपल्या युवा शिवसैनिकासह येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
शहरातील नगर परिषद हद्दीतील क्षेत्रात नाली व रस्त्यांचे बांधकाम सुरू असून सदर असताव्यस्त पडलेल्या, व वरीलप्रमाणे नमूद कामाची दखल संबंधित अधिकारी घेतात की नाही? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.