Showing posts with label गडचिरोली. Show all posts
Showing posts with label गडचिरोली. Show all posts

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार – उपमुख्यमंत्री अजित पवार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह विभाग, अर्थ विभाग आहेच. परंतू संपूर्ण कॅबिनेट संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे कार्यक्रमात दिली. ते पोलिस विभागातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले होते. सी- 60 जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृह विभागाकडून सी-60 जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता तो तातडीने मंजूर केला. तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्य दलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी प्रयत्न करु असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप महानिरिक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम व सी-60 जावानांची पथकं उपस्थित होती. सी-60 जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकीत जवानांच्या चांगल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सन्मानीत केले. यावेळी प्रत्येक जवानांशी मंचावर आल्यावर आदराने विचारपूस केली व कौतुकाची थाप मारली. यावेळी बोलतांना ते म्हणाले मर्दीनटोला येथील नक्षल चकमक ही ऐतिहासिक घटना आहे. याची नोंद पंतप्रधानांनी घेतली. मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुकही केले. राज्यात जिल्ह्यात शांतता अखंड रहावी म्हणून तुम्ही आहोरात्र मेहनत घेता यासाठी मी सर्व सी-60 जवानांना सलाम करतो असे गौरवोद्गार त्यांनी बोलतांना काढले.

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नक्षलवाद्याविरुद्ध लढत असतांना आता सी-60 जवानांची नवीन ओळख निर्माण झाल्याचे म्हटले. नक्षलवाद्यांचा बिमोड करणारी टिम म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. नक्षल चळवळीतील लोकांमध्येही या सी-60 पथकाचा दरारा निर्माण झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. कर्तव्याला श्रेष्ठ माननाऱ्या जवानांसाठी आम्ही त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ केली. आता पुढील मागण्याही लवकरच पुर्ण करु यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मानले.
रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात रेल्वे मार्गावर भाष्य केले. यासाठी जिल्हा‍धिकारी, पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पुढील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने मुंबईला बैठक आयोजित करु असे सांगितले. यावेळी अडचणी, निधी, तसेच कामे वेळेत कशी पूर्ण होतील याबाबत विचार विनिमय करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी गावाच्या परिसरातील नागरिकांशी, आरोग्य सेविका, आदिवासी बांधव, बालकांशीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साधला संवाद. यावेळी उपस्थित मुलांशी त्यांनी शालेय स्तरावरील गप्पा मारल्या. तसेच नागरिकांनाही शेतीविषयक प्रश्न विचारले. दैनंदिन स्वरूपात आदिवासी बांधवांचा दिनक्रम कसा चालतो याबाबत ही विचारणा केली. उपस्थितांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध साहित्याचे वाटपही करण्यात आले.

केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांचे हस्ते आयुष्यमान भारत मधून दिव्यांग साहित्याचे वाटप

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सववांतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयात भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांचेहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांचे हस्ते आयुष्यमान भारत योजनेंतर्गत विविध पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वितरणही करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले, जिल्हयात प्रधानमंत्री केअर फंडामधून पीएसए ऑक्सिजन प्लांटची उभारणी झाली आहे. कोरोना काळात ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होता ही आनंदाची बाब आहे. देशात आयुष्यमान भारत ही योजना यशस्वीपणे सुरू आहे. जिल्हयातील सर्व गरजूंना आयुष्यमान कार्ड मिळेल यासाठी नियोजन करावे. देश आरोग्य क्षेत्रात प्रगती करीत असून नुकतेच जगातील पहिल्या आयुर्वेद संस्थेला मंजूरी जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळाली आहे. ती संस्था भारतातीलच एक आहे. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी संजय मीणा, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल रूडे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान सर्व उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना समोर बोलविले. व उपस्थित इतरांना उभे राहून कोविड मधे केलेल्या कार्याबद्दल टाळयांच्या गजरात त्यांचा गौरव करण्याचे आवाहन केले. यावेळी मंत्री म्हणाले, कोविड काळात एक अशी वेळ होती की कोविड बाधिताच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना भेटणे टाळले, दूर्दैवी मृत पावलेल्या रूग्णांच्या काही नातेवाईकांनी मृतास पाहणेही नाकारले. परंतू या आरोग्य योद्ध्यांनी सर्व आवश्यक मदत रूग्णांना दिली. त्यांचे कार्य न मोजता येणारे आहे. यासाठी त्यांचा सन्मान यथायोग्य आहे.आरोग्य मेळाव्याच्या शेवटी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत विविध पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच आयुष्यमान भारतच्या कार्डचे वितरणही करण्यात आले. तत्पुर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयात पीएम केअर फंडातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ त्यांचे हस्ते संपन्न झाला.

केंद्र अर्थसहाय्यीत विविध योजनांचा घेतला आढावा:

केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात केंद्र अर्थसहाय्यीत विविध योजनांचा आढावा घेतला. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, रोजगार हामी योजना, मुद्रा लोन, स्डॅण्डअप इंडीया, उडान, प्रधानमंत्री सडक योजना यांचा समावेश होता. या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी विविध योजनांबद्दल सादरीकरण केले. तसेच जिल्हयातील नाविण्यपूर्ण योजनांची माहिती दिली.

या बैठकीत केंद्रीय मंत्री महोदयांनी उपस्थितांचे विविध योजनांमधील केलेल्या कार्याबद्दल आभार मानले. जिल्हयात रीक्त जागांची संख्या जास्त असतानाही केलेले कार्य समाधानकारक असल्याचे ते म्हणाले. रीक्त जागांबाबत आवश्यक त्या स्तरावर चर्चा करणार असल्याचेही ते बोलले. कारण आकांक्षित जिल्हयात कोणत्याही पदावर जागा रीक्त नसणे गरजेचे असून विकास कामांसाठी जागा भरलेल्या प्रशासकीय कामांसाठी गरजेचे असते. जिल्हयात मत्स्य शेतीला चालना द्या, अगदी कमी खर्चात आता मत्स्य शेती करता येते. फक्त शेतात तळे खोदा, चांगले बीज टाका त्यातून निश्चित फायदा होईल असा सल्ला जिल्हयातील युवा शेतकऱ्यांना बैठकीवेळी दिला. केंद्र व राज्याच्या मत्स्य शेतीच्या योजनांचा फायदाही घेण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.

पशुधन सांभाळताना आपली गाय ३ ते ४ लिटर दूध देते. यातून शेतकरी कसा वर येईल. आपल्याला योग्य जनावरांची निवड करावी लागेल. चांगली जनावरे शेतकऱ्यांना अर्थिक अडचणीतून निश्चित बाहेर काढतील असे ते मार्गदर्शनपर भाषणात बोलले. या बैठकीला खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी संजय मीणा, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.

कुलसंगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस : विविध संघटननांनी भेट देऊन दिले समर्थन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके स्मारकाचे झालेले नुकसान त्वरीत दुरुस्त करुन देण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले गडचिरोली येथील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांना काल दिनांक ०५ एप्रील २०२२ रोजी प्रकृती खालावल्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी कुलसंगे यांच्यावर उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे .
            
दरम्यान गडचिरोली येथिल प्रसिद्ध सामाजिक कायकर्ते डॉ.शिवनाथ  कुंभारे सर, गुरुदेव सेवा मंडळचे पंडीत पुडके सुखदेव वेठे, विविध सामजिक संघटनांच्या महिला कार्यकर्ता रुग्णालयात जाऊन वसंत कुलसंगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

तसेच या संपू्र्ण उपोषणाला व कुलसंगे यांनी केलेल्या मागणीला संपूर्ण समर्थन जाहिर केले. कुलसंगे यांनी शासनापुढे मांडलेल्या मागणीचा पाठपूरावा करण्यासाठी गडचिरोली शहरातील तथा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, राजकिय संघटना ह्या एकवटलेल्या असून या येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार या वेळी सर्व कार्यकर्तांनी व्यक्त केला.
        
विशेष म्हणजे चामोर्शी रोडवरील वीर बाबुराव शेडमाके स्मारकाची नासधूस राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने तीन महिन्यापूर्वी केली होती आणि त्यामुळे हे स्मारक मोडकळीस आले असुन कोणत्याही क्षणी कोसळू शकते व असे जर झाले तर त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्य हानी व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे या स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. म्हणुन कुलसंंगे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. चार दिवस उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या सल्यानुसार त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके यांच्या गडचिरोली -चामोर्शी महामार्गावरील स्मारकांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाद्वारे प्रचंड नुकसान कलेल्या ठिकाणास गडचिरोलीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे साहेब, माजी आमदार आनंदराव गेडाम साहेब, गुरुदेव सेवा मंडळाचे पंजीत पुडके साहेब, वेठे साहेब , जेष्ठ पत्रकार रोहीदास राऊत सर इत्यादी सामाजिक तथा राजकिय कार्यकर्त्यांनी घटनास्थळालाा प्रत्यक्ष भेट दिली. तसेच शहिद वीर बाबुराव शेडमाके स्मारकाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहनी करुन त्यावर सविस्तर चर्चा केली.        
(शासकिय रुग्णालयात उपोषणादरम्यान उपचार घेतांना वसंतराव कुलसंगे साहेब)

त्याचप्रमाणे स्मारकाच्या नुकसान भरपाईसाठी मा.वसंतरावजी कुलसंगे यानी दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ पासून केलेल्या आमरण उपोषणास संपूर्ण समर्थन दर्शवून पूर्ण पाठींबा दर्शविला आहे. उपोषणाच्या ४ थ्या दिवसी डॉक्टरांच्या सल्याने व पोलीस प्रशासनाच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याबाबत शारीरीक प्रकृतीची चौकशी केली. 
        
त्याचप्रमाणे शहिद स्मारकाच्या नुकसानग्स्त भागाची पूर्ववत बांधनी करण्यासाठी शासन तथा प्रशासनाकडे पाठपूरावा करणार असल्याचेही सांगीतले.

"जो पर्यंत शहिद स्मारकाच्या नुकसानग्रस्त भागाची पूर्ववत पायाभरणी करणार नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके आदिवासी विकास प्रबोधन समीतीचे संस्थापक अध्यक्ष मान. वसंतराव कुलसंगे यानी निर्धार केला आहे."

वसंत कुलसंगे उपोषणाचा चौथा दिवस; प्रकृती खालावली - प्रशासनाचे दुर्लक्ष


सह्याद्री चौफेर | न्यूज 

गडचिरोली : चामोर्शी रोडवरील वीर बाबुराव स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी साठी येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर या मागणी चे तीन दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत वसंत कुलससंगे यांचे उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

या उघोषणामुळे कुलसंगे यांची प्रकृती खालावली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज दुपारी त्यांची तपासणी केली.

उपोषणाचा चौथा दिवस असूनही प्रशासनातर्फे त्यांच्या मागणीची अजून पर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. मात्र, वीर बाबुराव स्मारकाची दुरुस्ती होई पर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार कुलसंगे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आदीवासी समाजाच्या विवीध संघटना व कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे. काल या कार्यकत्यांनी जिल्हाधिकारी ग गडचिरोली यांना निवेदन सुध्दा सादर केले. गोंडवाना गणतंत्र पार्टी, अखील भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली, बिरसा क्रांती दल, गोंडवाना गोटूल समिती आदिवासील महीला परिषद इ. संघटनांचा त्यात समावेश होता. 

वीर बाबुराव स्मारकाचे कंत्राटदाराने केलेल्या नुकसानीचा तीव्र निषेध करून या स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच स्मारकाचे नुकसान करणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही भागणी केली आहे. दरख्यात अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यास रोहिदास राऊत, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे, सुरज मडावी, लोमेश गेडाम, माजी नगरसेविका वर्षात ताई शेडमाके, माझी पोलीस निरीक्षक शिवराम कुमरे, मंजुळाताई पुढे, मनीराम दुग्गा व अन्य कार्यकर्ता. यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.


गडचिरोली जिल्ह्यात आता ब्लॉकचेन प्रणालीद्वारे जात प्रमाणपत्रे निर्गमित होणार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यात जात प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जात प्रमाणपत्रांची नक्कल, खोटी प्रकरणे रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप वीक विजेत्या लेजीटडॉक (LegitDoc) या स्टार्टअपची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या डिजिटल स्वाक्षरी केलेली जात प्रमाणपत्रे नागरिकांना महाऑनलाइन पोर्टलद्वारे जारी केली जातात. तथापि, बहुसंख्य लोक सोयीच्या दृष्टीने जात प्रमाणपत्रे कागदी प्रिंटच्या स्वरूपात बाळगतात आणि यामुळे छापील कागदांवरील डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित करणे शक्य होत नाही. डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे जारी करूनही आज जात प्रमाणपत्रांची नक्कल आणि खोटी प्रकरणे निदर्शनास येतात. हे टाळण्यासाठी आता ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पॉलीगॉन POS तंत्रज्ञानाचा वापर करून जात प्रमाणपत्रे ब्लॉकचेन प्रणालीद्वारे प्रमाणित करता येणार आहेत. प्रत्येक जात प्रमाणपत्रावरील महत्त्वाचे तपशील पॉलीगॉन POS ब्लॉकचेन सिस्टीमद्वारे क्रिप्टोग्राफिक QR कोड स्वरुपात दर्शविले जातील. या QR कोडद्वारे शासकीय विभाग अथवा इतर कोणत्याही कार्यालयांना या प्रमाणपत्राची पडताळणी व सत्यता सत्यापित करणे शक्य होणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागात राबविला जात असून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेल्या एटापल्ली आणि भामरागडमधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली उपविभाग कार्यालयाच्या अधिपत्याखालील सुमारे 65 हजार जात प्रमाणपत्रांची माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. पुढील एका महिन्यात जात प्रमाणपत्रांचा सर्व डेटा ब्लॉकचेन प्रणालीमध्ये भरला जाणार आहे. QR कोड असलेली ब्लॉकचेन-सक्षम जात प्रमाणपत्रे जिल्ह्यातील सामायिक सेवा केंद्रांद्वारे (Common Service Centre) नागरिकांना प्राप्त करता येतील.

याबाबत श्री. कुशवाह म्हणाले की, भारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे मूळ महाराष्ट्रात आहे, ज्या की आज जागतिक स्तरावरही यशस्वी ठरत आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत विजेत्या ठरलेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन, सेवेच्या प्रकल्पांची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी 15 लाख रुपयांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात. हा उपक्रम प्रशासनात नाविन्यता आणण्यात मोठी भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले. 

सहायक जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, या नावीन्यपूर्ण यंत्रणेमुळे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्रांच्या गैरवापरास आळा बसेल. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनद्वारे नवीन प्रमाणपत्रे ब्लॉकचेनद्वारे निर्गमित केले जातील.

लेजीटडॉक (LegitDoc) स्टार्टअपचे सहसंस्थापक नील मार्टिस म्हणाले की, प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी महाराष्ट्र शासन ई-गव्हर्नन्स उपक्रमांमधे वेब/ब्लॉकचेनसारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची बाब अतिशय महत्वकांक्षी व लक्षणीय आहे. अशा उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात आमुलाग्र सकारात्मक बदल दिसतील.

ब्लॉकचेन प्रणालीद्वारे निर्गमित केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची सत्यता अवघ्या 10 सेकंदांत सत्यापित करता येते. कुठल्याही प्रकारच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

गडचिराेलीत थाटात महिला दिन साजरा; नारीशक्तीचे आयोजन, मनिषा मडावींचा सत्कार !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन नारीशक्ती जिल्हा शाखा गडचिरोली यांचे वतीने मंगळवार दि. 8 मार्च 2022 ला मृणाली मेश्राम यांचे निवासस्थानी (गोकुळ नगर येथे) जागतिक महिला दिन थाटात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गडचिरोलीच्या रंजिता काेडापे यांचे हस्ते झाले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रंजना गेडाम नगरसेविका, वर्षा शेडमाके माजी नगरसेविका तथा माजी सभापती नगरपरिषद, संध्या उईके माजी नगरसेविका, मीनल चीमुरकर, आरती कोल्हे व नीता बोभाटे ह्या महिला उपस्थित होत्या.सदरहु आयाेजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नारी शक्ती संघटनच्या अध्यक्षा जयश्री येरमे यांनी भूषविले हाेते. सदरहु कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डाँ .बाबासाहेब आंबेडकर आणि विरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमात मनीषा मडावी व त्यांच्या पथकाने मॉडलिंग मध्ये पुणे येथे पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल जागतिक महिला दिनी त्यांच्या पथकाचा प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महिला दिना निमित्त्याने लक्ष्मी कन्नाके,सपना दुबे, भूमिका बर्डे, मृणाली मेश्राम, बिना उईके अंजली कोडापे यांच्या पथकाने समूह नृत्य व गीत सादर केले. तर वंदना मडावी यांनी संसारातील स्त्रीच्या व्यथा यासंबंधीची कविता कार्यक्रमात सादर केली. वैयक्तिक नृत्य शालिनी पेंदाम व सपना दुबे यांनी सादर केलीत. या भरगच्च कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी महिलांचे हक्क व अधिकार, त्यांच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार तसेच महिलांची सुरक्षितता, शिक्षण,आरोग्य आणि समाजात तसेच कुटुंबात महिलांचे भरीव योगदान याबाबत आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भारती मडावी (सचिव नारी शक्ती संघटन,)यांनी केले तर प्रास्ताविक रेखा तोडासे (कार्याध्यक्ष) यांनी केले उपस्थितीतांचे आभार अंजली कोडापे सदस्य यांनी मानले. थाटात पार पडलेल्या या कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मृणाली मेश्राम, अंजली कोडापे, विना उईके, मंजुषा कन्नाके,लक्ष्मी, कन्नाके ,भारती मडावी, रेखा तोडासे, नेहा गेडाम, शालिनी पेंदाम, वंदना मडावी आदींनी अथक परिश्रम घेतले.

समाजात महिला नेतृत्वास डावलले जाते - कुसुम ताई अलाम


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : स्वतंत्र महिला नेतृत्व सक्षम असले तरी ते स्विकारले जात नाही. ज्यांना राजकीय पाठबळ नाही अशा अभ्यासू, विचारवंत व निर्णयक्षमता असलेल्या महिलांना संधी डावलली जाते. National Council of Women Leader's या दिनांक 5 व 6 मार्च रोजी पुणे येथे दोन दिवसीय कार्यक्रमात आदिवासी महिला विषयक व पंचायत राज मधील महिला विषयक चर्चा सत्रात जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळातील अनुभवाची उकल करीत माजी जि.प.सदस्या, गडचिराेलीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ मार्गदर्शिका कुसुमताई अलाम या वेळी बोलत होत्या.

दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक महिला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य विषयक, मानसिक सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय यावर चर्चा केल्या गेली. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भक्कमपणे मजबूत व्हावे. शासकिय स्तरावरून विविध प्रकारच्या योजना मिळाव्या त्यासाठी पाठपुरावा करणे, डाटा, पुरावे, दस्ताऐवजीकरण करणे, कायदेविषयक पॅनल तयार करणे, इत्यादी विषयांवर नियोजनबध्द कार्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे चर्चेतून या वेळी सुर उमटले
कार्यक्रमास डॉ .शितल कांबळे यांचेसह महाराष्ट्रातील अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

गडचिराेलीत काव्य मैफीलचा कार्यक्रम संपन्न !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था शाखा गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने काव्यमैफिल आयोजित करण्यात आली हाेती.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान काव्यांगण साहित्य समुहाच्या राज्य सल्लागारच्या कुसुम ताई अलाम यांनी विभूषित केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की गडचिरोली जिल्हाच्या साहित्यिकांची मोठी जबाबदारी आहे. हा जिल्हा विविध कारणाने जळतो आहे. आपल्या जिल्ह्यातील समस्या वेगळी आहे. हे लेखणीतून उतरले जावे. या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जावा असे लेखक कलावंत येथे आहेत. आपल्या लेखणीला अधिक धारदार बनवले गेले पाहिजे. काव्यांगणचे जिल्हाध्यक्ष अशोक मांदाडे यांच्या पुढाकाराने व सर्वांच्या सहकार्याने काव्य मैफिलचा कार्यक्रम यशस्वी झाला याप्रसंगी निरज आत्राम (राष्ट्रीय संस्थापक कार्याध्यक्ष) यांचा गडचिरोली शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मारोती आरेवार, जितेंद्र रायपुरे, उपेंद्र रोहनकर प्रतिक्षा पि.कोडापे, प्रेमिला अलोणे, सुधाताई चौधरी, पुरुषोत्तम लेनगुरे, हरिदास कोटरंगे, पुरुषोत्तम ठाकरे, शरद गायकवाड, नयन निकोडे यांनी या वेळी काव्य वाचन केले.
विज्ञान,युवकांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील, शेती, महिला अस्तित्व, हिंसा, सावित्री माई फुले, बाबासाहेब भीमराव, परिवर्तन, प्रबोधनशिल अशा सामाजिक आशयाच्या अनेक प्रकारच्या कविता या वेळी सादर झाल्या. सदरहु कार्यक्रम प्रसंगी नरेंद्र निकोडे, किर्ती निकोडे, मंगला मांदाडे, विजया मांदाडे, निरुपम मांदाडे आदीं उपस्थित होते. काव्य मैफिलचे संचालन अशोक मांदाडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार नयन निकोडे यांनी मानले.

कार्यक्रमाला गडचिराेलीतील बरेच श्राेते उपस्थित हाेते.

दखल न्युज भारत चे संपादक जगदीश वेन्नम यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

गडचिरोली : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगर-दऱ्यामध्ये वसलेल्या रेगुंठा येथील उच्च शिक्षित युवक दखल न्यूज भारत चे संपादक मा.जगदीश वेन्नम यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय सम्मान २०२२ चे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  
एकता फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक कार्यकर्ते व बचाव कार्य,मदत कार्य,किंवा पत्रकारिता व सुशिक्षित युवकांना दिले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य स्थरावर गडचिरोली चे जगदीश वेन्नम यांचे पत्रकारिता, सामाजिक कार्य,हेलपिंग कार्य आधारे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी टरून जिल्ह्यात मानाचा तुरा रोवले करिता जिल्ह्यात अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

आदिवासी एकता युवा परिषदच्या वतीने महिला हिंसाचार विरोधी कार्यक्रम


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

गडचिरोली : आदिवासी एकता युवा परिषदच्या वतीने बुधवार दि.१ डिसेंबरला गडचिराेली जिल्ह्यातील लांजेडा येथे महिला हिंसाचार विरोधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई ब्राम्हणवाडे यांनी विभूषित केले हाेते तर मार्गदर्शक म्हणुन अॅड. निलिमा जुमनाके,निता वडेट्टीवार, गोविंदराव ब्राम्हणवाडे विलासराव निंबोरकर, अरुण भोसले तुलाराम नैताम, कुसुम ताई अलाम उपस्थित हाेते.या शिवाय या कार्यक्रमाला मानका सुधाकर मेश्राम, पारबता दशरथ गेडाम, सुषमा गणेश मडावी,शकुंतला सोमनकार, मंगला नैताम, शेवंता टिंगुसले, अल्का नैताम, इंदिरा नैताम, कासु नैताम, वंदना नैताम, लिला नैताम, व दारुबंदीच्या इतर महिला सदस्या उपस्थित होत्या.

आयोजित चर्चा सत्राच्या अनुषंगाने महिला हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची माहिती या वेळी देण्यात आली. तदवतचं महिलांच्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यांत आली.

गडचिराेलीत दाेन दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

सह्याद्री | किरण घाटे 

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आदिवासी समाज संस्कृती साहित्य इतिहास ह्या विषयावर दोन दिवस राष्ट्रीय परिसंवाद जनाधिकार मंच, आदिवासी एकता युवा परिषद, नारायण सिंह ऊईके विकास समिती ब्रम्हपूरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित केला होता.गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार कै. बाबुरावजी मडावी यांच्या दृष्टीकोनातून या जिल्ह्याचा विकास कसा होता व पुढे या परिसराची विकासाच्या दृष्टीने वाटचाल कशी असावी यावर चिंतन करण्यात आले. गडचिरोली हे देशाचे विकास माँडेल बनावे,

आर्थिक, सामाजिक प्रश्नांना घेऊन आपली विकासात्मक वाटचाल करावी. शिक्षणाची गंगोत्री व्हावी,व देशभरातून अभ्यासक, संशोधक येथे येवून अभ्यास करावे. हे त्यांचे स्वप्न होते. गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने त्यांच्या स्वप्नातील आदिवासी विकासाची पूर्तता होईल असे वक्तव्य कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केले. सदरहु राष्ट्रीय परिसंवादासाठी विद्यापीठाच्या इतिहास विभागाने अथक परिश्रम घेतले.

डॉ .रश्मी बंड, डॉ. नरेश मडावी, डॉ .संतोष सुरडकर यांचा मोलाचा वाटा आहे. कुसुम ताई अलाम यांच्या रान आसवांचे तळे, रान पाखरांची माय, रान जखमांचे गोंदण या तीनही कविता संग्रहावर प्रमोद बोरसरे यांनी विवेचन केले.

काव्यांगण लेखणी साहित्य मंचच्या राष्ट्रीय सल्लागार पदी गडचिराेलीच्या कुसुमताई अलाम यांची नियुक्ती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : नवोदित कवी व प्रतिभावंत कवींच्या कवितांना वाव मिळावा म्हणून राजू पाडेकर यांच्या प्रेरणेतून काव्यांगण लेखणी साहित्य मंचाची निर्मिती करण्यात आली. याच साहित्य मंचाच्या राष्ट्रीय सल्लागार पदावर गडचिराेलीच्या साहित्यिका कुसुमताई अलाम यांची निवड करण्यात आली तर, राष्ट्रीय संघटक म्हणून रवींद्र गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्यानेच नव्यांगण लेखणी साहित्य मंचच्या गडचिरोली जिल्हा शाखेची निर्मिती नुकतीच करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष अशोक मंदाडे, उपाध्यक्ष रजनी सलामे,पुरुषोत्तम ठाकरे (महासचिव), मारोती आरेवार (सचिव), महिला आघाडी प्रमुख पदी प्रतिक्षा कोडापे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक व शैक्षणिक स्तरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय राज्य अध्यक्ष कवि राजू पाडेकर व राज्य कार्याध्यक्ष प्रा.नीरज आत्राम यांना दिले.

सत्यशाेधक चळवळीचे नागेश चौधरी यांच्या "बहुजनाच्या सामाजिक - सांस्कृतिक एल्गारचे" गडचिराेलीत प्रकाशन

सह्याद्री | किरण घाटे

चंद्रपूर : गडचिरोली मधील बळीराजा पॅलेस येथे दि.६ नाेव्हेंबरला सत्यशोधक चळवळीचे अग्रणी असलेले अभ्यासू व विचारवंत नागेश चौधरी यांच्या बहुजनांचा सामाजिक सांस्कृतिक एल्गारचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प.सदस्या तथा महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कृत साहित्यिका कुसुम ताई अलाम यांनी विभूषित केले हाेते. बटू वामनाचे रुप घेऊन बळीराजाला पाताळात गाडले. नैऋती नावाची बीजमाता धान्याचा शोध लावणारी मातृसत्ता हिच्या कडून बळीराजाने गुण घेतले होते. मातृसत्ता ही समानता,कल्याणासाठी, संरक्षण देणारी असते त्या मातृसत्तेचे गुण बळीराजा मध्ये होते. म्हणजे ते प्रजा हितदक्ष होते. त्यामुळे त्यांचा बळी गेला,हा सांस्कृतिक संघर्ष आहे. आदिवासींसोबत हा सांस्कृतिक संघर्ष दिसतो. अयोध्येतील राम मंदिराच्या साठी आदिवासीच्या पवित्र स्थळांची माती प्रतिकात्मक रुपात जात आहे. बळीराजाचाआजही बळी दिला जात आहे हे दिल्लीतील आंदोलनातून दिसते. असे विचार अलाम यांनी आपल्या भाषणातून या वेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार (द हितवाद) राेहीदास राऊत, जेष्ठ समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलासराव निंबाळकर हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. यांचे ही यावेळी भाषणे झाली. प्रा .संतोष सुरडकर यांनी आपल्या सुरेल आवाजातील क्रांतीगीत गायले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मानंद मेश्राम यांनी केले. अशोक मांदाळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. उपस्थितीतांचे आभार प्रवृत्ती वाळके यांनी मानले. या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली हाेती.

सुरजागड : ठिय्या आंदोलन !



               सुरजागड, ठिय्या आंदोलन !

२५ ऑक्टाेंबर पासुन सुरजागड खनिज प्रकल्पाच्या विरोधात एटापल्ली येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन वरवर पाहता आदिवासींचा हक्क, अधिकार यासाठी लढा आहे असे वाटत असले तरी आंदोलकांची या मागची काय भुमिका आहे हे समजुन घेतले पाहिजे.

या खदानीमुळे केवळ सर्व सजीव सृष्टीचे सौंदर्य, पर्यावरणाचे संरक्षण, विस्थापन, प्रदुषण, आरोग्य, विकास, रोजगार हे प्रश्न निर्माण होणार आहेत असे नव्हे तर आदिवासींची आयडेंटिटी नाकारणारा विकास आहे हे समजुन घेतले पाहिजे. इलाक्यातील हजारो आदिवासींनी का रस्त्यावर उतरावे? आपले घरदार मुले बाळ, गुरेढोरे, शेतीवाडी सारे सोडून झाडाच्या खाली चुली पेटवून खुल्या जागेवर थंडीमध्ये धरणीला पाठ टेकवावी व आकाशाकडे बघत आहेत ते का मुर्ख आहेत का? असे दुर्दैवी चित्र दिसत आहे यावर प्रसार माध्यमांनी सहकार्य केले पाहिजे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, अभ्यासू, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन शासन प्रशासनासोबत संवाद साधला पाहिजे.

आदिवासींसाठी असलेले संविधानातील हक्क, पाचवी अनूसूचि,स्वशासन चालवण्यासाठीचा पेसा कायदा याचा आधार घेत आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलकांची ही मागणी रास्त आहे की, नाही यावर खरे तर चर्चा होणे गरजेचे आहे. विकासाची नेमकी परिभाषा कोणती याची मांडणी होणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैचारिक भूमिका मांडली पाहिजे असे माझे ठाम मत आहे. इलाका गोटुल ने या संघर्षाची सुरवात केली. ज्याला मागासलेला म्हणतात तो अशिक्षित आदिवासी माणुस शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतो आहे. हे वाखाणण्याजोगे आहे. खरं तर, गडचिरोली जिल्हा देशपातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींमुळे नावारुपाला आला आहे. त्यात काही बाबतीत अभिमानास्पद व काही बाबी दुःखपूर्ण आहेत. त्यातील अभिमानास्पद बाब म्हणजे मेंढा लेखा व देवाजी तोफा होय. सरकारचे प्रतिनिधी म्हणून रमेश जयरामजी स्वतः येऊन आदिवासींचे मायबाप होऊन घरपोच हक्क प्रदान केले. याचा गडचिरोलीचा देशपातळीवर गाजावाजा झाला . आणि म्हणूनच देशभरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येने मेंढा लेखा चे अनुकरण करण्यासाठी व शिकण्यासाठी गडचिरोलीत येतात. परंतु याच जिल्ह्यात मात्र संविधानातील आदिवासींचे हक्क पायदळी तुडवले जाताना दिसत आहेत.

वन विभागाने व शासनाच्या आदिवासी विभागाचे सहकार्याने दुर्गम भागातील आदिवासींना गॅस सिलिंडर वाटप केले आहे ते कशासाठी तर सरपणासाठी लागणारे लाकडे जंगलातून तोडून नेतात ते थांबले जावे व जंगल नष्ट होऊन जाऊ नये यासाठी ती योजना आखली होती आणि खदानीच्या रुपाने हजारो हेक्टर जमीनीवरी घनदाट जंगल कापून नष्ट होत आहे त्याबद्दल काहीही नियोजन नाही. कंपनीचे दलाल म्हणतात की, कंपनी यवतमाळ जिल्ह्यात जंगल उभे करणार आहे. ते आदिवासी जीवनमूल्ये, संस्कृती, रितीरिवाज परंपरा पण उभे करून देणार आहेत का? कोरोना काळात जीवन जगण्यासाठी निरंतर संघर्ष झाला. लाखो जीव ऑक्सीजन बेड न मिळाल्याने किड्यामुंग्या सारखे रस्त्यावर मेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग मुळे अमेरिका सारख्या अनेक देशात अभ्यास केला जात असतांना आदिवासी जीवनमूल्ये विश्वाला कसे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशी आदिवासी जीवन पद्धती खदानीच्या अघोरी विकासात मुळासह खोदून नष्ट करत असतांना आदिवासींच्या अशा आंदोलनात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जीवंत राहण्यासाठी आव्हान निर्माण झाले असतांना जनतेनी जागृत होऊन एकजुटीने सक्षमपणे व शांततेने लोकसहभाग वाढवला पाहिजे.

जिल्हा प्रशासनातील प्रमुख जिल्हाधिकारी हे आदिवासी बहूल जिल्ह्यात आदिवासीचे उपायुक्त असतात. त्यांना विषेश अधिकार आहेत. पोलिस प्रशासनाने त्यांना व आदिवासी विभागाला हाताशी घेऊन आदिवासींसोबत समन्वय साधला पाहिजे अशी अपेक्षा आहे. वनखात्यानेही आत्मपरीक्षण करावे आदिवासींसाठी वनविभागाचे नाते का जोडले गेले नाही? ते जोडले जावे. नेमके आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात त्यांचा संबंध अराजक शक्तीसोबत जोडुन प्रशासनाने आपली कमजोरी दाखवली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या आदिवासी बहुल भागात लोकशाही कां सुदृढ होऊ नये याचे आकलन होत नाही. संपूर्ण देशभरातील डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्ते बनवले जातात. मेट्रो, उडाणपुल, बुलेटट्रेन, चौपदरी रस्ते याची जितकी आवश्यकता शासनाला वाटते तितकीच शिक्षण, आरोग्य, मुलभूत सुविधा, स्त्रिया व बालकांचे योग्य संगोपन, वृध्दाचे प्रश्न, दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची सुविधा, सुरक्षा, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ची अधिकची यंत्रणा, अद्यावत आरोग्य सुविधा शाश्वत रोजगाराच्या संधी, सुरक्षा तळागाळात पोहचवण्यात याव्यात. कोणत्याही टाकावू बाबींवर अतोनात खर्च केला जातो पण, वन उपजावर प्रक्रिया करून अनेक वस्तू तयार करता येईल याच्या वर आधारित कौशल्य विकास आराखडा, प्रशिक्षण, निर्माण प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्ध करता येईल. या जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग म्हणजे जणु घाण्याला जुंपलेला बैल झाला आहे असे निदर्शनास येत आहे.

पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी यांची वनविभाग व आदिवासी विकास विभाग यांना घेऊन आम जनतेला दिलासा मिळेल व प्रशासन व शासन यांचे वर दृढ विश्वास होऊन विकासाच्या कामात गती देण्यासाठी प्रयत्न करावे. सुरजागड आंदोलनाची दखल घेऊन सरकारने आदिवासींचे मायबाप व्हावे एवढी मनापासून अपेक्षा आहे. तदवतचं सुरजागड व अन्य खाणी बाबत आदिवासी हिताचे बाजूने निर्णय घ्यावा. लोकशाही मार्गाने शांततामय आंदोलनाची आम्ही आदिवासी कधीही कास सोडणार नाही.
~ कुसुम अलाम 
आदिवासी सेवक तथा साहित्यिक गडचिराेली ९४२१७२८४८९

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेन्द्र ब्राम्हणवाडेंची नियुक्ती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१८ ऑक्टो.) : गडचिरोली जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेन्द्र ब्राम्हणवाडे यांची नुकतीच निवड झाली आहे. दरम्यान नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे हे कुसुमताई अलाम यांच्या निवासस्थानी आशिर्वाद घेण्यासाठी आले असताना त्यांनी औक्षवंत करुन त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या.

ब्राम्हणवाडे हे कमी वयातील गडचिरोलीचे पहिले जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ नेत्यांनी या पदावर त्यांची नियुक्ती केली ही अतिशय अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे. एन.एस.यू.आय. पासुन तर लोकसभा अध्यक्ष या पदावर काम करीत असताना अथक परिश्रम करुन जनसेवेचे कार्य त्यांनी केले आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत काँग्रेस पक्षाची सत्ता नसताना अवघड परिस्थितीत काम करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. रक्तदान शिबिरे घेणे, नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात आलेले संकट असेल, त्यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता धडपड केली आहे. कोरोना सारख्या महाभयानक व कठीण परिस्थितीत कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना भोजन सेवा देण्याचे महान कार्य देखिल केले आहे. जनतेच्या भावना, गरजा लक्षात घेऊन त्यांना ताबडतोब मदत करताना मी मदत करत असल्याचे त्याने कधी भासू दिले नाही.

मोर्चा,मेळावे,आंदोलने यात पुढाकार घेवून व काँग्रेस पक्षाचे ध्येय व धोरणे राबविण्यांत तत्पर असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व गडचिरोली जिल्ह्याला लाभले असे म्हटल्यास ते अतिशाेक्तीचे ठरणार नाही. वरिष्ठांनी जी त्यांना जबाबदार दिली ती जुने, नवीन नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्यांतुन यशस्वी पणे त्यांनी पार पाडून जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे मत कुसुम ताई अलाम माजी जि.प.सदस्य साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्त्या यांनी आपल्या बाेलण्यातुन आज व्यक्त केले. दरम्यान महेन्द्र ब्राम्हनवाडे यांचे नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

शोधग्राम प्रकल्पातील कामे प्रशासकीय यंत्रणेसाठीही पथदर्शी - राज्यपालांकडून प्रशंसा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
गडचिरोली, (११ ऑक्टो.) :  गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

 राज्यपाल कोश्यारी यांनी आज गडचिरोली जिल्हयातील चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरु असलेले काम त्यांनी जाणून घेतले. डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही केली . तसेच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्णांसोबतही राज्यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. 

 शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, डॉ बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून विविध उपक्रमशील मनांना प्रेरणा मिळते. या स्थळी येऊन हे सारे उपक्रम स्वत: अनुभवण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. दोन वर्षापूर्वी मी गडचिरोलीत आलो होतो परंतु वेळेअभावी येथे येऊ शकलो नव्हतो. दारूबंदी व तंबाखूबंदीचे काम कठीण आहे, ते सातत्त्याने केले पहिजे. या पार्श्वभूमीवर सर्च संस्थेद्वारा गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू बंदीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, सिगारेट व बिडी पिण्याचे प्रमाण अनेक ठिकाणी कमी झाले आहे. उपदेश देणे सोपे आहे पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण आहे, ही खरोखरच एक साधना आहे. ती तुम्ही निष्ठेने करत आहात अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 

कोरोना साथीबाबत राज्यपाल म्हणाले की कोरोना अजूनही संपलेला नाही, प्रधानमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोना रोखण्यासाठी सुयोग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रतिबंधक लसीकरणाबाबत या भागात जागृती व्हावी. निर्भय होतानाच जरुर काळजी घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मी नेहमी अशा सेवाभावी संस्था आणि उपक्रमांना जाणिवेने भेट देत असतो . प्रशासकिय अधिकारी वर्गाला पण अशा ठिकाणी नेत असतो. यातून मलाही खूप काही शिकायला मिळते तसेच प्रशासनालाही काही चांगल्या बाबींची माहिती होते. असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व इतर मान्यवर उपस्थित होते. 

राज्यपाल यांचे स्वागत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सायंकाळी चार वाजता पोलीस मुख्यालयाच्या हॅलीपॅडवर आगमन झाले. राज्यपाल गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर, राजशिष्टाचार अधिकारी व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

झाडीपट्टी नाट्य रंगभुमी सुरु होत असल्याने कलावंतांच्या आशा पल्लवीत; नाट्यशौकीनांत ऊत्साह


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वडसा, (६ ऑक्टो.) : गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाच्या टाळेबंदीमुळे झाडीपट्टींच्या नाट्यप्रयोगांना परवानगी नाकारल्यामुळे या भरोष्यावरती असलेल्या हजारो कलावंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. सोबतच नाट्यशौकीनांच्या देखील ऊत्साहावर विरजन पडले होते, पहीली आणि दुसरी लाट ओसरल्यानंतर तीसरी लाट येण्याचे भाकीत काही तज्ञांकडुन वर्तविण्यात आल्याने पुन्हा टाळेबंदी होऊन नाट्यप्रयोग होणार की, नाही या चिंतेत कलावंत सापडला होता. परंतु सद्यस्थीत तीसरी लाट येण्याचे कुठलीही चिन्ह दिसत नसल्यामुळे हळुहळु संपुर्ण महाराष्ट अनलॉक कडे वाटचाल करीत आहे.

28 सप्टेंबर पासुन पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात आली. 4 आक्टोंबर पासुन शाळा सुरु करण्यात आल्या. 7 आक्टोंबर पासुन मंदीर सुरु होत आहेत. त्याचप्रमाने 22 आक्टोंबर पासुन नाटकांना परवानगी मिळणार असे, मा.मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे दोन वर्षापासुन नैराष्येत असलेल्या नाट्यकलावंतांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

दिवाळी पासुन सुरु होत असलेल्या या हंगामादरम्यान दिवसा मंडई आणि रात्री नाटक ही झाडीपट्टीची परंपरा मानल्या जाते, एक ऊत्सव समजल्या जातो. या ऊत्सवाकरीता ज्या गावला मंडई आणि नाटक असेल, त्या गावला गावातील बाहेर गेलेले लोकं या निमीत्ताने परत येतात. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी नाटक पहाण्याकरीता येतात. परंतु दोन वर्षापासुन टाळेबंदी मुळे नाट्यप्रयोग बंद असल्याने नाट्यशौकीनांची पण निराशा झाली होती, परंतु आता नाट्यप्रयोग सुरु होत असल्यामुळे नाट्यशौकीन देखील ऊत्साहात दिसत आहेत. आणि झाडीपट्टीतील चारही जिल्ह्यातील नाट्यमंडळ नाटकांचे माहेरघर असलेल्या वडसा येथे जाऊन नाटकांची बुकींग करीत आहेत.

गेल्या दोन वर्षापासुन बंद असलेला झाडीपट्टीच्या नाटकांचा पडदा यंदा ऊघडणार असल्याने नाट्यकलावंत तसेच नाट्यशौकीनांमध्ये देखील ऊत्साह पहायला मिळत आहे.
22 आक्टोंबर पासुन नाट्यप्रयोग सुरु करण्याचे  शासनाने अभीवचन दिल्यामुळे अखिल झाडीपट्टी नाट्यकलावंत परिषदेेने शासनाचे आभार मानले. तसेच झाडीपट्टीतील समस्त रंगकर्मींना येणाऱ्या  नाट्यहंगामाकरीता शुभेच्छा दिल्या.

 "22 आक्टोंबर पासुन तमाम महाराष्ट्रातील नाट्यप्रयोग सुरु करण्याबाबत अभिवचन दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ऊद्धवसाहेब ठाकरे, सांस्कृतीक मंत्री मा.अमीत देशमुख, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.विजय वडेट्टीवार यांचे खुप-खुप आभार..आणि कलावंतांना येणाऱ्या सीजनकरीता शुभेच्छा!"
~शेखर पटले
अध्यक्ष, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद

"यंदा झाडीपट्टीचा पडदा ऊघडनारच..त्यामुळे नाट्यमंडळांनी आप-आपल्या आवडत्या रंगभुमीची नाट्यप्रयोग बुकींग करुन आपली परंपरा जोपासावी व पुर्ववत झाडीचे वैभव परत मीळवावे..नाट्यप्रयोगांना परवानगी जाहीर केल्याबद्दल राज्यशासनाचे आभार"
मुकेश गेडाम
सचिव, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद

"22 आक्टोंबर पासुन शासनाने नाट्यप्रयोग सुरु करण्याचे राज्याला अभीवचन दिल्यामुळे झाडीपट्टीची पंढरी असलेल्या वडसा येथील विविध रंगभुमीचे कार्यालय सजलेले आहेत. आपण आपले आवडते नाटक बुकींग करावे असे नाट्यमंडळांना आवाहन"
~ किरपाल सयाम
ऊपाध्यक्ष, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद

"गेल्या दोन वर्षापासुन नाट्यप्रयोग बंद असल्याने कलावंत निराश होते पण, आता पुन्हा नव्या ऊमेदीने जोमाने तयारीला लागुन झाडीपट्टीचा नाट्यवैभव सर्वांनी मिळुन कायम राखु"
~ज्ञानेश्वरी कापगते
सहसचिव, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद

गडचिराेलीत गांधी जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (४ ऑक्टो.) : शनिवार दि. 2 आक्टोंबरला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त गडचिराेलीत एक कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. त्या निमित्ताने सर्वधर्म समभाव प्रार्थना झाली. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई व आदिवासी समाज बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते. उपराेक्त कार्यक्रमास डॉ. शिवनाथ कुंभारे समाजसेवक तथा अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली, रोहिदास राऊत जेष्ठ पत्रकार द हितवाद, प्रकाश भाऊ अर्जुनवार, विलासराव निंबोरकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा सर्व धर्मांचे कार्यकर्ते, व मान्यवर मंडळी उपस्थित होती. देशातील वर्तमान परिस्थिती पाहता विविध संघटनांनी मिळुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे होते. देशातील नागरिकांमध्ये या महापुरुषांचे विचार पोहचले पाहिजेत व रुजले जावे असे मत अनेकांनी या वेळी व्यक्त केले.

झाडीपट्टीत "अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परीषदेची स्थापना



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वडसा, (२९ सप्टें.) : दि.२६ सप्टेंबर ला झाडीपट्टीतील रंगकर्मींची सभा आमगाव येथे जेष्ठ  कलावंत डॉ.परशुराम खुने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत झाडीपट्टीतील शेकडो रंगकर्मी उपस्थित होते.  समस्त कलावंतांच्या वतीने कलावतांच्या हितासाठी "अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद" ची स्थापना करण्यात आली.

यात अध्यक्ष म्हणून शेखर पटले, तर सचिव पदासाठी मुकेश गेडाम यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारीणीत परिषदेचे ऊपाध्यक्ष म्हणून किरपाल सयाम, प्रियंका गायधने, किशोर भाग्यवंत, देवा कावळे सहसचीव म्हणून ज्ञानेश्वरी कापगते, वासुकुमार मेश्राम, सुनील कुकुडकर, दुधाराम कावळे तर सदस्य म्हणून शेरु खान, विनोद काळे, प्रतिभा साखरे, शंभुदेव मुरकुटे, ऊत्तम ऊके, लालचंद पुंगाटे, कोषाध्यक्ष शंतनु कुळमेथे यांची निवड करण्यात आली..
सदर परिषदेचे सल्लागार-मार्गदर्शक म्हणून झाडीपट्टीचे जेष्ठ कलावंत डॉ.परशुराम खुने, अंबादास कामडी, प्रा.डॉ.दिनकर चौधरी, डॉ.प्रवीण  सहारे यांची निवड करण्यात आली.

प्रसिद्धी प्रमुख राहुल पेंढारकर, मंगल मशाखेत्री, होमदेव कोसमशीले हे काम सांभाळतील.
सभेचे संचालन राहुल पेंढारकर, प्रास्ताविक देवा कावळे तर, आभार किरपाल सयाम यांनी मानले.
निवड प्रक्रीया प्रमुख म्हणून प्रा.डॉ.दिनकर चौधरी, तर सहप्रमुख म्हणून डॉ.प्रवीण सहारे यांनी ऊत्तम नियोजन करुन अविरोध निवडप्रक्रीया पार पाडली.
अखिल झाडीपट्टी नाट्य परिषद ही झाडीपट्टीतील कलावंतांच्या पाठीशी ऊभी राहुन झाडीपट्टीच्या विकासासाठी नक्कीच कटीबद्ध असेल, असे परिषदेच्या वतीने उपस्थित रंगकर्मींना विश्वास देण्यात आला.
निवड केलेल्या कार्यकारीणी मंडळास झाडीपट्टीतील अनेक रगकर्मींनी पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

वाघाचा हैदोस आणि जनतेचा संताप

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
गडचिरोली जिल्ह्यात १३ निष्पाप जीवांचा वाघाने बळी घेतला. त्या वाघाला पकडण्यात उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर एफ आय आर दाखल करावा. असे आवाहन धुंडे शिवनी येथे आयोजित गावकऱ्यांच्या सभेत मा. आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. तसे वृत्त ही प्रकाशित झाले आहे. जनतेचस सांत्वन व दिलासा देताना डॉ.होळी यांचे भावनावेगाने काढलेले हे उद्गार असले तरी मूळ मुद्दा हा जनतेच्या सुरक्षेचा? की वनविभागावर आगपाखड करण्याचा ?असा संभ्रम पडतो. गेल्या अनेक वर्षात जिल्ह्याला लागत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, ताडोबा, चिमूर परिसरात असे कितीतरी वाघाची शिकार झालेले दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. हे सर्वश्रुत आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यात अलीकडे काही महिन्यांपासून वाघाने जो हैदोस घातला आहे, त्याला जेरबंद करण्यास शासन-प्रशासन अपुरे पडत आहे? की जाणीवपूर्वक ढिलाई करते आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी जी साखळी असते त्यात वाघाला विशेष स्थान आहे. वाघ राष्ट्रीय प्राणी असल्याने त्याचे संरक्षण करणे, पर्यावरणीय दृष्टीने वाघाला वाचवणे नितांत गरजेचे आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की जनतेला त्यांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून दिले पाहिजे! यावर कायमस्वरूपी पर्यायच नाही का ? रानावनात शेतात जाणारा कोणता वर्ग आहे? शेतकरी, गरीब, आदिवासी? तो वर्ग आहे. जंगलाच्या आस-याने जगणाऱ्या या माणसाला आता जंगलात जाणे कायम बंद करावे लागेल का? असे शासनाचे धोरण दिसत आहे. लोकांनी जगावे कसे ?आतापर्यंत जे जंगलावर जगत आले, त्यांचे संपूर्ण आयुष्य जंगलावर निर्भर होते अशा माणसांनी आता काय करावे ?याबाबत शासन, प्रशासन स्पष्ट का बोलत नाही? किंवा वाघाने मारलेल्या मृतकांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत केल्याने प्रश्न सुटू शकतो का? एका जीवाची किंमत शासन रोख रक्कम देऊन करत असेल तर संपूर्ण गावातील जनतेच्या बँकेच्या खाते वरच पगार पैसे टाकणार का ?तर जंगलात व शेतावर जाणे सोडणार असा आग्रह ग्रामीण जनतेने धरावा का ?शासनाने सूडबुद्धी,दुर्बुद्धी वापरले की काय ? सदसद्विवेक बुद्धी गमावली काय ? असे जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. शासनाचे प्रतिनिधी बनलेले, जनतेतूनच गेलेले आपले लोकप्रतिनिधी, त्यांची भाषा व त्यांचे जनतेप्रती असलेले कर्तव्य कसे असावे ? याचे जनतेनेही आता अवलोकन करणे गरजेचे आहे. वनविभागा हा शासनाचा एक भाग आहे. त्याचे काही कर्तव्य जबाबदारी आहेत. पण त्यांना मर्यादा पण आहेत.शासन मात्र नागरिकांच्या हितासाठी जबाबदार आहे. बांधील आहे. तेव्हा लोकांचे प्रतिनिधी म्हणून शासनात बसत असणाऱ्या साऱ्याच लोकप्रतिनिधींनी आपापल्या भूमिका तपासणी आवश्यक आहे. तसेच जनतेने सुद्धा अधिक समजदार व्हावे. कारण पूर्वीचा काळ आता राहिलेला नाही. दोन वर्षांआधी covid-19 काळात सर्व जनता भयभीत जगत आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण, गरीब, शेतकरी, दलित, आदिवासी हे पोट भरण्यासाठी कामानिमित्ताने बाहेर ठिकाणी गेले, गावाकडे परतत असताना त्यांचे अतोनात हाल झाले हे काही कमी नव्हे. हे थरारक अनुभव जगलेले लोक आता गावात जंगलाच्या शेजाऱ्याने राहून आपली उपजीविका करत असतील, तर सरकारने डोळे उघडून व बुद्धी शाबूत ठेवून जनतेच्या हितासाठी पुढे पाऊल टाकणे आवश्यक वाटते. वन विभागावर खापर फोडून आपले कर्तव्यापासून सरकार व सरकारचे प्रतिनिधी दूर पळत असतील,टोलवाटोलवी करत असतील तर जनतेने त्यांना धडा शिकवला पाहिजे. जनतेने आता आपल्या जीवाची आपणच हमी घेऊन, पुढील काळात आपल्याला जीवन जगताना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, संरक्षण, कर्तव्य सारे भान ठेवून वागावे. सरकारने डोळ्यावर लावलेली झापड जनताच उघडू शकते. हे दाखवून दिले पाहिजे. गेल्या अनेक वर्षात लागोलाग वाघाने मारले इतके बळी गडचिरोली तालुक्यात कधी झाले?हा इतिहास नाही. मात्र, आताच कसे वाघाच्या शिकारीचे इतके बळी जातात? हा गौड बंगाल काय आहे ?शासनाची ग्रामीण जनतेप्रती असणारे नीती ओळखून घेतली पाहिजे.

सध्यास्थितीत शेतकऱ्यांचा हंगाम झाला आहे. शेतात पीक उभे आहे. निंदण, खुरपण, तण काढणे, गवत काढणे, औषध फवारणी करणे इत्यादी महत्त्वाची कामे आहेत ते कसे करायचे ? हा शेतकऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे. जी शेतकरी महिला बिनधास्तपणे शेतात जात होती तिला आता धाकधुक झाली. डोळ्यात पाणी आणून शेतकरी रडत आहे. शासन व लोकप्रतिनिधींनी जागे व्हावे. आजवर अनेक संघटनांनी वाघाला जेरबंद करावे,यासाठी शासनाकडे निवेदने पाठवलेली आहेत याचा विचार करावा जनतेची सुरक्षा करावी. 

~ कुसुम ताई अलाम
गडचिरोली