बंगाली डॉक्टर लूटमार प्रकरण:मारेगाव ताब्यातील "त्या" आरोपींची आदिलाबाद कारागृहात रवानगी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव स्थित डॉ हाजरा यांना 13 मार्च रोजी मारेगाव-वणी या महामार्गांवर फिल्मीस्टाईलने लूटमार करून खंडणी मागणाऱ्या प्रकरणातील त्या आरोपींना परप्रांतीय राज्यातून मारेगावात आणले, a त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, सोन्याची अंगठी व चैन व वापरलेली कार जप्त करण्यात अजून यश आले नाही. मारेगाव ठाण्याचा पिसीआर संपून शनिवारला "त्या" आरोपींची परराज्यातील आदिलाबाद कारागृहात रवानगी करण्यात आली.

नवरगाव येथे सुपरिचित दवाखाना असलेल्या बंगाली डॉ.पोभासा हाजरा यांना 13 मार्च रोजी सायंकाळ सुमारास मारेगाव कडे जात असतांना आंतरराज्यातील टोळक्यांनी बंदुकीचा व धारदार शस्त्राचा धाक दाखवित त्यांच्या जवळील कॅश रकमेसह सोन्याची अंगठी व चैन लांबवून कार ने पोबारा केला होता. या धक्कादायक घटनेने जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा तपास सुरू असतांना सदर आरोपींनी दुसऱ्याच दिवशी सीमालगत तेलंगणा राज्यात कंटेनर वर डाव साधला. दरम्यान, कंटेनर लूटमार प्रकरणात इचोडा जिल्हा आदीलाबाद पोलिसांच्या जाळ्यात हे आरोपी  अडकले. आरोपींनी या प्रकरणात पोलिसांना गुमराह करण्यासाठी दुसरीच कार वापरली होती असे समजते.

दरम्यान,आरोपींना इचोडा पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्यातील टोळीचे धागेदोरे मारेगाव प्रकरणाशी जुळते का? व आरोपी हेच आहे का? यासाठी मारेगाव पोलिसांनी डॉ हाजरांना तिथे नेवून हेच ते चौघे का म्हणून कन्फर्म म्हणून परतले. तिथली प्रोसेस झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी हालचाली करित हे आरोपी 25 मार्च रोजी मारेगाव पोलीस स्टेशन ला आणून सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली.

परिणामी, मारेगाव ठाण्यात आणलेल्या आरोपीमध्ये मो.अर्षद अब्दुल्ला (वय 32) रा.जिराहिरा ता. पहारी जिल्हा भरतपूर (राजस्थान) तर जाकीर खान हासनी (वय 31), मुजाहिर खान इंद्रिस (वय 27), मुश्ताक खान प्रताप (वय 33) हे तिघेही राहणार हातीया ता. छाता जिल्हा मथुरा (उत्तरप्रदेश) यांनी मारेगाव लूटमार प्रकरणाचा गुन्हा गेल्या बुधवार ला कबूल केला. पण त्यांच्या कडील मुद्देमाल हस्तगत झाला नाही. मात्र, इचोड पोलिसांनी आरोपीकडून 2 बंदूक, 1 चाकूसारखे धारदार शस्त्र, 14 काडतुस, 2 देशी कट्टे जप्त केले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) कुठे? आणि ते आंतरराज्यातील टोळीतील हे सराईत गुन्हेगार कुठे?...नेमकं काय प्रकरण असेल? हा प्रश्न मात्र तालुक्यातील नागरिकांच्या डोक्यात घोंगावत आहे.

शेतीसह नर्सरी विकसित करून साधली शेतकरी बांधवाने आर्थिक उन्नती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नवनवे प्रयोग व उत्कृष्ट रोपांसाठी स्वत:ची नर्सरी तयार करून मोर्शी तालुक्यातील एका शेतकरी बांधवाने आर्थिक प्रगती साधली आहे.

शेती विकासासाठी सूक्ष्म सिंचन, नाविन्यपूर्ण पीक, अद्ययावत तंत्रज्ञान अशी विविध प्रयोगशीलता जोपासणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन मोर्शी येथील ओमनगरमधील प्रफुल्ल गणपतराव हेलोडे यांनी आपली प्रयोगशीलता व विविध शासकीय उपक्रमांची साथ यांची सांगड घालून उत्कृष्ट शेती फुलवली आहे.

प्रफुल्ल हेलोडे यांनी कृषी विभागाच्या क्रॉपसॅप व पाणलोट प्रकल्पात काही काळ काम केले. त्यांनी नोकरी न करता स्वत: शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:ची शेती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी 17 एकर शेती करार तत्वावर घेतली व या सर्व शेतीत ठिबक सिंचन यंत्रणा बसविली. शेतीत त्यांनी नाविन्यपूर्ण पीके घेतली. दोन एकरात ॲशगार्डच्या (पेठा) लागवडीचा प्रथम प्रयोग केला. त्यात एकरी 25 टन उत्पादन मिळाले. या पिकाचे उत्तम उत्पादन त्यांनी सातत्याने घेतले. नागपुरातील नामांकित खाद्यपदार्थ उद्योगाने त्यांच्याकडून या उत्पादनाची नियमित खरेदी केली. त्यामुळे हेलोडे यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.

जैविक शेतीचाही प्रयोग त्यांनी केला. तळणी येथे शेती विकत घेऊन त्यांनी सर्व शेतावर मल्चिंग केले. बांबूच्या शेडवर काकडीचे तीन महिन्याचे पीक घेऊन उत्पादन सातत्य ठेवले. मल्चिंग पेपरचा वापर संपूर्ण शेतावर आच्छादित ठेवण्यासाठी ट्रॅक्टरचलित मशिन तयार केली.

भाजीपाल्याची रोपे स्वत: तयार करता यावी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी नर्सरीला भेटी दिल्या. अभ्यास करून स्वत: रोपे तयार केली. शेतात शेडनेट व पॉलिहाऊस उभारण्यासाठी ‘आत्मा’मार्फत तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण घेतले.

कृषी विभागाच्या एमआयडीएच योजनेच्या माध्यमातून पॉलिहाऊस व शेडनेटची उभारणी केली. त्यात ते मिरची, काकडी, कोबी, टमाटे आदी भाजीपाला रोपे, टरबुज, खरबूज आदी रोपांची निर्मिती करत आहेत. त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला. फुलांचेही उत्पादन त्यांनी घेतले. आपल्या नर्सरीत ते शेतकरी बांधवांना रोपांची विक्रीही करतात. पॉलिहाऊस व शेडनेटनंतर त्यांनी द्वारका हायटेक नर्सरीची उभारणी केली. त्यांची 50 लाखांवर रोपविक्री झाली. आता तर त्यांची वार्षिक उलाढाल दीड- दोन कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. ते शेतकरी बांधवांना विविध पिकांसंदर्भात मार्गदर्शनही करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने त्यांना उद्यान पंडित म्हणून गौरविले आहे.

- हर्षवर्धन पवार
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

प्रत्येक गटाला तीन वर्षात 10 लाखांचे आर्थिक सहाय्य मिळणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जमिनीची सुपिकता व सेंद्रिय कर्ब वाढविणे, तसेच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात चाकूर तालुक्यात पंधरा शेतकरी गटांचे क्लस्टर तयार करणात आले असून नळेगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, नळेगाव या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाणार आहे. प्रत्येक गटाला तीन वर्षात एकूण दहा लाखांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा मोठ्या प्रमणात वापर होत आहे. पाण्याचा जास्त वापर, जमिनीची होणारी धूप, एकच पीक वारंवार घेणे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर पुरेशा प्रमाणात होत नसल्याने जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापीक होत आहेत, पिकांचे उत्पादन कमी होवू लागले आहे. उत्पादित शेतमालाची प्रतही खालावली असून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात परंपरागत कृषि विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत आहे. ही योजना गट आधारित असून जिल्हास्तरावर कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.

सेंद्रिय शेतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक गटाला तीन वर्षात टप्प्या-टप्प्याने दहा लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये सहाय्यकारी संस्थांमार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रादेशिक परिषदेद्वारे पी.जी.एस. प्रमाणीकरण, डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन, मूल्यवृद्धी, विपणन आणि प्रसिद्धी आदी बाबींसाठी प्रति हेक्टर प्रमाणे पहिल्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 16 हजार 500, तर दुसऱ्या वर्षी 17 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मातीचे नमुने तपासणी, चर काढणे अथवा बांध घालणे, हिरवळीचे खत, कंपोस्ट डेपो लावणे आणि जीवामृत, अमृतपाणी, बिजामृत, दशपर्णी यासारख्या निविष्ठा खरेदीसाठीही अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

शेतकरी गटांच्या मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती :

सेंद्रिय शेती संदर्भात पीक संवर्धन, पीक संरक्षण, सेंद्रिय प्रमाणीकरणाविषयी प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे, सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी आवश्यक माहिती अद्ययावत करणे, पीक पेरणी अहवाल, उपलब्ध शेतमाल व गुणवत्ता याबाबत अचूक माहिती सादर करण्यासह इतर बाबींविषयी गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे तज्ज्ञ प्रशिक्षक शेतकरी गटाला उत्पादित शेतमालाच्या सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत.

सेंद्रिय निविष्ठा निर्मिती ते सेंद्रिय प्रमाणीकरणसाठी आवश्यक बाबींचे मिळणार प्रशिक्षण:

सेंद्रिय शेतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय खतांची निर्मिती करण्यासह मुलस्थानी जलसंधारण, पीक नियोजन, आंतरपीक लागवड, बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन यासारख्या विविध बाबींचे प्रशिक्षण दरवर्षी दिले जाणार आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण मानके, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, मालाची प्रतवारी, विपणन व्यवस्थान आदी बाबींच्या प्रशिक्षणाचाही यामध्ये समावेश असणार आहे.

आगामी खरीप हंगामापासून 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीला प्रारंभ:

लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यामध्ये परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत सेंद्रिय शेतीसाठी पंधरा गटांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. या गटांमध्ये प्रत्येकी 20 शेतकऱ्यांचा समावेश असून हे शेतकरी आगामी खरीप हंगामात प्रत्येकी एक हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करणार आहेत. अशाप्रकारे एकूण 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाणार आहे. यामध्ये नळेगाव, आजनसोंडा खु., सावंतवाडी, हटकरवाडी, उकाचीवाडी, हुडगेवाडी, लिंबाळवाडी, सुगाव आणि घरणी गावामधील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जमिनीची सुपीकता वाढणार, ग्राहकाला रसायनमुक्त शेतमाल मिळणार:

जमिनीची सुपीकता व जमिनीतील सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवण्यासह त्यामध्ये वाढ होण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांचा व सेंद्रिय कीटकनाशकांचा सलग तीन वर्ष वापर आणि सेंद्रिय शेतीच्या रूपांतरणाच्या इतर बाबी अवलंबिल्यास, रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर होऊन तयार होणारा शेतमाल हा रसायनमुक्त होऊ शकतो. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, तिचे प्रमाणीकरण करणे तसेच सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रीय गट निर्मिती करणे व ग्राहकाला रसायनमुक्त शेतमाल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

"या" लाभार्थ्यांनी घ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊया…

पात्र लाभार्थी – सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट / एफपीओ / सहकारी संस्था

आवश्यक कागदपत्रे – 7/12 व 8 अ, आधारकार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

समाविष्ट बाबी - कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) यांचा समावेश असणार आहे. यात अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के औजारे अशी मदत मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख तर इतर औजारेसाठी 40 टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. औजारे बँक या घटकांतर्गत समाविष्ट बाबींमध्ये ट्रॅकर आणि इतर पसंतीनुसार औजारे यांचा समावेश असणार आहे .10 लाखापर्यंत अनुदान 40 टक्के (चार लाख), 25 लाखापर्यंत 40 टक्के अनुदान (10 लाख) असणार आहे.

संपर्क - अधिक माहितीसाठी mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ तसेच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : ३१ मार्च शुक्रवार...!


               राशीभविष्य : ३१ मार्च शुक्रवार...!

मेष:
करिअरच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास दिवस असेल. तुमचा कोणताही नवीन करार निश्चित होऊ शकतो, तुम्हाला राज्याकडून विशेष सन्मानही मिळू शकतो. भौतिक विकासाची शक्यताही निर्माण होत आहे. तुम्हाला सामाजिक कार्यात खर्च करावा लागेल, परंतु या खर्चामुळे तुमची कीर्ती वाढेल.

वृषभ
वृषभ राशीचे लोक नवीन योजनांमध्ये व्यस्त राहतील. पवित्र स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल. कायदेशीर वादात यश मिळेल. या राशीचे लोक जे स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत, त्यांची योजना यशस्वी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप सर्जनशील असणार आहे. काही सर्जनशील आणि कलात्मक काम पूर्ण करण्यात तुम्ही दिवस घालवू शकता. तुम्हाला सर्वात जास्त आवडते काम तुम्हाला करायला मिळेल. तुम्हाला खूप समाधान वाटेल. तुमच्या मनात नवीन योजनाही येतील.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस खूप सर्जनशील असणार आहे. तुम्ही कोणतेही काम समर्पित भावनेने कराल, त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. अपूर्ण कामे मार्गी लागतील. यासोबतच महत्त्वाच्या चर्चाही पाहता येणार आहेत. रात्री लग्नसमारंभाला जाण्याची संधी मिळू शकते.

सिंह:
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. पण, धर्म आणि अध्यात्माच्या बाबतीत थोडा वेळ अभ्यास करून लिहिणे योग्य ठरेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याबाबत थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

कन्या:
कन्या राशीच्या लोकांनी संयम आणि सावधगिरीने काम करावे. तुमचा आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे आपले वर्तन लक्षात घेऊन सर्वांशी वागा. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने तुमचे काम करा.

तूळ:
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. कामाच्या वर्तनाशी संबंधित सर्व वाद आज मिटू शकतात. नवीन प्रोजेक्टवर काही कामही सुरू होऊ शकते. रिअल इस्टेटच्या बाबतीत तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.

वृश्चिक:
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस खूप मजबूत आहे. तुम्हाला दिवसभर लाभाच्या चांगल्या संधीही मिळू शकतात. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. नोकरी किंवा व्यवसायात काही नावीन्य आणता आले तर भविष्यात त्याचा फायदा होईल. कामात नवीन जीवन येईल.

धनु:
धनु राशीच्या लोकांनी दिवस जपून आणि सावधपणे सांभाळावा. व्यवसायात थोडीशी जोखीम पत्करली तर मोठा फायदा होण्याची आशा आहे. दैनंदिन कामांच्या पलीकडे काही नवीन कामांमध्ये हात आजमावून पहा. तुमचा एखादा नातेवाईक तुम्हाला पैशाची व्यवस्था करण्यास सांगू शकतो.

मकर:
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला असणार आहे. तुम्हाला दैनंदिन घरातील कामे हाताळण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुला-मुलीच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

कुंभ:
कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान बदलामुळे समशीतोष्ण विकार होऊ शकतो. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठी दिवस आनंददायी राहील. घाईघाईत चूक होऊ शकते, त्यामुळे संयमाने काम करावे लागेल.

मीन
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. तुम्हाला व्यवसायात जोखीम पत्करून परिणाम मिळेल. संयमाने आणि तुमची मृदू वर्तणूक सुधारून समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तुम्ही एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केल्यास ते शुभ होईल.


मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नांदेड : नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ काल भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. जखमी व्यक्तींबाबत विचारपूस करुन त्यांना तातडीने योग्य ते उपचार उपलब्ध करुन देण्याबाबत अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे यांना सूचना दिल्या आहेत.

मृतांमध्ये ज्योती रमेश भोई वय 32, राहणार मेहकर, गालिअम्मा कल्याण भोई वय- 35, रा.गेवराई, वेजल कल्याण भोई वय वर्ष 1, रा.गेवराई, पुंडलीक कोल्हाटकर वय-70, रा माळसावरगाव ता. भोकर, तर दवाखान्यात नेताना वाटेत विद्या संदेश हटकर वय 37, रा. इजळी ता. मुदखेड यांचा समावेश आहे. चार मृतदेह शवविच्छेदनासाठी मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले आहेत. तर अपघातातील गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे.

जखमीमध्ये लक्ष्मी राजू गोडमंचे वय वर्षे 30, दिपा महेश गोडमंचे वय वर्षे 20, पुजा गोडमंचे वय वर्षे 40, सोहम हटकर वय वर्षे 10, सोनाक्षी हटकर वय वर्षे 13, शोभा भांगे वय वर्षे 35, शेख मोईद्दीन शेख जिम्मीसाब वय 45, पल्लवी विजय शामराव वय वर्षे 30, यांचा समावेश आहे.

चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया!


सह्याद्री चौफेर वृत्तसंस्था 

सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी वाढतांना दिसत आहेत. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, अनुवांशिक नसलेले कर्करोग अशा आजारांनी घरात प्रवेश केला आहे. आपल्या भारतातील पारंपरिक तृणधान्य- भरडधान्याच्या उपयोगाद्वारे या समस्येवर उपाय शोधता येईल.

 दुष्काळात तग धरणारे शेवटचे पीक म्हणजे तृणधान्य! अल्पभूधारक शेतकऱ्याला स्वतःच्या आरोग्यासाठी, त्याच्या गाई-ढोरांच्या वैरणासाठी, इंधनासाठी ते उपयुक्त आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, तसेच कमी पाण्यात होणारे हे पिक आहे.
मोठे तृणधान्य म्हणजे ज्वारी व बाजरी आणि छोटे तृणधान्य म्हणजे नाचणी, भगर, राळ, कोद्रो, सावा, वरी, छोटा सावा. छोट्या तृणधान्यांना विविध भागात नागली, मोर, भादली, कांगणी असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पूर्वी ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके खळ्यात मळणे या प्रक्रियेने तयार केली जात असे. पण छोट्या तृणधान्याचे वरील आवरण, टणक असल्यामुळे भरडावे किंवा कांडावे लागत असे आणि म्हणून यांना भरडधान्ये म्हटली जातात. काळाच्या ओघात शेतात हे पीक कमी घेतले जावू लागले. तसेच भरडणे व कांडणे ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे मनुष्याचा आहारातून अशी ही मूल्यवान तृणधान्य नाहीशी झाली.
समाजात आहार व आरोग्याविषयी जागरूकता आल्याने भरडधान्य आता ताटात दिसू लागले आहे. भारताच्या प्रयत्नाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणूनही साजरे केले जात असल्याने आणि त्यासाठी जनजागृतीचे विवध उपक्रम आयोजित केले जात असल्यानेदेखील नागरिकांना भरडधान्याचे महत्व कळले आहे.

तांदूळामध्ये असणारा ०.२ ग्रॅम प्रति ग्रॅम तंतू व भगरमध्ये असणारा १०.१ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम तंतू ही तुलना लक्षात घेतल्यास भरडधान्याचे महत्व लक्षात येते. आहारतंतू हे वजन नियंत्रित करणे, लठ्ठपणा कमी करणे, पोट साफ ठेवणे, पित्ताशयात खडे न होऊ देणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, यासाठी उपयुक्त असतात. तंतू हे इन्शूलिनचा प्रतिसाद वाढविण्याचे कार्य करतात, त्यामुळे साखर नियंत्रित रहात असल्याने या धान्यांना जगभरात मागणी आहे.
लहान मुली मुलांपासून ते पौगडावस्था, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यामध्ये लोहाची कमतरता असते. लहान मुलांमध्ये मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त असो लोह आहारात समाविष्ट असणे जरुरी आहे. बाजरीतील ८ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम, राळमधील ६.३ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम लोह व तुलनेत तांदूळातील १ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम असणाऱ्या लोहाचे प्रमाण लक्षात घेतल्यास आहारात भरडधान्याची उपयुक्तता लक्षात येते.

शरीराच्या प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी लागणारे कॉल्शिअम तसेच हाडांच्या वाढीसाठी व हाडे मजबूत राहण्यासाठी लागणारे कॉल्शिअम हे नाचणीमध्ये ३४४-३६४ मिलीग्रॅम प्रति १०० ग्रॅम आहे. नाचणी आहारातून बाजूल सारल्याने कॅल्शिअमच्या पूर्ततेसाठी औषधे घ्यावी लागतात. डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले केरोटिन बाजरीमध्ये असते.
तृणधान्य- भरडधान्य मध्ये असणारी साखर ही जटील कर्बोदके स्वरुपाची असल्याने रक्तात विरघळण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तिमध्ये साखर नियंत्रित करण्यात व वजन कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. या धान्यांमध्ये असणारे ॲन्टिऑक्सिडंट पेशींना इजा होऊ देत नाही. तसेच कर्करोग प्रतिबंधूसाठी ॲन्टिऑक्सिडंटचे कार्य उपयुक्त असते. तृणधान्य- भरडधान्य यामध्ये असणार ७ ते १२ टक्के प्रथिन हे स्नायू बळकटीकरण व शरीराच्या प्रक्रियामध्ये उपयुक्त असता.

जीवनसत्व, सूक्ष्मपोषकद्रव्ये युक्त असल्यामूळे शरीरातील पेशींची वाढ व कार्य व्यवस्थित राहते. व तसेच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. मानसिक आरोग्य चांगले राहणे, झोप शांत लागणे यासाठी उपयुक्त आहेत. भरडधान्य खातांना त्यांना अगोदर कमीतकमी ६ तास भिजवून ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या तंतूत पाण्याचे शोषण होणे शरीरासाठी उपयुक्त आहे, यांच्यापासून पोळी-भाकरी, ठोसा, इडली, आप्पे, विविध प्रकारच भात, खिचडी, बिस्कीट , ब्रेड, पिझा बेस आपण बनवू शकता.
शासनाच्या कृषि विभागाने पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध स्तरावर या धान्याचे महत्व समजावले जात आहे. एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त् असलेले हे धान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने आणि आपल्या आरोग्यासाठीदेखील आपण आहारात तृणधान्य-भरडधान्याचा समावेश करूया!

-डॉ.अर्चना ठोंबरे
(लेखिका वैद्यकीय व्यावसायिक आणि पौष्टिक अन्नधान्य विषयातील अभ्यासक आहेत.)

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन.

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था       

वणी : विद्यार्थ्यांमध्ये असणारे विविध सूप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक २ ते ४ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये युवा भरारी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.    
या उपक्रमात पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पुष्पगुच्छ सजावट, मेहंदी, रांगोळी, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी एकल नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, पोस्टर प्रेसेंटेशन या स्पर्धांसह कॅरम आणि बुद्धिबळाची पुढील सामने घेण्यात येतील.
      
तिसऱ्या दिवशी समूह नृत्य, सुगम संगीत यांच्या सादरीकरणासह स्पर्धांचे अंतिम सामने खेळण्यात येतील. शेवटी समारोपीय कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरणाने या युवा भरारी उत्सवाची सांगता होईल.       
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अभिजित अणे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे, डॉ.विकास जुनगरी, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रभारी प्रा. किसन घोगरे, क्रीडा विभाग संचालक डॉ. उमेश व्यास तथा ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येत या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वतरांगा, उत्तुंग सागवृक्ष, मिश्र वनांचे पट्टे, धबधबे यांनी समृद्ध मेळघाटात गौर, सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या, तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणारा आहे.

व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांबाबत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल प्रकल्पातर्फे टायगर फोरमकडे सादर करण्यात आला. फोरमच्या चमूने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांची पाहणी केली. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी या चमूत सहभागी असतात. या चमूने प्रत्यक्ष कामे, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षण दर्जा याची तपासणी करून अहवाल ग्लोबल फोरमला दिला. त्यानुसार फोरमकडून जागतिक मानक प्रकल्पाला जाहीर करण्यात आले आहे.

‘कॅटस्’नंतर ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॅल्यूशन’तर्फे विविध विषयांवर पाहणी केलेली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सकारात्मक गुण प्राप्त करेल, असा विश्वास प्रकल्पाच्या संचालिका जयोती बॅनर्जी यांनी व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संवर्धन व संरक्षण कार्यात अहोरात्र झटणा-या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले असून, या सर्वांचे अभिनंदन श्रीमती बॅनर्जी यांनी केले.

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३ हजार ६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४ हजार ४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.



मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून 'अंगणवाडी दत्तक' धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. आज दालमिया फाऊंडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठी, भागीरथी फांऊडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाऊंडेशन पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत

रामनवमीनिमित्त सह्याद्री चौफेर च्या शुभेच्छा


                      रा|म|न|व|मी ~ रा|म|ज|न्मो|त्स|व 


श्री रामनवमीनिमित्त चीफ एडिटर कुमार अमोल कुमरे यांनी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं, ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती आणि राजा म्हणून प्रभू श्रीरामाकडे पाहिले जाते.

राक्षसी प्रवृत्तींना नेस्तनाबूत करणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत, असेही कुमार अमोल म्हणतात.

वणीच्या स्थानिक कलावंतांनी सादर केली हास्यजत्रा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील जैताई देवस्थान मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवात उद्बोधक तथा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी वणीकरासाठी सुरू आहे. या शृंखलेत सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दि. 28 मार्चला येथील स्थानिक कलावंतांनी हास्यजत्रा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून हास्याचा फुलोरा फुलविण्यात यशस्वी झाले. वणीकरांनी या कलावंतांना भरभरून दाद दिली. 
या सर्व कलावंतांनी सुरुवातीला नांदी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संदीप उरकुडे, सागर मुने यांनी ससा व बर्फाची फॅक्टरी सादर करून सगळ्यांना हसवले. "सासू माझी ढासू" यात सुनंदा गुहे, सोनल टिकले या सासासुनेचे भांडण होते. त्यात निकुंज सातपुते याची गोची होते. 
   
महिलांच्या टूर प्लानिग साठी तृप्ती उंबरकर, श्रुती उपाध्ये, राधा वैद्य, तारा कुळकर्णी, कविता सातपुते, प्रिया बिवलकर, या टूर प्लानिग साठी येऊन विचित्र प्रश्न विचारून टूर मॅनेजर सागर मुने व असिस्टंट वेदांती उंबरकर यांच्या प्रहसनातून धमाल विनोद या कलावंतांनी सादर केला. कांदे पोहे या प्रहसनात अशोक सोनटक्के, शैलेश अडपवार, प्रिया कोणप्रतिवार, प्राची चंदेलकर, सीमा सोनटक्के, सागर मुने यांनी धमाल विनोद सादर केला. यातून शेतकरी नवरा उत्तम असतो असा संदेश देण्यात आला. 
सागर मुने, प्रवीण सातपुते, करिष्मा नवले, निखिल वाघाडे, यांच्या पप्पा या प्रहसनामध्ये मध्ये मुलीच्या आधीच झालेल्या तीन लग्नच्या घोळातून सगळा रसिक वर्ग हसून हसून लोट पोट होतो. व्हराड चाललं बँकेला या प्रहसनात बँकेचा मॅनेजर पाणी पुरी विकणाऱ्या व त्याच्या बायकांना कर्ज देत नाही व त्याचे महिन्याचे उत्पन्न पाहून तो सुद्धा पाणी पुरी विकण्याचा काम सुरू करतो. यातील विनोदी अभिनयाद्वारे सीमा सोनटक्के, अशोक सोनटक्के, उमाकांत मसे, मीना वानखेडे यांनी प्रहसन सादर केले. या कार्यक्रमात स्नेहलता चुंबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर एकपात्री प्रयोग सादर केला. तसेच पोटाची खळगी भरायला काय काय करावे लागते हे प्रकाश खोब्रागडे यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून दाखवले. प्रसिद्ध मिमिक्री कलावंत आकाश महादूले यांनी विविध पद्धतीने रसिकांचे मनोरंजन केले. 

ध्वनी व्यवस्था संदीप आस्वले यांनी सांभाळली, पार्श्वसंगीत अभिलाष राजूरकर, अक्षय करसे, राधा सोनटक्के यांनी दिले.

वन क्षेत्रातील ‘कुरणाचे कुंपण’ करणार शेताची राखण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

कुंपणानेच शेत खाल्ले' ही एक प्रचलित म्हण...आणि वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फिरवणारी बाब. वारंवार उद्भवणाऱ्या या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीतच 'कुरण विकास कार्यक्रम' वन विभाग राबवित आहे. आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून हे वनांतील 'कुरणांचे कुंपण शेताची राखण' करणार आहे.

वन्यजीव शेतात शिरुन पिके खातात वा रानडुकरांसारखे प्राणी नासाडीही करतात. शेतकऱ्यांसाठी हा मोठा संघर्षाचा प्रसंग असतो. याच मुद्यावरुन वन विभागालाही शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. रहदारीचे नियम वा प्रवेश बंदी या सारख्या उपाययोजना वन्य प्राण्यांवर कशा लादायच्या? त्या तशा अशक्यच. पण ज्या अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शेतीकडे वळतात ते अन्न म्हणजेच 'गवत' त्यांना वन हद्दीतच उपलब्ध व्हावे,यासाठी वन विभागाने कुरण विकास कार्यक्रम राबविला आहे.

अकोला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात ८५ हेक्टर वनक्षेत्रावर वन्य प्राण्यांचे खाद्य असणारे गवत लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. सन २०२२-२३ मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला असून व आता सन २०२३-२४ मध्ये दुसरा टप्पा सुरु झाला आहे.

दोन टप्प्यात कुरण विकास

पहिल्या टप्प्यात सन २०२२-२३ मध्ये बोरगाव (२० हेक्टर), बाभुळगाव (२५ हेक्टर), सोनखास (३० हेक्टर) या प्रमाणे व याशिवाय बाभुळगाव मध्येच अतिरिक्त १५ हेक्टर क्षेत्रात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतूनही कुरण विकास करण्यात आले असून एकूण ९० हेक्टर क्षेत्रावर कुरणांचा विकास करण्यात आला आहे. या कुरण विकास कार्यक्रमाला १ कोटी २० लक्ष रुपये इतका खर्च आला आहे.

दुसऱ्या टप्प्यात पातुर (२० हेक्टर), सोनखास (३० हेक्टर), परांडा (३५ हेक्टर) अशी ८५ हेक्टरवर कुरण विकास कार्यक्रम राबविला जात आहे.

असा होतो 'कुरण विकास'

कुरण विकासात गवताचे बी पेरले जाते. त्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील मोकळ्या जमिनींची नांगरणी करुन त्यावर सरी पद्धतीने गवत बी पेरले जाते. साधारण एक मिटर अंतरावर ह्या सरी पाडल्या जातात. काही वेळा गवताचे रोप तयार करुनही लागवड केली जाते. पाऊस पडण्याच्या आधीच हे काम केले जाते. पाऊस आल्यावर गवत अंकुरते. या कालावधीत तेथे प्राण्यांचा वावर होऊ दिला जात नाही. गवत मोठे झाल्यावर त्याचे बी पुन्हा जमिनीत पडते. पुढल्या पावसात हेच बी पुन्हा अंकुरते आणि गवताची घनता वाढते. साहजिकच हे गवत वन्य प्राण्यांचा अन्नाचा शोध सुरु होतो तेव्हा त्यांना खाता येते. या जादाच्या वेळात तिकडे शेतांमधील पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात आणि नुकसान टळलेले असते.

विविध गवतांची लागवड

कुरण विकास करतांना वन्य प्राण्यांना (तृणभक्षी) आवडते असे गवत लागवड केले जाते. त्यात मारवेल, मोती तुरा, पौन्या, काळी मुसळी, जंगली हरळी, गोंडे गवत, राई गवत, सोंद्री गवत, लहान गवत, गोंधळ, तिखाडी, वैद्य गवत या लागवड करता येणाऱ्या गवताच्या जाती आहेत. याशिवाय रान तूर, रान मुग, रान सोयाबीन, रान शेवरी या जंगली जातीही उगवत असतात. ही सर्व गवते वन्य प्राणी आवडीने खातात.

पाळीव जनावरांसाठीही चारा उपलब्धता

केवळ वन विभागातील जनावरे शेतात जाऊन पिके खातात असे नव्हे तर गावातील पाळीव जनावरे (गाय, बैल, म्हैस इ.) सुद्धा वन हद्दीत चरावयास जातात. त्यांच्या तेथील कुरणात वावरण्याने त्यांच्या खुरांखाली गवत दाबले जाते. जमिन कडक होऊन उगवण कमी होणे, अशा समस्या निर्माण होतात. त्यासाठी वन विभाग लिलाव पद्धतीने लगतच्या ग्रामस्थांना 'कापा आणि घेऊन जा', या तत्त्वावर गवत नेण्यास परवानगी देतात. त्यामुळे गावातील पाळीव जनावरांनाही चारा उपलब्ध होऊन गावातील लोकांना रोजगारही मिळतो, असे सहा. वनसंरक्षक सुरेश वडोदे यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांना अन्न उपलब्धता हाच उद्देश

मुळात वन्य प्राणी हे जंगलात खाद्याचे दुर्भिक्ष्य झाले की, मगच मानवी वस्त्यांकडे म्हणजेच शेतांकडे जातात. त्यासाठी त्यांना दुर्भिक्ष्य कालावधीत पुरेसे खाद्यान्न उपलब्ध करणे हाच या कुरण विकासाचा उद्देश आहे. जेणे करुन ते शेतांकडे जाणार नाही. जंगलांची घनता कमी होणे, जैविक ताणात वाढ, तापमानात होत असलेले बदल यासर्व पर्यावरणीय कारणांमुळे खाद्य गवत कमी होते. त्यासाठी कुरण विकास कार्यक्रम राबवून गवत लागवड व संवर्धन केले जात आहे, असे उपवनसंरक्षक अर्जूना के. आर. यांनी सांगितले.

आत्महत्येची धग... वरुड येथील युवकाने घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात आत्महत्येच्या मालिका कायम घडताना दिसत आहे. सतत होणाऱ्या घटनेने तालुक्यात चिंता व्यक्त केली जात असतांना आणखीन वरुड येथील एका 32 वर्षीय युवकाने गळफास घेतल्याची घटना 28 मार्च ला दुपारी उघडकीस आली.

गजानन रामचंद्र जगताप रा.वरूड असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घरी कोणी नसताना त्याने वरुड येथील आपल्या राहत्या स्वगृही गळफास घेतल्याचे आढळून आले.

वृत्त लिहेपर्यंत गजाननच्या आत्महत्येचे कारण काय हे कळु शकले नसून सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
 
                   

मार्डी येथे ३१ मार्चला महिला समूह नृत्य स्पर्धा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जनहित कल्याण महिला संघटना तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या संयुक्त विद्यमाने मार्डीत 31 मार्चला महिला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जनहित कल्याण महिला संघटनेच्या अध्यक्षा कविता मडावी राहणार असून उदघाटन सुवर्णा खामनकर करणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे,मारेगाव वन विभागाच्या प्रेमीला सिडाम, एकात्मिक महिला व बाल कल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका जयाताई मोरे, माजी सभापती शितलताई पोटे, माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर, शुभांगी ताई देवाळकर उपस्थित राहणार आहे.

मार्डी येथील जि प शाळेच्या मैदानात होऊ घातलेल्या या स्पर्धेचे उदघाट्न 31 मार्च ला सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात जनहितासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कार्यरत महिला लोकप्रतिनिधी तथा लोकसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यास व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या महिला समुह नृत्य स्पर्धेत महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक 'जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,मारेगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे प्रशिक्षण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

शेतकरी हा आपल्या राज्याच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळे त्या बळीराजाचा आर्थिक आधार बळकट करीत त्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प नुकताच राज्य शासनाने सादर केला. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात मदत आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक तंत्रकुशलतेची जोड देण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. शेती, सहकार आणि सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला राज्य शासनाची साथ या माध्यमातून मिळणार आहे.

राज्य शासनाने अर्थसंकल्प सादर करताना कृषि या महत्त्वाच्या घटकाला अधिक महत्त्व देत शेतकऱ्यांप्रती असणारी बांधिलकीच व्यक्त केली आहे. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी यावर अर्थसंकल्पात दिलेला भर स्पष्टपणे दिसून येत आहे. बळीराजाच्या समृद्धीसाठी राज्य शासन सदैव पाठीशी असल्याचा विश्वास या माध्यमातून राज्यातील शेतकरी वर्गाला दिला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे प्रशिक्षण

शेतकऱ्यांना फक्त आधुनिक यंत्रे देऊन शेती कशी करायची हे सांगून उपयोगाचे नाही. तर त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची ही गरज आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या जागेवर सर्व सुविधांनी परिपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी कन्वेंशन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी 227 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे तंत्रकुशलतेची जोड शेतीला देऊन शेती अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न होत आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे.

राज्यात फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळ पिके व फुल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळझाड व फुलपीक लागवड करता येते. यामध्ये सगल फळबाग लागवडीअंतर्गत वैयक्तिक लाभार्थीला आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, सीताफळ, ड्रॅगनफ्रुट, अव्हाकडो, केळी, द्राक्ष आदि फळ पिकांची लागवड करता येते, तसेच, पडीक जमिनीवर लागवड आंबा, बोर, नारळ, सीताफळ आदि फळ झाडांची लागवड करता येते. तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध आदी फुलझाडांची लागवड करता येते.

या योजनेत लाभार्थींनी क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारसीनुसार अंतर मर्यादेतच देय राहते. अतिरीक्त कलमे रोपे यांचे अनुदान देय नसते. लागवड वर्षासह सलग तीन वर्षात मंजूर अंदाजपत्रानुसार अनुदान देय राहते. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष पिकांच्या बाबत जे लाभार्थी कमीत कमी २० टक्के आणि कोरडवाहू वृक्षपिकांच्या बाबत किमान ७५ टक्के झाडे रोपे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थींना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. सन 2022-23 मध्ये मजुरीचा दर 256 रुपये मनुष्यदिन राहील.

ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष, आंबा, चिकू, डाळिंब, बोर, सीताफळ, पेरु, कागदी लिंबु, मोसंबी, संत्रा, आवळा, कवठ, जांभुळ नारळ, चिंच, फणस, अंजीर, पानपिंपरी, शेवगा, काजू आदि फळ पिकांना तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध या फुल पिकांना अनुदान देय राहील.

लाभार्थीचे निकष - कमीत कमी ०.०५ हे. व जास्तीत जास्त २.०० हे. प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवत असताना कुळाची संमती आवश्यक आहे.

अल्प व अत्यल्प लाभार्थी, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटूंब प्रमुख असलेल्या कुटुंबियांना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीस व पंतप्रधान आवास योजनेला प्राधान्य राहील. लाभार्थी शाश्वत उत्पन्नाची साधने उपलब्ध नसावीत. तसेच तो नोकरदार व्यक्ती नसावा. लाभार्थी ऑनलाईन रोजगार कार्डधारक असावा. लाभार्थीस ग्रामसभेची मंजुरी असावी व ग्रामपंचायत लेबर बजेटमध्ये त्याचा समावेश असावा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कृषि सहायक व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्त्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच प्रति थेंब अधिक पीक योजना राबवण्यात येत आहे.      

पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. पिकांची व्याप्ती वाढविणे. सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषि आणि फलोउत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी, सूक्ष्म सिंचन प्रणालीची स्थापना आणि देखभाल करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, असा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाच्या खर्चाच्या 45 ते 55 टक्के इतके अनुदान देण्यात येते. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या 55 टक्के किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 55टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या 45 टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 45 टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम दिली जाते. तसेच या योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी हा अटल भूजल योजनेत निवड झालेल्या गावातील असल्यास त्यास अटल भूजल योजनेचा लाभ दिला जातो. तर इतर लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत पूरक अनुदानाचा लाभ दिला जातो. याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पुरक अनुदान देण्यात येते. असे एकूण अनुक्रमे 80 ते 75 टक्के मर्यादेत अनुदान दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर शेतकरी योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत 7/12 व 8 अ चा उतारा, समाईक क्षेत्र असल्यास साध्या कागदावर इतर खातेदारांचे संमती पत्र, शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनांचा लाभ घेताना अर्ज मंजूर झाल्यापासून 7 वर्षांच्या कालावधीसाठी लाभार्थ्याने शेतमालकाशी केलेला नोंदणीकृत करार. 7/12 उताऱ्यावर विहीर, शेततळे इत्यादींवर सिंचन सुविधांची नोंद नसेल तर याबाबत साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांसाठी) इ. कागदपत्रे जोडावीत. 

सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी हे थेट पिकास दिले जाते. ठिबकमुळे पाण्याची 30 ते 80 टक्के बचत होते. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकांची जोमदार आणि सतत वाढ होते. पिकाला गरजेनुसार पाणी मिळते. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा समन्वय साधला जातो. कमीत कमी वेगाने पाणी दिले जात असल्याने मुळाच्या सभोवती ते जिरते, त्यामुळे पिकांची जोमाने वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते. द्रवरुप खते देता येतात. खतांचा 100 टक्के वापर तर होतोच शिवाय खताच्या खर्चात 30 ते 35 टक्के बचत होते. खताचा अपव्यय टळून सम प्रमाणात खते देता येतात. जमिनीची धूप थांबते त्याचबरोबर तणांवर नियंत्रणास मदत होते. असे सुक्ष्म सिंचनाचे फायदे आहेत.

सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 1 हजार 389 शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी 3 कोटी 85 लक्ष रुपयांचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याअनुषंगाने पाण्याची कमी उपलब्धता असणाऱ्या प्रदेशात सिंचनाच्या चांगल्या सुविधा उभारून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी ठिबक सिंचन हे कमी पावसाच्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरत आहे.

 

     -हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी,जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

महिलांना तिकिट दरात ५० टक्के सूट दिली तशीच गॅस सिलेंडरच्या दरातही ५० टक्के कपात द्या-क्रा. सा. फु. म. स. स


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा कधी? किमती कमी होण्याचं नाव घेत नसून दिवासेंदिवस महागाई वाढतच आहे. जिथे कपात हवी तिथे देत नसून महिलांना प्रवासात कपात देऊन काय उपयोग, द्यायची असेल गॅस मध्ये या अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकार ने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट जाहीर केली. हा अतिशय अभिनंदनीय निर्णय आहे. पण महागाईने होरपळणाऱ्या जनतेचाही सरकार ने विचार करायला हवा. ज्याप्रमाणे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट दिली, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे दरही ४०० ते ५०० रुपये करून महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा.या मागणीचे निवेदन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समितीच्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांना देण्यात आले.पुढे असेही निवेदनात नमूद केले की,सरकारी मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा जो सपाट लावला आहे, तो थांबवावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव निश्चित करून त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्यात यावा, रास्तभाव दुकानातून राशन देतांना दुजाभाव न करता सर्वच लाभार्थ्यांना राशन देण्यात यावे, त्याचबरोबर गरीब व गरजू लाभार्थ्यांनाच राशन देण्यात येते काय, याचे निरीक्षण करावे, तसेच रास्तभाव दुकाने बंद करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने निराधारांच्याही मानधनात वाढ करण्यात यावी, या सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या मागण्याही मान्य करून जनतेला जगण्याचा आधार द्यावा, अश्या मागण्या करण्यात आल्या.
या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह वणी झरी मारेगाव वतिने ह्या मोर्चात वणी, गणेशपूर, राजूर, पळसोनी झरपट, निंबाळा, कळमना येथील शेकडो महिला उपस्थित होत्या.

महागांव-सिंधी पाणंद रस्त्यांच्या मार्ग होणार सुकर

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : उपसरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषद,मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.

वणी मतदार संघांचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी महागांव सिंधी पांदन रस्ताकरिता निधी मंजूर करून दिल्याने अविनाश भाऊ लांबट यांनी त्यांचे आभार मानले. लांबट यांच्या सतत च्या मागणी सह पाठपुराव्याची आमदार साहेबांनी दखल घेतली आहे. त्यामुळे महागांव सिंधी पांदन रस्त्याचा मार्ग सुकर होणार आहे असे अविनाश भाऊ लांबट यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले.

"दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्तीतून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या महत्वाच्या बाबींवर सरकारने भर दिला आहे. 

वणी मतदार संघातील दुसऱ्यांना निवडून आलेले लोकप्रिय विद्यमान आमदार यांच्याशी चर्चा करून महागांव सिंधी पांदन रस्ता देण्यात यावा यासाठी मागील काही दिवसापासून अविनाश लांबट मागणी करित होते, आवश्यक बारमाही पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो त्यासाठी आमदार बोदकुरवार यांनी देण्याचा निर्णय घेतल्याने आता पांदन रस्त्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.

अखिल भारतीय सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्या मागणीला मोठे यश आले आहे. आमदारांनी या पांदन रस्त्याकरिता 50 लाख रुपयाचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने उपसरपंच लांबट यांच्या सह महागांव सिंधी येथील नागरिकांनी आमदार बोदकूरवार यांचे आभार मानले आहे.

कवितेचा प्रांत समृद्ध होण्यासाठी रसिकांचा दर्जा वाढायला हवा - प्रा. श्रीकांत पाटील


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : कवी हा जेव्हा कविता लिहून पूर्ण करतो त्यानंतर ती त्याची राहत नाही. ती रसिकांच्या आस्वादनासाठी उपलब्ध होते. रसिकांनी त्या कवितेतील मर्म समजून तिला न्याय दिला पाहिजे. श्रेष्ठ कविता कोणती हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार हा रसिकांचा असतो. त्यामुळे कवितेला श्रेष्ठत्व प्रदान करण्यासाठी व कवितेचा प्रांत समृध्द करण्यासाठी रसिकांचा दर्जा वाढायला हवा असे उद्गार प्रसिद्ध गीतकार व संगीतकार प्रा. श्रीकांत पाटील यांनी काढले. शेगांव ( बु ) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरी एक दिवसीय राज्यस्तरीय काव्यसंगितीचे आयोजन करण्यात आले. या काव्यसंगितीच्या पहिल्या सत्रात कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात ते बोलत होते. संवादक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रमोद नारायणे यांनी भूमिका पार पाडली. याप्रसंगी प्रसिध्द समीक्षक डॉ. संदीप भेले, कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर उपस्थित होते. कवितेविषयी प्रा. प्रमोद नारायणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीकांत पाटील म्हणाले, कवींसमोर प्रत्येक काळात आव्हाने असतात म्हणूनच कवी शब्दांच्या द्वारा प्रगट होत असतो. त्या आव्हानांना उलथून लावण्याचे काम कवी करतो. कविता ही काही शब्दांचा खेळ नसतो. तर ती जीवनाचे भाष्य करणारी एक कृती असते. कवी कविता लिहितो म्हणजे तो त्या काळाच्या पटावर आपले शब्द कोरत असतो. असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कविमनाची अवस्था, काव्यनिर्मिती प्रक्रिया, कवितेतील आशय अभिव्यक्ती यावरही त्यांनी विस्तृत भाष्य केले. कार्यक्रमाला देवराव कांबळे, दादाजी खोब्रागडे (वणी ) आत्माराम खैरे ( चंद्रपूर ) मुख्याध्यापक चंद्रभान देठे ( भद्रावती ) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यशस्वितेसाठी भारत रामटेके, माविम सहयोगीनी रंजू रामटेके, वनिता माकोडे, गीता फुलकर, सावित्री सीएमआरसी सचिव वंदना वाढई , सुधा भोज, मंदाताई वैद्य, प्रियंका नागदेवते यांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रति,
मा. जिल्हा प्रातिनिधी
दैनिक नवजीवन
चंद्रपूर

आपल्या लोकप्रिय दैनिकातून वरील बातमी प्रकाशित करावी ही विनंती.

प्रा. प्रमोद नारायणे
कार्यवाह
कवितेचे घर

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्यात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने त्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे गट व कंपन्या स्थापन करणे, गट शेतीवर भर देणे आणि त्या माध्यमातून शेतमालाचे एकत्रिकरण करून शेतकऱ्यांचा बाजार संपर्क वाढविणे यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात.

याअंतर्गंत महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प इत्यादी प्रकल्प राज्यात राबविण्यात आले. या आणि अन्य माध्यमातून राज्यात सुमारे 1 हजार 700 शेतकऱ्यांच्या कंपन्या, महिलांचे 361 लोक संचलित साधन केंद्र व 1 हजार 482 प्रभाग संघ स्थापन करण्यात आले आहेत. या संघटित शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाजाराधिष्टित शेती करण्यावर भर देण्यात येत आहे. तथापि राज्यात पिकविल्या जाणाऱ्या विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्यसाखळ्या विकसित करून त्यासाठी या संघटित शेतकऱ्यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट )प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पारंपरिक कृषि व्यवस्थेचे बळकटीकरण करून ती अधिकाधिक बाजाराभिमुख बनवणे आणि मुल्य साखळीतील खाजगी क्षेत्राचा सहभाग अधिक व्यापक करणे यावर भरदेण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी कृषि, पशूसंवर्धन, पणन, सहकार, महिला व बाल कल्याण, ग्राम विकास व नगर विकास या सात प्रशासकीय विभागांच्या अकरा यंत्रणा मिळून हा प्रकल्प राबवित आहेत .

लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. राज्याच्या कृषी व ग्रामीण उपजिविका क्षेत्रामध्ये स्मार्ट उपाययोजना राबवून राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी जागतिक बँक व केंद्र शासनाच्या सहकार्यांने ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक बँकेकडून ७०% , राज्य शासनाचा हिस्सा २७% तर खाजगी उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून (सीएसआर) 3% रक्कम पुरविली जात आहे. प्रकल्पाची एकूण किंमत २ हजार १०० कोटी रुपये एवढी आहे.

लाभ कोणाला मिळेल ?

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आणि कृषी विभागाचे अन्य उपक्रमाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांचे प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोक संचालित साधन केंद्र, सहकार विभागाच्या उपक्रमातर्गंत प्राथमिक कृषी पतसंस्था, उत्पादक संघ यांना या योजनेचा लाभ होईल. कृषि व्यवसाय सुधारणांसाठी संस्थात्मक व्यवस्थेचे बळकटीकरण, कृषि व्यवसाय विकास आणि बाजारपेठेत प्रवेश, जोखीम निवारणाची व्यवस्था उभी करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख घटक आहेत.

मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पाचे मुख्य घटक

मुल्यसाखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्याची व ती कार्ये करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होय. या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतामलाच्या किंमतीत वाढ (मुल्यवृद्धी) होत जाते. उत्पादक भागीदारी उपप्रकल्पात उत्पादक समुदाय संस्था आणि खरेदीदार संस्था हे दोघे एकत्र येवून उपप्रकल्प तयार करतील. बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प पध्दतीत उत्पादक समुदाय आधारित संस्था निश्चित असेल तथापि खरेदीदार निश्चित केलेला नसेल. परंतु या समुदाय आधारित संस्थेने उत्पादित केलेला शेतमाल कोणत्या बाजारात विकायचा तो बाजार निश्चित केला गेलेला असेल.

गोदाम आधारीत उपप्रकल्प

विकेंद्रीत स्वरुपात गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम आणि धान्य तारण सुविधा पुरविण्यासाठी हे उपप्रकल्प असतील.

कापूस मुल्यसाखळी

या घटकातंर्गत स्वच्छ व एकजिनसी कापूस उत्पादन करून कापसाच्या बेल (गठान)ची विक्री स्मार्ट कॉटन या ब्रँडखाली इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफार्मव्दारे करण्यात येणार आहे. तसेच कापूस मुल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे. सदर उपक्रम कृषि विभाग व महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॉटन ग्रोअर्स मार्केटींग फेडरेशन लि. यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, बीड, परभणी या १२ जिल्ह्यांमध्ये आहे.

उपप्रकल्पातील उत्पादने

फळे, भाजीपाला, अन्नधान्य पिके, नगदी पिके या मध्ये राज्यातील ज्या पिकांना बाजारपेठेत मागणी आहे तसेच ज्यांच्या मूल्यवर्धनास वाव आहे, अशा निवडक पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच शेळीपालन व परसबागेतील कुक्कुट पालन या दोन घटकांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे.

पीक काढणीनंतर लागणारी स्वच्छता, प्रतवारी इत्यादी यंत्र सामुग्री ,प्राथमिक व दुय्यम प्रक्रियेसाठी व पॅकिंगसाठी लागणारी यंत्र सामुग्री, शीत गृह, पिकवण गृह, पूर्व शीत गृह, गोदाम बळकटीकरण, नवीन गोदाम बांधकाम इत्यादी घटकांचा समावेश उपप्रकल्पामध्ये करण्यात येईल .

प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी smart-mh.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रकल्प समन्वय व व्यवस्थापन कक्ष मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) शेती महामंडळ भवन, २७०, भांबुर्डा, सेनापती बापट मार्ग, पुणे-४११०१६ दूरध्वनी – (०२०) २५६५६५७७/८ येथे अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


-श्रीमती अपर्णा प्रकाशराव यावलकर
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

आजचे रशिभाविष्य : २८ मार्च मंगलळवार

 
                राशीभविष्य : २८ मार्च मंगळवार..

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे आणि तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल. असे केल्याने तुम्हाला सर्वोत्तम अनुभव मिळेल. कार्यालयात विरोधकांच्या कारस्थानांपासून सावध राहा. खर्चही जास्त होईल. जर तुम्ही घरातील तरुण सदस्यांसोबत जास्त वेळ घालवलात तर तुमचा पाठिंबा त्यांना मदत करेल. त्यांना तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे.

वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत अतिशय शुभ आहे. तुम्हाला करिअरच्या बाबतीत मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे. दिवसभर उत्साह राहील. काही गोंधळामुळे लाभाच्या मार्गात अडथळे येऊ शकतात, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन प्रकरण सोडवता येईल. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते.

मिथुन :
आर्थिक बाबतीत थोडे जपून पावले टाकण्याचा दिवस आहे. आर्थिक बाबतीत लाभाचा दिवस आहे. आजूबाजूच्या लोकांशी वाद घालू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या शुभ कार्यासाठी जाण्याची संधी मिळेल. इतरांच्या मदतीने मनाला शांती मिळेल. मित्राची मदत होईल.

कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा निकाल येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस तणावपूर्ण असू शकतो. प्रामाणिकपणाने बनवलेले नाते दीर्घकाळ टिकेल. काही लोकांचे नशीब चमकू शकते. करिअरच्या दृष्टीने लाभ होईल.

सिंह :
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल आणि तुम्हाला काही काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील आणि यामुळे तुमची धावपळ अधिक होईल. दिवस खूप व्यस्त असेल. कठोर परिश्रमानंतर, तुम्हाला त्याचे फळ मिळेल, परंतु काही वेळाने ते मिळाल्यानंतर तुम्ही निराश होऊ शकता. समाजातील लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल आणि अचानक प्रवासातून काही फायदा होऊ शकतो. तुम्ही कोणाशीही वाद घातला नाही तर तुमच्यासाठी चांगले आहे.

कन्या :
कन्या राशीच्या लोकांना दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला वारंवार लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीवर पैसा खर्च करावा लागू शकतो आणि मुलांच्या शिक्षणात तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या करिअरसंबंधी आयुष्य नवीन वळण घेईल. प्रवास होईल आणि ई-मेल किंवा एसएमएसद्वारे काही चांगली बातमी मिळू शकेल. प्रॉपर्टी पेपर्समध्ये कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या.

तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस सकारात्मक परिणाम देणारा आहे. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित परिणाम मिळेल. पैशाचे प्रश्न सुटतील. आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतील. एखाद्या खास व्यक्तीशी परिचय होईल आणि तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. एखादी विशिष्ट गोष्ट न मिळाल्याने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुमचे कामही थांबू शकते.

वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. आपण केलेल्या नियोजनानुसार सर्वकाही होत असेल तर आपला दिवस आनंदात जाईल. तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील. चांगल्या वागण्याने नवीन मित्र बनतील आणि नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल, कौटुंबिक जीवनात, पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवल्यासारखे वाटेल. कार्यालयात विशेष बदल होतील आणि कामेही होताना दिसतील.

धनु :
धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे आणि तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुमच्या आयुष्यात राजकीय घडामोडी वाढतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्या पण असे केल्याने काही पैसे खर्च होतील. तुमचे मनही अभ्यासात गुंतलेले असेल. आयुष्याची दिशा नवीन वळण घेईल. तब्येतीची चिंता राहील, पण खाण्यापिण्यात सावध राहिल्यास समस्या दूर होऊ शकतात. मालमत्तेचे प्रश्न सुटतील आणि शेअर बाजाराशी संबंधित लोकांनाही फायदा होईल.

मकर :
करिअरच्या दृष्टीने मकर राशीच्या लोकांसाठी दिवस जवळपास सामान्य असेल. दिवसाच्या पहिल्या भागात लहान वाद डोके वर काढतील परंतु लवकरच सर्व काही तुमच्या समजुतीने सोडवले जाईल. वाढत्या खर्चाला आळा बसेल. जर तुम्ही जास्त मेहनत केली आणि तुमचे वर्तन सुधारले तर तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठ सदस्य आणि वडीलधाऱ्यांना तुमची चिंता होईल. गोंधळ कमी होईल.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस सर्वच बाबतीत मंद राहील. ऑफिसमध्ये काम संथपणे केले तर फायदा होईल. अभ्यास आणि लेखनाकडे लक्ष द्या. मालमत्तेचा लाभ मिळेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. ऑफिसमध्ये नवीन सहकारी कामात मदत करतील.

मीन :
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप शुभ राहील. व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या बाबतीत तणाव संपेल. खास लोकांशी तुमचा संपर्क वाढेल आणि प्रवासात तुम्हाला मनोरंजनाचा आनंदही मिळेल. दैनंदिन दिनचर्या करा आणि खाण्यापिण्याचा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करा. तुमचे सहकारी तुमच्या कामात मदत करतील पण कोणावरही जबरदस्ती करू नका.


विनोदाची हास्यजत्रा उद्या वणीत..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सागर झेप बाहुउद्देशी संस्था व जैताई मंदिर द्वारे आयोजित हास्य जत्रा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या मध्ये 9 प्रहसन, मिमिक्री, गण, बतावणी, एकपात्री प्रयोग अशी विनोदाची मेजवानी असणार आहे.
यात वणीतील नाट्य कलावंत अशोक सोनटक्के, शैलेश आडपवार, प्रवीण सातपुते, सीमा सोनटक्के, संदीप उरकुडे, प्राची चंदेलकर, प्रिया कोणप्रतिवार, राधा वैद्य, तृप्ती उंबरकर, प्रिया विवलकर, श्रुती उपाध्ये, तारा कुलकर्णी, कविता सातपुते, नंदा गुहे, मीना वानखडे, सोनल टिकले, निकुंज सातपुते, करिष्मा नवले, निखिल वाघाडे, आकाश महादुळे, प्रकाश खोब्रागडे, उमाकांत मसे असे सर्व कलावंत वणीकरांना खदखदून हसवणारा आहे.
त्यामुळे रसिकांनी हसण्याचा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

धावत्या बाईकवरील महिलेवर दरोडा, दोघांपैकी एक वडकी पोलिसांच्या ताब्यात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : तालुक्यात डॉ हाजरा लूटमार प्रकरण ताजे असतांना आणखीन एका महिलेला भर रस्त्यात लुटण्याचा थरार आज 27 मार्च ला घडला. मारेगाव तालुक्याच्या शेवट च्या टोकाला असलेल्या कोसारा येथील एक महिला बँकेच्या कामासाठी आली. ती वडकी वरून बँकेचे काम न झाल्याने कोसारा गावी जाण्यासाठी एका मोटारसायकल वर जात असतांना मागावरून येणाऱ्या दोन बंदूकधारी इसमानी तीची बॅग खैरी गावालगत च्या ब्रेकर वर ओढली. आणि लुटारूनी पोबारा केला. हा थरार आज मंगळवारला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास चिंचमंडळ,धानोरा रिठ येथे घडला असून त्यामुळे ही मारेगाव तालुक्यातील दुसरी घटना असल्याने एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार भारती संजय भेदुरकर रा. कोसारा (ता. मारेगाव) ही महिला वडकी येथील राष्ट्रीयकृत बँकेत काही कामा निमित्त गेली. परंतु तीचे काम न झाल्यामुळे ती महिला गावातीलच एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीने गावी परतत असताना तीच्या मागावरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वार इसमापैकी एकाने मागून तीची पर्स ओढली आणि पुढील दिशेने पोबारा केला. सदर घटना खैरी गावालगत च्या ब्रेकर घडली असून महिलेने खैरीत पोहचताच आरडाओरड करून हा प्रकार स्थानिकांना सांगितला.दरम्यान माझी जीवितहानी झाली असती तर असे महिलेने त्या दरोडेखोराला संतापून जॉबही विचारला.

दरम्यान, मोबाईल वरून पुढील मार्गांवरील महिललेने आणि सोबत च्या दुचाकीस्वाराने इतरांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे चिंचमंडळ येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे अतुल पचारे यांनी आपल्या सवंगडयांना संपर्क साधून माहिती देत रस्ता रोखण्यास सांगितले आणि स्वतः ही चिंचमंडळ हा मार्ग निगराणीत असताना त्या दोघांपैकी एका बंदूकधारी युवकाने धानोरा रिठ ह्याकडे कूच केल्याची माहिती मिळताच खैरी व चिंचमंडळ परिसरातील नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्याला अतुल पचारे यांनी पकडले व वडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या थरारातील मुख्य आरोपी संतोष खिरटकर (41) रा वरोरा जि. चंद्रपूर येथील असून दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे.


रासेयो पथकाद्वारे आझाद हिंद गाथा नाट्याचे सादरीकरण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला जातो आहे, त्यानिमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि समाजामध्ये स्वातंत्र्यविराच्या विचारांना उजाळा मिळावा यासाठी शहीद दिनाच्या निमित्ताने" स्वातंत्र्याची अमृत गाथा" या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेश बुरंगे यांचे कडून यवतमाळ जिल्ह्यातील लोकमान्य टिळक महाविद्यालया ची निवड या नाट्याच्या सादरीकरणासाठी कराण्यात आली.
          
महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सुरू असणाऱ्या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र मुंबई , राष्ट्रीय सेवा योजना आणि अर्टिस्टिक ह्युमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी एकाच वेळी महाराष्ट्रातील ७५ महाविद्यालया मध्ये स्वातंत्र्याची अमृत गाथा या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले . लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रसाद खांनझोडे यांचे भरपूर प्रोत्साहन लाभले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलिमा दवणे यांच्या मार्गदर्शनात वैष्णवी निखाडे,सागर क्षीरसागर,रवी शेगर,दीक्षा तेलंग,करण ढूरके, समृद्धी ताकसांडे, अब्रार शेख,विनय पुराणकर ,निखिल वाघाडे,गौरी ढेंगळे ,साई दुधलकर,
गौरव नायनवार,संजना देवगडे, प्रवृत्ती तेलंग,रोशन डाहुले विनोद शिंदे, योगेश कॉलर,अंकुश झाडे,सेजल येसेकर,तृप्ती वाघमारे या सर्व स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याची अमृत गाथा या नाट्याचे सादरीकरण केले.

महाविद्यालयातिल प्रध्यापकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि महाविद्यायातील विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस 

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आपल्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने विधेयक आणले. पूर्वी केवळ ६ अपंगत्वांचा समावेश होता, परंतू नव्या विधेयकामध्ये मधुमेहासह ४२ अपंगत्वांचा समावेश केल्या गेला. मात्र आज देखील दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका नेत्रहीन अधिकाऱ्याला पदस्थापना मिळण्यासाठी ७ वर्षे लढावे लागले होते. दिव्यांग लोकांना सहानुभूती नको परंतू समाजाकडून सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची चक्की समारंभपूर्वक भेट देण्याचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार अयोग्य, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण - मुंबई उपनगर व 'सक्षम' कोकण प्रांत या संथांनी केले होते.

जगात प्रत्येक आठवी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिव्यांग आहे, तर भारतात जवळ जवळ दोन टक्के लोक दिव्यांग आहेत. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार प्रशिक्षण, सामान संधी व सुरक्षित वातावरण देणे समाजाचे कर्तव्य आहे असे सांगून अनुकूल वातावरण मिळाल्यास दिव्यांग लोक उत्कृष्ट कार्य करू शकतात असे राज्यपालांनी सांगितले.

अष्टावक्र मुनी, संत सूरदास, वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन व शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग दिव्यांग असून देखील त्यांची प्रतिभा पूर्णपणे उदयास आली होती असे सांगून दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय व खासगी कार्यालये, संकेतस्थळे व वाहतुकीची साधने सुगम असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या हेतू चॅरिटेबल ट्रस्टला राज्यपालांनी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन व महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमलकिशोर तातेड (नि.), 'सक्षम' कोकण प्रांताचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सावंत, हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिव रिखबचंद जैन, मणी लक्ष्मी तीर्थचे विश्वस्त दिनेश मणिलाल शाह, राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम ए सईद व भगवंत मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगरचे सचिव न्या. सतीश हिवाळे तसेच दिव्यांग व्यक्ती व समाजसेवक उपस्थित होते.

आनंदाचे डोही "आनंद" तरंग

                 
                     अ|भि|ष्ट|चिं|त|न वा|ढ|दि|व|स 

'आनंदाचे डोही, आनंद तरंग।
आनंदचि अंग, आनंदाचे'

असे आनंदावस्थेचे स्वरूप तसे आमचे परम मित्र "आनंदराव" म्हणजे आनंद नक्षणे. अगदी मौज मस्तीच्या काळात वडिलांचे छत्र हरवल्यानंतर स्वतः च्या पायावर उभे राहून वाट्याला आलेल्या कुटुंबाची खंबीरपणे आपली जबाबदारी पेलणारे, म्हणजे ते आनंद भाऊसाहेब.... आता तर मनमिळाऊ दिलखुलास व्यक्तिमत्व आम्ही अनुभवतोय हे त्रिवार सत्य. शहरातील सुपरिचित सलून व्यावसायिक ते निर्भीड,निष्पक पत्रकारिता असा त्यांचा आनंददायी  लेखणीचा प्रवास...यापुढे ही आनंदमय जावो हिच. मनस्वी सदिच्छा..

त्यांच्या नावाप्रमांणे त्यांच्या वागण्यात, बोलण्यातच खरा आनंद दडलेला, निरव शांततेचा आभास घडवणारी "कातरवेळ" तो "चिल्ड" अनुभव असल्यामुळे या जन्मदिनी त्यांच्या स्वानुभवाचा आम्हास लाभलेला स्पर्श आहे. या शुभदिनी उत्कट क्षणी बहरलेली 'आनंद' ही अंतर्बाह्य सलग आणि एकच भावजाणीव म्हणजे आनंद नक्षणे....

अशा या उमद्या पर्मोच्चआनंद दिलखुलास व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा..!!

आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना
पुनःश्च वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा..!

शुभेच्छुक :- सह्याद्री चौफेर, परिवार 

वणीत शास्त्रीय नृत्याने रंगली चैत्राची रात्र...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील स्थानिक श्री जैताई देवस्थानामध्ये चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. त्या अंतर्गत रोज रात्री विविध कार्यक्रम होत आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी ‘गीत रामायण’ या शीर्षकाखाली एक कार्यक्रम झाला.

संस्कार भारती समिती शाखा वणी व नूपुर नृत्य निकेतन अकादमी तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यात गुरु नृत्यांगना सूचना बंगाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण आणि विविध भक्ती गीतांवर शास्त्रीय नर्त्याद्वारे हा कार्यक्रम प्रस्तुत केला. वणीकर श्रोते कार्यक्रम पाहून दंग झाले असून आयोजकांचे विशेष कौतुक केले.

यात त्यांनी विविध गीतांवर कथ्थक हे शास्त्रीय नृत्य सादर केले. सतीश बगडे यांनी गणेश वंदना आणि जय जय नंदकिशोर हरे या नृत्यासह कार्यक्रमाचा आरंभ केला. त्यानंतर साक्षी गायधने यांनी सरस्वती स्तुती आणि आईगिरी नंदिनी ही नृत्य प्रस्तुत केलीत. गुरु सूचना बंगाले यांनी ठुमक चलत रामचंद्र, विठू माऊली, भजे वसंतम आदी नृत्य सादर केलीत.
सतीश आणि साक्षी यांनी हम कथा सुनाते है, हनुमान चालिसा आणि अबीर गुलाल ही नृत्य प्रस्तुत केलीत. माही सांबारे यांनी धन्य धन्य प्रदक्षिणा प्रस्तुत केलं. त्यानंतर पल पल हे भारी हे समूह नृत्य झालं. सुनिता डाबरे, निखिल वाघाडे, जयती सुराणा, स्पृहा कोरडे, आरोही खैरे यांनी रामचंद्र कृपाळू ही नृत्य प्रस्तुत केलीत. 

यावेळी माधव सरपटवार अशोक सोनटक्के यांनी सूचना बंगाली तथा कलावंतांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला तसेच राजू उंबरकर यांचा मनसेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचा संचालन अभय पारखे यांनी केलं मैफिलीचे निवेदन सूचना बंगाली यांनी केले असून, तांत्रिक बाजू सागर मुने यांनी सांभाळली, चंद्रकांत अणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मैफिलीचा लाभ शहरातील सर्व रसिक श्रोत्यांनी आणि भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.