सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी: संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई :
महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले. २८८ पैकी महायुतीला तब्बल २३५ जागा मिळाल्या. एवढे प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीला मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवून सरकार स्थापन करता आले नाही. त्यामुळे राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार? आणि नव्या सरकारचा मुख्यमंत्री कोण असणार? याची राज्यातील जनतेला कमालीची उत्सुकता लागलेली आहे.
मुख्यमंत्रिपद मिळत नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यामुळे ते महायुतीची महत्वाची बैठक असलेल्या दिवशीच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी निघून गेल्याच्या बातम्याही आल्या. त्यामुळे महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून नव्या सरकारच्या शपथविधीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

'राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी... विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरूवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे,' असे बावनकुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महायुतीच्या नव्या सरकारबाबत नवी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत गुरूवारी बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप याबाबत सहमती झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांमुळे भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी साधी बैठकही होऊ शकलेली नाही.

अशातच आता खात्रीलायक सूत्रांकडून एक बातमी पुढे येत आहे. भाजप पक्षश्रेष्ठी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदेंचीच वर्णी लावण्याची शक्यता आहे.

सौ.मनिषा तिरणकर यांना राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार जाहीर


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यासह महाष्ट्रभर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्णहक्क संरक्षण समिती संस्था महाराष्ट्रच्या वतीने ३० नोव्हेंबर २०२४ ला राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे.यात सौ.मनिषा तिरणकर, राज्याध्यक्ष अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या हितासाठी कार्य करणारी सामाजिक संस्था, रुग्णहक्क संरक्षण समिती महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, बचतगट, क्रीडा, इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ समाज सेवकांचा संविधान सन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात सौ.तिराणकर ह्यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय क्षेत्रात काम केल्याबद्दल हा पुरस्कार सन्माननीय मान्यवर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

हा सन्मान गौरव सोहळा शनिवार दि.३० नोव्हेंबर २०२४ ला पत्रकार भवन एसपी आफिस समोर बसमत रोड परभणी इथे पार पडणार आहे.

आज वणी येथे संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी एस.बि.लॉन वणी येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. प्रकाश सिरसाट जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, छत्रपती संभाजी नगर,तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, प्रा.तक्षशिल सुटे, आनंद निकेतन विद्यालयात वरोरा हे भारतीय संविधान, निर्मितीचा इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका व भारतीय संविधान, अनु,जाती जमाती व ओ.बि.सी.समाजापुढील आव्हाने या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान प्रबोधन परीक्षा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्य "जागर संविधानाचा अभियान" अंतर्गत बौध्द स्मारक समिती, चिंचमंडळ द्वारा आयोजित "संविधान प्रबोधन परीक्षा" 26 नोव्हेंबर ला घेण्यात आली.

संविधानाप्रती जनजागृती करिता आपले हक्क व मूलभूत अधिकाराविषयी ओळख होऊन त्या विषयी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा त्याकरिता जागर संविधानाचा अभियान अंतर्गत समिती द्वारे आदर्श हायस्कुल मार्डी व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ येथील विद्यार्थ्यांना संविधानातील प्रमुख कलमे व विविध माहिती असलेले पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. त्याच पुस्तकावर आधारे ही संविधान प्रबोधन परीक्षा घेण्यात आली.
    

संविधान दिनी सर्वप्रथम बौ. स्मा. समिती चे अध्यक्ष ज्ञानेश्वर देठे यांच्या अध्यक्षतेत तथा सचिव राजेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधान व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या संविधान प्रबोधन परीक्षेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये सहभागी शाळा आदर्श हायस्कुल मार्डी येथील वर्ग 8 वी ते 10 वी चे 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ येथील 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामधून निवड झालेल्या प्रत्येकी शाळेतील विद्यार्थ्यांना 4 पारोतोषिक, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात येणार आहे.

या प्रबोधन परीक्षा करिता मुख्याध्यापक श्री. ढुमणे सर व मुख्याध्यापक श्री. रमेश खेकारे सर तसेच सचिव राजेश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभागाने पार पडली.

या परीक्षेला पर्यवेक्षक म्हणुन गंभीर कवाडे, विजय कवाडे, सुरेश कवाडे, ईश्वर दुपारे, शैलेश कवाडे यांनी कार्यभार पाहिला. ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता दोनही शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

चोपणमध्ये उगवला जिवंत नाला: उन्हाळ्यात सुद्धा वाहत असते या रस्त्यावरून पाणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
                    
मारेगाव : चोपणमध्ये मागील अनेक दिवसांपासून जिवंत नाला अवतरला असून या जिवंत नाल्यामुळे चोपण गावातील मुख्य रस्त्यावर उन्हाळ्यातसुद्धा पाणी वाहत असते. त्यामुळे गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.या वाहणाऱ्या पाण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
       
मारेगाव तालुक्यातील राजकीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले चोपण हे गाव.परंतु मागील अनेक दिवसांपासून या गावाला गावातील मुख्य रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे अवकळा आलेली आहे. या मुख्य रस्त्याने वर्षभर सांडपाणी वाहत असते. त्यामुळे गावातून एखादा नाला तर वाहत नाही ना असा भास सुद्धा होत असतो.

चोपणचे भूषण असलेले मंदिर. पण या रस्त्यामुळे सगळे लोप पावत आहे. बाहेर गावातील नागरिक या वाहणाऱ्या पाण्यामुळे छी... थू... करतांना दिसत आहे. या रस्त्यावरील वाहणाऱ्या पाण्यात अनेकजण आपली वाहने घेऊन पडलेली आहे. तरीही ग्रामपंचायतला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
या घाण पाण्यामुळे गावामध्ये रोगराई पसरत आहे. अनेक वेगवेगळ्या बिमाऱ्या वाढत आहे. त्यामुळे याकडे कोण लक्ष देईल असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ता, विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्वेने केले. असे महात्मा फुले सांगायचे. जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो. त्यामुळे शिक्षणाचा अधिकाधिक प्रचार व प्रचार झाला पाहिजे. असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. वणीतील जटाशंकर चौक येथील महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रशांत गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
संजय खाडे फाउंडेशन संचालित महात्मा फुले अभ्यासिका येथे 28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असे वचन खाडे यांनी दिले. प्रशांत गोहोकर यांनी महात्मा फुले यांची समाजसुधारणा, शैक्षणिक कार्याचे महत्त्व आणि आजच्या काळातील शिकवण यावर विचार मांडले.
कार्यक्रमाला सुरज गौरकार, निखिल तुरणकर, अक्षय नालमवार, देवांश आसकर, निखिल गानफाडे, शितल बोर्डे, कुणाल भेले, आकाश घोरपडे, अनिकेत थेरे, दिपक माडेवार, प्रदीप सातपुते, स्वप्निल सातपुते, विवेक खिरटकर, संतोष ताडुलवार, नितेश विंचू, अमित काळे, शंकर उपरे, शुभम राठोड, दिपक पथाडे, हर्षल मोहितकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे स्वयंसेवक व अभ्यासिकेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

वेकोली उपप्रबंधकाची चालाखी वाहन चालकाने दिली कबुली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वेकोलि उकणी खाणीतून भंगार चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी उपप्रबंधक व वाहन चालक या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील उकणी कोळसा खाणीतून कोळसा खाणीच्या यांत्रिकी उपप्रबंधक अनुप कुमार साही यांच्या सांगण्यावरून वाहन चालक अतुल गजानन पिदूरकर यांनी भंगार वाहणात लोड करून विकायला आणले गेलेले भंगार एम.एस.एफ. च्या जवानांनी पकडले व शिरपूर ठाण्यात जमा केले.
या प्रकरणाची पोलिसात तक्रार उकणी व जुनाड कोळसाखाणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांनी यांनी केली, शिरपूर पोलिसांनी त्यांच्या गुन्हा दाखल केला. यांचेकडून अंदाजे दोन लाख 85 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे करीत आहे.

शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतुन तयार केला पांदण रस्ता

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : ग्रामीण भागांत शेतांना रस्ते नसल्याने हंगामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शासकीय योजना असूनही त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणात नसल्यानेही फारसा फायदा नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करीत शेतरस्ता तयार करण्याचे काम हातात घेतले आहे. बामर्डा येथील सुधाकर वाघमारे, भास्कर गायधन, उमेश ढुमणे, दत्तू थेरे, अतुल जिवतोडे, गणेश काळे, सुभाष तोतडे, या शेतकऱ्यांनी बामर्डा ते गोरज हा पांदण रस्ता करण्यासाठी लोकवर्गणी जमा करीत काम सुरू केले. 

मच्छिन्द्रा गट-ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आला होता. असे असताना बामर्डा येथील पांदण रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने शासनाने गावातील शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना बनली आहे. 
या रस्त्यासाठी बामर्डा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा केली. श्रमदान करीत हा पांदण रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास जाण्या-येण्यासाठी हा रस्ता कच्चा स्वरूपात केला गेला आहे.मात्र,पक्या पांदण रस्त्याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी नुकतेच शेतकऱ्यांना कापूस खरेदीत टोकन मुक्त केलं, तसेंच शेतकऱ्यांना पांदण रस्ते युक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

"विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवा!" : सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांचे प्रतिपादन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : "विधी क्षेत्राला मोठा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आदींनी वकीली क्षेत्राला मोठा नावलौकिक मिळवून दिलेला आहे. वकील हे सामाजिक अभियंता म्हणून भूमिका निभावत असुन माझ्या कनिष्ठ वकिलांनी देखील विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवावा", असे प्रतिपादन सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या नविन कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ॲड.अरुण मोहोड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

ॲड. निखिल सायरे यांच्या संकल्पनेतून व ॲड. रंजित अगमे व ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे यांच्या सहकार्याने ॲक्विटस लिगल सोल्युशन्सची स्थापना केली असुन व याचे नविन कार्यालय यवतमाळ येथील चापनवाडी येथे सुरू केले. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याकरीता डॉ. सुमेध जाधव (आय.पि.एस.) हे उद्घाटक म्हणून तर श्रीधर कोहरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ अर्बन को-ऑप. बॅंक लि. यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड.अरुण मोहोड हे होते. डॉ. सुमेध जाधव (आय.पि.एस.) व श्रीधर कोहरे यांनी ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व समायोजित मार्गदर्शन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. निखिल सायरे, प्रास्ताविक ॲड.‌ रंजित अगमे यांनी तर आभारप्रदर्शन ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे यांनी केले.

कार्यक्रमास सर्वश्री सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामजी राऊत, दै. अमरावती मंडलचे जिल्हा प्रतिनिधी विजय बुंदेला, यवतमाळ अर्बन को ऑप बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र खोतकर, यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय जैन, सचिव मनमोहन ठाकरे, अश्विन‌ सव्वालाखे, ॲड. श्रेया आनंद, बाल कल्याण समितीचे डायरे, भगवान अगमे, सौ. अगमे, सौ. खोब्रागडे, श्रीमती निशा‌ सायरे, अशोक सहारे, दिनेश बोटरे, सौ. गौरी बोटरे, अमर शिंदे, राजु बुल्हे, रजनी बुल्हे, नितीन नेवारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भुषण ब्राह्मणे, प्रज्वल सहारे, प्रणव देशपांडे, काजल अगमे यांनी अथक परिश्रम घेतले.

सोनूपोडमध्ये गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : पोलिसांनी १५ किलो गोमांस जप्त केले. तसेच दोघांना ताब्यात घेतले. या गोमांसासह तीन हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार दि. २६ नोव्हेंबरला तालुक्यातील सोनुपोड येथे शेख सिलेमान व त्याचा मुलगा शेख रिजवान गोमांस विक्री करत असल्याची माहिती मारेगांव पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी साडेसात वाजता च्या सुमारास सोनुपोड येथे जावून पोलिसांनी छापा मारला.

गुरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असलेले आढळले असता पंचनामा करून आरोपिंना ताब्यात घेत, १५ किलो बैलच्या मासासह ३५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, घटनेचा लेखी रिपोर्ट पोहेकॉ रजनिकांत पाटील यांनी नोंद करून कलम ५ (क) (ड) महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा १९९५ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

लाडक्या बहिणींनी संविधान दिनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने संविधान दिना साजरा करण्यात आला. 

आजच्या दिवशी भारतीय संविधानाचा जन्म झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला होता. संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. दिवशी भारतीय नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे वचन दिले पाहिजे.

संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना अभिवादन! आपण संविधानाच्या मूल्यांचे पालन करूया आणि भारतीय लोकशाहीला मजबूत करूया! असे विचार किरणताई देरकर संस्थापक अध्यक्षा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी व्यक्त केले.
 
यावेळी चंदाताई मुन माजी पंचायत समिती सदस्य, पुष्पाताई भोगेकर माजी पंचायत समिती सदस्य,वृषालीताई खानझोडे माजी उपासभापती वणी, मंदा सोनारखन, प्रगती घोटेकर' मिनाक्षी मोहीते, सुरेखाताई ढंगळे, मंजूताई इनामे, वेणुताई झोडे, लताताई फलफुलवार, माजी सरपंच शिरपूर सारिका थेरे, सिमा बालगुणे, महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : नगरपालीका हद्दीत मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जे बंद अवस्थेत व दुर्लक्षीत आहे ते पूर्ववत सुरु करण्यात यावे व त्यासमोरील गेट समोरील अतिक्रमण काढून त्याला लोकोपयोगी करण्यात यावे अशा आशयचे निवेदन देण्यात आले.

नगर पालीका हद्दतील मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जे मागील ३ दशकापासून बंद अवस्थेत आहे व दुर्लक्षीत आहे. त्या नगरपालीकांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे ही इमारत हेतू पुरस्पर आपला विभाग दुर्लक्ष करीत आहे. म्हणून आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येतेय की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्यात यावे व सोबत त्या परिसरात मुख्यद्वारा जवळ अतिक्रमण काढण्यात यावे. सोबत रंगरंगोटी व साफसफाई करण्यात यावी व कायमस्वरुपी त्या वाचनालयाला पूर्ववत लोकांसाठी खुले करण्यात यावे. येत्या आठ दिवसात या वाचनालयाची दुरुस्ती, रंगरंगोटी व कायमस्वरुपी सुरु करण्यात यावे अन्यथा ६ डिसेंबर २०२४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पुतळ्याजवळ) आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे नगर पालीका प्रशासनानी निवेदनातून कळविण्यात आले आहे. 

या प्रकरणाकडे पालीका प्रशासनांनी दुर्लक्षीत केले व कुठलीही कायदा सुव्यवस्थेत अडथळा निर्माण झाला याकरीता पालीका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.निवेदन देते वेळी बबलुभाऊ मेश्राम, प्रविण खान‌झोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी के टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम,  शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सुरज उपरे, दादाजी देठे सर्व सहकारी उपस्थित होते.

संविधान दिना निमित्त आ. संजय देरकर यांचेकडून चैत्यभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी :- आज तारीख २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असल्याने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चैत्यभूमी मुंबई येथे जावून भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संविधानाच्या दिनाचे महत्त्व समजून वणीतील आमदारकीच्या इतिहासामधील चैत्यभूमीवर जाणारे संजय देरकर हे पहीले आमदार ठरले अशी चर्चा मतदार संघातील संविधानप्रेमी जनतेत सुरू झाली आहे. 
मागील २ दिवसापासून वणीचे लोकप्रिय आमदार संजय देरकर हे मुंबई येथे जावून आहे. त्यांनी मुबई येथे जाताच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देवून त्यांना अभिवादन केले. त्याच बरोबर मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

मुंबई येथील २६/११ च्या आतंकवादी हल्यातील शहीद झालेल्या स्मृती स्थळाला देखील आ. देरकर यांनी भेट देवून सर्व शहिदांना मानवंदना अर्पण केली आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमीवर जावून भारतीय संविधानाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे आमदार संजय देरकर हे पहिले आमदार ठरले आहे.
तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केल्याने वणी विधानसभेतील संविधानप्रेमी व शिवप्रेमी जनतेमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी त्याचसोबत जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकस, डॉ. विवेक गोफणे, सुधीर थेरे, शरद ठाकरे, आदी उपस्थित होते.

स्व. कुसुमताई तोडसाम यांचे द्वितीय पुण्यस्मरणनिमित्त विनम्र अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

"प्रेमाने विणलेली नाती कधीच संपत नाहीत; ती आठवणींच्या धाग्यांनी सदैव जुळलेली राहतात."
कुसुमताईंच्या प्रेमळ स्वभावाचा गोडवा आणि त्यांच्या मायेच्या सावलीत घालवलेले क्षण आजही ताजेतवाने वाटतात. त्या जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या विचारांची आणि मूल्यांची सावली नेहमीच आम्हाला सोबत करते.  

"प्रत्येक भेटीत त्यांनी दिलेली माया हीच त्यांची अजरामर भेट ठरते." त्यांची कर्तव्यपरायणता आणि जिद्द हे जीवन जगण्याचा खरा अर्थ शिकवून गेली आहे. त्यांच्या आठवणींनी आमच्या जीवनाला उभारी दिली आहे, आणि त्या कायम प्रेरणादायी राहतील.  

या स्मरणीय दिवशी, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.  

शोकाकुल:
श्री. चंद्रशेखर तोडसाम  
चि. चेतन तोडसाम  
कु. पल्लवी तोडसाम  

समस्त तोडसाम आणि मित्रपरिवार

मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी,भाजपाचं ठरलं!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच भाजपकडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकत भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु असतानाच दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये भाजप हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.

शामादादा कोलाम यांच्या जयंती निमित्त बिगर सातबारा शेतकरी संघटनेची बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाजाचे दैवत क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या आदेशाने विदर्भ अध्यक्ष अजय मंडपे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली बैठकीला मार्गदर्शन करतांना सांगीतले की राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीत महविकास युतीला मिळालेलं स्पष्ट बहुमत ऐतिहासिक असल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे त्यांच्या निवासस्थानी जावून अभिनंदन करुन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्याबाबतच्या सूचना संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी दिल्या असल्याची महिती अमरावती येथे पार पडलेल्या बैठकीत डॉ सुखदेव कांबळे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सांगितली पुढें बैठकीत मार्गदर्शन करतांनाडॉ सुखदेव कांबळे म्हणाले की यापूर्वी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्त्वात दादर चैत्यभूमी ते मुंबई मंत्रालय पायदळ मोर्चा काढून भूमिहीनांना जमिनी तर बेघर कुटुंबांना घरे देण्याबाबत मागणी केली असता देवेंद्र फडणविस यांच्या मंत्रिमंडळाने सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करणे करिता ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमनुकुल करण्याचा निर्णय घेतला होता त्यांची अंमलबजावणी राज्यात सुरु असुन त्याचा बऱ्यासच्या बेघर कुटुंबांना लाभ मिळत आहे त्याच धर्तीवर पुन्हा देवेंद्र फडणविस यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या नवीन सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निर्गमित करावा या करिता प्रत्येक आमदाराच्या निवासस्थानी जावून अभिनंदन करुन निवेदन सादर करुन त्यांच्या पोहच पावत्या संघटनेकडे उपलब्ध करुन द्या जेणेकरून हिवाळी अधिवेशनाची तारीख घोषित होण्यापूर्वी भाई जगदीश कुमार इंगळे यांना राज्य विधिमंडळ सचिवालयाकडे पाठपुरावा करणे सोईचे होईल त्याकरिता सर्व कार्यकर्त्याने एकाजुटिने कामाले लागा अश्या सूचना डॉ. कांबळे यांनी बैठकीतून दिल्या.

जनतेनी आशीर्वाद दिला पण पक्षांतर्गत गद्दारीने घात केला - संजीवरेड्डी बोदकुरवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार परत आलं असं जवळ जवळ निश्चित आहे. मात्र, वणी विधानसभा मतदार संघातून भाजप महायुतीची जागा पडल्याने विधानसभा क्षेत्रातील जनतेत आता नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

रविवारी भारतीय जनता पार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यात महायुतीच्या प्रचंड जागा निवडून आल्या, याचा वणी मध्ये माजी आमदार यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित येऊन विजयाचा नारा देण्यात आला. माजी आ. संजयरेड्डी बोदकुरवार हे अनेक वेळा भावुक झाल्याचे दिसून आले. 
त्यानंतर सभेत बोलताना ते म्हणाले,अतिशय प्रामाणिकपणे काम केलं,मनात थोडीशी बेईमानी राबविली नाही. ज्याचं काम केलं, अतिशय निष्ठेने काम केलं.कधी आमदार व्हावं, जिल्हा परिषद लढवावं मनात कधीच नव्हतं.2014 मध्ये आपल्या आशिर्वादामुळे, प्रेमामुळे अतिशय पंधरा दिवसात तुम्ही आम्ही घेतलेल्या मेहनतीने आमदार झालो. आणि आमदार झाल्यापासून जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षाला दिला. कार्यकर्त्यांना दिला, जनतेला दिला.दहा वर्षात मी परिवाराला, पत्नी मुलांबाळांना वेळ देऊ शकलो नाही, तेवढा मी पक्षाला दिला. असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. पुढं ते म्हणाले कि, पराभवाची चिंता नाही, मात्र पक्षात राहून अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनी मला हरवण्यासाठी गद्दारी, बेईमानी केली याच शल्य माझ्या मनात आहे, आज तुम्ही इतक्या संख्येने इथे जमलात मला याच आनंद आहे. मात्र, पक्षात प्रामाणिकपणे काम करा, पक्ष कुठेही तुम्हाला कमी पडू देत नाही. मी तिकिटासाठी दिल्ली ला गेलो नाही, नाही मुंबईला गेलो. देवेंद्रजींनी मला स्वतः संपर्क साधून सांगितलं की तुमची तिकीट पक्की आहे, तुम्ही तयारीला लागा. म्हणून मी लढलो. परंतु आता मी माझा स्वभाव बदलणार आहे, जे गद्दार बेईमान आहे त्यांना मी माझ्या दारात पाय ठेवू देणार नाहीत. असे बोलताना बोदकुरवार गहिवरले.
तुम्ही सोबत राहा मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. एवढ्या मोठ्या पदाचा माणूस, माझ्या विरोधात प्रचार केला ही मोठी खंत आहे. पक्षात राहून अशी बेईमानी होत असेल तर हे पक्षाचे मोठं दुर्दैव आहे. आज राज्यात महायुतीचे सी एम (मुख्यमंत्री) होणार आहे, आम्ही आमदार नसलो तरी कोणाचे काम अडणार नाही. माझे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहे. मग देवेंद्रजी असो सुधीरजी असो, आणखी काही लोकं असतील. खूप चांगले स्नेहाचे संबंध मी सर्वांशी जपले. त्यामुळे आपल मी काम अडू देणार नाही. नवीन आमदारांना माझ्या शुभेच्छा आहे, मात्र ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलत आहे ही येणाऱ्या तरुण पिढीसाठी घातक आहे.माझा पराभव का झाला, कसा झाला हे तुम्हा सर्वाना माहिती आहे. परंतु यावर आता बोलणार नाही. मी विकासात कुठेही कमी पडलो नाहीत, खूप कामे केली. मला 80 हजार मत मिळाली हे आपल्या प्रेमाची साक्ष आहे. जर तर सोडून आपण पराभव मान्य करू, आणि पुढील कार्यासाठी नव्या दमाने जोमाने तुमच्यासाठी मी लढणार आहे. जेवढा वेळ पूर्वी देत होतो तेवढाच वेळ आताही तुमच्यासाठी देणार आहे हे बोलताना ते अतिशय भावुक होऊन म्हणाले. 
यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

21 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवरगाव येथील एका 21 वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवल्याची घटना शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. 

खुशी सुभाष मोहुर्ले रा. नवरगाव (धरण),असे घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.आई सकाळी कामाला गेली होती, ती सायंकाळी कामावरून घरी परतली असता घरात मुलगी दोरीच्या सहाय्याने गळफास अवस्थेत आढळून आली. ही दुःखद वार्ता कळताच गावकरी घटनास्थळी जमली,युवतीला रुग्णालयात हलविले डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. ख़ुशी ही शेजारच्या वणी तालुक्यात अकॅडमी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असल्याचे समजते. 

मुतकाच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी असून वडिलांचे निधन झाले आहे. सध्या खुशीच्या आत्महत्येचे कारण अस्पस्ट असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करित आहे.

वणी विधानसभेत संजय देरकर 15560 मतांनी विजयी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी विधानसभा क्षेत्रात उबाठा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी 15560 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते पंचवीसव्या वर्षीच्या लढ्यानंतर विधानसभेत पोहोचले आहे. यापूर्वी चार वेळा विधानसभा निवडणूक लढवणारे संजय देरकर ते यावर्षी 2024 मध्ये उबाठा महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना मिळाली होती. आज शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल होता,समोर आलेल्या निकालात देरकर यांनी भाजप महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पराभूत केलं आहे. 

विशेष म्हणजे देरकरांनी पहिल्या फेरी पासूनच मतांचा जोर पकडला होता, त्यानंतरही मतांचा आकडा फुगत गेला आणि दहाव्या फेरीनंतर संजय देरकर यांच्या विजयाची घोडदौड सुरु झाली. यामध्ये काँग्रेस ठाम राहिल्यामुळे शिवसेना उबाठाचे उमेदवार विजयी झाल्याचे देखील बोललं जात होत. प्रत्येक फेरीचे आकडे व दर मिनिटाला येणारी देरकरांची आघाडी, वणी मतदार संघातील नागरिकांची उत्कंठा वाढवत होती. बहुमताच्या आघाडीमुळे विजय निश्चित शिगेला पोहचली होता.अखेर संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मात देत संजय देरकर यांनी 15560 मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांचं वणी विधानसभा क्षेत्रात नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

पहा कुणाला किती मते मिळाली
अरुणकुमार खैरे (बसपा) 1163, राजू उंबरकर (मनसे) 21977, संजय देरकर (शिवसेना उबाठा) 94618, संजीवरेड्डी बोदकुरवार (भाजप) 79058, अनिल हेपट (भाकप) 3875, राजेंद्र निमसटकर (वंचित बहुजन आघाडी) 3605, अपक्ष राहुल आत्राम 2532,  संजय खाडे 7540, केतन पारखी 407, नारायण गोडे 855, हरिष पाते 1307, निखिल ढुरके 2246 असे मते मिळाली.  तर नोटा 1328.


शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय देरकर वणीमधून विजयी


संजय देरकर यांचा बोदकुरवारावर 15,560 मतांनी दणदणीत विजय 

वणी मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.
संजय देरकर या ठिकाणी निवडून आले आहेत.
संजय देरकर उबाठा गटाचे महाविकास चे उमेदवार होते.
त्यांच्या झंझावाती प्रचारापुढ विरोधकांना पराभूत व्हाव लागलं आहे.
वणीतील विजयानंतर संजय देरकर यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
त्यांच्यापुढे संजीवरेड्डी बोदकुरवार या भाजप महायुतीच्या  उमेदवाराचे आव्हान होते.
संजय देरकर यांनी १० व्या फेरीअखेर 37 हजारांच्या वर आघाडी मिळवली होती.

(सर्व फोटो सह्याद्री चौफेर संग्रहित)