महसूल विभागाची धडक कारवाई : कोसारा परिसरात अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, तर एक वाहन घेऊन फरार...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. या जप्ती च्या कारवाई ने रेती तस्करांचे धाबे चांगलेच दनाणले असून ही पावरफूल कारवाई तहसीलदार निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गुघाने (मंडळ अधिकारी), तलाठी शैलेंद्र कुमार शिंगणे, विवेश सोयाम, सनदेवल कुळमेथे या महसूल टीम ने केली. दरम्यान,अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही करीत असताना एक चालक वाहन घेऊन फरार झाल्याचे समजते.

मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटावरून रेतीची तस्करी नित्याचिक झाली आहे तरी, तहसीलदार निलावाड कार्यालयात रुजू झाल्यापासून रेती तस्करी वर काही प्रमाणात आळा घातला गेला असला तरी,रेती तस्कर महसूल विभागाच्या प्रत्येक हालचाली वर कटाक्षाने लक्ष ठेऊन आपले हित साधत असतात. परंतु महसूल प्रशासन हे सुद्धा या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी रात्रंदिवस एक करित आहे, त्याची प्रचिती काल बुधवार च्या सायंकाळी सहा वाजता सोईट (ता. वरोरा) ते कोसारा रोडवरील कोसारा गावा लगत अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असलेले रेतीचे दोन ट्रॅक्टर महसूल पथकानी पकडले. व दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
मारेगाव तालुक्यात हर्रास नसताना चांद रात्रीस मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून, यात लाखों रुपयाचा महसूल रेती तस्करांकाकडून शासनाला चुना लावला जात आहे. यात काही राजकीय नेत्यांचा सुद्धा समावेश आहे.

परिणामी, रेती तस्करांच्या अफलातून मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभागाने तस्करावर आळा घालण्यासाठी कंबर कसली असून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार निलावाड, मंडळ अधिकारी घुगाने, तलाठी कुळमेथे, तलाठी शिंगणे, तलाठी सोयाम व ड्रायवर विजय हे सातत्याने प्रयत्न करित आहेत. 

विभागीय बालपरिषदेत मूर्ती शाळेच्या शिरपेचात दुहेरी मुकुट !


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर, नाशिक व अमरावती या तिन्ही विभागातील सर्व जिल्ह्यातील तंबाखू विरोधी यंग लिडर्स विद्यार्थ्यांकरीता दि. ३० जानेवारी २०२४ ला आयोजित विभागीय ऑनलाईन बालपरिषद २०२४ मध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती, केंद्र नलफडी, पं. स. राजुरा येथील विषय शिक्षक मनीष अशोकराव मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अस्मिता शिवाजी डाखरे, वर्ग ८ वा या विद्यार्थीनीने मा. श्री राजेंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम यांच्या सोबत प्रश्नोत्तरे रूपात संवाद साधला. तर या बालपरिषदेचे संयुक्त सुत्रसंचलन मूर्ती येथील विषय शिक्षक श्री मनीष अशोकराव मंगरूळकर यांनी केले. 

     बालपरिषद म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ. त्यात अस्मिताने सर्वप्रथम सादर केलेल्या तंबाखू विरोधी जनजागृती कार्याचे वाशिम जिल्हा शिक्षणाधिकारी मा. राजेंद्र शिंदे यांनी खूप कौतुक व हार्दिक अभिनंदन केले आणि त्यानंतर अस्मिताने विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर व सकारात्मक उत्तर त्यांनी दिले. 
       नागपूर, नाशिक व अमरावती या तीनही विभागातील सर्व जिल्ह्यातील यंग लिडर्स विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी बालपरिषदेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. श्री.राजेंद्र शिंदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , जिल्हा वाशिम , मा. श्री. श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कारंजा लाड, जिल्हा वाशिम, मा. डॉ मनीष बत्रा , दंत शल्य चिकित्सक, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, जिल्हा भंडारा, मा. डॉ शैलेश कुकडे कार्यक्रम व्यवस्थापक NTCP, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा भंडारा, मा. श्री. रामदास आर. धनगर, मुख्य संपादक वत्सगुल्मा मीडिया नेटवर्क, जिल्हा वार्ताहर
D.D.News व हितवाद हे उपस्थित होते.

      या विभागीय ऑनलाईन बालपरिषदेसाठी कु. अस्मिता शिवाजी डाखरे, हिच्यासह मूर्ती शाळेतील कुंदन शालिक लांडे, वर्ग सातवा, कु. तेजस्विनी रोशन ताकसांडे, वर्ग आठवा, कु. जानवी सुरेंद्र वडस्कर, वर्ग सातवा, श्रीजल रमेश शेरकी, वर्ग सातवा असे एकूण पाच विद्यार्थीगण व मार्गदर्शक शिक्षक मनीष मंगरूळकर यांनी मागील तीन महिन्यांपासून बालपरिषदेचे संपूर्ण ११ ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण केले. शाळा व गाव स्तरावर अतिशय प्रभावीपणे तंबाखू विरोधी जनजागृती केली. त्यामुळेच कु.अस्मिता शिवाजी डाखरे व श्री मनीष अशोकराव मंगरूळकर यांची निवड विभागीय ऑनलाईन बालपरिषदेसाठी करण्यात आली. आणि त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याबद्दल मूर्ती येथील या विद्यार्थी यंग लिडर्सचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

     *विभागीय ऑनलाईन बालपरिषदेतील आत्मविश्वासपूर्ण सक्रिय सहभागाबद्दल तसेच मूर्ती शाळेचे नाव विभागीय पातळीवर उंचावल्याबद्दल कु. अस्मिता शिवाजी डाखरे व मनीष अशोकराव मंगरूळकर सर यांचे अभिनंदन करून हेमंत भिंगारदेवे, संवर्ग विकास अधिकारी राजुरा, गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी राजुरा, नामदेव बावणे केंद्रप्रमुख केंद्र नलफडी, धनराज रामटेके सरपंच मूर्ती, मिथुन मंदे , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, महेश शेंडे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद संजय बोबाटे, दयानंद पवार, अमोल बल्लावार आणि गावकरी* यांनी आवर्जून कौतुक व अभिनंदन केले आहे

श्रमिकांच्या आवाज हरपला, कॉ. शंकरराव दानव यांचे निधन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, शेतकरी, कामगारांचे आवाज असलेले, त्यांचे साठी सातत्याने आंदोलन करणारे कॉ. शंकरराव दानव यांचा मृत्यूशी असलेला संघर्ष संपला. आज पहाटे ६ वाजता मृत्यूने त्यांना कवटाळले व ते आपल्यातून निघून गेले. कॉ. शंकरराव ह्यांना दि. २७ जानेवारी लां त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांचे चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ४ दिवस त्यांचा मृत्यूशी झुंज होती. त्यांचे अवेळी निघून जाण्याने पक्ष व कार्यकर्त्यांवर खूप मोठी दुःखाचे आभाळ कोसळली आहे.  

कॉ. शंकरराव दानव हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील संस्थापक सदस्य होते. यवतमाळ जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जनतेचा प्रत्येक समस्येशी असलेल्या संघटना त्यांनी उभारल्या होत्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते वयाचा १५ व्य वर्षी पासून ते आज शेवटचा घटका पर्यंत ते कार्यरत होते. दवाखान्यात त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी ताबडतोब मला येथून घेऊन चला, मला यवतमाळ जायचे आहे, तिथे महिलांचा संघर्ष सुरू आहे, मला तिथे जायचे आहे, असे त्यांचे वाक्य होते. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. त्यांना पुन्हा एकदा झटका आला व ते कोमात गेले. त्यानंतर ते कोमातून परत आलेच नाहीत.

कॉ. शंकरराव दानव ह्यांनी विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, फेरी, कोळसा कामगार, नगर परिषद कर्मचारी, जिनिंग प्रेस कामगार, चुनाभट्टी कामगार, चुना दगड कामगार, आशा व गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका अश्या कितीतरी संघटना बांधून सर्वांना न्याय देण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करीत होते. त्यांनी अनेक दीर्घ लढे करून पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वन जमीन कसनाऱ्यांना त्यांना हक्काची जमीन मिळवून दिली तर अनेकांना ती मिळवून देण्यासाठी आजही त्यांचा संघर्ष सुरू होता. 

कॉ. शंकरराव ह्यांचा जन्म १९४८ ल एका गरीब कुटुंबात झाला. त्यांची संपूर्ण हयात गरिबीत गेली. पक्ष व जनतेचा कार्यात ते एवढे गुंग असायचे की सायंकाळी त्यांचा घरी स्वयंपाक शिजेल की नाही ह्याची सुद्धा शाश्वती नसायची. मोठ्या कठीण अवस्थेत त्यांचा परिवार जगत होता. शेवटी फार कमी वयात त्यांचा मोठा मुलगा राहुल ने परिवाराची जिम्मेदारी निभावली. परंतु कॉ. शंकरराव हे सातत्याने खेड्यापाड्यात पायदळ तर कधी सायकलने फिरत राहिले. दलीत, आदिवासी, शेतमजूर ह्यांचे संघटन बांधत राहिले, त्यांचा संघर्ष सुरूच ठेवला.

कॉ. शंकरराव हे कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते ज्यामध्ये. कॉ.ए. बी. बर्धन, वासुदेव आचार्य, बी. टि. रणदिवे, वृंदा करात, डॉ.अशोक ढवळे अशा कितीतरी नेत्यांसमावेत खांद्याला खांदा लावून काम करीत राहिले. ते अनेक आघाड्यांवर काम करीत असल्याने त्यांना सगळीकडे बहुमान होता. त्यांचा कडे संघर्षाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी ऐकून घेतल्या जात होते. अश्या ह्या पुढाऱ्यांचे अवेळी एकाएकी निघून जाणे पक्ष, जन आघाड्या व कार्यकर्त्यांना खूप मोठी हानी झालेली आहे. त्यांचा जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते पोरके झाले आहेत, एवढे मात्र नक्की!

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. आज यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 25 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या कला क्षेत्रातील कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन 1995 पासून सुरुवात झाली. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य –चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी अनेक चित्रपटातून रसिकांना खळखळून हसायला लावले. त्याचबरोबर, संवेदनशीलतेने भूमिका साकारताना रसिकांच्या आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अभिनयाचे गारुड मराठी चित्रपटरसिकांवर आजही कायम आहे.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या चित्रपटसृष्टीत परिचित आहेत. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाने त्यांचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. व्यावसायिक नाटकापासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर पांडू हवालदार, राम राम गंगाराम, अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन अशा चित्रपटांतून विविध रंगी भूमिका करुन प्रेक्षकांच्या मनात स्वताचे स्थान निर्माण केले. स्वताचे कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या या कारकिर्दीचा गौरव राज्य शासनाने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करुन केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ. अनिल काकोडकर, वासुदेव कामत, डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ. शशिकला वंजारी, अॅड. उज्वल निकम आणि समितीचे सदस्य सचिव बिभीषण चवरे यांचा समावेश होता.


पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरकुल द्या - शिवणी धोबे येथील ग्रामस्थांची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वर्धा नदीच्या काठा जवळील शिवणी (धोबे) या गावाला पुराचा दरवर्षी तडाखा मोठ्या प्रमाणात बसत असतो.या तडाख्यामुळे दरवर्षी अनेक घरांची परझड, नुकसान होत आहे. त्यामुळे पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरकुल द्या अशी मागणी शिवणी धोबे येथील ग्रामस्थांची आहे.

तालुक्यातील शिवणी धोबे येथे आता मोदी आवास योजनेचे 33 घराचे उदिष्ट ग्रामपंचायतला आले होते. त्यामध्ये ग्रामपंचायतने 33 जणांची लिस्ट बनवुन ग्रामपंचायत ठराव सादर करण्यात आला होता. परंतु तक्रारीअंती चौकशी अंतर्गत त्यातील 14 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले. अशी तक्रार आज मंगळवारला पंचायत समिती कार्यालयाला देण्यात आली.

विशेष म्हणजे शिवणी धोबे हे गाव वर्धा नदीच्या तिरावर असुन पावसाळ्यामध्ये पुर्ण गाव पाण्याखाली येत असते, त्यामुळे येथील पूरग्रस्त लोकांनी विटा,सिमेंट व छतावर टिनपत्रे व कवेलु टाकुन तात्पुरती राहण्याची आपापल्या व्यवस्था केली आहे. मात्र,त्या घरांना पक्के घर असे संबोधू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तूर्तास अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना ग्राम.पं. ने दिलेल्या ठरावानुसार मोदी आवास योजनेत समाविष्ट करून पुरग्रस्त त्या अपात्र लोकांना लाभ देण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी गावातील सरपंच निलेश रासेकर, रमेश ढोके, ज्ञानेश्वर धोबे तसेच मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांचे सह शिवणी धोबे येथील लाभार्थी उपस्थित होते.

उद्या मार्डी येथे कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबिराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुका काँग्रेस कमिटी च्या पुढाकाराने व विजयकिरण फाउंडेशन द्वारा आयोजित या शिबीरात महाराष्ट्राचे पहिले टेलीमेडिसिन तंत्रज्ञानयुक्त हायटेक आपल्या दारी 'कँसर तपासणी हॉस्पिटल' येत आहे. मा. ना. विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य व शिवानीताई वडेट्टीवार सरचिटणीस प्रदेश युवक यांच्या सहकार्याने 31 जानेवारी रोजी ग्रामपंचायत मार्डी येथे तर 1 ते 2 फेब्रुवारी रोजी मारेगाव नगर पंचायत येथील प्रांगणात सकाळी 11 वा. हे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य रुग्णांना महागडे उपचार घेणे परवडत नाही, शिक्षण असून देखील प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणांना आर्थिकदृष्टया घरचांना मदत करणे शक्य होत नाही, रोजगार न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून व्यसनाधीनता वाढता आहे, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. स्पर्धा परीक्षामधील गैरप्रकार आणि पेपरफुटीमुळे तरुणामध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने आरोग्यावर खर्च करणे देखील शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. आर्थिक परीस्थिती बेताची असल्यास अनेक महिला दुखणे हे अंगावर काढतात, महिलांच्या आरोग्याकडे सरकारचे लक्ष नाही.
आणि सरकारच्या हुकुमशाही कारभारामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. गरजू आणि गरिबांना उपचार मिळणे अवघड झाले आहे.
सध्याच्या स्थितीत सर्वसामान्य गरजू लोकांना महागडा उपचार परवडत नसल्याने सामाजिक दायित्व जोपासत काँग्रेस व विजयकिरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, यकृताचे आजार 45 हुन हून अधिकत रक्ताच्या तपासण्या,किडनी विकार, मानसिक आजार, त्वचारोग, टी बी, अस्थीरोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, रक्तदोष, श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, तसेच अत्याधुनिक मॅमोग्राफी मशीन (स्तनाच्या कॅन्सर चे निदान), अत्याधुनिक X RAY मशीन (सर्व प्रकारचे x ray), अद्ययावत पॅथॉलॉजी प्रयोग शाळा (45 हून अधिक प्रकारच्या रक्ताच्या तपासणी),  अद्ययावत दंत चिकित्सा युनिट, मुख कर्करोग तपासणी (ECG, रक्तदाब, पल्सरेट, बॉडी मास इंडेक्स, ब्लड शुगर स्पायरोमेट्रि, फुफ्फुस क्षमता तपासणी), लहान मुलाचे श्वसनाचे आजार, गर्भवती स्त्रियांमध्ये eclampsia व preeclampsia चे निदान
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहेत.

तरी मार्डी परिसरातील गरजू गरीब लोकांनी उद्या बुधवार रोजी होणाऱ्या भव्य शिबिराचा लाभ घ्यावा असे, आवाहन मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

आजपासून मार्डी येथे भव्य कबड्डी चे खुले सामने,दोन लाख एकोणसाठ रुपयांची भव्य बक्षिसे

   
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
        
मारेगावतालुक्यातील मार्डी येथे न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी चे वतीने कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले असून दिनांक ३१ जानेवारी ला उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे.दिनांक ३१ जानेवारी,१ व २ फेब्रुवारी या कालावधीत प्राथमिक शाळेचे पटांगणात हे सामने पार पडणार आहे.
यावर्षी प्रथमच महिला कबड्डी खेळाडूंना संधी मिळणार असून महिलांच्या 'अ' गटाकरिता प्रथम बक्षीस ३१०००, द्वितीय बक्षीस २१०००, तृतीय बक्षीस ११०००तर चतुर्थ बक्षीस ५००० तर पुरुष 'अ' गटाकरिता प्रथम बक्षीस ५१००० रुपये, द्वितीय बक्षीस ३१००० रुपये, तृतीय बक्षीस २१००० रुपये, चतुर्थ बक्षीस ११००० तर पुरुष 'ब' गटात प्रथम बक्षीस ३१०००,द्वितीय बक्षीस २१००० ,तृतीय बक्षीस १५०००रुपये,आणि चतुर्थ बक्षीस १०००० रुपये अशी चार बक्षिसे असून त्या व्यतिरिक्त गिफ्ट हेम्पर, चषक आणि वैयक्तिक बक्षिसे आहेत.
या सामन्यात सहभागी होणाऱ्या महिला गटाकरिता ७००₹,पुरुष 'अ' गटाकरिता १०००₹,आणि 'ब' गटाकरिता ८००₹ प्रवेश फी आहे.तरी या कबड्डीचे खुले सामन्याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अक्षय सराटे, उपाध्यक्ष रुपेश जुमनाके, सचिव समाधान सिरामे आणि समस्त पदाधिकारी,सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्यापासून ऑनलाइन मिळेल 10 वी परीक्षेचं हॉल तिकीट, असं करा डाऊनलोड..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट उद्या म्हणजेच बुधवारपासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार असून विद्यार्थी 31 जानेवारीपासून आपलं हॉल तिकीट ऑनलाइन मिळवता येणार आहे.
इयत्ता दहावीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाऊनलोड कसे करावे?

● सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in ला भेट द्या
● SSC परीक्षा निवडा.
● नवीन विंडो उघडेल.
● आपले यूजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
● आवश्यक असणारा तपशील प्रविष्ट करा.
● तपशील प्रविष्ट केलेल्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र आपल्या स्क्रिनवर दिसेल.
● ‘डाऊनलोड’ या पर्यायावर क्लिक करा.
● प्रवेशपत्र डाऊनलोड करून सेव्ह करा.
● सेव्ह केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट आऊट काढा.
मंडळाने दिलेल्या 'स्कूल लॉगिन'मध्ये हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध असेल. दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत. हॉल तिकीट प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. तसेच त्या हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  


सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 23 ते 25 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. दरम्यान विविध विषयावरील कार्यक्रम सादर झाले व तसेच या संमेलनात सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात अभिजित पंढरपूरे आणि आकाश कुमरे व संच यांनी एकापेक्षा एक सुमधुर गीत सादर केले, गायक अभिजित पंढरपूरे यांच्या गोड आवाजात प्रथम गायलेल्या श्रीराम की जानकी या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर गायक आकाश कुमरे यांच्या ठसकेबाज आवाजात तुझ्या रूपाचं चांदणं या मराठी गाण्याने सदर कार्यक्रमाची सांगता झाली. साथसंगत सुमित ठमके, कुमारबादल कुमरे, बँजो वादक डॉ. वी.पी. गेडाम सर, हार्मोनियम प्रशांत ठाकूर, तबला व ढोल लोखंडे बंधू यांची लाभली होती.
कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ. घरडे सर व तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

उत्कृष्ट संच म्हणून अभिजित पंढरपूरे आणि आकाश कुमरे व संच, यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भारतीय बौद्ध महासभा तथा वंचित बहुजन आघाडीतर्फे इव्हीएम विरोधात महामहिम राष्ट्रपतींना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : इव्हीएम (EVM) यंत्र हटवा, मतदान मत पत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) चा वापर करा आणि लोकशाही वाचवा, या मागण्यांसाठी आज सोमवार ला भारतीय बौद्ध महासभा तथा वंचित बहुजन आघाडी च्या तालुका शाखेतर्फे तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना (भारत सरकार नवी दिल्ली) देण्यात आले.

26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान संपूर्ण भारतात लागू झाले असुन समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चार मुलभूत तत्वावर आधारीत असुन धर्मनिरपेक्षता हा त्या संविधानाचा गाभा आहे. परंतु अलीकडे ईव्हीएम यंत्रातील मतदारात संभ्रम निर्माण झाला असून EVM द्वारे दिलेले मत शंभर टक्के मत त्याच प्रतिनिधीला मिळेल की नाही, याबाबत शंका अधिक दृढ होत चाललेली आहे. त्याप्रकारचे EVM बाबतचे हे वातावरण संपूर्ण देशाला दिसत आहे. लोकशाही देशासाठी इव्हीएम यंत्र घातक असल्यामुळे स्वच्छ व नि:पक्ष वातावरणात सन 2024 ची व त्या पुढील निवडणूक होण्यासाठी 'इव्हीएम हटाओ देश बचाओ' या विषयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. मतदान (बॅलेट पेपर) वर करा वापर आणि लोकशाही वाचवा अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ पूर्व चे जिल्हाध्यक्ष भगवान इंगळे, वंचित बहुजन आघाडी चे मारेगाव तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, संजय जिवने (उपाध्यक्ष), नूतनताई तेलंग (वं.ब.आ महिला ता. अध्यक्ष), सुवर्णाताई नरांजे (वं.ब.आ. महिला शहर अध्यक्ष), अनंता खाडे, राहुल आत्राम (जिल्हाध्यक्ष क्रांतिवीर शामदादा कोलाम संघटना, यवतमाळ) यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनादेशाचा अनादर, 6 महिन्यांची शिक्षा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : हातउसणे घेतलेल्या रकमेची परतफेड न करता त्याऐवजी धनादेश देऊन अनादर झाल्याप्रकरणी स्वाती विकास बोबडे ह. मु डोंबिवली ईस्ट, जि. ठाणे यांना दोषी ठरवत येथील न्यायदंडाधिकारी निलेश वासाडे यांनी 6 महिन्यांचा कारावास व 5 लाख 20 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

शिक्षा झालेल्या स्वाती बोबडे हिने प्रवीण साधुजी भट रा. वणी यांच्याकडून हातउसणे पैसे घेतले होते. पैसे परत करतेवेळी भट यांना धनादेश दिला. परंतु तिच्या बँक खात्यात रक्कम नसल्याने धनादेश अनादर झाला. त्यामुळे प्रवीण भट यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ट केले, न्यायाधीश नीलेश वासाडे यांनी साक्षपुरावे आणि युक्तिवाद ऐकून स्वाती विकास बोबडे हिला धनादेशप्रकरणी दोषी ठरवून सहा महिन्यांचा कारावास व रक्कम प्रवीण भट यांना अदा करण्याचा आदेश नुकताच दिला. फिर्यादीतर्फे अॅड. पी. एम. पठाण यांनी बाजू मांडली.

अवैध दारु विक्री बंद करा - गोंडबुरांडा येथील महिलांची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गॉडबुरांडा येथे सुरु असलेली अवैध दारु विक्री कायमची बंद करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन आज सोमवारला असंख्य महिलांनी मारेगाव गाठून ठाणेदार जनार्धन खंडेराव यांना देण्यात आले.

गावात मागील चार-पाच महिण्यापासून कुंभा येथील एक प्रशांत नामक व्यक्ती अवैध दारु विक्री करीत आहे. सदर बाब पोलीस पाटील, सरपंच व तंटामुक्ती यांना सांगुन बैठक बोलावुन सविस्तर चर्चा करुन त्या दारु विक्रेत्याला समाजावून सांगण्यात सुद्धा आले. परंतु गावातील पोलीस पाटील, सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे सुध्दा तो ऐकायला तयार नाही. उलट "तुमच्याने जे होते ते करुन घ्या, मी माझे दारु विक्रीचा व्यवसाय बंद करणार नाही" असे बोलून अश्लिल शिवीगाळ करुन धमकी देत असतो. असे 'निवेदनात नमूद आहे.

पुढं असेही तक्रारीत म्हटलं आहे की, या अवैध दारु विक्रीमुळे गावात अशांतता निर्माण झालेली असून गावातील तरुण, होतकरु व्यक्ती व्यसनाधीन खूप झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून गावात रोज झगडे भांडण सुरु असते. तसेच या दारु विक्रेत्याची हिंमत जास्तच वाढली असून सदर व्यक्ती हा धमकावत असतो. त्यामुळे सदर अवैध दारु विक्रेत्यावर योग्य ती कार्यवाही करुन त्वरीत येथील अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी गोंडबुरांडा येथील महिलांनी केली.

निवेदन देताना ग्रापं. सदस्य अनुसया शेडमाके, पौर्णिमा उरवते, चंदा जुमनाके, शांता आत्राम, कानाबाई शेंदरे, शिला आत्राम, कलाबाई टेकाम, बालीबाई आत्राम, शालीनी रामपुरे, शोभा आत्राम, अनिता आत्राम, रीना रामपूरे, जणाबाई आत्राम, लक्ष्मी आत्राम यांच्या सह असंख्य महिला उपस्थित होत्या.

शेतकरी कामगारांचे नेते कॉम्रेड शंकरराव दानव यांची प्रकृती खालावली परंतु स्थिर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव ह्यांना दि. २७ ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सध्या व्हेंटिलेटर वर ठेवले आहे. परंतु तब्येत स्थिर असून तब्येत सुधारण्याची आशा केल्या जात आहे. इस्पितळात त्यांची मुले ॲड. राहुल, मिलिंद व सारिका तसेच पक्षाचे कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदू बोबडे, मनीषा परचाके त्या ठिकाणी उपस्थित आहेत.

कॉम शंकरराव दानव ह्यांची संपूर्ण हयात शेतकरी,शेतमजूर, कामगार, दलीत, आदिवासी, महिला, विद्यार्थी व युवक ह्यांचा हक्कासाठी संघर्ष करण्यात गेली. वयाचा १५ व्या वर्षापासून स्वतःला चळवळीत झोकून दिले असून त्यांनी चालविलेल्या संघर्षातून अनेकांना चांगले जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात वन जमीन कसनाऱ्यांचे आंदोलन चालवून हजारो शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळाली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. बांधकाम कामगारांचे संघटन बांधून त्यांना सुद्धा न्याय मिळवून दिले. प्रत्येक क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्षात राहिल्याने जिल्ह्यात त्यांना बहुमान आहे. गेल्या ६० वर्षापासून चळवळीत राहिल्याने त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले तसेच त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा करण्यात आले होते. असे हे लोकनायक कामरेड शंकरराव दानव ह्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस करीत लवकर बरे होण्याची कामना व्यक्त केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ. अजित नवले, किसन गुजर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, सिटू कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड हे सातत्याने विचारपूस करीत ते लक्ष ठेऊन आहेत. काम्रेड दानव आय सी यू मध्ये असल्याने त्यांना सर्व कार्यकर्त्यांना भेटता येऊ शकतं नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना इस्पितळात येण्यापासून थांबविण्याची सूचना करण्यात आली आहे. असे असले तरीही आशा व गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सिटु संघटनेचा अनेक कार्यकर्त्या प्रामुख्याने उषा मुरके व प्रीति करमनकर यांचे समवेत तसेच मेटिखेडा येथील पक्षाचे अनेक कार्यकर्ते चंद्रपूर कडे येत आहेत. ह्यांना फक्त आपला प्रिय काम्रेड ह्यांना पाहायचे आहे व ते लवकर बरे व्हावे अशी कामना आहे.

कॉम्रेड शंकरराव दानव यांना हृदय विकाराचा झटका, प्रकृती स्थिर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे यवतमाल जिल्यातील जेष्ठ नेते शेतकरी, शेतमजूरांचे व कामगारांचे तारणहार, शंकरराव दानव यांना आज रविवारी पहाटे हदय विकाराचा तिव्र झटका आला,असे वृत्त माध्यमातून समोर आले आहे.
त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले होते व डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशन यशस्विरीत्या पार पाडले असे त्यांचे चिरंजीव अ‍ॅड.राहुल व मुलगी सारीका यांनी माध्यमातून सांगितले व आता त्यांची प्रकृती स्थिर असुन अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणी मधे त्यांचेवर उपचार सुरु आहेत, असेही माध्यमातून म्हटलं आहे.

महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर धजावण्यास का?पडतेय मागे...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : सध्या देशी दारू, मटका, जुगार हे अवैध धंदे मागे पडले आहेत. मारेगाव तालुक्यात रस्त्याच्या कडेला मोजमाप घेऊन दुकानदारी थाटली जात असून यात अवैध 'कोल डेपो' हा नवा उद्योग सध्या कोसारा परिसरात जोमात चालू आहे. यात जिल्ह्याबाहेरील व्यावसायिकांची भागीदारी असल्याची समजते.

मागील वर्षी काही संघटना पक्षांनी तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करून उपोषण करण्याचा ईशारा देखील दिला, तसेच लोकप्रतिनिधीने तर ठाणेदार यांना तंबीच देऊन, सांगितले की मारेगाव तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करा. मात्र, एवढं होऊनही पाणी मुरतेय कुठे हेच कळायला मार्ग नसून आजतागायत कोसारा येथील ठाण मांडून असलेला कोल डेपो यावर कुठलीही कारवाई नाही. महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर कारवाई करण्यास का? मागे पडतेय...हा संशोधनाचा विषय असून तालुक्यात महापूर आलेल्या अवैध व्यवसाय का 'क्लोज' होत नाही हा चिंतनाचा विषय आहे. परंतु सगळे मूग गिळून गप्प आहे, असे चर्चील्या जात आहे.

आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या या मारेगाव तालुक्यात स्थानिक बेरोजगारांना हाताला काम नाही ही वास्तविकता आहे. मात्र आंतरजिल्ह्यातील लोकांना तालुक्यात प्रशासनाच्या नाकावर टिचून कोळशाची हेरगिरी करताहेत हे नवलच म्हणावं. 'खाकी'चा रुबाब थंडावला की काय अशी दबक्या आवाजात चर्चा असून यावर वेळीच लगाम लावला गेला नाहीतर उद्या ह्यांच्याच मुजोऱ्या वाढून परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तूर्तास मारेगाव तालुक्यातील कोल डेपो या अवैध व्यवसायाला "अच्छे दीन" आल्याची जोरदार चर्चा जनमाणसात जोर धरत आहे.

ज्योती धावंजेवार यांचे निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : रंगारीपुरा येथील ज्योती राजु धावंजेवार यांचे काल रात्री दिर्घ आजाराने रात्री 11.30 वाजता नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 57 वर्षाचे वय होते.

शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजुभाऊ धावंजेवार यांच्या त्या अर्धांगिनी होत. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांचे राहते घरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. ज्योती धावंजेवार यांच्या पाठीमागे पती, मुलगा, मुलगी, नातवंड अशा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे : उत्तम निलावाड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9.30 वाजता मारेगाव येथील तहसील कार्यालयात मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमास तहसील कार्यालयाचे कर्मचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. ते म्हणाले की, अमली पदार्थांचे व्यसन ही समाजातील मोठी समस्या आहे. व्यसनमुक्तीसाठी सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, डोल ताशासह मिरवणूक काढून ध्वजारोहण केले.

तहसील कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रजासत्ताक दीन साजरा केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व गाणी सादर केली. तहसीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व गाणी सादर केली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तहसील कार्यालयाचे कर्मचारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ व इतर मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

घरकुल लाभार्थी झिजवत आहे पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गोंड बुरांडा येथील मोदी आवास घरकुल योजनेच्या घरकुल यादीत लाभार्थ्यांची नावं असून सुद्धा वारंवार वगळण्यात येत असल्याने त्रस्त झालेले लाभार्थी, घरकुल आज मिळेल, उद्या मिळेल म्हणून..अखेर ते पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी इतर समाज बांधव बहुसंख्येने राहतात. त्यातल्या त्यात घरकुल योजनेचे लाभार्थी बहुसंख्येने सर्वसामान्य गरजू भूमिहीन असून त्या लोकांना घर राहायला नाही, त्यामुळे काही लाभार्थी आपल्या हक्काच्या घरासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारताहेत. परंतु त्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत पदाधिकारी घरकुल यादीतून डावलत असल्यामुळे ते आपली कैफियत मांडून संबंधित कार्यालयातून आल्या पावली परत जात आहे.

विशेष म्हणजे घरकुल योजनेच्या यादीत त्यांची नावं दोनदा समाविष्ट करण्यात आले,अशी गोंड बुरांडा येथील लाभार्थी प्रमोद अतकर, राजू अतकर व पंढरी दगडे ह्यानी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले. गावात राजकारण आड येत असल्याचेही ते म्हणाले. याबाबत आम्ही रीतसर अर्ज पंचायत समिती कडे मागणी साठी करण्यात आला असून संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव मनमानी कारभार करित असल्याबाबत त्यांची तक्रार आहे. त्यामुळे निकषाप्रमाणे घरकुल योजनेचा लाभ आम्हा गरजू लोकांना देण्यात यावा व चिरीमिरी करण्याऱ्यावर कडक शासन करावे अशी मागणी लाभार्थ्यांची आहे. 

वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर OBC, VJ, NT, SBC, चा एल्गार मोर्च्याच आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सरकारने OBC (VJ,NT, SBC) वी जातनिहाय
जनगणना करावी तसेच मराठा समाजाल सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व त्यांचा 'ओबीसी' मध्ये समावेश करण्यात येऊ नये या प्रमुख मागन्या व इतर 18 मागण्या घेऊन OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती, वणी-मारेगोव-झरी जि. यवतमाळ यांनी वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर "एल्गार मोर्चा" चे दि. 11 फेब्रु 2024 ला दुपारी आयोजन करण्यात आलेले आहेत.

मागिल अनेक वर्षापासून मागणी होत असलेली ओबीसीची जात‌निहाय जनगणना केंद्र व राज्य सरकारने करावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना कररावी ही मागणी जातनिहाय जनगणना कृती समिली क्रीत आहेत. परंतू आत्तापर्यंत केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. तसेच मराठा समाजाच्या दबावामुळे सरकारकडून त्यांना ओबीसीत समावेश करण्याचा घाट घातल्या जात आहे. ही बाब ओ बी सी साठी अन्याय‌कारक असून आहे. त्याचबरोबर विद्याथ्र्यांचे प्रश्न, शेतकयांचे प्रश्न, सरकारी कर्मचारी यांचे विविध प्रश्स घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीकडून सरकारविरोधात एल्गार पुकारलेल आहेत. तरी OBC (VJ, NT, SBC) बलवेव ओबीसी तील विविध जातसमूहाने आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी, समाजाच्या भवितव्यासाठी लाखोंच्या संख्खेने मोर्च्यात मुलाबाळासहित सहकुटुंब सहपरिवार,. आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सहभागी व्हावे' असे आवाहन OBC (VJ, NT SBC) ज्ञातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष, निमंत्रक यांचेसह सर्व सभासदानी केलेले आहेत, शासकीय मैदान, वणी येथुन मोच्यान प्रारंभ करून समारोव सुद्धा शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे होणार आहेत. समारोप सुद्धा शासकीय मैदानात होणार आहे त्यानंतर सदर मोर्च्याच रुपांतर सभेत होऊन त्याठिकाणी सभेला डॉ. लक्ष्मण यादव (प्रसिद्ध वक्ते तथा ओबीसी विचावंत, दिल्ली) हे संबोधित करणार आहेत. सभेनंतर शिष्टमंडळ मा उप‌विभागीय अधिकारी, वणी योना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

शासकीय मैदानावरुन प्रारंभ करून पुरुष व महिला हयानी रांगेत संपूर्ण शहरात विविध घोषणाबाजी करित शांततेत मोच्या करावा मोर्च्या दरम्यान कोणीही हूल्लडबाजी, कोणत्याही सामाजिक संघटना वे पक्षा विरुद्ध शेरोबाजी करुन मोर्च्याला गालबोट लावू नये. हा मोर्चा कोणत्याही पक्ष व समाजाविरुद्ध नसून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आहे याची सर्व OBC CVT, NT, SBC) च्या समाज‌बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन एल्गार मोर्चा'च्या आयोजकांनी केलेले आहेत.


प्रजासत्ताकदिनी सागर जाधव यांचा गौरव


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील सामाजिक क्षेत्रात 'स्माईल फाउंडेशन' ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात या संस्थेचं भरीव कार्य असून सोबतच विविध क्षेत्रांतही या संस्थेचं काम मोठं आहे.
या सगळ्या कार्याची दखल महसूल प्रशासनानं घेतली. गणराज्यदिनानिमित्त शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर देविदास जाधव यांचासह त्यांच्या चमूचा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री गणेश किंद्रे, तहसीलदार, निखिल धुरदळ, ठाणेदार, अजित जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. सोबतच पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्यात. स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिस स्टेशनला न जाता घरबसल्या मोबाईलवरून करा ऑनलाईन तक्रार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पोलिस स्टेशनमध्ये न जाताही तुम्ही तुमची फिर्याद करु शकता. यालाच ऑनलाईन तक्रार करणे म्हणतात. ऑनलाइन तक्रार कश्या प्रकारे करायची जाणून घ्या..

गुन्ह्यांचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारात केले जाते;
• अदखलपात्र गुन्हा 
• दखलपात्र गुन्हा
अदखलपात्र गुन्हा -
म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही.

दखलपात्र गुन्हा -
म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं.
आपल्याकडे अशी उदाहरणे समोर आहेत, जिथे पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे, कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो.
ऑनलाइन तक्रार कशी केली जाते?
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी राज्य पोलीस वेबसाईटवर जावे लागते आणि वेबसाईट वरील दाखवलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन तक्रारची वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा- https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx

 हरवलेल्या मोबाईलची तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा- https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/MobileMissingForm.aspx
एफआयआर नोंदवताना, गुन्हा घडलेली नेमकी जागा, नेमका हा गुन्हा कधी घडला ती नेमकी वेळ, माहिती असल्यास गुन्हेगाराचे नाव, नाव माहिती नसल्यास त्याचे अचूक वर्णन, गुन्हा घडताना आजूबाजूला कोण व किती माणसे होती, त्याचा तपशीलवार व अचूक वर्णन, हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता इत्यादी. हे तपशीलवार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र पोलीस वेबसाईट आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची ऑनलाइन पद्धतीत ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे.


प्रजासत्ताकदिनी विस्तार अधिकारी सुधाकर जाधव यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातून मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये सर्व बीएलओ (केंद्स्तरीय मतदार नोंदणी अधिकारी) यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी ८ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले होते, उत्कृष्ट मतदार नोंदणी पर्यवेक्षक म्हणून श्री सुधाकर जाधव विस्तार अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री जाधव यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत प्रशासनाने २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी वणी येथील शासकीय मैदानात झालेल्या कार्यक्रमात, उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार यांचे हस्ते व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री गणेश किंद्रे, तहसीलदार, निखिल धुरदळ, ठाणेदार, अजित जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तार अधिकारी सुधाकर जाधव (पं स मारेगाव) यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.


प्रजासत्ताक दिन विशेष; जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास....!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आज आपण स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास
भारत स्वतंत्र झाल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आली. याच दिवशी भारत प्रजासत्ताक असल्याची घोषणा करण्यात आली. १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यामुळे याच दिवशी संविधान स्वीकारण्यात आले.
सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एका बैठकीचे आयोजन केले होते. यात ब्रिटिशांनी २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी करण्यात आला. या दिवशी सर्वात पहिलं भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिति तयार करण्यात आली. यात ३०८ सदस्य होते. हा मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ.भारतरत्न बाबासाहेब यांनी तयार केला. यात अनेक सुधारणा आणि बदल केल्यावर समितीच्या सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी ही घटना सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. यानंतर १० वाजून २४ मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 
या दिवशी, डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दिवशी, तिरंगा फडकावण्याबरोबरच, राष्ट्रगीत गाणे आणि भव्य लष्करी संचलन देखील केले जाते.

उद्या मारेगावकर घेणार "वळण"


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : उद्या 27 जानेवारी ते 2 फेब्रु. दरम्यान परसोडा येथे भव्य शिवपुराण कथा होत आहे. त्या अनुषंगाने सात दिवसाच्या प्रवचनाला मोठ्या संख्येने भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी गर्दी होणार आहे. याकरिता कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग म्हणून उद्या मारेगाव ते वणी हा महामार्ग बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी, गृहविभागाने काढला आहे.
त्यामुळे उद्यापासून सात दिवस मारेगावकर मार्डी, नांदेपेरा, वणी असे वळण घेणार आहे. परंतु वणी-यवतमाळ मार्गांवरील असलेले राजूर, निंबाळा, भांदेवाडा, बोदाड, झरपट, सोमनाळा व कळमना ह्या गावांना त्रास होणार आहे ह्या करीता संबंधित गावांचा रहिवासियांकडून वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहेत. तर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी वणीला आलेले एडी. एस पी जगताप साहेब ह्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती. दरम्यान, जगताप साहेबांनी सर्वतोपरी पोलीस विभाग सहकार्य करेल मार्ग संबंधित बाधित गावांना मोकळा करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
मात्र, वणी ते मारेगाव हा महामार्ग बंद करण्यात येणार असल्यामुळे कोणत्याही वाहनांची येरजाऱ्या होणार नसल्याने शेतकरी, शेतमजूर, रोज मजुरी करणारे, ऑटो वाहक, शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, चुना उत्पादन, चुना उद्योगातील शेकडो कामगार रोजमजुर, गावात किराणा व अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होईल व येथील किराणा व अन्य व्यवसाय बंद राहतील व त्यामुळे चालत्या फिरत्या उद्योग,धंद्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे. 
तसेच मारेगाव येथून वळण घेतल्यावर मार्डी, नांदेपेरा, वणी या मार्गाचा अधिक चा ताण वाढणार आहे. आधीच जड वाहतुकीस बंद असलेला हा रस्ता. आता भरधाव वाहने धावताना दिसणार किंबहुना अपघाताची शक्यता बळावणार, या पूर्वी नांदेपेरा मार्गाने कोळसाची जड वाहतूक करणारी ट्रक वाढली होती, तेव्हा या मार्गांवर नाहक जीव लोकांना गमवावा लागला. आताही तीच परिस्थिती मार्डी नांदेपेरा वणी या वळणावर उद्भवल्यास पुन्हा अपघाताची शृंखला चालणार तर नाही,असे भीतीदायक बोलल्या जात आहे. 
वरील ह्या महत्त्वाचा मुद्दा व प्रश्न संबंधित विभागाने लक्षात घेऊन हा वणी यवतमाळ महामार्ग पूर्ववत सुरु ठेवावा अशी सर्व सामान्यांना वाटत आहे किंबहुना बंद करू नये अशी अपेक्षा असून एडी एस पी जगताप साहेबांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जनतेला दिलेले आश्वासन कितपत प्रत्यक्षात दिसते याकडे मारेगाव वणी महामार्गांवरील दैनंदिन वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे लागले आहे.


सर्व देश वाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


या विशेष दिवशी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर आत्म्यांचे स्मरण करूया आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करूया. आपल्या शूरवीरांनी आपल्या भविष्यासाठी काय केले हे लक्षात घेऊन त्यांचे स्मरण करत त्यांचा वारसाहक्क जपात पुढे न्यायला हवा. आपल्या पुढच्या पिढीला याची जाणीव करण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक दीन निमित्त  शुभेच्छा...

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!