सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (३० जुलै) : जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून, अतिवृष्टीने ग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशा आशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेऊन जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात गत कांही दिवसात संततधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेले असून, जनता हवालदिल बनली आहे. खरीपाची बहुतांश पिके वाहून गेली असून अनेक घरांचीही पडझड झालेली आहे तसेच,अनेक बाबींतून शेतकरी, जनता त्रस्त बनली आहे.
या अतिवृष्टी ग्रस्त भागांची स्थळ पाहणी पंचनामे करून सरसकट नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश या सामाजिक संघटनेच्या वतीने आगामी काळात तिव्र जनआंदोलन सुरु करू असा ईशाराही निवेदनातून जिल्हाध्यक्षा स्वामी यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा सचिव सुप्रिया कल्याणकर,संगीता झिंझाडे आदीं कार्यकर्त्यांची उपस्थित होती.