मारेगाव : सततच्या नापिकीमुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. शेतातून निघालेला माल बाजारपेठेत विक्रीला नेल्यास भाव मिळत नाही. पेरणीच्या काळात बँकांकडून पीककर्जासाठी नकारघंटा वाजविली जात आहे. चोहोबाजूने आर्थिक कोंडी होत असल्याने जगावं की मरावं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत आहे. एकीकडे पेरणीची लगबग सुरू असताना दुसरीकडे पेरणीच्या काळातही शेतकरी असो की शेतकरीपुत्र, मृत्यू चा फास आवळताहेत.
पत्नी, मुलांना सोबत घेऊन शेतकरी राबराब राबतो. मात्र, त्याच्या हाती कर्जबाजारीपणाशिवाय काहीच येत नाही. मागील वर्षाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाची निसर्गाने माती केली. शेतातून निघालेला माल मिळेल त्या भावात शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
आतापर्यंत तालुक्यात निम्म्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. हातात पैसाच नसल्याने बियाणे, खते आणायचं कुठून अशी परिस्थिती आहे. अशीच काहीशी परिस्थिती केगांव येथील शेतकरी पुत्राची होऊन त्याने शुक्रवारच्या रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांचे वय थकल्याने हा तरुण आपल्या वडिलांच्या शेतात राबत होता. मात्र, सतत च्या नापिकी आणि कर्जबाजारीने पुरता हतबल झाला असता काय करावे, असं चित्र डोळ्यात खेळत,त्याने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवले. त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं व त्यानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हनुमान प्रभाकर मेश्राम (27) रा. केगांव असे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचं नाव असून शनिवारी दिनांक 29 जून रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्याच्या पश्चात आई-वडील,एक भाऊ व एक विवाहित बहीण असा बराच मोठा परिवार आहे. घरातील हनुमान हा कर्ताधर्ता असून त्याच्या अकाली निघून जाण्याने मेश्राम परिवारावर मोठं दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर गावात हळहळ व्यक्त होत आहे.