रोजगार देत नसाल तर आत्मदहनाची परवानगी तरी द्या!


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२९ ऑगस्ट) : मुकुटबन व परिसरातील सुशिक्षीत बेरोजगार व प्रकल्पग्रस्त तरुणांनी इस्पात कोळसा खान व सिमेंट कंपनीत रोजगार मिळावे याकरिता 3 दिवस उपोषण केले होते. कंपनीच्या लेखी आस्वासन नंतर उपोषण मागे घेण्यात आले. लेखी आस्वासनात इस्पात कोळसा कंपनीने १५ ऑगस्ट पूर्वी २०, सप्टेंबर मध्ये १० व ऑक्टोबर मध्ये १० असे एकूण ४० तरुणांना नौकरीवर घेण्याचे लेखी आस्वासन दिले. २२ दिवस लोटूनही कंपनीने एकाही तरुणाला नौकरिवर न घेता तीन ग्रामपंचायत कडून इतर तरुणांची यादी घेऊन उपोषणकर्ते व नवीन यादितील तरुणांमध्ये झगडे लावण्याचा प्रकार चालू आहे. उपोषणकर्ते तरुण गेल्या २० दिवसांपासून पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या चकरा मारून थकले परंतु कंपनी काहीच बोलण्यास तयार नाही. खाजगी कंपनीचे अधिकारी व राजकीय दडपणामुळे तरुणांना नौकरी वर घेत नसल्याने बेरोजगार तरुण हतबल झाले व अखेर तरुणांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याची परवानगी मागितली.
बेरोजगार तरुण कंपनीतील अधिकारी यांच्याशी नौकरी बाबत विचारणा केल्यास उडवाउडवीचे व धमकविण्याची भाषा बोलत असल्याचा तरुणांचा आरोप आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणात कंपनीबाबत प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.

राजकीय पुढारी व कंपनी यांच्या राजकारणात  बेरोजगारांच्या रोजीरोटी वर घाला घातला जात आहे. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार आज १२ वाजता मुकुटबन आले व तरुणांना घेऊन इस्पात कोळसा खानच्या मुख्य गेटवर पोहचले व कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याकरिता मॅनेजर यांना बोलविण्यास सांगितले. कंपनीचे अधिकारी नसल्याचे सांगण्यात येताच पवार प्रचंड संतापले व आम्हाला ११ वाजता भेटण्याचे सांगीतल्यानंतर इथे हजर का नाही? असा संतप्त प्रश्न केला.
 
त्यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून बोलणे झाल्यानंतर तसेच १ सप्टेंबर पासून बेरोजगार मुलांची ट्रायल घेऊन नौकरी वर लावण्याच्या आस्वासनानंतर सर्व तरुण परतले. १ सप्टेंबरला मुलांना नौकरी वर न घेतल्यास सर्व तरुण तारीख ठरवून तहसील कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार रामगुंडे व मुकुटबन पो.स्टे.चे ठाणेदार अजित जाधव यांना देण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, अनिल मुजगुले, आझाद उदकवार, उमेश पोतराजे, अनुप धगडी, जयंत उदकवार, प्रदीप वैद्य, गजानन नगराळे, गजानन वासाडे, पंढरी पेटकर, राजू धोटे, गजानन आडे सह शेकडो तरुण उपस्थित होते. कंपनीच्या मुख्य द्वारावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणेदार अजित जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, गणेश मारे हजर होते.

"अच्छे दिन आणु म्हणणाऱ्यांनीच अच्छे दिन संपविले" - कॉम्रेड दानव


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मेटीखेडा, (२८ ऑगस्ट) : अच्छेदिन आणणार म्ह्णून सत्तेवर बसलेल्या मोदी सरकार ने शेतकरी विरोधी कृषी कायदा आणला, कामगारांना चांगले जीवन व सुविधा देणारे कायदे संपवून भांडवलदारांना फायदे पोहोचविणारे कायदे करून कामगारांना देशोधडीला लावले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रचंड प्रयत्न करून निर्माण केलेले सार्वजनिक उद्योगक्षेत्राचे खाजगीकरण करूनच नाहीतर ते भांडवलदारांना विकून देशाला कंगाल करणे सुरू केले, हे सर्व अच्छे दिन संपविणे होय, म्हणून अच्छे दिन परत मिळविण्यासाठी हे सरकार जाणे आवश्यक आहे, तसेच शेतकरी-कामगारांना आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी सतत संघर्ष करण्याची गरज आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात संघर्ष करीत आहे, असे प्रतिपादन माकप चे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. शंकरराव दानव यांनी मेटीखेडा येथे माकपच्या कळंब तालुका अधिवेशनातील प्रतिनिधींसमोर केले.
या कळंब तालुका अधिवेशनात जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनीही मार्गदर्शन केले.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनात तीन वर्षांच्या लेखाजोखा होऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. तेरा सदस्यीय तालुका कार्यकारिणीत पालोती गावाचे सरपंच कॉ. सदाशिव आत्राम यांची कळंब तालुका सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या नवीन कार्यकारिणीत देविदास आत्राम, सुदाम टेकाम, शेवंताबाई टेकाम, शामराव जाधव, मारोती जाधव, सुलाभ पवार, अशोक पवार, मनोहर बुरबुरे, पुरुषोत्तम पाटील, शंकर अंबाडरे , मारोती शेरबंदी, लक्ष्मीबाई मेश्राम यांच्या समावेश आहे.

जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा वनमाला ताईंच्या संकल्पनेतून वृक्षारोपण संपन्न

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२८ ऑगस्ट) : दरवर्षी आमणी या गावात, शालेय परिसरात यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वनमालाताई आवडीने वृक्षारोपण करत असतात. आजपण सहज मोजता न येण्याऐवढी झाडे आमणी या गावी बघायला मिळतात. ताईंचा नवनवीन झाडे लावण्याचा उत्साह व त्यात शालेय कर्मचाऱ्यांचा सदैव मिळणारा मदतपूर्ण सहभाग ह्यामुळे आमणी गावचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलत जात. आज दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी ग्राम आमणी ते महागाव रोड ला व एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

येणाऱ्या पिढीस मुबलक ऑक्सिजन, फुल,फळ, व वाटसरुंसाठी थंडगार सावली मिळावी ह्या उद्देशातून वनमालाताई राठोड यांचे मार्गदर्शनाने व त्यांचे हस्ते रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. कडुनिंब, करंज, चिंच, वड, बेहडा, बहावा, गुलमोहर ई. प्रकारच्या झाडांची रोपे लावण्यात आली.

वृक्षारोपण हे आमणी (बु) गावच्या सरपंच सौ.सुनीता सुनील राठोड, उपसरपंच श्री.संतोष राऊत, ग्रा.प सदस्य श्री.गोविंद राठोड, सौ.आशा वानखेडे, सौ.स्मिता जाधव, पंजाब कांबळे, शंकर चव्हाण य.जि.काँ.क सरचिटणीस सुनीलभाऊ राठोड, वैद्य.अ. रामराव पवार, सौ.जयमाला पवार, वनाधिकारी राठोड साहेब, गोहाडेजी, इंजि. गोपाल पवार, पांडू राऊत, समाधान जाधव, प्राथ.आ.शाळेचे मुख्याध्यापक राजू कावडे, मु'अ. जय वानखेडे, गोर अध्यक्ष बाळू राठोड, रुपेश सुरोशे, के. के.राठोड, प्रा. विनोद राठोड, अमोल पवार, इंदल पवार, अविनाश राठोड, अविनाश खंदारे, दिलीप राठोड, विवेक जाधव ह्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सन २०१८ च्या शासन निर्णयाची २०२१ मध्ये प्रसिध्दी; ओमप्रकाश भवरे यांच्या आंदोलनाला यश

सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
कळंब, २८ ऑगस्ट) : महाभारतातील कुंभकर्ण हा फक्त वर्षेतुन सहा महिने झोपत होता. परंतु कळंब नगरपंचायत प्रशासनाने चक्क! जवळपास तीन वर्षे झोप घेवून घेऊन कुंभकर्णाचे झोपेचे रेकॉर्ड तोडल्याचा प्रत्यय कळंब शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून कच्चे घर बांधून राहत असलेल्या नागरिकांना आला.
    
सविस्तर वृत्त असे की, कळंब शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून कच्चे घर बांधून ४० वर्षे अगोदर पासून राहत असलेल्या गरीबांना विद्यमान महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र. एमयुएन-२०१८प्र.क्र.१९७/नवि-१८ दि.१७ नोव्हे.२०१८ रोजी "सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी शासन निर्णय घेतला. त्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी बैठक घेऊन नगरपंचायत प्रशासनाला पत्र क्र./अका राजस्व-६/कावि २२४५/२०१८ दि.२२ नोव्हेंबर २०१८ व पत्र क्र./अका राजस्व-६ कावि २२९१/२०१८ दि.०१ डीसेंबर २०१८ रोजी पत्र देण्यात आली. व याच पत्राचे अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने क्र./नपंक/जाहीरनामा.वि./२०१८ दि.०७/०१/२०१८ रोजीचे दै.देशौन्नती मध्ये जाहीर सुचना देवून दि.०१/०१/२०११ किंवा त्यापुर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आलेले प्लाॅटची भुमी अभिलेख कार्यालयाकडून विनामूल्य मोजणी करून नियमानुकुल करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु सदर सुचना सामान्य जनतेच्या कानापर्यंत गेली नसल्यामुळे नगरपंचायतला एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे कळंब शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून कच्चे घर बांधून राहत असलेल्या लोकांचे पक्या घराचे स्वप्न पूर्ण अधूरे राहणार होते. परंतु सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश भवरे यांनी १५ आगस्टपासुन आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याची नोटीस देताच कुंभकर्ण झोपेत असलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जाग आली. व १५ आगस्ट २०२१ पासुन कचरा गाडीवरील लाऊडस्पिकर व्दारे महाराष्ट्र सन २०१८ चे निर्णयाचा संदर्भ देवुन, कळंब शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून कच्चे घर बांधून राहत असलेल्या नागरिकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे कळंब शहरातील शासकीय भूखंडावरील अतिक्रमण नियमानुकुल होवून त्यांचे पक्के घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे आशेचे किरण दिसत असल्याची प्रतिक्रिया ओमप्रकाश भवरे यांनी आमचे प्रतिनिधी जवळ व्यक्त केली. परंतु लवकरच कळंब शहरातील शासकीय जागेवर कच्चे घर बांधून राहत असलेल्या अतिक्रमणधारकांचे वतीने नगरपंचायत प्रशासनाचे विरोधात शासन निर्णयाची पायमल्ली करून कळंब शहरातील बेघर लोकांना वंचित ठेवण्यात आल्या बाबत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करणार या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

दैनंदिन व आठवडी बाजार त्वरीत सुरु करा- राजु झोडेंची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८ ऑगस्ट) : भाजीपाला पिकवणांऱ्या शेतकऱ्यांनी आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कचेरीसमोर भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश आज शनिवारी व्यक्त केला. 
     
कोरोनाच्या काळात मागील वर्षीपासून बाजारपेठा व आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला पिकवणांऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकर्‍यांनी पिकवणांऱ्या मालाला योग्य हमीभाव व आठवडी व दैनंदिन बाजारपेठ बंद असल्याने प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकारने मोठमोठे मॉल, दारूची दुकाने व इतर व्यवसाय सुरू करण्याची सूट दिली असताना आठवडी बाजार तसेच दैनंदिन बाजार अजूनही बंद ठेवलेले आहेत. सरकार व प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे पिकवलेल्या शेतमालाला विकायचे कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरू असता तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भावु मिळून चार पैसे मिळाले असते. शेतकरी मोठ्या कष्टाने भाजीपाला पिकवित आहे. परंतु आठवडी बाजार व दैनंदिन बाजार बंद असल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागत आहे. हे खरे वास्तव आहे. सरकार व प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. यावर सरकारने तात्काळ लक्ष देऊन भाजीपाला विकणांऱ्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी व त्यांच्या मालाला योग्य व रास्त भाव मिळण्याकरिता आठवडी बाजार व दैनंदिन बाजार तात्काळ सुरू करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.

शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने केराची टोपली दाखवली तर या विरोधात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कचेरीवर शेतकऱ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार असा इशारा राजूभाऊ झोडे यांनी प्रशासनाला एका प्रसिध्द पत्रकातुन दिला आहे .