रोजगार देत नसाल तर आत्मदहनाची परवानगी तरी द्या!


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२९ ऑगस्ट) : मुकुटबन व परिसरातील सुशिक्षीत बेरोजगार व प्रकल्पग्रस्त तरुणांनी इस्पात कोळसा खान व सिमेंट कंपनीत रोजगार मिळावे याकरिता 3 दिवस उपोषण केले होते. कंपनीच्या लेखी आस्वासन नंतर उपोषण मागे घेण्यात आले. लेखी आस्वासनात इस्पात कोळसा कंपनीने १५ ऑगस्ट पूर्वी २०, सप्टेंबर मध्ये १० व ऑक्टोबर मध्ये १० असे एकूण ४० तरुणांना नौकरीवर घेण्याचे लेखी आस्वासन दिले. २२ दिवस लोटूनही कंपनीने एकाही तरुणाला नौकरिवर न घेता तीन ग्रामपंचायत कडून इतर तरुणांची यादी घेऊन उपोषणकर्ते व नवीन यादितील तरुणांमध्ये झगडे लावण्याचा प्रकार चालू आहे. उपोषणकर्ते तरुण गेल्या २० दिवसांपासून पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या चकरा मारून थकले परंतु कंपनी काहीच बोलण्यास तयार नाही. खाजगी कंपनीचे अधिकारी व राजकीय दडपणामुळे तरुणांना नौकरी वर घेत नसल्याने बेरोजगार तरुण हतबल झाले व अखेर तरुणांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याची परवानगी मागितली.
बेरोजगार तरुण कंपनीतील अधिकारी यांच्याशी नौकरी बाबत विचारणा केल्यास उडवाउडवीचे व धमकविण्याची भाषा बोलत असल्याचा तरुणांचा आरोप आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणात कंपनीबाबत प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.

राजकीय पुढारी व कंपनी यांच्या राजकारणात  बेरोजगारांच्या रोजीरोटी वर घाला घातला जात आहे. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार आज १२ वाजता मुकुटबन आले व तरुणांना घेऊन इस्पात कोळसा खानच्या मुख्य गेटवर पोहचले व कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याकरिता मॅनेजर यांना बोलविण्यास सांगितले. कंपनीचे अधिकारी नसल्याचे सांगण्यात येताच पवार प्रचंड संतापले व आम्हाला ११ वाजता भेटण्याचे सांगीतल्यानंतर इथे हजर का नाही? असा संतप्त प्रश्न केला.
 
त्यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून बोलणे झाल्यानंतर तसेच १ सप्टेंबर पासून बेरोजगार मुलांची ट्रायल घेऊन नौकरी वर लावण्याच्या आस्वासनानंतर सर्व तरुण परतले. १ सप्टेंबरला मुलांना नौकरी वर न घेतल्यास सर्व तरुण तारीख ठरवून तहसील कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार रामगुंडे व मुकुटबन पो.स्टे.चे ठाणेदार अजित जाधव यांना देण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, अनिल मुजगुले, आझाद उदकवार, उमेश पोतराजे, अनुप धगडी, जयंत उदकवार, प्रदीप वैद्य, गजानन नगराळे, गजानन वासाडे, पंढरी पेटकर, राजू धोटे, गजानन आडे सह शेकडो तरुण उपस्थित होते. कंपनीच्या मुख्य द्वारावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणेदार अजित जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, गणेश मारे हजर होते.