सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मेटीखेडा, (२८ ऑगस्ट) : अच्छेदिन आणणार म्ह्णून सत्तेवर बसलेल्या मोदी सरकार ने शेतकरी विरोधी कृषी कायदा आणला, कामगारांना चांगले जीवन व सुविधा देणारे कायदे संपवून भांडवलदारांना फायदे पोहोचविणारे कायदे करून कामगारांना देशोधडीला लावले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रचंड प्रयत्न करून निर्माण केलेले सार्वजनिक उद्योगक्षेत्राचे खाजगीकरण करूनच नाहीतर ते भांडवलदारांना विकून देशाला कंगाल करणे सुरू केले, हे सर्व अच्छे दिन संपविणे होय, म्हणून अच्छे दिन परत मिळविण्यासाठी हे सरकार जाणे आवश्यक आहे, तसेच शेतकरी-कामगारांना आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी सतत संघर्ष करण्याची गरज आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात संघर्ष करीत आहे, असे प्रतिपादन माकप चे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. शंकरराव दानव यांनी मेटीखेडा येथे माकपच्या कळंब तालुका अधिवेशनातील प्रतिनिधींसमोर केले.
या कळंब तालुका अधिवेशनात जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनीही मार्गदर्शन केले.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनात तीन वर्षांच्या लेखाजोखा होऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. तेरा सदस्यीय तालुका कार्यकारिणीत पालोती गावाचे सरपंच कॉ. सदाशिव आत्राम यांची कळंब तालुका सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या नवीन कार्यकारिणीत देविदास आत्राम, सुदाम टेकाम, शेवंताबाई टेकाम, शामराव जाधव, मारोती जाधव, सुलाभ पवार, अशोक पवार, मनोहर बुरबुरे, पुरुषोत्तम पाटील, शंकर अंबाडरे , मारोती शेरबंदी, लक्ष्मीबाई मेश्राम यांच्या समावेश आहे.