अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

मारेगाव : सतत कोसळणाऱ्या पावसाने मारेगाव तालुक्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाचवेळी नदीपत्रात आल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले. यातून गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर ग्रस्ताना नुकसान भरपाई, हेक्टरी 50 हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना वेगळा मोबदला व कर्जाचे नव्याने पुनर्गठन व तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी आज अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 
मारेगाव तालुक्यातील सध्याची पूर परिस्थिती व दुष्काळ परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाचवेळी नदीपत्रात आल्याने परिसरातील शेतामध्ये वर्धा नदीचे पाणी शिरले. हे पुराचे पाणी गावात शिरू लागल्याने नागरिकांची चांगलीच दणादाण उडाली. मागील विस दिवसापासून सतत पाऊस सुरु असल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जवळजवळ 14 गावांना पुराचा फटका बसला, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. लाखों रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत वेगळं पॅकेज जाहीर करून झालेल्या नुकसानीचा सर्वे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व मारेगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा तसेच तालुक्यातील ज्या पूर ग्रस्तांच्या जमिनी खरडून नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना पिक कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने पिक पेरणी करिता कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. 
तालुक्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना करण्यात आली आहे.
या वेळेस सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शंकर जावदे, माला रामकृष्ण गौरकार, गोवर्धन तोडासे, मारोती तुराणकर, सुजित डुकरे, सुरेश लांडे, प्रवीण बोथले, प्रवीण नाभे, विनोद आत्राम, दयानंद कुडमेथे आदी शेतकरी उपस्थित होते.