कोरपना तालुक्यातील गडचांदूर जवळील बुद्धभूमीला पर्यटनाचा दर्जा द्यावा, रिपाईच्या कोरपना तालुकाध्यक्षानी केली मागणी !

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
चंद्रपूर, (३ जुलै) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर लगत असलेल्या बुद्धभूमीला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन विकसित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोरपना तालुकाध्यक्ष शिलाताई गौतम धोटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

कोरपना हा आदिवासीबहुल तालुका असून नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. गडचांदूर नजीक असलेली बुद्धभूमी नसर्गिक सौंदर्याने वेढलेली असून या ठिकाणी पुरातन काळातील कोरीव बुद्ध मूर्ती व बुद्ध विहारे आहेत. विस्तृत अशा निसर्गरम्य परिसरात असलेली बुद्धभूमी पर्यटकांसाठी व बौद्ध अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यामुळे बुद्धभूमीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी मागील विस वर्षांपासून बौद्ध अनुयायी करीत आहे. पण याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नसल्याने बुद्ध भूमीचा विकास झाला नसून याठिकाणी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. 

कोरपना तालुक्यातील गडचांदूर नजीक निसर्गाच्या सानिध्यात बुद्धभूमी वसलेली आहे. अमनाला सिंचन प्रकल्पाच्या अगदी शेजारीच ही बुद्धभूमी असल्याने असंख्य पर्यटक व बौद्ध अनुयायी बाराही महिने याठिकाणी येत असतात. परंतु याठिकाणी सोई सुविधांचा मोठा अभाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला भेटी देणाऱ्यांची असुविधा होते. बुद्धभूमीत प्राचीन बुद्ध मूर्ती, बुद्ध विहारे व कोरीव अशोक चक्र आहे. अप्रतिम कोरीव काम याठिकाणी पाहायला मिळते. बुद्ध कालखंडाशी निगडित रेखाटनही येथे दिसून येते. निसर्गाच्या सानिध्यात ही बुद्धभूमी असल्याने ती विकसित झाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळू शकतो. बुद्धभूमीला नैसर्गिक सौदर्य तर लाभलच आहे, त्यातच बुद्धभूमीच्या आंतर बाह्य भागाचे सौंदर्यीकरण करून सोई सुविधा उपलब्ध करून दिल्यास याठिकाणी येणाऱ्यांची संख्या आणखीच वाढेल.

मागील कित्येक दिवसांपासून बुद्धभूमीच्या सौंदर्यीकरणाची मागणी होत आहे. पण लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करून अनुयायांची मने दुखवीत आहे. आंध्रप्रदेश, केरळ येथील पर्यटक मोठ्या संख्येने बुद्धभूमीला भेटी देतात. तसेच चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ येथील पर्यटक व बौद्ध अनुयायी बुद्ध भूमीतील बौद्ध वास्तू बघण्याकरिता नेहमी येत असतात. प्राचीन कला कुसरींनी उत्कृष्ट सजावट केलेली बुद्ध विहारे व निसर्गाने नटलेला परिसर पर्यटकांना आकर्षित तर करतोच, पण पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास बुद्ध सांकेतिक स्थळ म्हणून संपूर्ण देशात ही बुद्धभूमी नावारूपास येऊ शकते. त्याकरिता या बुद्धभूमीचा विकास करून बुद्धभूमीला पर्यटनाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.

बुद्धभुमीचं आंतर बाह्य सौंदर्यीकरण करून याठिकाणी सर्व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात येत आहे. बुद्धभूमीत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजी माजी लोकप्रतिनिधींनी बुद्धभूमी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बुद्धभूमीचा पर्यटनस्थळ म्हणून त्वरित विकास न केल्यास रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रिपाई च्या कोरपना तालुका अध्यक्षा शिलाताई धोटे यांनी दिला आहे.