शेवटी कर्जमाफी शेतकऱ्यांना काँग्रेसनेच दिली - आशिष खुलसंगे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले असून येत्या 9 ऑगस्ट पासून यात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत वसंत जिनिंग चे अध्यक्ष तथा झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी दिली. 

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, महिला शहर अध्यक्ष शामा तोटावार, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, अशोक पांडे, राहुल दांडेकर, अंकुश माफूर, प्रा,शैलेश आत्राम हे उपस्थित होते. 
आंदोलन, मोर्चा, उपोषण निवेदने देतात परंतु शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशाच येत असताना या यात्रेतून काय साध्य होईल, या प्रश्नांनावर उत्तर देताना अध्यक्ष श्री.खुलसंगे म्हणाले की, वणी विधानसभा क्षेत्रात दिवसागणिक शेतकरी आत्महत्या वाढत आहे आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत असल्याने त्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी काँग्रेस तर्फे 'शेतकरी न्याय यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी काँग्रेसनेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, ते आजपर्यंत कोणीही देवू शकले नाही. 
पुढे बोलताना ते त्यांनी सांगितलं की, "शेतकरी न्याय यात्रा" ही 9 ऑगस्ट ला आरंभ होत असून ही यात्रा वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर, महिला, युवक यांच्याशी संवाद साधणार असून शेतकरी तसेच सर्व सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेणार आणि त्या शासन दरबारी उचलून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ह्या यात्रेद्वारे केला जाणार आहे. खा.प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार असून प्रथम मारेगाव तालुक्यातून वनोजा देवी येथील जनामाय कासामाय मंदिर येथून सुरुवात होणार होऊन ही यात्रा झरी तालुक्यात प्रस्थान करेल नंतर वणी तालुक्यात दाखल होत ह्या यात्रेचा समारोप होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

आदिवासींनी अस्तित्व आणि अस्मितेचे राजकारण करण्यासाठी पुढे यावे- बाबारावजी मडावी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : आदिवासींचे संविधानावरील आरक्षणाची बोगस लुटमार करीत असुनही विविध पक्ष आदिवासीवर होणारा अन्याय दुर करण्यासाठी पुढे येतांना दिसत नाहीत. आदिवासीचे शोषण आणि त्यांचेवर लादलेली गुलामी आदिवासींना त्यांचे हक्क आणि विकासापासुन वंचीत करणारी आहे.अश्या अवस्थेत सर्व आदिवासींनी आपल्या अस्तित्वाच्या राजकारणाचे झेंडे ऊभारावे. 
आदिवासी अनेक गटातटात,वेगवेगळ्या संघटनेत, पक्षात आणि जमातवादात विभागल्या जात असुन आदिवासीची विभागणी प्रगतीच्या आड येत आहे. अश्या अवस्थेत आदिवासींनी संघटीत होवुन आपल्या अस्तित्वाच्या राजकारणाची सुरवात करावी. लोकशाहीत जागे झालेली माणसेच शाबुत राहू शकतात, याचे भान ठेवुन आदिवासींनी अस्तित्व तथा अस्मितेचे राजकारण करण्यास सज्ज व्हावे,असे आवाहन आदिवासी साहित्यिक वर प्रगतशील विचारवंत बाबारावजी मडावी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : इमारतीचे पेंटिंगचे काम करत असताना तोल जाऊन वरून खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना 25 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. 
बंडू तुकाराम खोब्रागडे (वय 50) रा. रंगारीपुरा असे या रंग रंगोटी काम करणाऱ्या कामगाराचे नाव असून या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बंडू हे शहरातील छोरीया ले-आऊट मधील इमारतीला रंगरंगोटी चे काम करत असतांना त्याचा बॅलन्स डगमगल्याने ते इमारतीच्या तिसऱ्या मजल्यारून चक्क! खाली आदळले. यात बंडू खोब्रागडे याला जबर मार लागून डोक्याला गंभीर दुखापत झाली,त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान,त्याच्या कामगार सहकाऱ्यानी त्याला ताबडतोब वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर बंडू खोब्रागडे यांच्या परिवाराला ही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविला. 



माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, ब्रिगेडीअर सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी माजी सैनिकांच्या विविध विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला. खारघर येथे माजी सैनिकांसाठी विश्रामगृह, मेस्को महामंडळामार्फत होणारे उपक्रम, माजी सैनिकांचे वेतन, मुंबईमध्ये संग्रहालय उभारणे, सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गावाला विशेष दर्जा देऊन तेथे विकासकामे करणे, माजी सैनिकांना टोल मध्ये सवलत आदी विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली.

सैनिकांनी देशासाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर कर्तव्य बजावले आहे. अशा माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाच्या सचिवांना दिले. माजी सैनिकांच्या विश्रामगृहाला सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथे जागा देण्यात आली आहे. तेथे विश्रामगृहाच्या कामाला तातडीने सुरूवात करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव सकारात्मक असून त्यासाठी विभागाने माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

चिमुरड्या सह वडीलाला विषारी सापाचा दंश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील शास्त्री नगर येथील गाढ झोपेत असलेल्या बाप-लेका'ला विषारी सापाने दंश केल्याची घटना दि. 24 जुलैच्या पहाटे 2 च्या दरम्यान घडली, यात एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. तर वडीलावर उपचार सुरू आहे. दक्षित सुमित नेलावार असे,मृत पावलेल्या बालकाचे नाव असून वडीलांची प्रकृती चिंताजनक आहे.
     
प्राप्त माहितीनुसार शास्त्री नगर मोक्षधाम जवळील परिसरात राहत असलेले नेलावार परिवार 24 जुलैला गाढ झोपेत असताना पहाटे 2 वाजताच्या दरम्यान, वडील सुमित नेलावार (अंदाजे वय ३५), मुलगा दक्षित सुमित नेलावार (अंदाजे वय 1 वर्ष) यांच्यासह दक्षितची आई व बहीण हे आपल्या घरातच झोपलेले होते. यादरम्यान वडील सुमित आणि एक वर्षाचा दक्षित च्या अंथरुणात विषारी साप शिरून त्या दोघांना दंश केल्याने चिमुरडा रडू लागला अन वडीलासह संपूर्ण परिवाराला जाग आली. 
    
त्याच वेळी वडील सुमित व चिमुरड्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. दरम्यान त्यांना तातडीने वणीतील रुग्णालयात दाखल केले गेले,परंतु त्या दोघांनाही चंद्रपुर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, चिमुरड्याचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन, वडील सुमित नेलावार यांचीही प्रकृती चिंताजनक असुन त्यांचेवर चंद्रपुर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.