शेवटी कर्जमाफी शेतकऱ्यांना काँग्रेसनेच दिली - आशिष खुलसंगे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले असून येत्या 9 ऑगस्ट पासून यात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत वसंत जिनिंग चे अध्यक्ष तथा झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी दिली. 

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, महिला शहर अध्यक्ष शामा तोटावार, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, अशोक पांडे, राहुल दांडेकर, अंकुश माफूर, प्रा,शैलेश आत्राम हे उपस्थित होते. 
आंदोलन, मोर्चा, उपोषण निवेदने देतात परंतु शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशाच येत असताना या यात्रेतून काय साध्य होईल, या प्रश्नांनावर उत्तर देताना अध्यक्ष श्री.खुलसंगे म्हणाले की, वणी विधानसभा क्षेत्रात दिवसागणिक शेतकरी आत्महत्या वाढत आहे आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत असल्याने त्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी काँग्रेस तर्फे 'शेतकरी न्याय यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी काँग्रेसनेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, ते आजपर्यंत कोणीही देवू शकले नाही. 
पुढे बोलताना ते त्यांनी सांगितलं की, "शेतकरी न्याय यात्रा" ही 9 ऑगस्ट ला आरंभ होत असून ही यात्रा वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर, महिला, युवक यांच्याशी संवाद साधणार असून शेतकरी तसेच सर्व सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेणार आणि त्या शासन दरबारी उचलून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ह्या यात्रेद्वारे केला जाणार आहे. खा.प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार असून प्रथम मारेगाव तालुक्यातून वनोजा देवी येथील जनामाय कासामाय मंदिर येथून सुरुवात होणार होऊन ही यात्रा झरी तालुक्यात प्रस्थान करेल नंतर वणी तालुक्यात दाखल होत ह्या यात्रेचा समारोप होईल, असेही ते यावेळी म्हणाले.