अविश्वास ठराव फेटाळला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दिनांक 22 जुलै 2024 रोजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री रोशन वामन कांबळे व इतर 3 एकुण 4 जणांनी सरपंच सौ. जयाताई अतुल ढाले यांचे विरुद्ध अविश्वास दाखल करणाऱ्या प्रस्तावाची नोटीस तहसील कार्यालय मारेगांव येथे उपस्थित राहून सादर केली होती. 
त्या अनुषंगाने आज दिनांक 26 जुलै 2024 रोजी दुपारी ठिक 2.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय केगाव (बोदाड) तालुका मारेगांव येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. सदर विशेष सभेत एकूण 7 ग्राम पंचायत सदस्या पैकी 6 सदस्य उपस्थित होते. आणि एक सदस्य गैरहजर होता. उपस्थित सहा सदस्या पैकी सरपंच यांच्याविरुद्ध चार सदस्यांनी हात वर करून मते नोंदविले आणि सरपंचांच्या बाजूने दोन सदस्यांनी हात वर करून मते नोंदविले. 
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील नियम 35 (3) नुसार ग्रामपंचायत मध्ये मत देण्याचा अधिकार असणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश म्हणजेच ६ पेक्षा कमी मते अविश्वास ठरावाच्या बाजूने मिळालेली असल्यामुळे आज रोजी अविश्वास ठराव नामंजूर करण्यात/फेटाळण्यात आलेला आहे. 
सभेच्या अध्यक्षस्थानी उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव हे उपस्थित होते तर त्यांना सहकार्य करण्यासाठी सचिव कु. जयश्री पाटील ग्रामपंचायत केगाव ह्या उपस्थित होत्या. सभेच्या ठिकाणी मंडळ अधिकारी अमोल गुघाणे, अरविंद पिंपळकर आणि तलाठी संजय शिंदे हे उपस्थित होते.