उमेदवारासाठी प्रचारदूत बनला सोशल मिडिया

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सोशल मिडिया हा आजकाल परवलीचा शब्द बनला आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकात या आधुनिक तंत्राचा वापर होणे अपरिहार्य आहे. काळ बदलला आणि त्यानुसार आचारसंहितेचे नियम अधिक कडक झाले. साहजिकच प्रचाराचा कालावधी कमी झाला. पारंपरिक प्रचाराची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली. त्यामुळे केवळ एका 'क्लिक'ने लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची सोय उमेदवारांना आयतेच उपलब्ध झाली. 

पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, कानाकोपऱ्यातील सभा यांचे महत्त्व आजसुद्धा कमी झालेले नाही. तथापी, त्याचबरोबर फेसबुक, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) यासारख्या माध्यमांतून लोकसभेच्या उमेदवारांचे समर्थक पोस्ट टाकल्या जात आहेत. सोशल मिडिया म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारदूत बनला आहे. लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभाव पडणार आहे. म्हणूनच निवडणूक आयोगानेही यावर नजर ठेवण्याची तयारी केली आहे. परंतु राजकीय पक्षाकडून आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट टाकण्याचा सपाटा लावला आहे. मतदारावर सोशल मिडियाच्या माध्यमातून एकतर्फी भडिमार होऊ शकतो. सोशल मिडियाचा योग्य उमदेवाराची निवड करताना उपयोग होऊ शकतो. यासाठी सोशल मिडियाला एक व्यासपीठ बनविता येईल. 

लोकशाहीच्या मंदिरात स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार या माध्यमातून आपली दावेदारी सादर करू शकतात. आज सोशल मिडिया राजकीय पक्षासाठी एक नवे साधन म्हणून पुढे आले आहे. चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा निवडणुकीचा विचार करता सोशल मिडियावर राजकीय पक्षाची सक्रियता बघायला मिळत आहे. मतदान जवळ आल्यानंतर सोशल मिडियावरील प्रचाराचा भडीमार अधिक वाढणार आहे. विविध प्रकारचे फोटो, व्यंगचित्र, व्हिडोओ च्या माध्यमातून प्रचार करीत आहेत. सोशल मिडियावरील राजकीय पोस्टवर नजर ठेवणे अवघड आहे. त्यामुळे मतदारात संभ्रम वाढण्याची शक्यता आहे. अनेकांनी राजकीय पोस्ट टाकणाऱ्यांना आपल्या यादीतून डिलीट करणे सुरू केले आहे. निडणुकीच्या कालावधीत सोशल मिडियावर प्रत्येक तिसरा मेसेस हा राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याशी निगडीत आहे. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पारंपरिक प्रचार जवळपास लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. त्याची जागा पूर्णपणे सोशल मिडियाने घेतली आहे. 

प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापले सोशल मिडिया सेल वर्षभर आधीपासूनच कार्यान्वित केले. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे. ही सगळी आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही तसेच चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तरोत्तर हायटेक प्रचाराचा फंडा वाढत जाईल, यात काही शंका नाही!