मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका गावातून अख्ख आदिवासी कुटुंबच झालं बेपत्ता

सह्याद्री न्यूज | दिपक नैताम 
देवास, (ता.३) : मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यात येणाऱ्या नेमावार गावातील अख्ख आदिवासी कुटुंबच गावातून बेपत्ता झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांपासून हे आदिवासी कुटुंबं आपल्या राहत्या घरून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देऊनही पोलीस या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. या कुटुंबातील सदस्यांना शोधण्यात पोलिस तत्परता दाखवीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे मध्यप्रदेश प्रांताचे राष्ट्रीय महासचिव कुंवर बलवीर सिंह तोमर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या कुटुंबाचा सुगावा लावण्याकरिता ५ सदस्यीय कमेटीचे गठन केले असून ही कमेटी घटना स्थळाला भेट देऊन आसपासच्या परिसरात व बेपत्ता कुटुंबाच्या परिजनांकडे चौकशी करणार आहे. परिसरातील नागरिक व त्यांच्या परिजनांकडून या प्रकरणाविषयी माहिती गोळा करून घटनेच्या मुळाशी जाऊन पाच दिवसांत कमेटी या घटनेचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती तोमर यांनी देवास संभाग उज्जेनचे पोलिस कमिश्नर यांना पाठविलेल्या सूचना पत्राद्वारे दिली आहे. 
मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यातील खातेगाव तालुक्यातील नेमावर गावात राहणारं एक गरीब आदिवासी कुटुंब मागील काही दिवसांपासून गावातून अचानक बेपत्ता झालं आहे. १७ मे ला या कुटुंबातील मोठी मुलगी गावातील आपल्या घरी आली असता घराला कुलूप लावून दिसल्याने हे गंभीर बाब उघडकीस आली. सदर मुलीने आपल्या घरातील सर्वच सदस्य घरून बेपत्ता असल्याची तक्रार नेमावर पोलीस स्टेशनला नोंदविली. तक्रार दाखल करून १५ दिवस लोटले तरी कुटुंबाचा सुगावा लावण्यात पोलीसांना यश न आल्याने दिसत नाही. कुटुंबातील तीन मुली, एक मुलगा व आई असं पाच जणांचं कुटुंबच गावातून अचानक बेपत्ता झाल्याने शंका कुशंकांना पेव फुटले आहे. या कुटुंबातील दोन सदस्य अल्पवयीन आहेत. मानवी तस्करीतून तर हा प्रकार घडला नसावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या बेपत्ता प्रकरणाचे रहस्य उलगडण्याकरिता पाच सदस्यीय कमिटीचे गठन केले आहे. ही कमेटी पाच जणांचं कुटुंब अचानक बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधून काढत या बेपत्ता प्रकरणाचा पाच दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचे पार्टीचे राष्ट्रीय महासचिव कुंवर बालवीर सिंह तोमर यांनी उज्जेनचे पोलिस कमिश्नर यांना पाठविलेल्या सूचना पत्राद्वारे कळविले आहे.