वणीत पार पडणार भव्य शिवजयंती सोहळा, मनसेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई व फटाक्याची शाही अतिशाबाजी प्रमुख आकर्षण राहणार आहे. ताशांचा गजर, नृत्य, झांजांचा निनाद, आकर्षक देखावा आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

यामध्ये गत वर्षी तुळजा भवानी मातेचा भव्य दिव्य देखावा, शिवरायांचा महाअभिषेक, ढोल ताशा पथकाचे वादन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हीच परंपरा कायम ठेवत याही वर्षी शिवजयंती सोहळ्यानिमित्त वणी परिसर भगवामय करून, चौकाचौकात भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण करण्यात येईल.

वणीत पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ सकाळी ०७.०० वाजता पुतळ्यास महाअभिषेक करून करण्यात येईल. त्यानंतर याठिकाणी अनेक शिवभक्तां कडून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी मात्र ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात हा सोहळा संपन्न होईल. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून देण्यात आली. या कार्यक्रमाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन पक्षनेते राजू उंबरकर यांनी केले आहे.

सुनेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्याच्या मंडळींविरोधात गुन्हा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : लग्न झाल्यापासून पती, सासू सासरे व नणंद यांनी संगणमत करून २८ वर्षीय सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी सासऱ्याच्या मंडळींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विवाहसंबधी अपराध, धाकदपट धमकी, सामूहिरित्या कट रचण्याचा प्रयत्न...हा प्रकार मारेगाव तालुक्यात घडला आहे. संजना सतीश सिडाम (सध्या रा. गोंडबुरांडा, मारेगाव) असे पीडित तरुणीचे नाव आहे. वार्ड नं १ रेस्ट हाऊस जवळ मारेगाव (ता. मारेगाव) येथील सतीश श्रीधर सिडाम याच्याबरोबर १७ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न केले. लग्नानंतर वारंवार पती सतीश श्रीधर सिडाम, सासरा श्रीधर शामराव सिडाम, सासू ताराबाई श्रीधर सिडाम, पूजा श्रीधर सिडाम, मनीषा पांडुरंग मेश्राम, नम्रता सचिन आत्राम यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे. असं फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 

त्यामुळे या जाचाला कंटाळून अखेर सुनेने पोलिसात धाव घेऊन वरील सहाजनाविरोधात कलम 85, 352, 351(2), 351 (3), 3 (5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भाविकावर काळाचा घाला, आटो पलटी होऊन अपघात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज शनिवारी 11.30 ते 12 वाजता च्या दरम्यान भीषण अपघात घडला. आटो अनियंत्रित झालेल्या या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमींना मार्डी येथे प्राथमिक उपचार करून वणी या तालुक्याच्या ठिकाणी नेताच अपघातातील एक महिला शोभा पत्रू दारुणकर (अंदाजे वय 65) हिचा मृत्यू झाला असून माया तुकाराम कडुकर (55) व जिया रमेश येसेकर (40) या दोन महिला गंभीर जखमी आहे. 

वनोजा देवी येथील अपघातग्रस्त आटो हा खैरी येथील देवदर्शनाला जात होता. त्यादरम्यान तालुक्यातील मार्डी ते बामर्डा दरम्यान दबलेल्या जागेला चुकविण्याच्या नादात 317 या महामार्गावर आटो पलटी होऊन भीषण अपघात झाला. 

सतीशदादा गेडाम यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील सामाजिक कार्यकर्ता सतीश बाबुलालजी गेडाम यांचे आज शनिवारी सकाळी 8 वा. निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 46 वर्षाचे होते. 

स्व. सतीशदादा गेडाम यांनी वणी उपविभागीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे ऍम्ब्युलन्स ची सेवा दिली. सर्वांना परिचित झालेले गेडाम दादा यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, आदराने सर्वांची मने जिंकली होती. सर्व जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन मानव धर्म जोपासत माणसांना मदतीचा हात म्हणून 'राजे ऍम्ब्युलन्स'ची सेवा निर्माण केली. मात्र, स्व.सतीशदादा गेडाम हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. आज सकाळी 8 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

आज दि. 15 मार्च ला दुपारी 4 वाजता गणेशपूर येथील मोक्षधाम वर अंतिम संस्कार होणार आहे. असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन 400 कोटी रूपयांची आर्थ‍िक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & Entertainment summit-2025-‘वेव्ह्ज 2025’ ) च्या पहिल्या सत्राचे आयोजन आज सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.

जागतिक स्तरावर होणा-या या पहिल्या परिषदेचे यजमान पद महाराष्ट्र राज्याला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. राज्याच्या आर्थिक राजधानीत 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ही भव्य परिषद संपन्न होणार आहे. आज झालेल्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले असून, या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला.

या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासन दरम्यान ‘वेव्ह्ज 2025’ निमित्त सामंजस्य करार झाला.

या सत्राचे प्रास्ताविक केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी केले तर आभार केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी केले. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,उद्योग विभागाचे प्रधान सचिव एल.अनबलागन उपस्थित होते.   

मुंबईत 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी'ची उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्चाची घोषणा

महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक केंद्रामध्ये 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी' (IICT) ची स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधताना दिली. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून याबाबत, केंद्र शासन 400 कोटी रुपयांची आर्थिक सहायता देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली . हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल," मुंबईत उभारले जाणारे IICT केवळ एक शिक्षण संस्था नसून, हे संपूर्ण क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवीन दिशा देणारे केंद्र बनेल. "ही संस्था नावीण्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताला जागतिक पातळीवर नेईल," ही घोषणा केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सर्जनशील तंत्रज्ञानाला नवी दिशा मिळेल, असल्याचे त्यांनी सांगितले.

IICT – जागतिक दर्जाचे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था

प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ही संस्था केवळ चित्रपट निर्मिती पूरती मर्यादित न राहता, तर डिजिटल कंटेंट, (व्ही.एफ. एक्स) VFX, अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब 3.0 तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल." मुंबईतील IIT बॉम्बेप्रमाणेच ही संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातील सर्वोत्तम केंद्र बनेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 मुंबई-जागतिक स्तरावर क्रिएटिव्ह हब बनणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले , "मुंबई आधीच बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे. जसे दावोस आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे, तसेच हे व्यासपीठ क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड उभारणारे ठरेल."

 वेव्हज 2025 परिषदेविषयी

वेव्हज 2025 ही परिषद ब्रॉडकास्टिंग, चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल मीडिया, संगीत, जाहिरात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल. या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘वेव्ह्ज बाजार’, ‘वेव्हएक्सेलेरेटर’ आणि ‘क्रेटोस्फीअर’ या विशेष उपक्रमांची सुरुवात केली जाणार आहे.

यामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, नवनवीन कल्पनांना चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्याची संधी मिळेल.

महाराष्ट्र हा भारतीय सर्जनशील अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, चित्रपट, टेलिव्हिजन, डिजिटल कंटेंट, ॲनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रनगरी, फिल्मिस्तान स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ आणि फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांसारखी प्रतिष्ठित संस्थाने आहेत. ‘वेव्ह्ज 2025’ परिषदेसाठी 100 देश सहभागी होतील व या माध्यमातून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिंधीना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे, तसेच या परिषदेच्या आयोजनामुळे नवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, धोरणे आणि गुंतवणुकीबाबत चर्चा होईल.

मुंबई-जागतिक मनोरंजनाचे केंद्र

मुंबई ही भारताची आर्थिक आणि मनोरंजन राजधानी असून, याच पार्श्वभूमीवर ‘वेव्ह्ज 2025’ परिषदेचे आयोजन 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणार आहे. या निमित्ताने मीडिया, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांना चालना मिळेल आणि जागतिक नेतृत्वाना उद्योगाच्या भविष्यासाठी नवी दिशा ठरवण्याची संधी मिळेल.

सध्या जागतिक पातळीवरील माध्यम आणि मनोरंजन उद्योग झपाट्याने प्रगती करत असून, या क्षेत्राची बाजारपेठ वर्ष 2024 पर्यंत 2.96 ट्रिलियन डॉलर्स होती, भारत या क्षेत्रात 2029 पर्यंत 50 बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच, भारत सध्या 60 हून अधिक OTT प्लॅटफॉर्मसह जागतिक स्तरावर वेगाने विस्तार करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.