वनोजादेवी 'स्टॉप' वर महसूल पथकाची 'धडक' कारवाई


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील वनोजामार्गे देवी स्टॉप कडे वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर वाहन धारकांवर महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री जप्तीची कारवाई करून वाहन मारेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

मारेगाव तालुक्यात काही घाट हर्रास झाल्यापासून वाळूची वाहतूक सुरू आहेत. मात्र, या वाहतुकीच्या आड विनापरवाना व नियमाला फाटा देत सुसाट वाळूची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे दिवसभर ही वाहतूक होतांना दिसत नाही, मात्र सायंकाळीच ही वाळू वाहतूक सुरू असते हे सर्वश्रुत आहे. ह्यांची रात्रभर भुरभूर चालू राहते. ह्या सुसाट वाहतुकीने अनेक गावातील नागरिक त्रस्त आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी, कर्मचारी सुस्त असल्याने यासंदर्भात तक्रारी प्रशासना दरबारी होत असल्याने ह्या प्रकारावर आळा घालण्यासाठी शिस्तप्रिय तहसीलदार म्हणून उत्तम निलावाड साहेब यांना आल्यापासून ओळखले जाते, त्यांनी असे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करून वाळू तस्करांचे मनःसुबे उधळून लावलेले आहे. व आताही मनःसुबे उधळून लावतच आहे. त्यामुळे अमरावती विभागात महसूलात भर पडली. परंतु ही भर डाऊन करण्याच काम तस्कराकडून कायम सुरू असल्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर आहे. 

अशातच सोमवारच्या रात्री या परिसरात गस्तीवर असलेल्या महसूल पथकाला अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा टिप्पर क्र. (MH-29, BE- 9998) हे वाहन वनोजा मार्गे देवी (स्टॉप) कडे येत असल्याचे दिसताच देवी (स्टॉप) येथे त्या टिप्पर वर कारवाई करून वाळूचा टिप्पर तहसील कार्यालय मारेगाव येथे जमा केले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या वाहणात जवळपास तीन ते चार ब्रास वाळू असून ही कारवाई वणीचे नायब तहसीलदार खिरेकर, नायब तहसीलदार रमगुंडे यांच्या उपस्थितीत तलाठी गजूसिंग गुनावत, गजानन वानखेडे, एस एस कुळमेथे, विवेश सोयाम, मंगेश बोपचे यांनी केली. ह्या कारवाईने परिसरातील तस्करांचे धाबे दनाणले आहे.


राजूर येथील राजीव गांधी चौकातील महिलांचे पाण्यासाठी ग्रा. पं. ला निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉलरी) येथील वॉर्ड क्र. ३ येथील राजीव गांधी चौकातील हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करणारे निवेदन येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चहानकर यांना राजीव गांधी चौकातील महिलांनी दिले आहे.

 भर उन्हाळ्यात ज्यावेळेस पाण्याची गरज जास्त असते अश्या वेळेस महिनाभरापासून हातपंप खराब झाल्याने राजीव गांधी चौकातील कष्ट करणाऱ्या महिलांना अतोनात त्रास होत आहे. परिणामी येथील महिला ईशान गोल्ड चुना कंपनी कडून रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पाणी टाकणाऱ्या टँकर चे पाणी घेत आहेत हे लक्षात येताच ते पाणी देणे ही कंपनीने बंद केले. त्यानंतर ग्रा. पं. ने सुद्धा दोन दिवस टँकरने पाणी पुरवठा करून ते ही बंद केले. हातपंप दुरुस्त केले परंतु ते ही थातूरमातूर केले असल्याने हातपंपातून पाणी उपसने त्रास दायक ठरला आहे. कितीतरी पंप मारल्यानंतर हातपंपातून पाणी निघते. त्यामुळे जोपर्यंत हातपंप योग्यरीत्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे राजीव गांधी चौकातील कविता राकेश उईके, सायदा रफिक सय्यद, रजिया अकील कुरेशी, रेहाना शाहिद सय्यद, हलिमा शेख कादिर, शेवंता गंगाधर निर्मलकर, आशा नुर अली, रजिया युसुफ अली, नसीम असिफ अली, गौशिया शेख लतिफ, नजमा युसुफ शेख, रेशमा गफ्फर शेख, शागुफ्ता इदरिष शेख, हिना सलीम शेख, सरस्वती मेश्राम, संगीता दीपक उईके यांनी केली आहे. 

यावेळेस ग्रामसेवक चहानकर यांनी मागणी करणाऱ्या महिलांना ताबडतोब हातपंप दुरुस्त करून देण्याची हमी दिली. तसेच दोन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून ते पूर्ण झाल्यास व गावात पुन्हा चार ठिकाणी ट्युबवेल खणून ते पाणी नळाद्वारे घरोघरी पोहोचविण्यात येईल असेही सांगितले. परंतु महिलांनी दोन दिवसात हातपंप दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शाळेची जुनी पुस्तकं रद्दीत न विकता दान करा, स्माईल फाउंडेशनचे आवाहन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शाळा संपली, पुढच्या वर्गात विद्यार्थी गेला की त्याचे नवे घेतलेले पुस्तके तसेच पडून राहतात किंवा तीच पुस्तके रद्दीत दिले जातात. मात्र, ही पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना कामात येऊ शकतात. त्यामुळे वर्ग 1 ते 12 वी पर्यंतची पुस्तके, नोट्स, गाईड्स तसेच नोटबुक, कंपास, स्केचपेन, कलर बॉक्स असे कोणतेही स्टडी मटेरिअल रद्दीत न विकता किंवा घरात पडून असल्यास दान करा. हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जाईल असे सामाजिक उपक्रम स्माईल फाउंडेशनतर्फे राबवण्यात येत आहे. 

शाळेसाठी अनेक पालक विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं विकत घेऊन देतात. मात्र, पाल्य उत्तीर्ण झाल्यावर त्याचे शालेय पुस्तके, साहित्य बरेचदा घरी पडून राहतात. प्रसंगी ते रद्दीत कवडीच्या भावाने विकलीही जातात. मात्र, यातील अनेक पुस्तके वापरण्याजोगे असतात. व ही पुस्तकं गरजुंच्या शिक्षणाच्या कामात येऊ शकतात. ही पुस्तके स्माईल फाउंडेशन गोळा करून गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना दान करणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जुनी पुस्तके तसेच शैक्षणिक साहित्य दान करा असे आवाहन करण्यात आले आहे.

काय काय दान करता येणार...
वर्ग 1 ते 12 वी पर्यंतचे स्टेट बोर्ड व सीबीएससी बोर्डचे पुस्तकं दान करता येणार आहे. याशिवाय कंपास बॉक्स, स्केचपेन, नोटबुक इत्यादी देखील दान करता येणार आहे. जर कुणाला नवीन साहित्य देण्याची इच्छा असेल तर त्यांना नवीन साहित्य देखील देता येणार आहे. 

स्माईल फाउंडेशन हे परिसरातील एक सुपरिचित सेवाभावी संस्था आहे. संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पुरक उपक्रम राबवले जातात. अधिक माहितासाठी प्रा. जागर जाधव 7038204209 या क्रमांकावर किंवा वॉटर सप्लाय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक: महावितरण कार्यालयावर धडक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते. मात्र त्यानंतर तासंतास वीज पुरवठा खंडीत राहतो. याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार वीज गेल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचा आरोप नगर पालिकेकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे सोमवारी दिनांक 20 काँग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात सहका-यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत उप अभियंत्याशी भेट घेतली. यावेळी तातडीने ही समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले.

भर उन्हाळ्यात अनेक वेळा दिवसा रात्री लाईट जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सातत्याने वीज गेल्याने अनेकांचे विद्युत उपकरणे खराब झाले आहेत. तर दिवसा लाईट नसल्याने इंटरनेट बंद होते. परिणामी अनेकांचे काम थांबतात. त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लाईट बंद असते. याबाबत महावितरणाच्या कर्मचा-यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही दाद मिळत नाही.  

तांत्रिक अडचणीमुळे विजेची समस्या होती. मात्र ती आता समस्या सोडवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वारंवार वीज जाणे थांबणार व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, असा दावा उप अभियंत्यांनी केला, अशी माहिती संजय खाडे यांनी दिली. त्यामुळे काही दिवस वाट पाहणार. त्यानंतरही ही समस्या सुटली नाही तर महावितरण कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा संजय खाडे यांनी दिला.

निवेदन देते वेळी राजाभाऊ पाथ्रडकर, तेजराज बोढे, प्रमोद वासेकर, संजय सपाट, प्रेमानंद धानोरकर, विकेश पानघाटे, साधना गोहोकर, मंगला झिलपे, काजल शेख, अशोक चिकटे, कैलास पचारे, रवि कोटावार, अशोक नागभीडकर, अमित संते, अरुण लांडे, वामन कुचणकर, प्रतिक गेडाम, वामन नागपुरे, रामदास पखाले, सुरेश भारसाकळे, आर एस मालेकर, सुरेश बंसल, संगीता खाडे, बरखा वाधवानी, प्रेमिला पावडे, दर्शना पाटील, मंदा बांगरे, संगिता मांढरे, उज्ज्वला निब्रड, ललिता बरशेट्टीवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

वीज नसल्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम सध्या वणीत भीषण पाणी टंचाई आहे. वीज नसल्याने शहरातील पाणी पुरवठा सुरळीत नसल्याचा दावा नगर पालिकेने केला आहे. तसेच पाणी प्रश्नावर वीज वितरणला जबाबदार धरले होते. त्यामुळे संजय खाडे यांच्या नेतृत्तात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धडक देत या प्रश्नावर उप अभियंत्यांना विचारणा केली. 

अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्याची लागली वाट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शासनाच्या लिलाव झालेल्या वाळू घाटावरुन क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहणे रस्त्यावरून भरधाव धावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची पुर्णपणे वाट लागली असुन नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

मारेगाव तालुक्यातुन वाहत असलेल्या वर्धा नदीवरील आपटी, कोसारा, व सावंगी वाळू घाट लिलाव झाला आहे. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक वजन भरलेली रेती वाहणे चोरट्या मार्गाने धावत आहे. त्यामुळे या रस्त्याची पुर्णपणे वाट लागली आहे. या रस्त्यावरून धावणारी वाळूची जड वाहतुक बंद करण्यात यावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वर्धा नदी घाटावरील आपटी वाळू घाटावरुन आकापुर, चिंचाळा, वरुड, वनोजादेवी, गौराळा,या रस्त्यावरून वाळू घाटाचा लिलाव झाल्यापासुन सुसाट वेगाने वाळूची जड वाहतुक केली जात आहे. ही वाहतुक बंद करण्यात यावी यासाठी या मार्गावरील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी एक लेखी निवेदन मारेगावचे तहसीलदाराकडे सादर केले आहे. निवेदनामध्ये वनोजा देवी ते गौराळा हा ग्रामीण भागातील रस्ता जनतेच्या रेट्यामुळे मंजुर झाला असुन, यंदा तो डांबरीकरणा सह पुर्णत्वास आला आहे. मात्र, या रस्त्याची वजण सहन करण्याची क्षमता 20 टनापेक्षा कमी असताना 40 टणा पेक्षा अधिक क्षमतेची रेती भरलेली वाहणे रात्र दिवस धावत आहे. त्यामुळे हा रस्ता उखडला असुन वाहतुक धारकांना या रस्त्यावरून वाहणे चालविणे जिकरीचे काम झाले आहे.त्यामुळे हा रस्त्यावरून धावणारी जड वाहतुक तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदना वर आकापुर सरपंच संदीप कारेकार, चिंचाळा पाथरी गटग्रामपंचायत उपसरपंच शशिकांत तावाडे, गौराळा ग्रामपंचायत सरपंच मयुरी चंद्रकांत धोबे, उपसरपंच अतुल गानफाडे यांच्या सह्या आहेत.