भालर ते तरोडा या रस्त्यासाठी वारंवार तक्रार करून सुध्दा सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष - मनोज ठेंगळे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत आणि दुसरीकडे गाव आणि शहर यांना जोडणाऱ्या रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधाही वेळेवर मिळू शकत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असेल? कुठ पर्यंत निवडणुकीचा मुद्दा म्हणून रस्ता, पाणी आणि वीज असणार? कारण ग्रामीण भागात एका समाज सेवकाला युवापिढी आणि गावकऱ्यांना घेऊन हक्काचा रस्ता बनवून मिळावा म्हणून आंदोलन करावे लागले.
एकदा आंदोलन झाले, पण दुसऱ्यांदा होऊ नये अशी सरकारी यंत्रणा तत्पर असावी. पण ग्रामीण भागात शेतीसाठी एक तर विजेचा आणि दुसरा म्हणजे शेतमाल विकायला बाजारपेठे पर्यंत पोहोचायला चांगला रस्ता पाहिजेत. तेव्हाच हा माल समृध्दी महामार्गावर जाईल ना. देशाचे प्रधानमंत्री म्हणतात सरकार शेतकऱ्यां सोबत आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने समृध्दी महामार्ग बनवला. पण ग्रामीण जनतेच्या नशिबी असा असमृध्दी, खड्डेमय मार्ग का? असा गंभीर प्रश्न सर्व सामान्य माणसाच्या मनात येतो.
वारंवार मागणी करूनही भालर ते तरोडा या गावांना जोडणारा रस्ता अजूनही बनवल्या गेला नाही. सर्व सामान्य माणूस यासाठी प्रयत्नशिल आहे. पण ही मुजोर सरकारी यंत्रणा झुकायला तयार नाही. या रस्त्यावर भालर, बेसा, लाठी, निवली, सुंदरनगर, तरोडा, निलजई ही गावे असून मुख्य म्हणजे हा रस्ता घुग्घुस-चंद्रपूर जोडल्या गेला. हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर असून गव्हर्नमेंट शेड्युल रेट कमी असल्यामुळे कोणताही ठेकेदार टेंडर भरायला धजावत नाहीत, जो तयार असतो त्याला मिळत नसल्याचे तक्रारकर्ते श्री. ठेंगळे म्हणाले.
परिणामी भालर ते तरोडा हा 7.850 किमी. लांबीचा रस्ता गेल्या 2 वर्षापासून खराब होऊन खड्डेमय झालेला असल्यामुळे गावकऱ्यांनी सतत पाठपुरावा केला. परंतु रस्ता दुरुस्त करून मिळत नसल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ता मनोज ढेंगळे यांचे नेतृत्वात 16 जून 2023 रोजी रस्ता रोको आंदोलन केले होते. सदर आंदोलनात कार्यकारी अभियंता प्र.मं.ग्रा.स. योजना यवतमाळ यांनी ऑगस्ट महिन्यात काम चालू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आंदोलनाला 5 महिने लोटून सु‌द्धा अजूनही सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही.

या रस्त्याची टेंडर प्रक्रिया 5 महिन्यांपासून सुरु असून चौथ्या रिकॉल मध्ये दोन कंत्राटदार पात्र ठरलेत. परंतु गव्हर्नमेंट शेड्युल रेट पेक्षा जास्त दराने टेंडर भरलेले असल्यामुळे अजूनही कोणत्याच कंत्राटदाराला कामाचे आदेश दिलेले नाहीत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाद्वारे ADB-YAV (11)-10 या पॅकेज क्रमांकात वणी तालुक्यातील तीन गावच्या रस्तांचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागाकडे दिले. परंतु 18.195 कि.मी. अंतर व 14 कोटी 78.67 लक्ष रुपये किमतीचे एवढ्या मोठ्या कामाचे हे टेंडर असल्यामुळे तालुक्यातील साधारण कंत्राटदार टेंडर भरुच शकले नाही. त्यामुळेच टेंडर प्रक्रियेला विलंब झाला व खड्डेमय रस्त्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत. यावरून प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करित नागरिकांना वेळेत रस्त्याची सेवा देऊ शकत नसाल तर या PMGSY योजनेमधून काम करताच कशाला? असा संतप्त सवाल मनोज ढेंगळे यांनी सरकार आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांना केला आहे.
येत्या 15 दिवसांत या रस्त्याचे काम चालू करण्याची मागणी करण्यात आली असून, तसे न झाल्यास यापूर्वी केलेल्या आंदोलनापेक्षाही अतिशय तीव्र आणि आक्रमक स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनोज ढेंगळे व महेश पाटिल, संदिप बुऱ्हान, आकाश पोटे, भवसागर पेटकर, प्रणय गाणफाडे, लोकेश काळे, सतिश देवतळे, दिपक निमकर यांनी गावकऱ्यांच्या वतीने दिला आहे.

वणी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरात परत सक्रिय होऊ पाहणाऱ्या मोटरसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळून वणी पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आहे. आंतरजिल्हा रॅकेट मधील दोन चोरट्यांना डीबी पथकाने मोठ्या शिताफिने अटक केली असून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई 20 ते 21 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. 
वणी बसस्थानक येथून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडल्याने डिबी पथक ऍक्शन मोडवर आले आहे. शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील सुधीर अरुण निखाडे यांची बसस्थानक येथे उभी असलेली मोपेड मोटरसायकल (MH 29 AY 2585) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यांनी मोटरसायकल चा स्वतः शोध घेतल्यानंतर 20 नोव्हेंबरला ठाण्यात तक्रार नोंद केली. मोटरसायकल चोरीची तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने चोरट्यांचा कसून शोध घेणे सुरु केले. दरम्यान, त्यांना सेवा नगर येथे राहणाऱ्या सौरभ घनश्याम भटवलकर नामक तरुणाजवळ चोरीला गेलेल्या वर्णनाची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकच नाही तर, दोन गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सौरभ भटवलकर (20) याच्या जवळून मोपेड दुचाकी (एम एच 29 ए वाय 2585) व हिरो होंडा स्प्लेंडर (एम एच 29 झेड 5938) अशा दोन मोटरसायकल जप्त केल्या असून, त्याच्यावर भादंवि च्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तक्रार दाखल असल्याचा नागपूर पोलिसांनी दिला दुजोरा  
वणी शहरात गस्त घालणाऱ्या डीबी पथकाला दिपक चौपाटी बार जवळ मोटरसायकल घेऊन उभ्या असलेल्या युवकावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या युवकाची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास जवळील दुचाकीचे कागदपत्र मागितले असता तेही त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळे त्याने मोटरसायकल चोरी केल्याचा संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी त्यास मोटरसायकल सह ताब्यात घेतले. त्याला खाकीचा इंगा दाखविताच त्याने नागपूर येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सतीश उर्फ शेंबड्या बाबाराव मडावी (25) रा. वार्ड क्रं.10 राळेगाव याच्या जवळून होंडा ऍक्टिव्हा (एम एच 31 डी एफ 1266) ही मोटरसायकल जप्त करून त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. नागपूर येथून वरील वर्णनाची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल असल्याचा नागपूर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
सदरची कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे, डीबी पथकाचे वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसीम शेख, गजानन कुडमेथे यांनी केली.

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
           
राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे.

नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर ॲपद्वारेच सादर करणे बंधनकारक आहे; परंतु, पोटनिवडणुकांत बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

मुलांना मारण्याआधी या गोष्टीचा नक्कीच विचार करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
             
शंतनू दुपारला बारा वाजता शाळेतून घरी परत येतो. शंतनुच पाच वर्षाच वय. मम्मी शंतनुला हात पाय धुवायला सांगते. शंतनू येताच हॉलमध्ये आपलं दप्तर ठेवतो. शंतनू लगेच बाथरूमला जातो. बकेट मधील पाणी पायावर टाकतो आणि बाहेर येतो मग मम्मीनी शंतनु साठी जेवण वाढलेले असते. 
            
मम्मी शंतनुला परत आवाज देते. तसाच शंतनू मम्मी जवळ येतो. शंतनू ताटाजवळ बसतो. मम्मी शंतनूला घास भरवायला लागते. शंतनूच जेवन पूर्ण होते तसाच शंतनु खिडकीकडे वळतो. 
          
खिडकीतून डोकावत असताना शंतनूला सोनू सायकल चालविताना दिसते. असे चित्र दिसल्यावर शंतनु एकही क्षणाचा अवलंब न करता मम्मीकडे जातो आणि म्हणतो मम्मी मला सायकल पाहिजे आहे. मम्मी ऐकते आणि म्हणते बेटा, तुझ्याकडे सायकल तर आहे ना ! शंतनु म्हणतो. मम्मी ती नको दुसरी पाहिजे. ती बघ, बाहेर बोट दाखवत म्हणतो. तशी पाहिजे मम्मी. तेव्हा मम्मी शंतनुला म्हणते, नाही बेटा. आणि मम्मी त्या ठिकाणावरून आतमध्ये चालत जाते. 
          
अशाही वेळेस शंतनुचा हट्ट चाललेला असतो. मम्मी यावर काहीच बोलत नाही. परंतु शंतनूचा हट्ट वाढत चाललेला असतो. त्यावेळी वाढता हट्ट बघून मम्मी शंतनूच्या पाठीवर एक थापड मारते. यावेळेस शंतनुला मम्मीने मार दिल्यामुळे शंतनु मोठ्याने रडायला लागतो. 
             
अशा प्रकारची कृती मम्मीची बरोबर आहे का ? याचा विचार होणही अतिशय महत्त्वाच आहे. बरेचदा असंच होतं आणि बऱ्याच घरी या प्रकारचा उपाय हा वापरला जातोच पण यासारखा उपाय वापरल्याने योग्य तो परिणाम साधला जात असतो का ? 
          
मम्मीने वापरलेला हा मारण्याचा पर्याय बरोबर नाही. कारण मारल्याने मुलांच्या संकल्पना स्पष्ट होत नाही आणि मुलं मारण्याने चूप बसतात असे होत नाही. असं जर वाटत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे. मुलांच्या आग्रहाची अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच मुलांच्या साहित्याची, खेळण्याची, वस्तूची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सर्व मुलांच्या अपेक्षांची पूर्तता करणे हेही पालकांना शक्य नसते. 
          
 म्हणून तर वेगवेगळ्या अनुषंगाने विचार करणे हे कधीही श्रेयसकर. शंतनूच्या मम्मीने या ठिकाणी शंतनूला व्यवस्थित रित्या समजून सांगणे अतिशय महत्त्वाचं होतं. कारण आत्ताची मुलं ही आधिच्या मुलांसारखी बिलकुलच राहिली नाही. ती अधिक समजूतदार झालेली आहे. आताच्या मुलांच्या कुठल्याही गोष्टी लवकर लक्षात येतात. 

मुलांना स्पष्ट व नम्रपणे सांगा-           
या ठिकाणी शंतनूच्या मम्मीने म्हणायला पाहिजे होते की, बेटा तू छोटा आहे. सोनू बघ बरं, तुझ्यापेक्षा किती मोठा आहे. आहे की नाही, आहे ना ! त्यामुळे तो मोठी सायकल चालवू शकतो. तू आता छोटा आहेस. तू आणखी थोडा मोठा झाल्यानंतर तू त्याची सायकल चालवू शकशील. मग तुलाही तशीच सायकल घेऊन देणार. हो की नाही बेटा, काय अशा सांगण्याने शंतनू ऐकली नसती, नक्की ऐकली असती.

आदरपूर्वक संबंध निर्माण करा -
मुलांना भविष्याचे वेध सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे मुलांच्या डोक्यात त्याचे व्यवस्थित टेक्चर निर्माण होईल. म्हणून मम्मी पप्पांनी मारण्यापर्यंत तर जाऊच नये. मुलांनी केलेली मागणी आणि वय तसेच वेळ यांच्याशी तारतम्य साधून पालकांनी व्यवस्थितरित्या त्या गोष्टीला नियंत्रित करणे अतिशय आवश्यक आहे. 
त्यामुळे मुलाच्या मनात कधीच भीतीचे वातावरण पालकाबाबत निर्माण होणार नाही आणि मुलं कुठलीही गोष्ट पालकांना स्पष्टपणे सांगतील.

प्रा. डॉ. दिनेश जारोंडे
पीएचडी. नेट-सेट (मानसशास्त्र),
लेखक प्रशिक्षक मार्गदर्शक समुपदेशक.
संपर्क : 9403257006 

आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. बसस्थानाकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

एसटी महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २२०० तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. बसस्थानकांवरील होर्डींग्जची दुरुस्ती करतानाच त्यांची सजावट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.