संविधानामुळे सर्वांना अधिकार, मूलभूत कर्तव्याची जाणीव – पालकमंत्री मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : संविधानामुळे सर्वांना अधिकारासोबतच मूलभूत कर्तव्याची व विचारांची जाणीव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिकवण सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर महानगरपालिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित चित्रप्रदर्शनीचे उद्धघाटन करताना ते बोलत होते. यावेळी श्रद्धेय सुमनवंतो महास्थवीर सचिव महाराष्ट्र प्रदेश भिक्षु संघटना भंते मदन्त सघवंस थेरो, देवराव भोंगळे, डॉ.मंगेश गुलवाडे, ब्रीजभूषण पाझारे, राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, धम्मप्रकाश भस्मे, अंजली घोटेकर, विशाल निंबाळकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हिमालयापेक्षाही उंच आहे. समता, ममता व बंधुत्वाच्या मार्गावर जात-पात व समाजाच्या बाहेर जाऊन संविधानाच्या चौकटीत आचरण, वर्तणूक व कर्तव्य पूर्ण करू, हा भाव डॉ. आंबेडकरांनी संविधान समर्पित करताना व्यक्त केला होता. प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा सन्मान करण्याची वृत्ती आपल्या अंगी बाळगावी. जयंतीच्या दिवशी अभिवादन करून पुढच्या 365 दिवसाचा संकल्प करत प्रत्येक दिवशी डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानाच्या मार्गावर एक-एक पाऊल पुढे जाण्याचा संकल्प करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, संविधानाचा जयघोष करतांना देशात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत तर कामरूपपासून कच्छपर्यंत प्रत्येक जण आपल्या अधिकाराचा शोध घेत असतो. बोलण्याचे, फिरण्याचे व वागण्‍याचे स्वातंत्र्य आपणास आहे. आंबेडकरांनी संविधानातून जनतेला मूलभूत कर्तव्ये सांगितली त्या कर्तव्य व जबाबदारीला महत्त्व देणे गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या आसपासचा परिसर हा संविधानाच्या चौकटीत समता, ममता व बंधुत्वावर आधारित एक समूह समाज निर्माण करण्यासाठी योगदान देईल, इतकी भावना पुढच्या 365 दिवसांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या सिकलसेल आरोग्य तपासणी स्टॉलला भेट दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते फोटो चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन

महानगरपालिका येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील फोटो चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी चित्र प्रदर्शनीचे अवलोकन केले.

समाजासाठी व समाजाच्या हितासाठी उत्तम कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

समाजासाठी उत्तम कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अशोक घोटेकर, शंकर पाझारे, अजय गणवीर, सुरेश वेल्हेकर, बळीराम महोतव, प्रेमदास मेश्राम, राजू भगत, श्रेया इथापे, रत्नमाला खोब्रागडे, प्रियंका पाटील, आनंदी शेंडे आदींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

व्यवस्था परिवर्तनातील क्रांतिकारी योद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर - गीत घोष

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बाबासाहेब हे एक जगातील दलित, शोषित, पिडित सर्वहारा मुक्तीचा तंत्रज्ञान असून मानव मुक्तीचा सम्यक मार्ग असल्याने ते व्यवस्था परिवर्तनातील क्रांतिकारी योद्धा असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष यांनी केले. ते सवर्ला येथील सम्यक बौद्ध मंडळ द्वारा आयोजित 132 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती महोत्सव तथा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्ती अनावरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सम्यक बौद्ध मंडळ,लुंबिनी महिला मंडळ, सार्व. नवदुर्गा मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, गुरुदेव सेवा मंडळ, पदावली भजन मंडळ, बिरसा मुंडा बिग्रेड सावर्लाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे अध्यक्ष मा.डॉ. भालचंद्रजी चोपणे माजी. कुलगुरू नागपूर, विशेष अतिथी म्हणून मा.श्री. संजीव रेड्डी बोदकुरवार हे होते, प्रमुख पाहुणे सौ.कुंदाताई चोपणे, सरपंच ग्रा.पं.सावर्ला, अशोक सुर, अध्यक्ष वि.कार्यकारी सो.नायगाव, मारोतरावजी चोपणे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सावर्ला, नथ्थुजी सोमलवार अध्यक्ष तंटामुक्ती समिती, सावर्ला हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून मा.प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड, स्वामी रा.ति.मरा. विद्यापीठ, नांदेड,प्रा.संजयरावजी बोधे सर, समाजिक विचारवंत, वरोरा, गीत घोष, राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.संवैधानिक हक्क परिषद, वणी, रघुनाथजी कांडाळकर साहेब, वणी हे होते.

पुढे बोलतांना गीत घोष म्हणाले,बाबासाहेबांनी दोन व्यवस्था उलथून पाडल्या आहेत त्या म्हणजे बौद्ध धम्माची आपल्या अनुयायासोब दिक्षा घेऊन मनूवादावर आधारीत हिंदू धर्माचा त्याग करुन समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायावर आधारीत वैज्ञानिक बुध्द धम्माचा स्वीकार आणि पुरोहितशाहीवर आधारीत राज्यव्यवस्था बदलून लोकशाही समाजव्यवस्था निर्माण केली व भारतीय माणसांना धार्मिक गुलामीतून मुक्ती देवून संधिची समानता आणि प्रत्येक माणसाला समानतेची संधी प्राप्त करुन देणारे संविधान या देशाला दिले.

या प्रसंगी प्रा.संजय बोधे सर यांनी ओ.बि.सी.च्या प्रश्नांवर आपली भुमिका मांडून बाबासाहेब हे आमचे मुक्तीदाता असल्याचे प्रतिपादन केले. या वेळेस सर्व वक्त्यांनी आपापल्या विषयावर भाष्य करुन हा देश एकसंघ टिकून ठेवायचा असेल तर आपण सर्वां सर्व भेद विसरून भारतीय राज्यघटनेची सुरक्षा करण्यावर भर दिला.गावातील सर्व समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित करुन एकतेचे दर्शन घडवेल.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन, देवानंदजी मुनेश्वर, विक्रम तामगाडगे यांनी केले, प्रास्तविक, शामरावजी देठे तर आभार भाऊरावजी राऊत यांनी मानले.

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : अवैध मार्गाने गुटखा वाहतूक करणारी वाहने जप्त केल्यानंतर शासन जमा करावीत, त्यासाठी वन विभागाच्या धर्तीवर परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या बैठकील अन्न व औषध विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे, उपसचिव वैशाली सुळे, यांच्यासह विधि व न्याय विभागाचे उपसचिव मकरंद कुळकर्णी उपस्थित होते.

राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, खर्रा व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक व विक्री यावर सन २०१२ पासून प्रतिबंध आहेत. या प्रतिबंध असलेल्या पदार्थांची वाहतूक होत असेल किंवा वाहनात साठा ठेवला असेल अशी वाहने अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त केली जातात. जप्त केलेल्या वाहनांचा ताबा वाहन मालकाने न्यायालयात अर्ज केल्यास त्यास परत केला जातो. वाहन मालकाने असा अर्ज न केल्यास अशी जप्त केलेली वाहने कार्यालयाच्या आवारात पडून राहतात. जप्त केलेली वाहने वन विभागाच्या धर्तीवर शासनाची मालमत्ता म्हणून घोषित करण्याबाबत अधिसूचना निर्गमित करावी, असे आदेश मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिले.

वन विभागाने जप्त केलेली मालमत्ता, वाहने इत्यादी शासन जमा करुन त्याची विल्हेवाट तसेच वाटप करण्याचे अधिकार भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ६१ अन्वये तरतुदीनुसार वन विभागाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यास आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मध्ये जप्त केलेल्या वाहनांबाबत अशी कोणतीही तरतूद नाही. ही बाब कायद्यात समाविष्ट करण्याबाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांना विनंती करण्यात येईल. यामुळे गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर वचक बसेल आणि अवैध पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीस आळा बसणार आहे. 

जार मधून पिण्याचे पाणी विक्री करणाऱ्यांना आता घ्यावी लागेल परवानगी

स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहक जार मधून पाणी विकत घेतात. या पाण्याची शुद्धता, स्वच्छता आणि आरोग्य तपासण्यासाठी सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. या जार मधुन पाणी विकणाऱ्यांना यापुढे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घावी लागणार आहे. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकी दरम्यान दिली.

शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात यवतमाळ राज्यात अव्वल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : अन्नधान्य वितरणातील अपहार, गैरव्यवहार रोखण्याकरिता तसेच लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले. या प्रकल्पातंर्गत लाभार्थ्यांना रास्त भाव धान्य दुकानामार्फत ईपॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वितरण करण्यात येते. यवतमाळ जिल्हा हा सर्व योजनांच्या ६ लक्ष १० हजार ७६८ शिधापत्रिकांमधील २२ लक्ष ७७ हजार ३१० लाभार्थाची १०० टक्के आधार जोडणी करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेमध्ये प्रती कार्ड ३५ किलो व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत प्रति व्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. अपात्र शिधापत्रिकांमधील लाभार्थ्यांचा शोध घेऊन वगळणी करणे व पात्र लाभार्थ्यांचा समावेश करणे ही पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणारी निरंतर प्रक्रिया आहे. मे २०१८ मध्ये आधार संलग्न सार्वजनिक वितरण प्रणाली संपूर्ण राज्यात यशस्वीपणे सुरू करण्यात आली. या नवीन प्रणालीमुळे १०० टक्के धान्याचे वितरण आधार सत्यापन करून होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मयत व्यक्ती, दुबार नोंदी, स्थलांतरित कुटुंबे, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, विवाहित मुली आदींचा शोध घेऊन निकषात न बसणाऱ्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र करण्यात आल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्याला ७ जिल्हे आणि एका राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे इतर जिल्हा आणि राज्यातील शिधापत्रिकांचा शोध घेण्याचे जिकिरीचे काम जिल्हा पुरवठा विभागाने पार पाडले. यात २ हजार ३८३ शिधापत्रिका नक्कल आढळून आल्यात त्यापैकी १२९२ रद्द केल्या तर १०९१ तपासणीअंती राखून ठेवण्यात आल्या आहेत. यातही यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत तर या कामात इतर कोणताही जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या आसपासही नाही.

शिधापत्रिका आधारकार्ड सोबत संगणकीकरण करणे हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून याद्वारे उपलब्ध झालेला इष्टांकाचा वापर नवीन शिधापत्रिका मधील लाभार्थी तसेच विभक्त कुटुंबे यांना अन्नधान्य देण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हा हा सर्व योजनांच्या ६,१०,७६८ शिधापत्रिकामधील २२,७७,३१० लाभार्थाची १०० टक्के आधार जोडणी करणारा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.

शिधापत्रिका -आधार संलग्नीकरणाची फलश्रुती म्हणून अन्न धान्याचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत खात्रीशीर पोहचत असून धान्याचा गैरव्यवहार व अपहार यास आळा बसला आहे. याचा परिणाम म्हणून लाभार्थ्यांना धान्य न मिळणे यासारख्या तक्रारी कमी झाल्या आहेत.

शिधापत्रिका संगणकीकरणामुळे लाभार्थ्यांना मिळत असलेले धान्य घरबसल्या ऑनलाईन पाहता येणे शक्य झाले आहे. त्यामुळेच विभागात पारदर्शकता येऊन नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे सर्व लाभार्थ्यांचे सत्यापन झाल्याने यवतमाळ जिल्हा पुरवठा विभाग जबाबदार, पारदर्शक आणि गतिमान झाला आहे.

-सुधाकर पवार
जिल्हा पुरवठा अधिकारी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यवस्था परिवर्तनाचा बौध्दिक सिध्दांत आहे - गीत घोष


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बाबासाहेब हे केवळ एक व्यक्ती नसून ते व्यवस्था परिवर्तनाचा एक सिध्दांत आहेत असे मत अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गीत घोष यांनी, नांदेपेरा येथील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ ‌बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना व्यक्त केले.

नांदेपेरा येथील भारतीय बौद्ध महासभा तथा महिला मंडळाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्य ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खुशालराव रामटेके हे होते तर प्रमुख मार्गदर्शक मा.गीत घोष, राजू निमसटकर, संतोष पेन्दोर, सुरेश शेंडे हे होते.
पुढे बोलतांना घोष म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन व्यवस्था बदलविल्या एक बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन धर्मांधतेवर आधारीत धर्म व्यवस्था आणि पुरोहितशाहीवर आधारीत राज्य व्यवस्था बदलून लोकशाही व्यवस्था निर्माण केली आणि ही सत्ता  परिवर्तनातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी एक महान इतिहासीक घटना आहे असे मी मानतो असेही बोलले. याप्रसंगी राजू निमसटकर, संतोष पेंदोर व सुरेश शेंडे यांची देखील भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे संचालन शंकर शेन्डे, प्रास्तविक रवि वनकर यांनी केले तर आभार चंद्रकांत धोटे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेपेरा येथील भारतीय बौद्ध महासभा तथा रमाई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य गण यांनी अथक परिश्रम घेतले.